18 व्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. देशात एकूण 7 टप्प्यामध्ये होणारी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात होत आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक 83 दिवस चालणार आहे. त्यामुळे मतदार राजाला आणि प्रशासनालाही जागे राहण्याची गरज आहे.
राजकीय पक्षांसाठी निवडणुकीचा हंगाम परीक्षेचा असून, मतदार राजासाठी मात्र पाच वर्षाचे भविष्य ठरविणारा आहे. सध्या देशात आणि राज्यात राजकीय पक्षांनी नैतिकता वेशिवर टांगल्याने मतदारांची गोची झाली आहे. भ्रष्टाचारी कोण आणि शाहू कोण हे जनतेला ठरवायचे आहे. न्याय, समता, बंधूता, एकात्मता, धर्मनिरपेक्षता ही संविधानाची मूल्य जपणाऱ्या पक्षाच्या हातात देशाचा कारभार द्यावा लागणार आहे. आज महागाई, बेरोजगारी, मॉबलिंचिंग, जातीभेदाने देशात मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले-आहेत, ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, जे धर्मांधतेला खतपाणी देतात, जे अराजक माजवितात अशा राजकीय नेते, उमेदवारांपासून लोकसभा स्वच्छ ठेवणे ही सुजान जनतेची जबाबदारी आहे. जगात भारत अनेकतेत एकता असणारा एकमेव देश, सर्वात मोठी लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने देशाची ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्नरत राहणे गरजेचे आहे. मतदानाचा हक्क अदा करा. निवडणूक पारदर्शक पार पाडणे जेवढी प्रशासनाची जबाबदारी आहे त्याहून अधिक नागरिकांची आहे.
- बशीर शेख, उपसंपादक
Post a Comment