Halloween Costume ideas 2015
July 2022

आशियातील सर्वात मोठा मॉल उत्तरप्रदेशात उभारला : नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे धर्मांधकांचे उधळाताहेत मनसुबे


उत्तर प्रदेश सारख्या आर्थिकदृष्ट्या आजारी राज्यात निवेश करण्यासाठी जेव्हा केंद्र आणि राज्य सरकारने उद्योगपतींना पुढे येण्याचे आवाहन केले. तेव्हा युसूफ अली यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत लखनऊमध्ये 15 एकर जागेमध्ये 2 हजार कोटी रूपये खर्च करून आशियातील सर्वात मोठा मॉल उभा केला. त्याचे रीतसर उद्घाटन मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांच्या हस्ते ईद उल अजहाच्या दिवशी म्हणजे 10 जुलै 2022 रोजी पार पडले. मात्र तिसऱ्याच दिवशी म्हणजे 13 जुलैला त्या ठिकाणी काही लोकांनी एका कोपऱ्यात नमाज अदा केल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रक्षेपित झाली. आणि मॉलचा विरोध सुरू झाला. या पार्श्वभूमीवर ही घटना काय आहे? त्या मागची मानसिकता काय आहे? याचा वेध घेणे अनुचित होणार नाही म्हणून हा लेखनप्रपंच.

युसूफ अली कोण आहेत? 

युसूफ अली यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1955 रोजी केरळच्या त्रिशूर जिल्ह्याच्या नाटिका नावाच्या छोट्याशा गावात झाला. त्यांनी गावाजवळीलच करणचीरा येथील सेंट झेवियर स्कूल मधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि बिझनेस मॅनेजमेंटमधील डिप्लोमा पूर्ण करून 1973 साली अबुधाबी येथे आपल्या चुलत्याच्या दुकानामध्ये सहकार्य करण्यासाठी गेले. त्यांनी आपल्या अंगभूत गुण आणि नशीबाच्या जोरावर त्या छोट्याशा दुकानाचे रूपांतर एका आंतरराष्ट्रीय रिटेल मार्केटींग चेनमध्ये केले. त्या चेनचे नाव लूलू मॉल असे आहे. लूलूचा अर्थ मोती असा होतो आणि कुरआनच्या सुरे रहमानमध्ये हा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे. त्यावरून हा शब्द त्यांनी आपल्या रिटेनचेनला दिला. आजमितीला लूलू ब्रँडचे 22 देशात 235 मॉल्स आहेत. या लूलू ग्रूपचे मुख्यालय अबुधाबी येथे असून, त्यामध्ये तेथील शाही घराण्यातील एका राजपुत्रानेे एक अब्ज डॉलर गुंतवून लूलू ग्रूपची 20 टक्के भागीदारी खरेदी केली असून, 80 ट्नक्याची मालकी युसूफ अली यांची आहे. ते या ग्रुपचे चेअरमन असून, त्यांच्याकडे एकूण 57 हजार कर्मचारी आहेत व त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 8 अब्ज डॉलर एवढा आहे. त्यांचा समावेश जगातील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये 569 वा आहे. त्यांच्या मॉलची श्रृंखला अमेरिका, युरोप आणि मध्यपुर्वेत प्रामुख्याने आहे. ज्यात ब्रिटनमध्ये बर्मिंगहम शहरात, अमेरिकेत न्यूयॉर्क शहरातील मॉल सामील आहेत. 1990 मध्ये युसूफअली यांनी अबुधाबीमध्ये लूलू ग्रूपचा पहिला हायपर मार्केट -(उर्वरित पान 2 वर)

उभा केला. त्यानंतर सन 2000 पर्यंत त्यांनी खाडीच्या प्रत्येक मोठ्या शहरात लूलू मॉलची श्रृंखला उभी केली. त्यांना तीन मुली असून त्या सर्व व्यावसायामध्ये वडिलांची मदत करतात. 

युसूफ अली हे दानशूर व्यक्ती असून, ऑगस्ट 2018 मध्ये जेव्हा केरळामध्ये महापुरामध्ये अनेक घरे वाहून गेली होती तेव्हा त्यांनी पुनर्वसनासाठी 9 कोटी रूपयांची मदत केली होती. कोरोना महामारीशी लढण्यासाठी त्यांनी 54 कोटीचे दान दिले होते. खाडीमध्ये आपले पाय रोवल्यानंतर युसूफ अली यांनी आपल्या मातृभूमीकडे मोर्चा वळविला. सर्वात अगोदर त्यांनी आपल्या गृहजिल्ह्यात म्हणजे त्रिशूर येथे एक मोठे हॉटेल सुरू केले. 2013 मध्ये त्यांनी कॅथोलिक सिरियन बँकेचे साडेचार टक्के तर धनलक्ष्मी बँकेचे 5 टक्के शेअर्स खरेदी केले. याशिवाय त्यांनी अनेक छोट्यामोठ्या बँकांमध्ये भागीदारी मिळविली. त्यानंतर त्यांनी त्रिशूर आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये दहा टक्के सहभाग मिळविला. 2019 साली त्यांनी केरळाच्या त्रिप्रिया आणि त्रिशूर या ठिकाणी दोन मोठे शॉपिंग मॉल उभे केले. 2021 मध्ये बेंगलुरू तसेच तिरूअनंतपूरम मध्ये दोन मोठे मॉल उभे केले. लखनऊमध्ये त्यांचा मॉल पाचवा असून, गुणवत्तेच्या दृष्टीने हे सर्व मॉल आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. 

वास्तविक पाहता भारताच्या एका सुपूत्राने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे नाव कमाविले. त्यामुळे त्यांचे कौतुक व्हायला हवे पण झाले उलटेच. लखनऊच्या चकचकीत मॉलमध्ये काही समाजकंटकांनी येऊन 13 तारखेला नमाज अदा केली. जी की चुकीच्या दिशेने व घाईघाईत 18 सेकंदमध्ये पूर्ण केल्यामुळे प्रशासनाला संशय आला व यात आतापर्यंत काही बिगर मुस्लिम लोकांना अटकही झाली. तर  14 जुलै रोजी दोन लोकांनी येऊन सुंदरकांडचे पारायण केले. 19 जुलैला अयोध्येतून एक कथित साधुंनी येवून मॉलचे शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला. अर्थात प्रशासनाने तो हाणून पाडला. हा ही आरोप करण्यात आला की, मॉलमध्ये 80 टक्के कर्मचारी मुस्लिम असून, हे भविष्यात जिहादचे केंद्र होणार आहे. यावे खंडन मॉलप्रशासनाने करून मॉलचे व्यवस्थापक गंगाधर यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून मॉलमधील 80 टक्के कर्मचारी हिंदू असल्याचे जाहीर केले. ही बाब दुर्भाग्याची असल्याची प्रतिक्रिया नवदीत सुरी (माजी राजदूत युएई) यांनी ट्विटरवरून व्यक्त केली. 

वास्तविक पाहता एवढा मोठा मॉल मुस्लिम व्यक्तीच्या खाजगी मालकाचे असल्याचे सत्य लखनऊच्या संकीर्ण सांप्रदायिक मानसिकतेच्या काही लोकांना रूचले नाही. त्यातून त्यांनी हे सर्व प्रकार केले, असे समजण्यास वाव आहे. हे सर्व 2014 पासून मुद्दामहून सुरू केलेल्या मुस्लिमांविरूद्धच्या घृणेच्या मोहिमेचा एक भाग आहे. घृणा तीही या दर्जाची की आपल्या शहरात देशातील सर्वात मोठा मॉल आलेला आहे. तेथे वस्तू स्वस्त मिळत आहेत. अनेक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे, याचे कौतुक दूरच राहिले आहे. उलट त्या मॉलला निशाना बनवून बदनाम करण्याची मोहिम सुरू झालेली आहे. असे झाले तर मध्यपूर्वेतून खाडी देशातून आपल्या देशात गुंतवणूक करण्याचे धाडस कोण करणार? याचा कोणी विचार करताना दिसून येत नाही. ही घृणा राष्ट्रहितामध्ये नाही. 

युसूफ अली हे लोकहितवादी उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्यापार करतात. त्यांच्या केरळ राज्यातील मॉलमध्ये जेव्हा सेल लागतो तेव्हा रात्रभर मॉलमध्ये इतके लोक जमा होतात की धावत्या जिन्यावर पाय ठेवायला एक इंच सुद्धा जागा मिळत नाही. स्वस्तात माल विक्री करण्यामध्ये लूलू ग्रूपला जगात तोड नाही. अनेक वस्तूंचे उत्पादन लूलू ग्रूप अबुधाबीमध्ये स्वतःच करतो आणि विशेष म्हणजे त्यासाठी लागणारा कच्चा माल आणि यंत्रसामुग्री भारतातून आयात करतो. थोडक्यात लूलू मॉल श्रृंखला ही देशाच्या हितामध्ये आहे, हेच सत्य आहे. 

जनतेची प्रतिक्रिया

सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा या सर्व घटनाचक्रामधून तीन गोष्टी चांगल्या घडल्या आहेत एक म्हणजे लोकांना माहित नसलेले युसूफ अली आता सर्वांच्या ओळखीचे झालेले आहेत. दोन लखनऊमध्ये लूलू नावाचा एक मोठा मॉल आहे याचीही प्रसिद्धी आपोआप जगभरात झालेली आहे. तीसरी चांगली गोष्ट अशी की या सर्व नकारात्मक मोहिमेनंतरसुद्धा जनतेचा भरभरून प्रतिसाद या मॉलला मिळत आहे. यातून संकीर्ण प्रवृत्तीच्या लोकांनी काय तो बोध घ्यावा. 

घृणेची कारणे?

याठिकाणी मुस्लिमांनी विशेष लक्षात घेण्याची बाब म्हणजे भारतात मुस्लिमांविषयीची जी घृणा आहे ती इस्लामसाठी काही नवीन नाही. सातव्या शतकात मक्का शहरात सुद्धा जेव्हा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी इस्लामची घोषणा केली होती तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी राहणारे बहुसंख्य मुर्तीपूजक कुरैश हे अल्पसंख्यांक एका ईश्वराची उपासना करणाऱ्या मुस्लिमांविषयी जी भावना बाळगून होते तीच भावना आज भारतीय बहुसंख्यांक समाज अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाबद्दल बाळगून आहे. घृणेचे एक अत्यंत वाईट उदारहण म्नका शहरातील एक सरदार अबु सुफियान याच्या पत्नीचे देता येईल. जिचे नाव हिंदा होते. तीने इस्लामच्या द्वेषापोटी प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि त्यांच्या अल्पसंख्यांक गटाला मदत करणाऱ्या हम्जा रजि. या सरदार व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या चुलत्याची हत्या आपल्या गुलामामार्फत करून त्यांच्या प्रेताची छाती चिरून त्यांचे काळीज चाऊन चोथा केले होते. वास्तविक पाहता हम्जा रजि. आणि हिंदा यांच्यात कुठलेही वैर नव्हते, व्यवहार नव्हता तरीपण केवळ मुस्लिमांविषयी असलेल्या घृणेमुळे तिने असे अघोरी कृत्य केले. मूर्तीपूजा करणारे आणि एका ईश्वराला न मानणारे यांच्यामधील परंपरागत विरोध हे यामागील मूळ कारण आहे. म्हणून त्या काळात प्रेषित मुहम्मद सल्ल. बहुसंख्य कुरैश यांच्याशी व्यवहार करतांना जे धोरण अवलंबिले होते तेच धोरण आता आपल्याला अवलंबवावे लागेल. त्यासाठी त्या काळात प्रेषित सल्ल. कसे वागले? त्यांचे साहबा रजि. कसे वागले? त्यांनी त्या काळी बहुसंख्यांकांशी व्यवहार करताना कुठली काळजी घेतली? इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास करून उलेमांना मस्जिदीमधून मुस्लिमांना मार्गदर्शन करावे लागेल. त्यांचे प्रशिक्षण करून घ्यावे लागेल. तेव्हा कुठे त्यांचे प्रबोधन होवून भविष्यात फरक पडू शकेल.  

माणूस तेव्हाच समाजोपयोगी होऊ शकतो जेव्हा त्याचे मन शुद्ध असते. अशुद्ध मनस्थिती असणारे लोक समाजासाठी हानिकारक असतात. चांगल्या गोष्टीतूनही ते वाईट अर्थ काढतात. म्हणूनच युसूफअली यांच्या समाजोपयोगी कार्यातसुद्धा काही लोकांना वाईटपणाच दिसला. 

अल्पसंख्यांक मुस्लिम आणि बहुसंख्यांक हिंदू बांधवांच्या आपसातील संबंधाची व्याख्या करताना जमाअते इस्लामी हिंदचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी रहे. असे म्हणतात की,’’ बिगर मुस्लिम कौमों के साथ मुस्लिम कौम के तआल्लुकात की दो हैसियते हैं. एक हैसियत तो ये है के इन्सान होने के नाते हम और वो एकसां हैं. दूसरी हैसियत ये है के, इस्लाम और कुफ्र के इख्तेलाफ ने हमें उनसे जुदा कर दिया है. पहली हैसियत से हम उनके साथ हमदर्दी, फय्याजी, रवादारी और शफ्फक्कत का हर वो सुलूक करेंगे जो इन्सानियत का तकाजा है और अगर वो दुश्मने इस्लाम न हों तो उनसे दोस्ती, मस्लेहत और मसालेहत भी कर लेंगे और मुश्तरका मकासिद के लिए तआवुन करने में भी दरेग न करेंगे. मगर किसी भी तरह का मआद्दी और दुनियावी इश्तेराक हमको इस तौर से जमा नहीं कर सकता के, हम और वो मिलकर एक कौम बन जाएं और इस्लामी कौमियत को छोडकर कोई मुश्तरका हिंदी कौमियत, चिनी, मिस्री कौमियत की तरह कुबुल कर लें. क्यूं की हमारी दूसरी हैसियत इस किस्म के इज्तेमा में मानेअ है. कुफ्र और इस्लाम का मिलकर एक कौम बन जाना कतअन मुहाल है.’’ (संदर्भ : मसला-ए-कौमियत पान क्र .36).

म्हणजे आपले स्वतंत्र अस्तित्व जपत आपण बहुसंख्य बांधवांशी जेवढे चांगले संबंध ठेवणे शक्य असतील तेवढे ठेवणे अपेक्षित आहे. व नशिबाने असे संबंध देशभरात आहेत. परंतु कधी-कधी त्यामध्ये बाधा येते व आपसातील संबंध ताणले जातात. मुस्लिमांचे दुर्दैव हे आहे की, जेव्हा दोन्ही समाजातील संबंध सामान्य स्थितीमध्ये असतात तेव्हाच आपल्या नैतिक  व लोकहितवादी वर्तनाने बहुसंख्य बांधवांना प्रभावित करण्याची व इस्लामचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची संधी आपण वाया घालवितो. म्हणून आपण त्यांना वेगळे वाटतो. मला विश्वास आहे आपला हा वेगळेपणा जर बहुसंख्यांक  बांधवांना पावलो पावली उपयोगी पडत असेल (जसे की लूलू मॉल उपयोगी ठरत आहे) तर त्याचा फार दिवस विरोध बहुसंख्य बांधवांकडून होणार नाही. कालौघात तो विरोध आपोआप गळून पडेल. मात्र अडचण अशी आहे की, साधारणपणे आपण स्वतःच कुरआनला अपेक्षित असलेल्या मुस्लिमांसारखे जीवन जगत नाही. मग दुसऱ्यासमोर ते कसे मांडणार? थोडक्यात बहुसंख्यांक बांधवांकडून मुस्लिमांविषयी असलेल्या घृणेच्या अनेक कारणांपैकी मुस्लिमांची स्वतःची वाईट वर्तणूक हे ही एक कारण आहे. हे सत्य आपल्याला अगोदर स्वीकारावे लागेल तेव्हाच त्यावर आपल्याला उपाय करता येईल. 

लोकशाहीमध्ये अल्पसंख्यांकांनी कितीही आरडा ओरडा केला तरीही ते बहुसंख्यांकासमोर आव्हान उभे करू शकत नाहीत. म्हणून प्रत्यक्षात जिभेचा  कमी करत प्रत्यक्षात सातत्याने चांगले वागत राहणे, व योजनाबद्दल पद्धतीने स्वतःला देशासाठी उपयोगी बनविणे (जसे की युसूफ अली यांंनी स्वतःला बनविले आहे) हाच एकमेव उपाय आहे. यासाठी त्यांच्यासारखाच, लंबा इतंजार करण्याची हिम्मत आणि शांतपणे कष्ट करत राहण्याची गरज आहे. 

बहुसंख्य मुस्लिमांचा प्रत्यक्षात कुरआनशी संपर्क तुटल्यामुळे त्यांच्यामध्ये संयमाचा अभाव निर्माण झाला आहे. मनाविरूद्ध घडलेल्या घटनांविषयी तात्काळ संतप्त प्रतिक्रिया देण्याची खाज आपण दाबू शकत नाही, हे मुस्कान खानच्या हिजाबच्या घटनेवरून व नुपूर शर्माच्या प्रकरणानंतर मुस्लिमांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून पुन्हा सिद्ध झालेले आहे. नशीब लूलू मॉलबद्दल आतापर्यंत तरी कुठल्याही मुस्लिम संघटनेने काही आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिलेली नाही.  

इस्लामचा उद्देश लोकांना नैतिक दृष्टीने श्रेष्ठ बनविणे आहे. हे सत्य मुस्लिमांमधील बहुसंख्या नेत्यांच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत बहुसंख्यांकांची आपल्या विरूद्धची घृणा कमी होणार आहे. 

खामोशी की तह में छुपा लिजिए सारी उलझने

शोर कभी मुश्किलों को आसान नहीं करता  

म्हणून अत्यंत संयमाने देशात वाढत असलेल्या सांप्रदायिक परिस्थितीतीला धैर्यपूर्वक तोंड देण्याशिाय आपल्याला पर्याय नाही. सैन्यामध्ये एक प्रसिद्ध म्हण अशी आहे की, ‘‘शांततेच्या काळात सैन्य जेवढे जास्त घाम गाळेल युद्धाच्या काळात त्याला तेवढेच कमी रक्त गाळावे लागते’’ हीच गोष्ट मुस्लिमांसाठी लागू होते. शांततेच्या काळात आपल्या लेखणी , वाणी आणि वर्तनातून मुस्लिम समाज जेवढे इस्लामी आचरण करेल, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवेल, तेवढाच अशा सांप्रदायिक तेढ निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांची कमी हानी होईल. कोट्यावधी लोक दर दिवशी नमाज अदा करतात, दर रमजानला महिनाभराचे रोजे ठेवतात, हजारो लोक दरवर्षी हजला जातात पण त्यांच्यातील फार कमी लोकांमध्ये सकारात्मक बदल घडतो. बाकी सर्व पालथ्या घागरीवर पाण्यासारखे होऊन गेलेले आहे. 

नेशन स्टेटचे सत्य

हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे ती ही की सध्या 21 वे शतक चालू असून, आतापर्यंत सर्वच देशांच्या सीमा निश्चित झालेल्या आहेत. नेशन स्टेटच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झालेले आहे. आता बहुसंख्य नागरिकांना अल्पसंख्य नागरिकांची भीती घालून काही साध्य होणार नाही. नेशन स्टेट तेव्हाच होते जेव्हा नेशनमध्ये राहणारे सर्व नागरिक, त्या देशाचे नागरिक मानले जातात. शांततापूर्ण सहअस्तित्वाशिवाय, दोघांनाही पर्याय नाही आणि त्या शिवाय देशाची प्रगती होणे शक्य नाही. ज्या दिवशी हे सत्य बहुसंख्यांक बांधवांच्या लक्षात येईल त्या दिवशी भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. ज्याप्रमाणे चीनने एकेका नागरिकाला मौल्यवान समजून त्याच्याकडून राष्ट्रनिर्मितीचे काम करवून घेतले. त्याचप्रमाणे भारताच्या प्रत्येक नागरिकाला मौल्यवान समजून कामाला जुंपले पाहिजे. हिंदू मुस्लिम करत बसले तर देश प्रगती करणार नाही. जय हिंद ! 

शेवटी इश्वराकडे प्रार्थना करतो की, ऐ अल्लाह! माझ्या या प्रिय देशामध्ये जातीय तेढीचे वातावरण जे लोक निर्माण करीत आहेत त्यांना सद्बुद्धी दे. त्यांना कळत नाहीये के ते देशाचे किती मोठे नुकसान करीत आहेत आणि आम्हाला इस्लामचा संदेश लेखणी, वाणी आणि वर्तणुकीतून बहुसंख्य समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्याची समज आणि शक्ती दे आमीन. 

- एम. आय. शेख



भारताने 2018 पासून लोकसंख्याशास्त्रीय सुवर्ण काळात प्रवेश केला आहे. पहिल्यांदाच भारतातील 15 ते 64 या वयोगटातील लोकसंख्या त्या वयोगटा बाहेरील लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. म्हणजे कमवू शकणाऱ्या नागरिकांची संख्या ही त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत अधिक आहे.  हा काळ 2055 पर्यंत एकूण 37 वर्षे असण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये भारताचे सरासरी वय अंदाजे 28 आहे जे चीन व अमेरिकेमध्ये 37 आहे. ही एक मोठी संधी समजली जाते, ज्याचा फायदा चीन, दक्षिण कोरिया, जपान व थायलंड यांच्यासारख्या आशियाई देशांनी चांगल्या प्रकारे उचललेला दिसून येतो. उपलब्ध मनुष्यबळाला साजेसे उद्योग धंदे, कारखाने यांची निर्मिती त्या देशांनी केली. पण भारतात काय परिस्थिती आहे? 

जून 2022 च्या आकडेवारीनुसार, मे 2022 मध्ये उपलब्ध असणाऱ्या 40.04 कोटी नोकऱ्या एका कोटी ने कमी होऊन 39 कोटी झाल्या. बेरोजगारीचा दर वाढून  7.80% झाला, शहरी भागातील बेरोजगारी 7.3% तर ग्रामीण भागातील 8.03% आहे. मे 2016 मध्ये भारताची कार्यक्षम लोकसंख्या अंदाजे 95 कोटी होती ज्यात पाच वर्षात अंदाजे 11 कोटींची भर पडून ती फेब्रुवारी 21 मध्ये 106 कोटींपर्यंत गेली. मे 16 मध्ये 95 कोटींपैकी 46 कोटी म्हणजेच जवळपास 48% नागरिक या कामगारशक्तीचा (लेबर फोर्स) भाग होते जे फेब्रुवारी 21 मध्ये 106 कोटींपैकी 46 कोटी म्हणजे 40% पर्यंत खाली आले. एप्रिल 20 मध्ये कोविड मधल्या लॉकडाऊनमुळे 35.57% इतके खाली गेले होते जे आता 38.8% इतके कमी आहे. मागच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात 20 ते 24 वयोगटातील भारतातील बेरोजगारी 63% इतकी होती तर तेच प्रमाण 20 ते 21 वयोगटात 40% होते. सध्या तरुण बेरोजगारांची संख्या अंदाजे 25% इतकी आहे. देशातील 27 स्टार्टअप मध्ये दहा हजार पेक्षा जास्त कपात झाली. दैनंदिन व्यवहारात, नोकरी धंद्यात व अर्थकारणात स्त्रियांचा सहभाग 25% वरून 11%  व शहरी भागात हे प्रमाण 6.56% इतके खाली आले आहे. (बांगलादेशातील अर्थकारणातील स्त्री सहभाग मागील दहा वर्षात साधारण दहा टक्क्यांनी वाढून 30% च्या वर गेला आहे). जगातील तरुण व स्त्रियांच्या लेबर फोर्स मधल्या सहभागात भारताचा क्रमांक तळाचा आहे. जागतिक बँकेचे पूर्व प्रमुख अर्थशास्त्रज्ञ  कौशिक बासू यांच्या मते, भारतात  सद्यघडीला असणारी बेरोजगारीची समस्या ही गेल्या तीन दशकातील सर्वात भीषण आहे. 

बेरोजगारीची आकडेवारी कशी मांडली जाते ? 

एक कार्यरत (एम्प्लॉईड) असणारे, दुसरे कामाचा शोध न घेणारे आणि तिसरे, जे शोधात आहेत परंतु त्यांना काम किंवा नोकरी मिळत नाही असे. एनएसएसओ ही राष्ट्रीय सर्वेक्षण करणारी संस्था आहे, ज्यांचे बेरोजगारीच्या सर्वेक्षणाचे काही निकष असतात. सर्वेक्षणाच्या तारखेआधी किमान शंभर दिवस (तीन महिने) जी व्यक्ती कामाचा शोध घेत आहे परंतु कामाची संधी मिळाली नाही अशा व्यक्तीला बेरोजगार समजले जाते. याचा अर्थ नोकरीसाठी प्रयत्न न करणाऱ्या नागरिकांना यातून वगळले जाते. आकडेवारी तीन प्रकारे मांडली जाते. एक ’वार्षिक’ ज्यात सर्वेक्षणाच्या दिवसाआधी एक वर्ष किंवा 365 दिवस नोकरीची संधी न मिळालेले, साप्ताहिक म्हणजे आठवडाभरात एकही कामाची संधी न मिळालेले आणि दैनिक म्हणजे दिवसभरात तासाभराच्या कामाची संधी सुद्धा न मिळू शकलेले नागरिक. कामाची संधी मिळूनही कोणत्याही कारणास्तव ती संधी न स्वीकारणाऱ्यांची यात गणना होत नाही. उदाहरणार्थ एकूण 1000 इतकी 15 ते 64 वयोगटातील लोकसंख्या पकडली आणि त्यातील 50% म्हणजे 500 व्यक्ती कार्यक्षम आहेत असे समजू. जर बेरोजगारीचा दर 5% पकडला तर त्याचा अर्थ 500 पैकी 25 व्यक्ती सक्रियपणे कामाच्या शोधात होत्या परंतु त्यांना काम मिळू शकले नाही. जर त्या 25 पैकी 10 लोकांनी कोणत्याही कारणास्तव काम शोधायचे बंद केले तर कामगार शक्ती 500 वरून घसरून 490 पकडली जाते आणि त्या आकड्याच्या आधारावर बेरोजगारीचा दर मोजला जातो. म्हणजेच काम नसणाऱ्या नागरिकांच्या संख्येत घट न होता देखील बेरोजगारीचा दर मात्र घटतो ज्याला छुपी बेरोजगारी म्हणतात.  मागील काही वर्षात नागरिकांमध्ये रोजगाराप्रती आलेले औदासिन्य पाहता, ही समस्या अधिक गंभीर बनते. शिवाय बेरोजगारीच्या जोडीला अल्प बेरोजगारी देखील आहेच. अल्पबेरोजगारी चे उदाहरण म्हणजे जर एखादा मजूर दिवसभरात 12 ते 14 तास काम शोधतो परंतु त्यातील फक्त 2 ते 3 तासांचेच काम उपलब्ध होत असेल तर त्यांनाही बेरोजगार समजले जात नाही. सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायजेस (उझडएी) केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेच्या आकडेवारीनुसार या क्षेत्रातील नोकरीच्या संधी सातत्याने कमी होत आहेत. 

अगदी 2018/19 च्या सर्वेक्षणानुसार 2009/10 मध्ये असलेली कर्मचाऱ्यांची संख्या 14.90 लाखांवरून 2018/19 मध्ये 10.33 लाख इतकी खाली आली होती. पण या नोकऱ्यांचे आकर्षण मात्र कमी झाले नाही कारण संधी कमी झाल्या तरी मानधनात सातत्याने वाढ झाली. नोकरीची शाश्वती, इतर भत्ते व सुविधा या व्यतिरिक्त जर दहा वर्षात सरासरी पगार 5.89 लाख वरून 14.78 लाख रुपये झाला. म्हणूनच शिपाई किंवा इतर कनिष्ठ पदासाठी हजारोंच्या संख्येने अर्ज असतात ज्यात पदवीधर, इंजिनियर, अगदी डॉक्टरेट मिळवणारे देखील असतात.

असंघटित किंवा अनौपचारिक अर्थव्यवस्थेचा वाटा 50% असून 90% रोजगाराच्या संधी मात्र या क्षेत्रातून उपलब्ध होतात. हे क्षेत्र जास्त असुरक्षित व प्रभावित आहे. या क्षेत्रातील आकडेवारी नसल्यामुळे बेरोजगारीच्या समस्येचे गांभीर्य जनतेसमोर येत नाही. लेबर इकॉनॉमिस्ट राधिका कपूर यांच्या मते बेरोजगारी हि अशी ’चैन’ आहे जी शिक्षित किंवा थोडीफार बरी आर्थिक परिस्थिती असलेल्यांनाच परवडू शकते. गरीब, अर्धशिक्षित किंवा अकुशल कामगारांचे तेवढे भाग्य नाही. म्हणजेच पडेल ते, मिळेल त्या मोबदल्यात काम करण्याव्यतिरिक्त पर्याय नसलेली मोठी लोकसंख्या जगण्यासाठी झगडत आहे. एकूण वर्कफोर्स पैकी 75% स्वयंरोजगारीत किंवा पडेल ते काम करणाऱ्या श्रेणीतील आहेत. ज्यांना कोणत्याही सुविधा, भत्ते किंवा सुरक्षितता नाही. निवृत्तीवेतन, आरोग्य विमा, तीन वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरीची हमी, या व असल्या सुविधा असलेल्या नोकऱ्या करणाऱ्यांचे प्रमाण अंदाजे 2% इतके कमी आहे आणि फक्त 9% नागरिकांना नोकरीमध्ये किमान एका सामाजिक सुरक्षेची हमी असलेली नोकरी आहे. थोडक्यात बेरोजगारीचे भीतीदायक वाटणारे आकडे देखील एकंदरीत अर्थव्यवस्थेचे खरे विदारक दृश्य दर्शवीत नाहीत. 

भारताची आतापर्यंत झालेली प्रगती ही कृषी अर्थव्यवस्थेपासून सेवाक्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्थेच्या दिशेने झालेली आहे ज्यात सॉफ्टवेअर, किंवा वित्तीय सेवा यासारख्या क्षेत्रांचा सहभाग आहे. तज्ज्ञांच्या मते भारतासारख्य अर्थव्यवस्थेने केवळ सेवा क्षेत्रावर विसंबून न राहता वस्तुनिर्मिती किंवा उत्पादनावर भर दिला पाहिजे. कारण सेवा क्षेत्रामध्ये उच्चशिक्षित व कुशल कामगारांनाच सहभागी होता येते त्या विपरीत उत्पादन क्षेत्रात अल्पशिक्षित किंवा अकुशल कामगारांनासुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. लोकसंख्याशास्त्रीय सुवर्णकाळ असलेल्या काळाचा फायदा घेणाऱ्या देशांनी त्याचा अंदाज घेऊन मोठे कारखाने चालू केले, उत्पादनक्षमता वाढवली व त्याच बरोबरीने किमान दशकभर आधीपासून शिक्षण व कौशल्य क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली. भारतात मात्र 6% हे ध्येय असताना एकूण जीडीपीच्या केवळ 3% शिक्षणावर खर्च केला जातो. 

लघु व मध्यम उद्योग क्षेत्र, कामगारांचे हक्क याबाबतीत सरकारी धोरण ढिसाळ राहिले आहे. त्यात 2016 मध्ये नोटबंदीसारखा निर्णय घेतला गेला ज्याचे दुष्परिणाम विविध व्यवसायांवर व त्या क्षेत्रातील नोकऱ्यांवर झाले. त्यापाठोपाठ आलेल्या जीएसटीच्या अंमलबजावणीतील त्रुटींचा देखील तेवढाच हातभार लागला. 2011/12 मध्ये देशातील जीडीपी च्या 34.31% इतके प्रमाण देशातील व्यवसायात होणाऱ्या गुंतवणुकीचे होते. 20/21 मध्ये ते 30.91% झाले. याचा अर्थ एकूण उत्पन्नापैकी जी रक्कम उद्योग किंवा व्यवसाय निर्मितीमध्ये होत होती त्यात घट झाली. आजच्या घडीला बेरोजगारी ही देशाची सर्वात मोठी समस्या बनली आहे जी अक्राळविक्राळ रूप धारण करण्याआधी, तज्ज्ञांच्या सल्ल्याने महत्वाची पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा आपण एका जागृत ज्वालामुखीच्या तोंडाशी उभे आहोत हे ध्यानात असावे. 

- सूरज सामंत



ओडिशा मधील मयूरभंज जिल्ह्यातील अपरबेडा या एका छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू ज्यांचा वाडवडिलांचा कोणताही राजकीय सत्ताधारी इतिहास नव्हता. त्या भारतासारख्या बलाढ्य देशाच्या राष्ट्रपती बनतील हा साधा विचार कोणी केलाही नसेल. आपल्या गावातून उच्चशिक्षणासाठी कॉलेजला जाणाऱ्या त्या प्रथम विद्यार्थीर्नी होत्या. 

मुर्मू यांनी शिक्षण संपल्यावर शासकीय नोकरी केली. नोकरी करत असताना त्या एका शाळेत मुलांना शिक्षण देत होत्या. पण कमाईसाठी नव्हे तर मुला-मुलींना शिक्षणाची दारे खुली करता यावी यासाठी त्या क्षुल्लक प्रमाणात विद्यार्थ्यांकडून फी घेत होत्या. त्या मुलांना शिक्षण देत असताना तत्कालीन एका बीजू पटनाईक दलाच्या आमदारांनी त्यांना पाहिलं आणि त्यांची सेवा पाहून त्यांना फार कौतुक वाटले. ह्या आमदारांनी तोपर्यंत भाजपात प्रवेश घेतला होता. 

ओडिशामध्ये भाजपाचा विस्तार करण्यासाठी ते अशा व्यक्तींच्या शोधात होते. त्याच सुमारास स्वतंत्र झारखंडच्या मागणीसाठी आंदोलन चालू होते. झारखंड या स्वतंत्र आदिवासी राज्याकडे केवळ बिहारचेच लोक नाही तर पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील आदिवासी समाजाला आकर्षण होते. साहजिकच श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचाही त्यास पाठिंबा असणार.

नंतर 1997 साली भाजपाने त्यांना मयुरभंज येथील नगर पालिकेच्या निवडणुकीत आणले. त्यांना त्यांनी शहरातील स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी ती जबाबदारी अगदी सहजपणे आणि कुशलतेने पार पाडली. 

नंतर 2000 आणि 2004 सालीच्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत मुर्मू दोन्ही वेळेल्या जिंकल्या आणि मंत्रपदी विराजमान झाल्या. भाजपाचे एक नेते म्हणत काही लोक माझ्यासमोर त्यांच्या विषयी बोलायचे आणि त्यांच्या समोर माझ्या विरूद्ध बोलायचे. मूर्मू यांनी त्या वेळी त्यांना सांगितले होते की आपण दोघांना असे बोलणाऱ्यांना तिथले तिथेच रोखलं तर आपण आपलं कार्य चांगल्या रीतीने करू शकू. 

2015 साली त्यांनी राज्यपाल म्हणून नियुक्त केले. काँग्रेस आणि भाजपा दोन्हीच्या शासनात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. झारखंडचे राज्यपालपदी असताना तत्कालीन मुख्यमंत्री रघुबरदारस यांनी 200 वर्ष जुने भूसंपादन कायद्यात बदल करून दोन नवीन कायदे केले होते. त्यावर राज्यपालाची सही हवी होती. त्यांनी त्या दोन कायद्यांची मंजुरी नाकारताना असे म्हटले होते की मी माझ्या लेखणीने कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. हे कायदे आदिवासी समाजाच्या मालकीतील जमीनींच्या औद्योगिक विकासासाठी मोठ्या उद्योगपतींना द्यायच्या होत्या. 

एक आदिवासी महिला ज्यांचा कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या बळावर आपली नैतिकता आणि प्रामाणिकता स्थापित करून देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचल्या आहेत. त्यांना आदिवासी समाजाचीच नव्हे तर इतर मागासवर्गांची सध्याची दयनीय परिस्थितीची जाणीव आहे. भारताच्या मागासवर्गीय जाती जमातींना आर्थिक, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात ज्यांना वास्तविक वाटा मिळालेला नाही पण संवैधानिक मर्यादांचे पालन करताना त्या अशा दुर्लक्षित समाजाच्या विकासासाठी काम करू शकतील का हा प्रश्न आहे.

नोव्हेंबर 2018 वर्षी एका आंतरराष्ट्रीय बँकिंगच्या विषयावर बोलताना त्या असे म्हणाल्या होत्या की, झारखंड आणि भारत सरकार बँकिंगच्य सुविधा आदिवासी जमाती पर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत असले तरी मागासजाती जमातीची परिस्थिती आजही अत्यंत दयनीय आहे. आजही ते दारिद्रयाशी झुंज देत आहेत.


एस.आय.ओ.चा उपक्रम : आंतरशालेय सीरत नॉलेज टेस्ट स्पर्धेत 500 विद्यार्थ्यांचा सहभाग; समीरा पठाण प्रथम


लातूर (जुनेद अकबर) :
 

शिक्षणाचा मुख्य उद्देश चारित्र्य निर्मिती असून प्रेषित मुहम्मद सल्ल. हे आदर्श चारित्र्यसंपन्नतेचे उदाहरण आहेत. त्यामुळे सर्वांनी त्यांच्या जीवनीचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे आवाहन मुफ्ती अब्दुल्लाह यांनी केले आहे. 

शहरातील स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या वतीने नुकतीच आंतरशालेय सीरत नॉलेज टेस्ट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी बक्षीस वितरण समारोह 16 जुलै रोजी लातुरातील साठफूट रोडवरील एम के फंक्शन हॉल येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमाअते इस्लामी हिंदचे केंद्रीय सदस्य तौफिक असलम खान होते. मंचावर प्रमुख पाहुणे मुफ्ती अब्दुल्लाह शेख, डॉ. असद पठाण होते.

नॉलेज टेस्ट स्पर्धेमधून तीन पारितोषिक काढण्यात आली. यामध्ये डॉ.जाकीर हुसैन विद्यालयातील पठाण समीरा अब्दुल रहीमखान हिने प्रथम क्रमांक पटकाविला, द्वितीय मिनार उर्दू शाळेतील पठाण आदीबा सिद्दीक तर मौलाना अबुल कलाम आझाद विद्यालयातील मनियार उज्मा आरेफ तृतीय आली. विजेत्यांना जमाअते इस्लामी हिंदचे केंद्रीय सदस्य तौफिक असलम खान, मुफ्ती अब्दुल्लाह शेख, डॉ. असद पठाण यांच्या हस्ते शनिवारी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 

यावेळी तौफीक असलम खान यांनी कुरआन मधील आयतींचा संदर्भ देत म्हणाले की, ’’अल्लाह कुरआन मध्ये फरमावितो की, पैगंबर मुहम्मद सल्ल. हे फक्त मुस्लिमांसाठीच पृथ्वीवर पाठविले गेले नसून, समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी पाठविले गेले आहेत. त्यामुळे सर्वांनी पैगंबरांचे जीवनचरित्र आणि कुरआनचे अध्ययन करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रेषित सल्ल. यांच्या जीवनचरित्रातून यशस्वीतेचा मार्ग सापडतो. ऐहिक आणि पारलौकिक जीवनाबद्दल मनातील शंका-कुशंका -(उर्वरित पान 7 वर)

दूर होऊन ईश्वरीय मार्गावर चालण्यासाठी माणूस प्रयत्न करतो. त्यामुळे आपसुकच त्याच्या जीवनात समृद्धीचे द्वार उघडते. आपल्याला ईश्वरीय मार्ग प्रेषितांच्या माध्यमातून समजला. त्यांचे जीवन चालते बोलते कुरआन होते. त्यामुळे त्यांच्या मार्गावर आचरण करणे समस्त मानवकल्याणासाठी फायदेशीर असल्याचे ते म्हणाले. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात लोकांनी पुस्तकांपासून फारकत घेतल्याचे वाटते. कुठल्याही गोष्टीची इत्यंभूत माहिती न घेता ते मत व्यक्त करतात. त्यामुळे अडचणी वाढतात. यासाठी  माणसाने कोणत्याही गोष्टीबद्दल कुठलीही धारणा बनविण्याच्या अगोदर त्याबद्दल जाणून घेणे आवश्यक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

डॉ. असद पठाण म्हणाले, समाज परिवर्तनासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे साधन असून समाज सुधारणेसाठी उच्च शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणातून माणसाची जडण घडण होते. समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असून, ते वाढविण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. अल्लाहने सर्वात अगोदर शिक्षण घेण्यासाठी बाध्य केले आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त शिक्षण घेतले पाहिजे. कुरआन आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या माध्यमातून आम्ही सरळ मार्ग शोधू शकतो. आमच्या जीवनाची आम्ही खरी प्रगती करू शकतो. हे युग विज्ञानाचे असून, विज्ञानाला जाणून घेण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे आणि विज्ञानाचे मूळ शोधण्यासाठी आम्हाला कुरआनचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असल्याचेही डॉ. पठाण म्हणाले.  

स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन तर्फे 30 जुन रोजी लातूर शहरातील विविध विद्यालयात प्रेषित हजरत मुहम्मद (सल्ल.) यांच्या जीवन चरित्रावर आंतरशालेय नॉलेज टेस्ट घेण्यात आली होती. या स्पर्धेत 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. 

बक्षिस वितरण कार्यक्रमास 750 विद्यार्थी, पालकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक एसआयओ शराहध्यक्ष मुसद्दीक शेख यांनी केले. यावेळी त्यांनी एसआयओचा परिचय करून कार्यक्रमाचा उद्देश, परीक्षेचे महत्व सांगितले. 

सुत्रसंचालन जुनैद सिद्दीकी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहा पटेल, जुनैद अकबर, इंजीनियर शादाब शेख, मुसद्दीक शेख,मोहम्मद शेख, सय्यद मुजाहिद,फैजान पटेल, मुदब्बीर पटेल, अली हैदर पटेल, फैजान पटेल, फैजान शेख, जहीर, नइम,  शाहिद,रौफ, तोहीद शेख ने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते.



प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, आदमच्या संततीने पोटापेक्षा अधिक कोणतं भांडं भरलं नसेल. त्याला काही घास पोट भरण्यासाठी पुरेशे आहेत जे त्याला ताठ उभे राहण्यास मदत करतील. तरी पण त्यापेक्षा अधिक खायचेच असेल तर इतके जेवा पोटाचा एकतृतीयांश अन्नासाठी, एकतृतीयांश  पाण्यासाठी आणि एकतृतीयांश श्वास घेण्यासाठी असेल. (हमकदाम र., तिर्मिजी)

जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी खैबर जिंकले तेव्हा तिथे अमाप फळे आण इतर खायच्या वस्तू होत्या. लोकांनी भलतीच फळे इत्यादी वस्तू खाल्ल्या ज्यामुळे त्यांना ताप आला. लोकांनी प्रेषितांकडे तक्रार केली तेव्हा प्रेषित (स.) म्हणाले, ताप मृत्यूचा संदेश देतो. ताप आल्यावर थंड पाण्याने आंघोळ करा. लोकांनी तसेच केले आणि त्यांचा आजार निघून गेला.

माणसं जेव्हा अगोदर केलेलं जेवण पचण्याआधीच पुन्हा जेवायला बसतात तेव्हा ते आपल्या विनाशाला आमंत्रण देत असतात. कमी खाण्याने आत्मा तृप्त असतो, माणसात मवाळपणा येतो, मेंदूला ऊर्जा मिळत असते, राग येणे कमी होते, माणूस मनमिवाऊ वृत्तीचा असतो. जास्त खाल्ल्याने माणसामध्ये बुद्धिमत्ता वाढत नसते, तसेच कमी खाल्लाने झोपही जास्त येत नसते. वैध वस्तू जरी असल्या तरी त्यांचे सेवन कमी करावे, कारण ज्यास जास्त खाण्याची सवय जडली तर तो हराम (निषिद्ध वस्तूंचे) देखील सेवन करणार.

ज्यांनी आपलं पोट नियंत्रणात ठेवलं त्याने आपल्या धर्माचं रक्षण केले. ज्यांनी भुकेला नियंत्रित केलं त्याने चांगलं चारित्र्य संपादन केले. भुकेलेला माणूस बऱ्याच गुन्ह्यांपासून अलिप्त राहतो. पोट भरून जेवल्याने मन मुरदाड अवस्थेत जाते.

प्रेषित (स.) म्हणाले की मुस्लिम एक पट जेवतो तर नाकारणारे सात पटींनी अधिक जेवतात.

प्रेषित (स.) पुढे म्हणाले की एका माणसाचे जेवण दोन माणसांना आणि दोन माणसांचे जेवण तीन माणसांना पुरत असते. तसेच तीन माणसांच्या जेवण चार माणसं खाऊ शकतात.

माता हजरत आयेशा (र.) म्हणतात, (मक्केतून) मदीनेला आल्यानंतर प्रेषितांच्या घरच्या लोकांना निरंतर तीन दिवस भाकरीसुद्धा पोटभर मिळाली नाही आणि अशाच अवस्थेत प्रेषितांनी जगाचा निरोप घेतला.

प्रेषित (स.) म्हणतात, माझ्या समुदायातील वाईटांत वाईट असे लोक असतील ज्यांचे पालनपोषण भल्या मोठ्या ऐशआरामात झाले असेल. विभिन्न प्रकारचे पक्वान्न त्यांनी खाल्ले असेल.

एका माणसाने ढेकर दिली, त्यावर प्रेषित (स.) म्हणाले, आपला ढेकर आपल्यापासून लांबच ठेवा. या जगात पोटभर खाणारे परलोकात बराच काळ उपाशी असतील.

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(२५) सरतेशेवटी यूसुफ (अ.) पुढे आणि ती मागे असे दाराकडे धावले आणि तिने पाठीमागून यूसुफ (अ.) चा सदरा (ओढून) फाडून टाकला. दारावर त्या दोघांनी तिच्या पतीला उपस्थित पाहिले. त्याला पाहताच स्त्री म्हणू लागली, ‘‘कोणती शिक्षा आहे त्या माणसासाठी ज्याने तुझ्या पत्नीवर वाईट हेतू ठेवावा? याशिवाय अन्य कोणती शिक्षा असू शकते की तो कैद केला जावा अथवा त्याला कठोर यातना दिली जावी?’’ 

(२६) यूसुफ (अ.) ने सांगितले, ‘‘हीच मला फूस लावण्याचा प्रयत्न करीत होती’’ त्या स्त्रीच्या स्वत:च्या कुटुंबियांपैकी एका व्यक्तीने (परिस्थितीजन्य पुराव्यावरून) साक्ष प्रस्तुत केली२४ की, ‘‘जर यूसुफ (अ.) चा सदरा पुढून फाटला असेल तर स्त्री खरी आहे आणि हा खोटा 

(२७) आणि याचा सदरा पाठीमागून फाटला असेल तर स्त्री खोटी व हा खरा.’’२५ 

(२८) जेव्हा पतीने पाहिले की यूसुफ (अ.) चा सदरा पाठीमागून फाटला आहे तेव्हा तो म्हणाला, ‘‘या तर तुम्हा स्त्रियांच्या ‘खसलती’ आहेत. खरोखर मोठ्या भयंकर असतात तुमच्या चाली. (२९) यूसुफ (अ.)! या मामल्याकडे दुर्लक्ष कर. आणि हे महिले! तू आपल्या अपराधाची क्षमा माग तूच मुळात अपराधी होतीस.’’२५अ 



२४) या घटनेवरून तात्कालीन परिस्थितीचे आकलन होते. घराच्या मालकाबरोबर त्या स्त्रीच्या नातेवाईकांपैकी कोणी येत असेल. त्याने हा विवाद ऐवूâन सांगितले असेल की जेव्हा की, हे दोघे एकदुसऱ्यावर आरोप लावित आहेत आणि कोणी साक्षीदार नाही. अशा स्थितीत परिस्थितीजन्य साक्ष ठेवून शोध घेतला जाऊ शकतो. या साक्षीदाराने अनुमानाच्या साक्षीकडे लक्ष देणे एक बुद्धीसंगत साक्ष आहे. त्याला पाहून त्वरित लक्षात येते की हा परिस्थितीची जाण राखणारा आणि अनुभवी माणूस आहे. परिस्थिती समोर आल्यावर त्वरित तो शोधवृत्तीने खोलात घुसून निर्णयाप्रत आला.

२५) म्हणजे पैगंबर यूसुफ (अ.) यांचा सदरा समोरुन फाटला असता तर स्पष्ट आहे की यूसुफकडून सुरवात झाली आणि स्त्री स्वत:ला वाचविण्यासाठी संघर्ष करीत होती. परंतु यूसुफ (अ.) यांचा सदरा मागून फाटला आहे, म्हणून स्पष्ट होते की स्त्री त्याच्यामागे लागली होती आणि यूसुफ तिच्यापासून आपली सुटका करू पाहात होता. या साक्षीत एक परिस्थितीजन्य साक्ष लपलेली होती कारण त्या साक्षीत लक्ष केवळ यूसुफ (अ.) यांच्या सदऱ्याकडे दिले. याने स्पष्ट होते की स्त्री शरीर किंवा तिच्या पोषाखावर आक्रमकतेची एकही निशाणी नव्हती. जर तो प्रयत्न बळजबरी करण्याचा असता तर त्याचे स्पष्ट चिन्ह स्त्रीवर दिसून आले असते.

२५अ) बायबलमध्ये या घटनेला विक्षिप्त् पद्धतीने सांगितले गेले आहे, 

``तेव्हा त्या स्त्रीने त्याचा सदरा हातात धरून सांगितले माझ्याशी संभोग कर तेव्हा तो आपला सदरा तिच्या हातात देऊन पळून गेला. जेव्हा त्याने पाहिले की सदरा तिच्या हातात देऊन आपण पळालो तेव्हा आपल्या लोकांना बोलावून त्याने सांगितले की तो एका स्त्रीशी आमची चेष्टा करण्यासाठी आमच्याजवळ घेऊन आला होता. तो माझ्याशी बलात्कार करण्यासाठी घरात घुसला तेव्हा मी ओरडू लागले. जेव्हा त्याने पाहिले की मी ओरडू लागले आहे तेव्हा त्याचा सदरा माझ्या हातात सोडून पळून गेला. तिने त्याचा सदरा त्याचे पतीराज घरी परत येईपर्यंत जवळ ठेवला. जेव्हा तिच्या पतीने तिचे सर्व गाऱ्हाणे ऐकले तेव्हा तो रागावला आणि यूसुफला कैदेत टाकले. (उत्पत्ति ३९ : १२-२०) या विक्षिप्त् कथनाचे सार म्हणजे पैगंबर यूसुफ (अ.) यांचा पोषाख (सदरा) असा होता की इकडे जुलेखाने त्याला हात लावताच तो आपोआप तिच्या हातात पडला नंतर यूसुफ (अ.) तसेच अर्धनग्नावस्थेत तेथून पळाले आणि त्यांचा पोषाख त्या स्त्रीजवळच राहिला अशाप्रकारे यूसुफ (अ.) अपराधी होते यावर कोणाला शंका येणार?

बायबलचे  कथन  वरीलप्रमाणे आहे. तलमूदच्या  वर्णनात  आहे  की  फोतीफारने जेव्हा आपल्या पत्नीची ही तक्रार ऐकली तेव्हा त्याने यूसुफला फार मारले आणि त्याच्याविरुद्ध दावा ठोकला. न्यायालयाने यूसुफच्या सदरा पाहून निर्णय दिला की अपराध स्त्रीने केला आहे, कारण सदरा मागून  फाटलेला आहे पुढून नव्हे. परंतु बुद्धिवान मनुष्य विचार करू शकतो की कुरआन उल्लेख तलमूदच्या वर्णनाशी जवळचा आहे. शेवटी याला का मान्य केले जावे की एक पदाधिकारी त्याच्या पत्नीवर गुलामाने हात टाकल्यावर हा मामला तो स्वत: न्यायालयात घेऊन गेला असेल? हा अत्यंत स्पष्ट उल्लेख आहे कुरआन आणि इस्राईली वर्णनाच्या अंतराविषयीचा. इस्लामवरील पाश्चात्य विद्वानांचे आरोप यामुळे निरर्थक ठरते की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी हे सर्व बनीइस्राईलींची नक्कल केली आहे. खरे तर कुरआनने यात सुधारणा केली आहे आणि सत्य घटना जगाला दाखवून दिली आहे.



पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा दक्षपणे व काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, शिवाय समस्त मानवजातीकडून मोठ्या प्रमाणात होणारे पृथ्वीवरील प्रदूषण व पर्यावरणाची हानी रोखणे किंवा त्याला आळा घालणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे;याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. असे आता जगभरातील पर्यावरण तज्ञ सांगत आहेत.मात्र त्यांच्या या धोक्याच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने कोणी लक्ष देत नाही असे दिसते, आज वनसंरक्षण आणि वनसंवर्धन तसेच पर्यावरण रक्षणासाठी आपण पाऊल उचलले नाही तर ही पृथ्वी नामशेष व्हायला वेळ लागणार नाही.यात संदेह नाही.

प्रचंड वेगाने वाढत जाणारी लोकसंख्या , वायू व जलप्रदूषण, अनिर्बंधीत जंगलतोड, प्लॅस्टिक तसेच दूषित पाणी व रासायनिक धूर व वस्तूंमुळे होणारी पर्यावरणाची हानी यामुळे पृथ्वीवरील भार कमालीचा वाढत चालला आहे.हे विचारात घेऊन सन १९९२ मध्ये ‘रिओ दि जानेरो’ येथे पहिली वसुंधरा शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या जागतिक परिषदेत पृथ्वी वाचविण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली व त्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण ठरावही संमत करण्यात आले. यावेळी ‘अजेंडा-२१’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या घोषणापत्राने पर्यावरणाचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रसंघ आणि देशोदेशीच्या सरकारांच्या कार्यक्रमपत्रिकेवर आला. ही शिखर परिषद पार पडून आता सुमारे तीस वर्षे झाली आहेत. दरम्यानच्या काळात परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी ती वेगाने अधिकच बिघडत चालली आहे.असे निदर्शनास आले आहे.

आज जागतिक लोकसंख्या १.६ अब्जांनी वाढली आहे. या प्रचंड लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी  पृथ्वी जेवढे देऊ शकते किंवा राखू शकते, त्याहूनही किती तरी जास्त प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर आपण करीत आहोत. त्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन ४८ टक्क्यांनी वाढले आहे. मानवी कृतीतून उत्सर्जित होणार्‍या हरितगृह वायूंपैकी ‘कार्बन डाय-ऑक्साइड’ हा सर्वाधिक घातक असा वायू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १५ वर्षांत पृथ्वीच्या तापमानात जेवढी वाढ झाली आहे. त्यापैकी ८५ टक्के तापमानवाढ एकट्या कार्बन डाय-ऑक्साइडमुळे झाली आहे. खनिज इंधने ही मानवनिर्मित कार्बन डाय-ऑक्साइडच्या उत्सर्जनाचे मोठे स्रोत आहेत. आपण ज्या ज्या वेळी वाहनांचा व उर्जेचा अतिरेकी वापर करत असतो. त्या त्या वेळी खनिज इंधने जाळून कार्बन डाय-ऑक्साइडची निर्मिती करत असतो, त्यामुळे आपण जागतिक तापमानवाढीला हातभार लावत असतो.

केवळ खनिज इंधनांद्वारेच जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणार्‍या वायूंची निर्मिती होते, असे नव्हे. तर आपल्या इतर छोट्या-मोठ्या कृतीतूनही पर्यावरणास घातक ठरणार्‍या वायूंची निर्मिती होत असते. जसे की- आपल्याला नको असलेले अन्न जेव्हा आपण फेकून देतो, तेव्हा जमिनीत फेकल्या गेलेल्या अन्नामुळेही जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणार्‍या वायूची निर्मिती होत असते. सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे आजमितीस उत्पादित अन्नाच्या साधारणपणे एक तृतीयांश अन्न फेकून दिले जाते. या कृतीतून आपण कोणाच्या तरी हक्काच्या अन्नाची नासाडी करतोच. शिवाय अन्नधान्य उत्पादनासाठी वापरली गेलेली जमीन, पाणी, ऊर्जा या संसाधनांचीही एका अर्थाने नासाडीच करत असतो आणि अंतिमतः तापमानवाढीला चालना देत असतो. त्यामुळेच जागतिक तापमानवाढीचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. हिमपर्वत व हिमनद्या वितळू लागल्या आहेत आणि त्यांच्या पाण्यामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.काही वर्षापूर्वी त्सुनामी सारख्या महाभयंकर संकटाने आपल्याला धोक्याचा इशारा दिला आहे.या पार्श्‍वभूमीवर जागतिक पर्यावरणतज्ज्ञांनी छोटी बेटे आणि समुद्रसपाटीजवळ असलेल्या जगभरातील सर्वच शहरांना धोका आहे असे भविष्य वर्तवले आहे,हा एक गंभीर  इशाराच दिला आहे.

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र हरित आच्छादनाखाली म्हणजेच वनांखाली असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात हे प्रमाण राखण्याऐवजी दिवसेंदिवस यात कमालीची घटच होत आहे. गेल्या २५ वर्षांत ३०० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील वने तोडण्यात आली आहेत. जंगले नष्ट करणाऱ्या प्रवृत्तींविरोधी जगभरातील पर्यावरण तज्ञ सातत्याने प्रबोधन करीत आहेत.भारताच्या बाबतीत विचार करता, भारतामध्ये १९८० ते २००५ या कालावधीत १ लाख, ६४ हजार ६१० हेक्टर जंगलांचे खाणींमध्ये रूपांतर झाले आहे. खाणीसाठी रूपांतरीत झालेल्या एकूण वन जमिनीपैकी निम्म्याहून अधिक जमिनीवर आज कोळशाच्या खाणी आहेत.

‘भारतीय वन सर्वेक्षण संस्थे’च्या नोंदीनुसार, २००९ ते २०११ या कालावधीत देशात एकंदर ३६७ चौरस किमी जंगलांचा नाश झाला आहे. भारतातील नैसर्गिक जंगले दरवर्षी १.५ ते २.७ टक्के या वेगाने घटत चालली आहेत. अशा प्रकारे एका बाजूला आपण प्रदूषण वाढवत आहोत, तर दुसर्‍या बाजूला प्रदूषण रोखणारी जंगलसंपती नष्ट करत आहोत. याचे गंभीर परिणामही आता दिसू लागले आहेत. सन २००० पासून जगभरात प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूमध्ये ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यापैकी ६५ टक्के मृत्यू आशियात होत आहेत. ‘जागतिक आरोग्य संघटने’नुसार प्रदुषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे जगभरात दरवर्षी ३.२ दशलक्ष मृत्यूमुखी पडतात.  शिवाय स्वाईन फ्ल्यू , चिकनगुणिया, कोविड सारखे नवनवीन आजार जगभरात मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. अर्थात या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता पृथ्वीचे आरोग्य राखणे म्हणजे आपले आरोग्य राखण्यासारखेच आहे.पृथ्वीचे आरोग्य राखण्यामध्ये वने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एक मोठे झाड छोट्या-छोट्या वनस्पती, कीटक, प्राणी-पक्षी यांना आसरा देते. विषारी कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेऊन जागतिक तापमानवाढ कमी करते आणि प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचे उत्सर्जन करते. वनांमुळे जमिनीची धूप रोखली जाते. जमिनीत पाणी मुरते व महापूर-दुष्काळ यांसारख्या आपत्ती रोखण्यास मदत होते. तसेच वनांपासून फळे-फुले, औषधे, मसाले, रंग, जनावरांसाठी चारा, जळणासाठी, निरनिराळ्या वस्तू बनविण्यासाठी आणि घरबांधणीसाठी लाकूड मिळते. अशा प्रकारची जवळपास ५० हजार कोटी रुपयांची साधनसंपत्ती भारतातील वने दरवर्षी आपल्याला दरवर्षी उपलब्ध करून देतात. म्हणूनच यंदाच्या वनसंवर्धन दिनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वनरक्षणासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे. भारतीय वनसर्वेक्षणाचा इतिहास व त्याचे महत्त्व, भारतीय वनसंपत्तीसमोरील संधी व आव्हाने, तसेच वनशेती किंवा वनीकरणाच्या दृष्टीने आवळा लागवडीचे महत्त्व, वड, पिंपळ, बाभळी, यांसारख्या वृक्षांचे महत्त्व अधोरेखित होणे गरजेचे आहे. वन संवर्धनाच्या दृष्टीने प्रत्येकाने वैयक्तिक किंवा सार्वजनिक पातळीवर किमान काही प्रयत्न केले पाहिजेत, तरच वनसंवर्धन दिनाचे  सार्थक झाले, असे म्हणता येईल.

अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या आपल्या मूलभूत गरजा असोत किंवा चंगळवादी संस्कृतीतील  चैनीच्या वस्तू असोत. आपली प्रत्येक गरज पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीद्वारेच भागविली जाते. त्यामुळे पृथ्वीविषयी कृतज्ञतेची भावना बाळगणे, आपली पृथ्वी स्वच्छ, सुंदर व हरित ठेवणे, ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. म्हणूनच वनसंवर्धन दिनाच्या निमित्ताने पृथ्वी वाचविण्याच्या कार्यात प्रत्येक नागरिकाचा हातभार असणे आवश्यक आहे.

आपली पृथ्वी,ही वसुंधरा हीच आपली जननी आहे, शिवाय ही समस्त मानवजातीची जीवनदायीनी आहे,ती टिकली तरच आपण टिकणार आहोत,याचा गांभीर्याने विचार करून प्रत्येक नागरिकाने कर्तव्य भावनेने वनसंपती वाढवली पाहिजे,ही वनसंपदा वाढली तर आणि तरच पर्यावरण टिकणार आहे, आणि पर्यायाने पृथ्वी नष्ट होण्यापासून वाचणार आहे, आज पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाची महत्त्वपूर्ण गरज निर्माण झाली आहे,या वनसंवर्धन दिनाचे निमित्त साधून जंगल आणि वनसंपदा वाढविण्यासाठी आणि जंगले आणि वनसंपदा नष्ट करणाऱ्या प्रवृत्तींविरोधी खंबीरपणे उभे राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने संकल्प व प्रतिज्ञा केली पाहिजे.

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२


(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)



सध्या एका डॉलरसाठी साधारण ८० रुपये मोजावे लागतात. म्हणजेच परदेशातून कोणतीही वस्तू आणि सेवा खरेदी करावी लागली तर त्यासाठी ऐंशी रुपये मोजावे लागतील. याउलट कोणत्याही वस्तू आणि सेवा परदेशात निर्यात केल्या तर त्याला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळतील.

भारताची अर्थव्यवस्था ही चालू खात्यावरील तुटीची व्यवस्था आहे. भारतातील आयात  निर्यातीपेक्षा जास्त आहे. म्हणजे  निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंपेक्षा कॉफी, मसाले इत्यादी वस्तू व तांत्रिक सेवा भारतातून अनेक पटींनी अधिक आयात केल्या जातात. भारतातील परकीय व्यापार नेहमीच नकारात्मक असतो. त्यामुळेच रशिया आणि युक्रेन यांच्यातील लढत हे रुपयाच्या घसरणीचे प्रमुख कारण असल्याचे सरकार सांगत आहे. परंतु असे धक्के सहन करण्याचे धोरणही भारतीय धोरणकर्ते बनवत नाहीत. जर भारत आपल्या सर्व संसाधनांचा योग्य प्रकारे वापर करून पुढे गेला असता, तर त्याच्याकडे नेहमीच सध्याची तुटीची अर्थव्यवस्था राहिली नसती. आयात-निर्यातीत फार मोठा फरक नाही.

ज्या गरीब देशात लोकांकडे आपले जीवन योग्य प्रकारे जगण्यासाठी पैसा नसतो, तेथे आयात-निर्यातीचे खुले धोरण अवलंबणे म्हणजे आयातीला चालना देणे आणि निर्यातीच्या शक्यता कमी करणे होय. इतर देशांतील वस्तू भारतात किंवा भारतात इतर देशांत अधिक विकल्या जातात, असा विचार तुम्ही स्वत:च करायला हवा.

एप्रिल ते जून २०२२ मध्ये सुमारे ३८ अब्ज डॉलरची निर्यात झाली. आयात सुमारे ६३ अब्ज डॉलर  होती. अशा प्रकारे व्यापार तूट सुमारे २५ अब्ज डॉलर  होती. गेल्या वर्षीच्या एप्रिल ते जूनच्या तुलनेत यंदा निर्यातीत २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर आयात ४७ टक्क्यांनी वाढली. 

रुपया कमकुवत झाल्यामुळे कमी नफ्याचा अंदाज घेऊन परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून आपला गुंतवलेला पैसा सतत बाहेर काढत आहेत. परदेशी गुंतवणूक अधिक प्रमाणात विकावी लागेल. त्यामुळे डॉलर आणि रुपयातील फरक आणखी वाढेल. भारतातील बहुतांश परकीय गुंतवणूक ही आर्थिक भांडवलाच्या स्वरूपात आहे. म्हणजे अशा ठिकाणी पैसे गुंतवले जातात, जिथे पैशातून पैसे कमविण्याचे काम चालते.

सध्या तेच घडत आहे. हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या सखोल संरचनात्मक उणिवांकडे लक्ष वेधते. बहुतांश परकीय गुंतवणूक उत्पादनाच्या कामात गुंतलेल्या ठिकाणी आली पाहिजे, जेणेकरून रोजगार मिळेल आणि भांडवलाचा योग्य वापर करता येईल. तसे असते तर परदेशी गुंतवणूकदारांनी अचानक पैसे काढून घेतले नसते. डॉलरच्या तुलनेत रुपया कमी पडला नसता. जानेवारी २०२२ पासून रुपया सुमारे ७ टक्क्यांनी घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण म्हणजे महागाई पूर्वीपेक्षा अधिक आहे. देशातील २५ हजारांपेक्षा कमी उत्पन्न मिळालेल्या ९० टक्के कामगारांना महागाईचा फटका अधिक बसतो.

२०१३ मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया ६८ रुपये प्रति डॉलरपर्यंत घसरला होता. देशात मजबूत नेता असेल, तेव्हाच डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होईल, असे वक्तव्य भाजपकडून करण्यात आले होते. त्या वेळी डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक घसरतोय की काँग्रेस पक्ष, हे सांगणं कठीण असल्याचं बोललं जात होतं. २०१८, २०१९, २०२० आणि २०२१ मध्ये रुपया कमकुवत होत राहिला - २.३ टक्क्यांवरून २.९ टक्क्यांपर्यंत. चार वर्षांपासून भारताचा रुपया कमकुवत होत चालला आहे. तो आता सर्वात खालच्या पातळीवर कमकुवत झाला आहे. म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याची कहाणी रशिया आणि युक्रेनच्या लढाईनंतरच सुरू झालेली नाही, तर तथाकथित कणखर नेते भारताचे पंतप्रधान झाल्यापासून सुरू आहे, हे समजण्यासारखे आहे. त्यानंतर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे. रुपयाच्या घसरणीशी संबंधित महत्त्वाची कारणे तपासण्याबरोबरच विरोधी पक्षात असताना तत्कालीन विद्यमान सरकारने काय सांगितले होते, हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 

आणखी एक गोष्ट सांगितली जात आहे की, डॉलरच्या तुलनेत जगातील अनेक देशांचे चलन घसरत आहे. जपानमधील येन आणि युरोपातील युरोची घसरण डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरणीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखं फारसं काही नाही. पण या गोष्टी म्हणणाऱ्यांना युरोप आणि जपानसारख्या देशांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे? तेथील रोजगाराची स्थिती काय आहे? लोकांचे उत्पन्न किती आहे? तेथील जनता डॉलरमुळे निर्माण होणाऱ्या महागाईने अधिक त्रस्त होईल की भारताची? हे सांगायलाही सांगितलं पाहिजे.

जगभरात ज्या पद्धतीने महागाई वाढत आहे, ती गोष्ट कोणापासूनही लपून राहिलेली नाही. वाढत्या किमतींमुळे जनतेच्या समस्यांत भर पडली असून, त्यातील सर्वात वाईट परिस्थिती समाजातील गरीब घटकांना सहन करावी लागत आहे. यावर संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार व विकास संघटनेने (यूएनसीटीडी) नुकत्याच केलेल्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की, अन्नधान्याच्या किंमतीत १० टक्के वाढ झाल्याने गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात ५ टक्के घट होते. ही रक्कम कुटुंब सहसा त्यांच्या आरोग्य सेवेच्या गरजांवर खर्च करते तितकीच आहे.

यूएनसीटीडीच्या मते, वेगाने गगनाला भिडणारी महागाई आणि वाढते कर्ज ही जगभरातील एक मोठी समस्या बनली आहे. त्याचबरोबर अन्नधान्य आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे लाखो लोक जगण्याच्या अत्यंत वाईट अवस्थेतून जात आहेत. गेल्या दोन वर्षांत महामारीशी लढा दिल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेची स्थितीही नाजूक झाली आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, आज ६० टक्के कामगारांचे प्रत्यक्ष उत्पन्न महामारीच्या आधीपेक्षा कमी आहे. एवढेच नव्हे तर जगातील ६० टक्के दुर्बल देश कर्जाच्या दलदलीत अडकले आहेत. असा अंदाज आहे की आफ्रिकेतील ५८ दशलक्ष लोक दारिद्र्यरेषेच्या किंचित वर आहेत. जागतिक पातळीवर ४१ कोटी लोक सामाजिक सुरक्षेच्या कक्षेबाहेर आहेत. 'द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड' या संयुक्त राष्ट्राने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात २०२१ मध्ये  सुमारे ८२.८ कोटी लोक उपाशीपोटी असल्याचे  समोर आले आहे. हा आकडा भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे ५९ टक्के इतका प्रचंड आहे. 

त्याचबरोबर दोन वेळची भाकरी जगातील २३० कोटी लोकांना मिळत नाही. ज्यांना जेवण मिळत आहे त्यांची अवस्थाही फारशी चांगली नाही. सकस आहार जगातील ३१ कोटी लोकांच्या आवाक्याबाहेर असल्याचे समोर आले आहे.

'एफएओ'ने जाहीर केलेल्या खाद्यमूल्य निर्देशांकाने जवळपास विक्रमी पातळी गाठली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेळी तो २०.८  टक्क्यांनी अधिक आहे. तीच गोष्ट इंधन क्षेत्राबाबतही आहे. जिथे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १२० डॉलरच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर २०२१ च्या तुलनेत यंदा इंधनाच्या दरातही ५० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २० ते २०२० या काळातील सरासरीच्या तुलनेत ज्या खतांच्या किमती दुपटीहून अधिक झाल्या आहेत, अशा काही खतांच्या बाबतीतही हेच घडत आहे.

आशिया आणि आफ्रिकेत राहणारे ९ कोटी लोक, जे पूर्वी विजेचा वापर करत होते, ते आता त्यांच्या मूलभूत इंधनाच्या गरजा भागवू शकणार नाहीत अशा स्थितीत आहेत.

सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांविषयी बोलायचे झाले तर वाढत्या महागाईचा अर्थ अन्नधान्यांच्या आणि इंधनाच्या किमती वाढणार, याचा परिणाम जनतेच्या खऱ्या उत्पन्नावर होणार आहे. त्यांचे राहणीमान ढासळेल, ज्याचा परिणाम पुढील वाटचालीत त्यांच्या भविष्यातील भवितव्यावरही होईल. वाढत्या गरिबीपासून विषमतेपर्यंतची दरी अधिक खोल होईल. शिक्षणाचा व उत्पादकतेचा स्तर खालावेल, तसेच लोकांचे वेतनही कमी होईल. सामाजिक आणि राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते अशा संकटांना तोंड देण्याच्या सरकारच्या क्षमतेवरही याचा परिणाम होईल.

या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जेथे काही कुटुंबांना त्यांच्या अन्नाच्या गुणवत्तेशी तडजोड करावी लागू शकते. त्याचबरोबर मुलांना शिक्षणापासून वंचित राहण्यापासून आरोग्याशी संबंधित खर्चाशी तडजोड करावी लागते. अशा परिस्थितीत, जेव्हा कुटुंबे आपला खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते स्वस्त उत्पादनांकडे जातील, ज्याचा दर्जा तितकासा चांगला नसेल. त्यामुळे भविष्यात त्यांना जास्त खर्च येणार आहे. गॅस सिलिंडरच्या आडून स्वयंपाकघरात भडकलेली महागाई आता जीएसटीच्या रूपात सर्वसामान्यांना रडवणार आहे. सरकारी तिजोरीतील खडखडाट दूर करण्यासाठी मोदी सरकारने आतापर्यंत करमुक्त राहिलेल्या अनेक खाद्यपदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणले आहे.

त्यानुसार सोमवार, १८ जुलैपासून पॅक आणि लेबल लावलेले पीठ, दही, लस्सी, पनीर यांसारखे खाद्यपदार्थ, हॉस्पिटलमधील वॉर्डचे भाडे आदींवर ५ टक्के, हॉटेलच्या रूमभाड्यावर १२ टक्के तर एलईडी लाईट्सवर १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. महागाईचे दररोज चटके बसू लागल्यामुळे आता जगायचे कसे? असा प्रश्न देशातील जनतेतून उपस्थित केला जात आहे.

5 टक्के – पाकीटबंद आणि लेबल केलेले मासे (फ्रोझन वगळता), दही, पनीर, लस्सी, मध, सुके सोयाबीन, मटार, गहू व इतर अन्नधान्य.

त्याचबरोबर रोप वेद्वारे माल आणि प्रवाशांची केली जाणारी वाहतूक, शस्त्रक्रियेची उपकरणे, हॉस्पिटलमधील नॉन-आयसीयू वॉर्डचे प्रतिदिन पाच हजारहून अधिक भाडे, प्रतिदिन एक हजार रुपयांपर्यंतचे हॉटेल खोली भाडे.

12 टक्के – सोलर वॉटर हीटर, नकाशे, चार्ट, इंधन खर्चासह मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रक व इतर वाहनांचे भाडे, जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया सुविधा, गोदामातील ड्रायफ्रुट्स, मसाले, गूळ, कापूस, ताग, तंबाखू, तेंदूपत्ता, चहा, कॉफी इत्यादींच्या साठवणुकीच्या सेवा.

18 टक्के – एलईडी लाईट्स – लॅम्प्स, टेट्रा पॅक, बँकांमार्फत दिले जाणारे चेकबुक, प्रिंटिंग / ड्रॉइंग शाई, धारदार चाकू, पेपर कटिंग चाकू, चमचा, पेन्सिल शार्पनर, एलईडी दिवा, केक सर्व्हिस, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने तसेच रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, कचरा प्रक्रिया संयंत्र आणि स्मशानभूमीसाठी जारी केले जाणारे कामाचे कंत्राट, कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी गोदामांमध्ये केली जाणारी धूम्रफवारणीची सेवा, आरबीआय, आयआरडीए व सेबीच्या सेवा तसेच घर भाड्याने देणे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलची गेल्या महिन्यात बैठक झाली. त्या बैठकीत जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या सोमवारपासून केली सुरू झाली आहे. त्यानुसार दुग्धजन्य पदार्थांसह अनेक वस्तूंवर पहिल्यांदाच जीएसटी लावला जात आहे. त्यामुळे दही- लस्सीपासून ते हॉस्पिटलमधील उपचारापर्यंत अनेक वस्तू व सेवांसाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. उघड्यावर विकल्या जाणाऱ्या तथा ब्रॅण्ड नसलेल्या उत्पादनांवर तेवढी जीएसटी सूट कायम ठेवण्यात आली आहे. काही वस्तू व सेवांवरील सध्याचा १२ टक्क्यांचा कर १८ टक्क्यांवर वाढवला आहे. आधीच गॅस सिलिंडरच्या दरवाढीने सर्वसामान्यांना बेजार केले आहे, त्यात जीएसटीमुळे अनेक वस्तूंची दरवाढ होत असल्याने उदरनिर्वाह करताना सर्वसामान्यांची प्रचंड दमछाक होणार आहे.

ईशान्येकडील राज्यांमध्ये जाणाऱ्या विमानांमध्ये केवळ इकॉनॉमिक क्लासचा प्रवास जीएसटीमुक्त असेल, तर बिझनेस क्लाससाठी १८ टक्क्यांच्या जीएसटीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. हॉस्पिटल्स, नर्सिंग होममधील आतापर्यंत करमुक्त राहिलेल्या वैद्यकीय सेवाही जीएसटीच्या कक्षेत आणल्या गेल्यामुळे केंद्र सरकारविरोधात जनतेतून तीव्र नाराजीचा सूर आळवला जात आहे.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक

भ्रमणध्वनी : ८९७६५३३४०४


सध्याच्या परिस्थितीत रस्त्यांचे खड्डे जीव घेणे झाले आहेत. पावसाळ्याची गंभीर परिस्थिती पहाता सर्वांनी स्वतःला सांभाळने गरजेचे आहे. यावर्षी पावसाने उग्र रूप धारण केल्याने राज्यात सर्वत्र पुरपरिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण महाराष्ट्र जलमग्न झाल्याचे दिसून येते. सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पावसाच्या पाण्याने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. महाराष्ट्रात अनेक नद्यांना महापूर आलेला असून संपूर्ण नद्या तुडुंब भरून धोकादायक स्थितीमध्ये आहेत.यामुळे अनेक धरण भरल्याने प्रत्येक धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुराने थैमान निर्माण केले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुरांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे दिसून येते.

त्याचप्रमाणे अती पावसामुळे ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दुर्घटनांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढले आहे जनुकाय रोडचे खड्डे "मौत का कुवॉ" बनल्याचे दिसून येते. त्यामुळे जीवीत हानी सुध्दा होत आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत अवकाळी पाऊस व  पावसाळ्यातील पाऊस यामुळे  वीज कोसळून आतापर्यंत तब्बल 157 लोकांचा बळी गेला ही सुद्धा गंभीर व चिंतेची बाब आहे. या संपूर्ण भयावह घटना निसर्गाचे संतुलन डगमगल्याने निर्माण झाल्याचे दिसून येते. गेल्या तीन-चार दिवसांपासून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने ग्रामीण भागातील लहान मोठ्या नदी-नाल्यांना महापूर आलेला आहे.

विदर्भातील जुनापाणी गावाच्या शेजारी असलेल्या तलावाचा बांध फुटल्याने सर्वत्र हाहाकार उडाला.अशा अनेक घटना विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत अख्खा महाराष्ट्र पाण्याखाली आल्याचे  दिसून येते. पावसामुळे दरवर्षी रोडला खड्डे पडतात यामुळे अनेक दुर्घटना होत असतात आणि यात अनेकांना आपला जीव सुध्दा गमवावा लागतो ही बाब महाराष्ट्रासह संपूर्ण देश चांगल्या प्रकारे जाणतो.

राज्यात तीन दिवस पुन्हा मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील लोकांनी सावधान राहणे गरजेचे आहे. पावसाचे विक्राळ रूप पाहता व यामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती, रस्त्यांना पडलेले खड्डे यामुळे होणाऱ्या दुर्घटना यापासून सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे जनतेने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नदी-नाल्याचा पूर, रोडचे खड्डे यापासून सावध राहावे जेणेकरून आपल्याला जिवीत हानी टाळता येईल. कारण "जान है तो जहान है"हा मूलमंत्र सर्वांनीच अंगीकारला पाहिजे.

आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे की आगीशी व पाण्याशी खेळू नये. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पावसाच्या पाण्यापासून सावधान रहाने अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नदी-नाल्याच्या पुरातून जाऊ नये किंवा प्रवास करू नये व स्वतःचा जीव धोक्यात टाकू नये.आपल्या कामांना वेळ झाला तरी चालेल परंतु नदी-नाल्यांच्या पुरांशी मुजोरी करू नका व आपला जिव धोक्यात टाकू नका.

आज अनेक क्षेत्रातील घरे पाण्याखाली आलेली आहेत.सिमेंट रोडच्या सुविधा झाल्यात, परंतु प्रशासनाचे ड्रेनेजकडे दुर्लक्ष झाल्याने शहर सुध्दा जलमग्न झाल्याचे दिसून येते. याचा त्रास सर्वसामान्यांना आज भोगावा लागतो आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात आतापर्यंत 104 लोकांचा बळी गेला तर 189 प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला. या व्यतिरिक्त जंगली प्राण्यांची सुध्दा पुरामुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अतिपावसामुळे राज्यातील 275 गावांना जबर फटका बसलेला आहे व काही गावांचा संपर्क सुध्दा तुटल्याचे दिसून येते.शहरात जिकडे-तिकडे सिमेंटीकरण झाले आहे. परंतु ड्रेनेजची सुविधा बरोबर नसल्याने शहरात सुध्दा जिकडे पहाल तीकडे आपल्याला पाणीच पाणी दिसून येत आहे.सध्याच्या परिस्थितीत पावसाच्या पाण्याने विक्राळ रूप धारण केल्याने  पशुपक्षी व मानवजातीसाठी काळ बनल्याचे दिसून येते. नर्मदा नदीत एसटी डुबल्याने 13 लोकांचा मृत्यू झाला व 40 आताही बेपत्ता आहे. अशा भयावह घटना ऐकून अंगावर शहारे येतात. त्यामुळे सर्वांनीच नदी-नाल्याच्या पुरांपासून व मुख्यत्वेकरून रस्त्याच्या जीवघेण्या खड्ड्यांपासून सावधान राहून आपले कार्य  करावे व "जान है तो जहान है" हा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारावा.

- रमेश कृष्णराव लांजेवार

नागपूर, मो.नं.9921690779


नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने वेश्या व्यवसायात लिप्त असलेल्या महिलांविषयी काही निर्देश जारी केले आहेत. त्यात असे म्हटले आहे की सेक्स वर्कदेखील इतर व्यवसायांसारखाच एक व्यवसाय आहे आणि संविधानाने दिलेल्या कलम २१ अन्वये कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. त्याचे पालन हा व्यवसाय करणाऱ्या महिलांवर देखील लागू होत आहे. न्यायालयाचे असे म्हणणे आहे की जर कोणती महिला स्वेच्छेने या व्यवसायाचा स्वीकार करत असेल तर तिला याचा अधिकार आहे. कुणीही त्या महिलेशी दुर्व्यवहार करता कामा नये. त्या महिलेचा सन्मान केला जावा. पण जर तिला देहव्यापारात विकले गेले असेल तर ज्याने विकले आहे त्याच्याविरुद्ध कारवाई केली जावी. त्याचबरोबर जर या व्यवसायातील एखाद्या महिलेने बाळाला जन्म दिला असेल तर त्या बाळाला महिलेपासून वेगळे केले जाऊ नये. त्याचाही तसाच सन्मान राखला जावा.

सर्वोच्च न्यायालयाने असेदेखील म्हटले आहे की वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करेली जावी. म्हणजे कुणी 'ब्रोथेल' (वेश्या व्यवसायाचा कारभार) करत असेल तर तशी कुणालाही परवनागी नसेल. अशा लोकांना कडक शिक्षा दिली जावी.

दुसरीकडे या व्यवसायातील एका महिलेने एका वृत्तवाहिनीच्या प्रश्नांना उत्तर देताना असे म्हटले आहे की कोणतीही मुलगी, महिला स्वेच्छेने या व्यवसायात कधीही येत नाही. कुणीही देहव्यापार करू इच्छित नाही. आम्हाला या व्यवसायात आणमारे दलाल लोक असतात. ते दलाल मुलींना आणून हा व्यवसाय चालवणाऱ्यांना विकतात. आम्ही जर यासाठी पोलिसांशी मदत मागितली तर ते कधीही आमची मदत करत नाहीत. ते आमच्याकडून पैसे मागतात. जेवढे पैसे दलाल लोक कमवत नाहीत तेवढे हे पोलीसदल मागत असतात. आम्ही प्रत्येकाशी मदत मागितली, विनंत्या केल्या, पण कुणीही आमची मदत करू इच्छित नाही. कुणीही आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. जर कोणत्या महिलेने मुलाला जन्म दिला तर त्या मुलाला तिच्याशी वेगळे केले जाते, म्हणजे ती हा व्यवसाय सोडून देऊ नये म्हणून. आम्ही जसे जीवन जगत आहोत तसे जीवन कुणालाही मिळू नये.

वेश्या व्यवसायाविषयी असे निर्देश देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकता आणि परस्त्रीशी व्यभिचार याला गुन्हा नसल्याचे म्हटले आहे, हे या ठिकाणी नमूद करणे गरजेचे आहे.

असेदेखील म्हटले जाते आणि यात तथ्यदेखील आहे की हा व्यवसाय जगभर पूर्वापार चालत आलेला आहे. भारतात याविषयी १९५६ साली कायदा सुद्धा करण्यात आलेला आहे. ज्याचा उद्देश या व्यवसायावर प्रतिबंध लावण्याचा आहे. हा व्यवसाय चालवणे (ब्रोथेल) या व्यवसायातून होणाऱ्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करणे, वेश्या पुरवणे (pimping), नैतिकता, बेरोजगारी, दारिद्र्य अशा बाबींवर चर्चा केली जात आहे. २०११ साली एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की सेक्सवर्कर यांना सुद्धा सन्मानाचा अधिकार आहे. २०२० साली मुंबई उच्च न्यायालयाने तीन सेक्स वर्कर्सना सुधारगृहामधून ताबडतोब सोडण्याचे आदेश दिले होते.

ही कायदेशीर आणि न्यायालयाची बाजू होती. दुसरीकडे जगात आजवरचा इतिहास पाहिला तर कोणत्याही काळात कोणत्याही धर्माने, समूहाने, समाजाने वेश्यावृत्तीला पाठिंबा दिलेला नाही. माणसांचे काही कर्मकांड असे असतात ज्यांना समाज, धर्म, नैतिकता कधीही मान्यता देत नाही. ते कार्य कोणत्याही परिस्थितीत, स्वेच्छेने असो की बळजबरीने केले तरी देखील समाज त्याला मान्यता देत नाही. स्त्रीविषयी ही महत्त्वाची बाब आहे की कोणतीही महिला आपल्या शीलाचे रक्षण कोणत्याही आणि कितीही बिकट परिस्थितीत करत असते. कोणतीही महिला स्वेच्छेने हा व्यवसाय कधीही स्वीकारणार नाही. धर्म आणि धर्माच्या शिकवणी माणसांच्या स्वभावानुसार असतात. धर्माद्वारे जे संस्कार दिले जातात त्यापासून संस्कृतीचा जन्म होतो आणि जगभर कोणत्याही संस्कृतीने वेश्या व्यवसायाला मान्यता दिलेली नाही.

जर देहविक्री व्यवसाय असेल तर चोरी करणे, दरोडे टाकणे सुद्धा व्यवसायच असू शकतो. या व्यवसायात तर जिवाचा धोका सुद्धा असतो. मग आपण कधी पुढे जाऊ या, चोरी-दरोडे टाकणे यांनासुद्धा व्यवसाय जाहीर करणार का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७



जपान म्हणजे एक शांतीप्रिय देश आहे. उद्योगांमध्ये रमणारे लोक, गुन्हेगारीशी ज्याचा संबंध नाही असा समाज, अशा समाजातही सुरक्षा यंत्रणेच्या उपस्थितीत यामागीनी याने शिंजो आबे यांच्या अगदी जवळ जावून मानेत गोळी मारली. हे कसे शक्य झाले? यामागीनी बद्दल पोलीस सुत्रांनी असे सांगितले की, ‘‘तो एकटा होता. एकटेपणामुळे त्याच्या मनावर विपरित परिणाम झाला होता.’’

जिसे न जलने की ख्वाहिश न खौफ बुझेन का 

वही चराग हवा के असर से बाहर है

शुक्रवार, 8 जुलै 2022 रोजी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळी झाडून एका माथेफिरूने हत्या केली. ही घटना भविष्यात जगाला कलाटणी देणारी ठरू शकेल. कारण इतर देशासारखी बंदूक संस्कृती जपानमध्ये नाही. जपान भौतिकदृष्ट्या जगात अग्रेसर देशांपैकी एक देश. तेथे जीवनमान अतिशय उच्चदर्जाचे, वयोमान जगात सर्वांपेक्षा जास्त, हॅपिनेस इंडेक्समध्ये जपान पहिल्या पाचमध्ये येतो, कठीण प्रयत्न करून सुद्धा तिथे बंदुकीचे लायसन्स मिळत नाही. अशा परिस्थितीतही तिथे तेत्सुया यामागीनी नावाच्या 41 वर्षाच्या एका तरूणाने स्वतः एक क्रूड बंदुक तयार केली व आबे यांच्यावर गोळी झाडली जी त्यांच्या मानेत घुसली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यामागीनी याच्या मनामध्ये एका खास संघटनेबद्दल वैर होते, जिचा संबंध शिंजो आबे यांच्याशी होता. त्या संघटनेला यामागीनी याच्या आईने आपली सर्व संपत्ती दान केली होती. यामागीनी याने जपानी नौदल आणि मेरिटाईम्स सेल्फ डिफेन्स फोर्समध्ये काम केले होते. 

जपानमध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले शिंजो आबे यांची हत्या अनेक अर्थांनी जगाला आंतर्मुख करणारी आहे. कारण 2014 मध्ये बंदुकीने हिंसा केल्याच्या  फक्त 6 घटना झाल्या होत्या. त्याच वर्षी अमेरिकेमध्ये बंदुकीने 33 हजार 599 लोक मारले गेले होते. (संदर्भ : ऑनलाईन बीबीसी, दि. 9 जुलै 2022) शिंजो आबे 2006 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनले. दरम्यान आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला होता परंतु पुन्हा 2012 साली ते पंतप्रधान झाले. त्यांच्या हत्येसंबंधी चीन आणि कोरिया वगळता अख्या जगाने हळहळ व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी तर या संदर्भात म्हटले आहे की, ‘‘शिंजो आबे के साथ मेरा जुडाव कई साल पुराना है. मैं गुजरात के मुख्यमंत्री के अपने कार्यकाल के दौरान से उन्हें जानता था. मैं प्रधानमंत्री बनने के बाद भी हमारी दोस्ती जारी रही. अर्थव्यवस्था और वैश्विक मामलों में उनकी समझ ने मुझपर गहरी छाप छोडी. है.’’ 

सगळ्या जगाला हा प्रश्न पडला आहे की शेवटी जपानमध्ये अशी घटना कशी घडू शकते. अनेक लोकांचा असा होरा आहे की, धर्मामुळे हिंसाचार वाढतो. परंतु जपानमध्ये तर कोणत्याही धर्माला सरकारी मान्यता नाही. जरी जपानचे लोक बौद्ध धर्माचे पालन करीत असले तरी धर्माच्या बाबतीत ते फारसे गंभीर नाहीत. जपानमध्ये नास्तीकांची संख्या अधिक आहे. जपान म्हणजे एक शांतीप्रिय देश आहे. उद्योगांमध्ये रमणारे लोक, गुन्हेगारीशी ज्याचा संबंध नाही असा समाज, अशा समाजातही सुरक्षा यंत्रणेच्या उपस्थितीत यामागीनी याने त्यांच्या अगदी जवळ जावून अगदी मानेत गोळी मारली. हे कसे शक्य झाले? यामागीनी बद्दल पोलीस सुत्रांनी असे सांगितले की, ‘‘तो एकटा होता. एकटेपणामुळे त्याच्या मनावर विपरित परिणाम झाला होता.’’ जपानमध्ये एकटे राहून शांतपणे जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. हे लोक कोणाशी ना कोणाशी नाराज असतात. राजधानी टोकिओमध्ये 2019 मध्ये एका व्यक्तीने क्योटो भागातील एका लोकप्रिय अ‍ॅनिमेशन स्टुडिओमध्ये एकट्यापणाच्या रागातून आग लावली होती. ज्यात 36 लोकांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा आरोपीने स्टुडिओबद्दलची नाराजीचे कारण सांगितले. प्रगत देशांमध्ये कोण, कशाबद्दल, केव्हा नाराज होईल आणि मोठी घटना घडवून आणेल याबद्दल नेमके काहीएक सांगता येत नाही. अमेरिकेमध्ये जो की जगातील सर्वात प्रगत देश मानला जातो, त्यात दररोज कुठे ना कुठे गोळीबाराच्या घटना घडतात आणि लोक हाकनाक मारले जातात. एकटेपणामुळे आलेल्या वैफल्यातून केली जाणारी गुन्हेगारी असो की प्रगत राष्ट्रात असलेल्या वांझोट्या संपन्नतेतून निर्माण झालेल्या विकृतीमुळे असो सातत्याने हिंसक घटना घडत असतात आणि त्यात निरपराध माणसं मारली जातात. ही एक मानसिक समस्या आहे. संपन्नतेतून मानसिक समस्या उद्भवण्याचे प्रकार आता जगाच्या प्रत्येक पुढारलेल्या देशात नित्याच्या झालेल्या आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये सर्वाधिक मेडिकल प्रॅ्निटस ही मनोचिकित्सकांचीच चालते. हे या गोष्टीचे द्योतक आहे की, भौतिक संपन्नतेमुळे माणसाचे जीवन परिपूर्ण होत नाही.   

माणसाचे जीवन परिपूर्ण कसे होते?

या प्रश्नाचे उत्तर देताना जमाअते इस्लामी हिंदचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी म्हटले आहे की, ’’नैतिक शक्ती की प्रचुरता भौतिक संसाधनों की कमी की भरपाई कर सकती है पर भौतिक संसाधनों की प्रचुरता नैतिक शक्ती के कमी की भरपाई कभी नहीं कर सकती.’’ मनुष्याचा मूळ स्वभाव त्याचे कर्म आणि जीवनाची कार्यप्रणाली ही त्याच्या धर्मावर आधारित असते. माणूस धार्मिक असेल तर धर्मातून प्रेम, त्याग, करूणा, मान, सन्मान, मर्यादा आणि संस्काराच्या चांगल्या भावना उत्पन्न होतात. परंतु जेव्हा माणसं धर्मापासून दूर जातात तेव्हा पतनाकडे अग्रेसर होत जातात. जो जेवढा धर्मापासून दूर तो तेवढा पतीत होत जातो, स्वार्थी होत जातो आणि आपल्या स्वार्थ सिद्धीसाठी भ्रष्ट मार्गाने संपत्ती कमाविण्यामध्ये त्याला कुठलीही अडचण भासत नाही. स्वार्थी व्यक्ती इच्छा आणि आकांक्षाचा दास होऊन जातो. त्यांच्या पूर्ततेसाठी रात्रं-दिवस प्रयत्नरत असतो. आणि इच्छा आणि आकांक्षा यांना कुठलीच मर्यादा नसते. रोज नवनवीन इच्छा माणसाच्या मनामध्ये निर्माण होत असतात. एक ईच्छा पूर्ण झाली नाही की दूसरी निर्माण होते. ती पूर्ण होते न होते तोच तीसरी उत्पन्न होते. एकाच वेळेस अनेक इच्छा-आकांक्षा मनामध्ये आकार घेतात व त्यांच्या पूर्ततेसाठी पैशाची गरज भासत असते. मग असे लोक पैसे मिळविण्यासाठी वाट्टेल त्या मार्गाचा उपयोग करतात आणि अशा स्वार्थी समाजात ज्याच्याकडे पैसा असेल त्यालाच सन्मान मिळतो. मग त्याने पैसा कसा कमावला याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. कुठल्याही मार्गाने पैसा कमाविलेल्या प्रत्येक माणसाला जेव्हा समाजमान्यता मिळते तेव्हा वाममार्गाने संपत्ती कमाविण्यासाठी एक आंधळी स्पर्धा सुरू होते जिला कुठलेच निर्बंध राहत नाहीत. अशा समाजामध्ये नीती नियमांचे सर्व मापदंड कोसळून पडतात. अशा समाजातील पुरूष हे, स्त्री आणि संपत्ती यांच्याच पाठलागामध्ये आयुष्य खर्ची घालतात. या दोन गोष्टी प्राप्त करण्यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्नशील असल्यामुळे इतर कुठलीही घरेलू आणि सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्ती एकटी राहण्याचा प्रयत्न करते. शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी अशा समाजामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपची कायदेशीर सोय केली गेली असल्यामुळे स्त्री पुरूष दोघेही एकाचवेळेस अनेक लोकांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास असतात किंवा किंबहुना ठेवतात. या सर्व धावपळीमध्ये त्यांना मुलं जन्माला घालण्याचा विसर पडतो. म्हणून अमेरिका आणि युरोपच्या अनेक देशांचा जन्मदर गेल्या कित्येक वर्षांपासून स्थिरच नव्हे तर मायनसमध्ये गेलेला आहे. नैतिक बंधने अशा समाजामध्ये झुगारून देण्याची प्रवृत्ती वाढते. धर्म जोखड असल्याची भावना निर्माण होते. नीती नियम हे त्यांना आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर अंकुश लावणारी वाटतात. त्यामुळे अशा समाजातील लोकांचे चित्त कायम सैरभैर असते व ते स्वैराचाराकडे आकर्षित होतात आणि अख्खे आयुष्य त्यातच घालवतात. मग अशा समाजात बालगुन्हेगारी वाढते, स्त्री-पुरूषांच्या संबंधामध्ये अविश्वास वाढतो आणि त्यातून लैंगिक गुन्हे वाढतात. अमेरिकेमध्ये होत असलेल्या महिलांच्या हत्त्यांच्या एकूण आकडेवारीपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांचे खून त्यांच्याच पुरूष मित्रांकडून केले जातात अशी आकडेवारी अनेक सर्वेक्षणातून पुढे आलेली आहे.

शिंजो आबे यांच्या हत्येनंतर जपानची पौरवात्य जीवनशैलीवरही आता प्रश्नचिन्ह लागला आहे. शिवाय, जगात सर्वाधिक आत्महत्या करणाऱ्यांचा देश जपानच आहे. आत्महत्येसाठी ‘हराकिरी’ हा जो शब्द आपल्याकडे प्रचलित आहे तो सुद्धा जपानी शब्द आहे. जपानमध्ये हराकिरी नावाचा एक डोंगर आहे ज्यावर वैफल्यग्रस्त लोक चढून जातात आणि वरून स्वतःचा कडेलोट करून टाकतात. ज्यात मृत्यू निश्चित असतो. थोडक्यात अमेरिकीची चंगळवादी जीवनशैली ही माणसाला मनोरूग्ण करून विनाशाकडे नेणारी असल्याचे दिसून येते तर दूसरीकडे पुर्वेकडील संपन्न जीवनशैली सुद्धा आत्महत्या आणि हत्येकडे नेणारी दिसून येते. या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील मुस्लिम देशांमधील जीवनशैली ही एवढी सक्षम जरूर आहे की त्यामुळे त्या देशात गुन्हेगारी नाही, मनोरूग्ण नाहीत, वृद्धाश्रमे नाहीत, सऊदी अरबमध्ये तर गुन्हेगारीचे प्रमाण जवळपास शुन्य असते. तेथील पोलिसांना वाहतूक नियमन आणि इतर सामाजिक उपक्रम करण्याचेच कर्तव्य बजावावे लागते. अशा परिस्थितीत इस्लामी जीवनशैली हीच माणसाला यशस्वी जीवन प्रदान करण्यामध्ये सक्षम ठरू शकते, हे स्पष्ट होते. 

इस्लामचा कसा फायदा होतो? 

या संदर्भात जमाअते इस्लामी हिंदचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात की, ’’इस्लाम का सबसे बडा फायदा ये है के, जैसे ही इन्सान शऊरी तौर पर इमान लाता है उसके बुनियादी अख्लाक की शुरूवाती मंजील पर ही उसके ऊंचे अख्लाक की एक बुलंद और शानदार मंजील तयार हो जाती है. जिसके जरीये इन्सान अपने मर्तबे की उस बुलंदी पर पहूंच जाता है जो उसके नफ्स (चित्त) को खुदगर्जी की नफ्सियात (मानसिकता), जुल्म (अत्याचार), बेहयाई (निर्लज्जपणा), गंदगी और आवारगी (स्वैराचार) से पाक कर देता है और उसमें खुदातरसी (ईशपारायणता), तक्वा (ईश्वराची भीती), परहेजगारी (चांगले चारित्र्य), हकपरस्ती (सत्यवादीपणा) पैदा करता है. उसके अंदर अख्लाकी ज़िम्मेदारीयों के शऊर और एहसास को उभारता है, उसे नफ्स को नियंत्रण में करने का आदी बनाता है. उसे सभी मख्लूकों (जीवों) के लिए करम करनेवाला (कृपाळू), खुले दिलवाला, रहेम करनेवाला (दयावान) इतनाही नहीं हमदर्द, इमानदार, बेगरज (निस्वार्थीर्), खैरख्वाह (लोकोपयोगी), बिना किसी तरफदारी के इन्साफ करनेवाला, हर हाल में सच्चा और सच्चे रास्ते पर चलनेवाला बना देता है. और उसमें एक ऐसा बुलंद किरदार (चरित्र) पैदा करता है के जिससे हमेशा सिर्फ भलाई की उम्मीद हो और बुराई का कोई अंदेशा न हो. (संदर्भ : रूदाद भाग 3, पान क्र. 162). 

थोडक्यात श्रद्धेचा जीवनशैलीवर अनिवार्य असा परिणाम होत असतो आणि श्रद्धेमध्ये इस्लामी श्रद्धा ही जगातील सर्वात आधुनिक श्रद्धा असून, जवळपास 200 कोटी लोक भूतलावर या श्रद्धेचा पुरस्कार करून जीवन जगत आहेत. यातील ते लोक यशस्वी आहेत ज्यांनी इस्लामच्या मूल तत्वांचा अंगीकार जीवनशैली म्हणून केलेला आहे आणि ते मुसलमान तेवढेच अयशस्वी आहेत जे नावाचे मुसलमान आहेत आणि इस्लामी मूलतत्वावर आधारित जीवनशैलीचा ज्यांनी प्रत्यक्षात त्याग केलेला आहे. जगामध्ये पुर्वेकडील जपानी जीवनशैली मानवाला यशस्वी करण्यासाठी उपयोगी आहे ना पाश्चिमात्य जीवनशैली उपयोगी आहे, फक्त इस्लामी जीवनशैली हीच मानवाला उपयोगी जीवनशैली आहे. मग ही गोष्ट कोणाला आवडो की न आवडो. कुरआनने इस्लामचा द्वेष करणाऱ्यांच्या बाबतीत स्पष्ट म्हटलेले आहे की, ‘‘तोच तर आहे ज्याने आपल्या पैगंबर (स.) ला मार्गदर्शन आणि सत्यधर्मासह पाठविले आहे जेणेकरून त्याला समस्त धर्मांवर प्रभुत्व द्यावे मग अनेकेश्वरवाद्यांना ते कितीही अप्रिय का वाटू नये.’’ (सुरे अस्सफ क्र. 61 : आयत नं.9)

जगात महासत्तेचा आरंभ साधारणतः आठव्या शतकापासून झाला. सुरूवातीला मुस्लिम महासत्ता उदयास आली. त्यानंतर युरोपने मुस्लिम महासत्तेला मागे टाकत ब्रिटनच्या नेतृत्वाखाली महासत्तेचा मान पटकावला. त्यांना महासत्ता बनविण्यामध्ये औद्योगिक क्रांतीची मोठी भूमीका होती. मुसलमान यात मागे पडले. आज 21 व्या शतकातही मुस्लिम जगाने औद्योगिक पर्वामध्ये प्रवेश देखील केलेला नाही. युरोपने भौतिक प्रगती साध्य केली ती चर्चेसना उध्वस्त करून केली. औद्योगिक क्रांतीपूर्वी युरोपमध्ये धर्मसत्ता होती. सर्व कारभार चर्चमधून चालायचा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाला कवडीची किमत नव्हती. म्हणून युरोपियन लोकांनी चर्चचे ऐकणे बंद केले आणि तंत्रज्ञानाची कास धरली. मात्र मुस्लिमांकडे जेव्हा महासत्ता होती त्या काळात विज्ञान, तंत्रज्ञान आणि आरोग्य शास्त्रामध्ये नेत्रदिपक अशी प्रगती झाली होती. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, भौतिक प्रगतीमध्ये इस्लामी श्रद्धा अडथळा बनत नाही. उलट इस्लामी श्रद्धेमुळे भौतिक प्रगतीवर नैतिकतेेचे अंकुश लावले जाते, म्हणून ती अधिक लोकोपयोगी होते. आजच्या सारखी अनियंत्रित होत नाही.

दुसऱ्या महायुद्धानंतर खिलाफते उस्मानियाच्या 1924 साली झालेल्या पाडावनंतर मुस्लिम धर्मसत्ता लयाला गेली. आज पृथ्वीच्या नकाशावर जरी 57 मुस्लिम राष्ट्रे दिसत असली तरी त्यातील एकही राष्ट्र खऱ्या अर्थाने इस्लामी नाही फक्त मुस्लिम आहेत. ते सर्वच्या सर्व युरोपप्रणित भांडवलशाही प्रदान लोकशाही किंवा घराणेशाहीवर आधारित राजेशाहीवर चालतात. भांडवलशाही व्यवस्थेचे नेतृत्व अमेरिकेकडे असून, या व्यवस्थेने अवघ्या जगाला आपल्या कवेत घेतले आहे. या व्यवस्थेने प्रचंड भौतिक प्रगती जरी साध्य केली असली तरी तेवढीच प्रचंड विषमता, गुन्हेगारी आणि मानसिक समस्यांचे जाळे विनलेले आहे. ज्यात अवघे जग गुरफटून गेले आहे. यावर उपाय एकच तो म्हणजे व्याजविरहित अर्थव्यवस्थेवर आधारित इस्लामी लोकशाही. मग कोणाला हे पटो अथवा न पटो.

- एम. आय. शेख

(पूर्व पोलीस उपाधीक्षक, स्तंभ लेखक शोधन) 



नुकत्याच हैदराबादेत झालेल्या भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाचे राजकारण अशा मार्गावर चालवण्याचा प्रयत्न केला आहे, जो त्यांना एकाच वेळी अनेक इच्छित स्थळी नेऊ शकतो. मोदी पक्षाला म्हणाले, स्नेहयात्रा काढून मुस्लिम समाजाच्या पसमांदा लोकांना आपल्याकडे आकृष्ट करता येईल. भाजपचा इतिहास आणि वर्तमान पाहता हे अत्यंत कठीण काम आहे. स्नेहयात्रा प्रतीकात्मक प्रकारचा उपक्रम ठरू शकतो. तथापि, संघ-भाजप-रालोआने मिळून न्यू इंडिया नावाचे जे भव्य राजकीय यंत्र तयार केले आहे, त्यात नवनवीन गोष्टी शिकण्याची अभूतपूर्व क्षमता आहे, असे वक्तव्य पसमांदा आंदोलनाचे प्रमुख  बौद्धिक वकील खालिद अन्सारी यांनी नुकतेच केले. ते विसरून चालणार नाही.

मुख्तार अब्बास नकवी यांना नुकतेच राज्यसभा सदस्यत्वापासून वंचित करत मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी केली आहे. एकदा टीव्हीवर माझ्यासोबत झालेल्या चर्चेत ते म्हणाले होते की, भाजप मुस्लिम मतांशिवाय सत्तेत आला होता आणि यापुढेही त्यांच्याशिवाय सत्ता मिळवणार. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. आता मोहन भागवत आणि मोदींना हिंदू एकतेत मुस्लिम मते मिळवणे गरजेचे वाटत आहे. या धोरणाची परिमाणे बहुमुखी आहेत. मुस्लिमांसोबतचे संबंध सुधारण्याचा भाजपला पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांच्या सरकारची आंतरराष्ट्रीय प्रतिमा बदलेल. सध्या मोदी सरकारच्या अल्पसंख्याकविरोधी धोरणामुळे त्यांच्या लोकशाही भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागलेले आहे. असे समजले जाते की, अशा सरकारद्वारे सामाजिक शांतता आणि स्थैर्य राहू शकत नाही. यामुळेच रेटिंग एजन्सीजकडून भारताच्या सार्वभौम रेटिंगमध्ये सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे ती नकारात्मकतेतून जंक श्रेणीत पोहोचण्याचा धोका आहे. असे झाल्यास भारताला आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवणे सोपे राहणार नाही. याच्याशी संबंधित दुसरा फायदा म्हणजे मुस्लिम समाजात जम बसवत भाजप आपल्या तरुणांना आंतरराष्ट्रीय इस्लामिक दहशतवादाच्या जाळ्यात फसण्यापासून रोखू शकतो. नूपुर प्रकरणामुळे भारत अलकायदासारख्या संघटनांसाठी सुपीक जमीन बनवण्याच्या शक्यतेने त्रस्त झाला आहे.

या धोरणाचा तिसरा पैलू निवडणूक आहे. भाजपला राष्ट्रीय पातळीवर जवळपास आठ टक्के मुस्लिम मते मिळतात. आतापर्यंत भाजप शिया आणि बरेलवियांची मते आपल्याकडे आकर्षिक करत आला आहे. मात्र, आता भाजप आपल्या अत्यंत मर्यादित वृत्तीचा त्याग करत सुन्नी समाजात हस्तक्षेप करू इच्छित असल्याचे संकेत शिया समाजातील नकवींची सरकारमधून हकालपट्टी झाल्याने मिळतात. कलम 370 रद्द करण्यापूर्वी पक्षाने खोऱ्यात सुन्नी लोकांमध्ये काम केलेे. पसमांदा मुस्लिमांचा छोटा भागही भाजप आपल्याकडे आकर्षित करू शकला तर उत्तरच नाही दक्षिण भारतातही पाय पसरण्यामध्ये येणारे अडथळे मोठ्या प्रमाणात कमी होतील. दीर्घकाळ सुरू असलेले पसमांदा आंदोलन मुस्लिम राजकारणावर नेतृत्व प्रस्थापित करण्यात अपयशी ठरले आहे. त्यांच्या या अपयशाचे रूपांतर भाजप यशामध्ये करू शकतो. पसमांदांचे नेते अली अन्वर अन्सारी यांच्या मते, भारतीय मुस्लिमांमध्ये अजलाफ (म्हणजे आरक्षणासाठी पात्र मागासवर्गीय) आणि अरजाल (म्हणजे घटनात्मक मान्यतेपासून वंचित अनुसूचित जाती) यांची संख्या सुमारे 85 टक्के आहे. मात्र, त्यांचे नेतृत्व केवळ 15 टक्के अशराफ (उच्च जातीचे मुस्लिम) करतात. हे अशराफ काँग्रेस विचारांचे असतात. काँग्रेसच्या पराभवानंतर मुस्लिम समाज मागासवर्ग हा आधार असलेल्या सपा, बसपा, राजद यांना मते देत आला आहे. भाजपने त्यांची मते मिळवण्यासाठी कधीच ठोस प्रयत्न केले नाहीत.  

- प्रा. अभयकुमार दुबे

लेखक :  दिल्ली येथील डॉ. आंबेडकर विद्यापीठ प्राध्यापक आहेत. 

abhaydubey@aud.ac.in

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत) 

(साभार : दिव्य मराठी) 



पायाभूत सुविधा, उद्योग, खाणी, सिंचन प्रकल्पांमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होतेय. तर यात आता जंगलांना लागणाऱ्या आगींमुळे वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी होतंय आणि यातून पर्यावरणाचा -हास होण्याचा धोका अधिक असतो. यातून आपला ऑक्सिजनचा एक महत्त्वाचा स्रोतही गमावला जात आहे. जंगल आगीमुळे पर्यावरणाची हानी तर होतेच आहे. पण कार्बन डायऑक्साईडही वातावरणात वाढतो आहे. हा हरितगृह वायू आहे व त्याचा प्रतिकूल परिणाम पृथ्वीचे तापमान वाढीमध्ये दिसून येत असल्याचे संशोधनात पुढे आल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सांगतात. जागतिक पर्यावरण बदलामुळे आधीच खराब झालेली पर्यावरणीय परिस्थिती जंगलांना लागणाऱ्या आगींमुळे अधिकच बिकट होत चालली आहे असेही पर्यावरणवादी वेळोवेळी आठवण करून देत आहेत. ज्या वेळी जंगलामध्ये आगी लागतात तेव्हा लहान किटकांपासून ते मोठ्या वन्यप्राण्यांपर्यंत सर्वांच्या अधिवासावर त्याचा आघात होतो. या वन्यप्राण्यांना उपलब्ध असलेलं खाद्य हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहत नाही. आग लागल्यानंतर पाऊस पडल्यानंतर तिथल्या जंगलांच पूर्वीसारखं जीवन होत नाही. त्यामुळे अन्नसाठा  कमी झाल्यामुळे आणि त्यांचा तिथला अधिवास नष्ट झाल्यामुळे वन्यप्राणी त्यांच्या अधिवासातून बाहेर येतात आणि मानवी वस्तीकडे येताना दिसतात. यामुळे मानव आणि वन्यजीवन संघर्ष पाहायला मिळतो. त्यामुळे आगीपासून जंगलाचे संरक्षण व्हावे, यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करण्याचा अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होता. आता या प्रयत्नांना यश आले असून, जंगलाला आग लागण्यापूर्वी अलर्ट करणारी यंत्रणा विकसित झाली आहे. त्यामुळे आगीच्या घटना नियंत्रित करण्यास मोठी मदत मिळणार आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या एकूण भूभागापैकी २४.६२ टक्के जंगलं आहे. देशातील ८ कोटी ९ लाख हेक्टर्स जमीन जंगलाने आच्छादली आहे. देशात जंगलाला लागणा-या आगीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जंगल संपत्ती नष्ट होते. एका रिपोर्टनुसार २०१८-१९ मध्ये देशात विविध ठिकाणी जंगलाला लागणा-या घटनांची संख्या २.१० लाख नोंदली गेली होती, तर २०२०-२१ मध्ये जंगलाला लागणा-या आगीच्या घटनांची संख्या ३.४५ लाख नोंदली गेली. यावरून जंगलाला लागणा-या आगीची संख्या लक्षात येते. २०१९ मध्ये २१ फेब्रुवारीला बंदीपूर अभयारण्यात मोठी आग लागली होती जी २५ फेब्रुवारीला विझवण्यात प्रशासनाला यश आले होते. यात सुमारे ८७,४०० हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. जंगल आगीमुळे भारताचे दरवर्षी सुमारे ११०० कोटी रुपयाचे नुकसान होत असते.

भारतातील १ जानेवारी ते २९ फेब्रुवारी २०१९ मधील एकूण जंगल आगींपैकी ३७% आगी या आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू व केरळ येथे लागल्या होत्या. ताडमाड उंच वाढलेल्या झाडांची आगीने कत्तल करण्यासाठी खरेतर पहिल्यांदा एका ठिणगीची गरज असते. ही ठिणगी विजेच्या कडकडाटमुळे मिळू शकते किंवा इतर कोणत्यातरी कारणामुळे. पण यासाठी परिस्थिती अनुकूल असावी लागते. जर स्थानिक पर्यावरण उष्ण व शुष्क असेल व जेव्हा पाण्याची पातळी खाली गेलेली असेल तेव्हा आगीसाठी पर्यावरणीय परिस्थिती अनुकूल बनते. त्या ठिकाणची आर्द्रता सुद्धा कमी असावी लागते व जळण्यासाठी लाकूड व पालापाचोळा पार सुकलेला असावा लागतो. त्याचबरोबर स्थानिक संरचनासुद्धा आग लागणे व ती पसरवण्यामध्ये फार महत्त्वाचे कार्य पार पडत असते. सपाट जागेत आग लवकर पसरत नाही. पण डोंगरांच्या चढावर ती द्रुतगतीने पसरते. खालची पेटती झाडे वरच्या झाडांना आगीच्या जंजाळात पटकन ओढून घेतात. पण या साऱ्या घटनांमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा घटक जो असतो तो आहे वारा, त्याची गती आणि त्याची वाहण्याची दिशा. जास्त व कमी दाबाचे जे पट्टे निर्माण होतात त्याच्यामुळे वाऱ्याची गती व दिशा सतत बदलत राहते. आगीची दिशा जास्त आर्द्रता असणाऱ्या वनाकडे कललेली असेल तर ती आग लवकर आटोक्यात येते किंवा आटोक्यात आणता येते. पण जर तिचा रोख कोरड्या व जळाऊ वनस्पतीकडे गेला तर तो वणवा शमवणे कठीण होऊन बसते. 

जंगलात आग लागण्याच्या घटनांबाबत अलर्ट करण्याची व्यवस्था मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु जंगलात आग लागल्यानंतरच असे अलर्ट जारी केले जात होते. त्यामुळे जंगलात पोहोचेपर्यंत आग भडकलेली असायची. अशा परिस्थितीत आग रोखणे शक्य नसायचे. यातून जंगलाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र नष्ट व्हायचे. जंगलाला लागणा-या आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता नवतंत्रज्ञान विकसित झाले असून, हे नवतंत्रज्ञान आठवडाभर अगोदरच आगीबाबत अलर्ट करू शकते. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय आणि भारतीय वन सर्वेक्षणच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१६ पासूनच या तंत्रज्ञानावर काम सुरू करण्यात आले. व्यापक अभ्यास आणि संशोधनानंतर २०१९ मध्ये हे तंत्रज्ञान विकसित केले. त्यानंतर त्याची दीर्घकाळ चाचणीही घेण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे याचे काम थंडावले होते. मात्र, आता नव्या तंत्रज्ञानासह नव्याने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हे नवे तंत्रज्ञान फायर वेदर इंडेक्स (एफडब्ल्यूआय) आणि भारतीय हवामान खात्याचे तापमान, पावसाच्या आकडेवारीचे विश्लेषण करून आगीचा अंदाज लावू शकते. या माध्यमातून जंगलातील तापमानाच्या चढ-उताराचा नियमित अंदाज घेतला जाणार आहे. सातत्याने तापमान वाढत गेले आणि त्यातून ड्रायनेस निर्माण झाला, तर आगीचा धोका असतो. वन क्षेत्राची ओळख जंगल नकाशा आणि जीआयएसच्या मदतीने केली जाऊ शकते. असे झाल्यास ज्या भागात आगीचा धोका आहे, तिथे सर्व यंत्रणा सज्ज ठेवून आग रोखण्यासाठी अगोदरच प्रयत्न केले जाऊ शकतात. एवढेच नव्हे, तर ज्यामुळे आग लागण्याचा धोका आहे, अशा हालचाली रोखण्याचे कामही केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.

यंदा राजस्थानमधील सरिस्का वाघ अभयारण्यात आगीच्या अगोदरच अलर्ट जारी केला होता. मात्र, त्याचा गांभीर्याने विचार केला गेला नाही. त्यामुळे आग भडली. त्यानंतर आग विझविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. एका सरकारी अहवालानुसार भारतात जंगलांना आगी मुद्दामहून लावल्या जातात. या आगी लावून शेतीसाठी जमीन मिळवली जाते किंवा शिकारीसाठी जमीन तयार केली जाते. लाकडाच्या वापरासाठीही जंगलाला आग लावली जाते. उत्तर भारतात कमी प्रमाणात जंगल वणवा पेटतो. अशाप्रकारच्या मानवनिर्मित कारणांमुळे जंगलाला लागणा-या वनव्यांना मात्र हे संशोधन रोखु शकणार नाही हे सुद्धा तेवढेच खरे.

- सुरेश मंत्री

अंबाजोगाई

संपर्क- ९४०३६५०७२२



ज्यांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवायचे आहेत त्यांनी कुरआनमधील सुरे लुकमान क्र. 31 चे आवर्जुन वाचन करावे नव्हे या संबंधीचे वेगवेगळे भाष्य अभ्यासावेत आणि त्यातील बारकावे हेरून आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत. कारण हा सर्वात महत्त्वाचा पण तेवढाच दुर्लक्षित विषय आहे. 

’’बेटा, कोणतीही वस्तू ती मोहरीच्या दाण्याबरोबर का असेना आणि कोणत्याही खडकात किंवा आकाशात अथवा पृथ्वीत कोठेही लपलेली का असेना, अल्लाह ती काढून आणील. तो सूक्ष्मदर्शी व खबर राखणारा आहे.   

बेटा, नमाज कायम कर, सत्कृत्यांचा आदेश दे, दुष्कृत्यांची मनाई कर, आणि जी काही आपत्ती येईल त्यावर संयम राख. या त्या गोष्टी आहेत ज्यांची ताकीद दिली गेली आहे,    आणि लोकांशी तोंड फिरवून बोलू नकोस, पृथ्वीवर ऐटीत चालूदेखील नकोस, अल्लाह कोणत्याही अहंकारी व गर्व करणार्या व्यक्तीला पसंत करीत नाही.   

आपल्या चालीत मध्यमपणा राख आणि आपला आवाज थोडा धिमा ठेव, सर्व आवाजांपेक्षा अधिक वाईट आवाज गाढवाचा असतो.’’  (31:16-19)


यशस्वी जोडपे त्यालाच म्हणता येईल ज्यांची संतती चांगली निपजेल. आज आपण पाहतो अनेक मोठ्या लोकांची मुलं चांगली निपजत नाहीत. मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार करणाऱ्या लिंगपिसाट तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. व्यसनाधीन तरुणांच्या संख्येमध्ये ही लक्षणीय वाढ होताना दिसून येते. जगातील सर्वात जास्त अल्कोहोल उत्पादन आणि कंजप्शन भारतात होते. ही सर्व लक्षणे संस्कारहीन पिढीची लक्षणे आहेत. 

स्वातंत्र्यापूर्वी आणि त्या नंतरच्या जुन्या पिढ्या जशाजशा अस्तंगत होत चाललेल्या आहेत तशा-तशा असंस्कृत नवीन पिढ्या निपजत आहेत. त्याचे कारण असे की, भारतीय समाजाला भौतिक प्रगतीबरोबर नैतिक प्रगती साध्य करता आलेली नाही. या दोघांमधील असंतुलन हेच नवीन पिढ्यांना मार्गभ्रष्ट करण्यामध्ये महत्त्वाची भूमीका बजावत आहे. मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आई-वडिलांना पेलता आलेली नाही. अलिकडे हे दोघेही कामानिमित्त बाहेर असल्याने मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ कमी आहे किंवा नाही. म्हणून अलिकडची तरूण पीढि बेफिकीर, व्यसनाधिन, अश्लील गोष्टींना वाईट न समजणारी निपजत आहे. बालमनावर जे संस्कार होतात ते मरेपर्यंत टिकतात. म्हणूनच बालमनावर चांगले संस्कार करण्याची आवश्यकता आहे. आता संस्कार करण्याची ही महत्त्वाची जबाबदारी तारांकित शाळांवर सोपविण्यात आलेली आहे, ज्या की व्यावसायिक आहेत. पुर्वी गुरूकुल किंवा ख्वानख्वाहमध्ये जसे चांगले संस्कार सामाजिक बांधिलकीतून केले जात होते तशी बांधिलकी या तारांकित शाळांकडे नाही. एकंदरीत बालपणी आई-वडिलांकडूनही चांगले संस्कार मिळत नाहीत, एकल कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबांना घरात थारा नाही, म्हणून त्यांच्याकडूनही चांगले संस्कार मिळत नाहीत. तसेच तारांकित शाळांमधूनही ते मिळत नाहीत. मिळते तर फक्त पैसा कमाविण्याचे तंत्र. म्हणून नवीन पीढिचे लक्ष केवळ पैसा कमविण्यापर्यंत मर्यादित झालेले आहे आणि एकदा का अमाप  पैसा तरूणांच्या हातात आला की फार कमी तरूण असतात ज्यांना त्या पैशाचा सदुपयोग करण्याचे भान असते. बाकीचे तरूण तो पैसा आपल्या ऐश-आरामी जीवनशैलीवर खर्च करतात. यातूनच पाश्चिमात्य देशात अलिकडे नवीन म्हण प्रचलित झालेली आहे की ‘वर्क हार्ड अँड पार्टी हार्डर’ म्हणजे खूप कष्ट करा मात्र त्यानंतर आनंद मिळविण्यासाठी जी पार्टी केली जाते ती यशस्वी करण्यासाठी कामापेक्षा जास्त कष्ट करा. यातून जे पार्टी कल्चर उदयाला आले आहे त्यात नशा आणि मैथून या दोन गोष्टी भोवतीच त्यांचे आयुष्य फिरत आहे. 

आज मुलांवर चांगले संस्कार करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट अशी झालेली आहे. त्यासाठी वेग-वेगळे क्लासेस करावे लागतात, त्यांचे गलेलठ्ठ शुल्क भरावे लागतात. या पार्श्वभूमीवर मुलांवर चांगले संस्कार करण्याचा एक सोपा मार्ग, जो कुरआनने सुचविलेला आहे तो मराठी भाषिक वाचकांसमोर सादर करणे हा माझ्या सामाजिक बांधिलकीचा आग्रह आहे. म्हणून आज हा विषय चर्चेसाठी निवडला आहे. 

प्रत्येक माणसाच्या मनामध्ये नेकीची भावना लपलेली असते. परंतु या चमकदार मल्टीप्लेक्स संस्कृतीमुळे त्या भावनेवर धूळ जमते. अशात एखाद्याने चांगला उपदेश केला तर काहीच्या मनामधून ती धूळ नष्ट होऊन त्यांच्यामधील नेकी पुढे येते. जिचा लाभ सर्वसामान्य माणसाला होऊ शकतो. कुरआनच्या प्रत्येक अध्यायामध्ये कोणता ना कोणता उपदेश लिहिलेलाच आहे. परंतु सुरे लुकमान हा एक असा अध्याय आहे जो मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे मेकॅनिझम देतो. दुर्भाग्याने आज मुस्लिमांचा मोठा वर्ग कुरआनपासून प्रत्यक्षात तुटलेला असल्यामुळे सुरे लुकमान म्हणजे काय? हकीम लुकमान कोण होते? त्यांनी आपल्या मुलाला कोणता उपदेश केले होते? हे बहुतेकांना माहितच नाही. मुलांवर चांगले संस्कार करणे यापेक्षा महत्त्वाचा दूसरा विषयक माणसांच्या जिवनात असूच शकत नाही. कारण याच गोष्टीवर देशाचे भविष्य अवलंबून असते. देशाला नीतिमान नागरिकांचा सातत्याने पुरवठा करत राहणे यापेक्षा महत्वाची दूसरी जबाबदारी कोणती असू शकेल बरे?

हकीम लुकमान यांनी आपल्या मुलाला केलेले उपदेश आज जर पालकांनी आत्मसात केले तर मला खात्री आहे की ते आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यात यशस्वी होऊ शकतात. 

हकीम लुकमान कोण होते?

कुरआनमध्ये हकीम लुकमान यांच्या वयक्तिक जिवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. या संबंधात कुरआनच्या भाष्यकारांमध्येही एकमत नाही. मात्र सर्व भाष्यकारांचे एका गोष्टीवर एकमत आहे की, हकीम लुकमान एक हिकमतवाले (शहाणे) व्यक्ती होते. ते एवढे महान होते की ईश्वराने त्यांचा उल्लेख आपल्या ग्रंथामध्ये केला आहे. 

हकीम लुकमान यांचे उपदेश

1. हे माझ्या पुत्रा! मुश्रीक बनू नकोस. ईश्वरासोबत कोणालाही सामिल करू नकोस. लक्षात ठेव! शिर्क फार मोठा अत्याचार आहे.  ज्या ईश्वराने, एकट्याने संपूर्ण ब्रह्मांडाची रचना केली, मानवाला जन्माला घातले व सर्व ब्रम्हांडातील व्यवस्था सांभाळतो, त्याच्या व्यक्तित्वात आणि गुणां (सीफात) मध्ये जर्रा (अणु) एवढेही शिर्क (सहभागिता) करणे यापेक्षा मोठा अपराध दूसरा नाही. 

या पार्श्वभूमीवर आपण आपल्या तरूण पीढिचा अंदाज घेतला तर आपल्या लक्षात येते की, आजची ही पीढि ईश्वराप्रती काय दृष्टीकोण ठेवते? आणि त्यांच्या जीवनामध्ये ईश्वराचे काय महत्त्व आहे? त्यांचे फेसबुक प्रोफाईल तपासले तर सहज लक्षात येते की, ईश्वराबद्दल त्यांच्या मनामध्ये किती सन्मान आहे? या प्रति ते किती जाणीव बाळगून आहेत? आणि या संदर्भात किती गंभीर आहेत? मुळात ते कुरआनने दाखविलेल्या मार्गावर चालण्यास तयार नाहीत पण मार्ग झुकेरबर्गने दाखविलेल्या मार्गावर चालण्यासाठी अक्षरशः मरत आहेत. 

2. हे माझ्या पुत्रा ! लक्षात ठेव! या जमीन आणि आकाशाच्या दरम्यान, जे काही आहे त्या सर्वांची इत्यंभूत माहिती ईश्वराला आहे आणि त्यावर त्याचे पूर्ण नियंत्रणही आहे. कोणतीही गोष्ट मग ती कितीही सुक्ष्म असो ईश्वराच्या नजरेपासून लपून राहू शकत नाही. एवढेच नव्हे तर प्रत्येक जीवाच्या मनामध्ये व डोक्यामध्ये काय सुरू आहे याचीही जाणीव ईश्वराला आहे. हे लक्षात ठेव. 

3. हे माझ्या पुत्रा! कटाक्षाने नमाजशी स्वतःला जोडून घे. कारण ईमान (श्रद्धेनंतर) सर्वोच्च प्राधान्य नमाजला आहे, जी वेळेवर अदा केल्याशिवाय तू खरा आज्ञाधारक (मुस्लिम) बनूच शकत नाहीस. नमाज एक असे कृत्य आहे जे स्वतः तर उत्कृष्ट आहेच आहे सोबत अन्य उत्कृष्ट कार्य करण्याची प्रेरणा सुद्धा त्या मधून मिळते. 

नमाजचे महत्त्व कुरआनमधील इतरत्र आयातीमध्येही जागोजागी विशद केलेले आहे. उदा. पैगंबर (स.), पठन करा या ग्रंथाचे जो तुमच्याकडे दिव्यबोधाद्वारे पाठविला गेला आहे आणि नमाज कायम करा, निश्चितच नमाज, अश्लील व अपकृत्यांपासून रोखते आणि अल्लाहचे स्मरण याहूनही मोठी गोष्ट आहे. अल्लाह जाणतो तुम्ही लोक जे काही करता.  (सुरे अनकबूत 29: आयत क्रं. 45)

या आयातीच्या शेवटच्या वाक्यावर वाचकांनी लक्ष दिले तरी पुरेसे आहे. यात जो दावा केलेला आहे की नमाजमुळे व्यक्ती अश्लीलता आणि सर्व वाईट गोष्टींपासून लांब राहतो. एवढे जरी साध्य झाले तरी त्या व्यक्तीला यशस्वी व्यक्ती म्हणून संबोधता येईल. नमाज आणि वाईट गोष्टी एकत्र येवूच शकत नाहीत. याचा अनुभव आपल्याला रोज येतो. पाच वेळेस नमाज अदा करणारी व्यक्ती दारू पीत नाही, खोटं बोलत नाही, कोणाचा विश्वासघात करत नाही. भ्रष्टाचार करत नाही, बलात्कार करत नाही, व्याभीचार करत नाही, थोडक्यात कोणत्याही वाईट गोष्टी त्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. नमाजचे सुरक्षाकवच त्याला सर्व वाईट गोष्टींपासून सुरक्षित ठेवतात. कल्पना करा प्रत्येक व्यक्तीने जर हे सुरक्षा कवच धारण केले तरी समाजात वाईट गोष्टी शिल्लकच राहणार नाहीत. नमाजला केंद्रात ठेवून जो व्यक्ती आपले जीवन जगतो तो अयशस्वी होऊ शकत नाही.

4. हे माझ्या पुत्रा! समाज सुधारणेचे काम करत रहा. या ठिकाणी वाचकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी ती ही की समाजात फक्त व्यक्तीगतरित्या चांगले राहून भागत नाही तर सामाजिक सुधारणा केल्याशिवाय, कोणताही देश आदर्श बनू शकत नाही. या संदर्भात मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी अतिशय मार्मिक भाष्य केलेले आहे. ते म्हणतात, ‘‘नेक लोक भलेही थोडीसी तादाद में होने पर भी अगर मुनज्जम (संघटित)  हो जाएं और अपने जाती (व्यक्तिगत) और इज्तेमाई (सामुहिक) तौर पर खालिस रास्ती (सरळ मार्ग), इन्साफ (न्याय) व हकपसंदी (सत्याची पाठीराखण करणारे), खुलूस (फक्त ईश्वराच्या मर्जीप्रमाणे वागणारे) व दियानतदारी (प्रामाणिकपणा) पर मजबुती के साथ जम जाएं और लोगों के मसाईल हल करने और दुनिया के मसलों को हल करनेका का एक बेहतरीन प्रोग्राम रखते हों तो यकीन जानीए इस छोटिसी मुनज्जम नेकीकी मुकाबले में बडी से बडी मुनज्जम बदी अपने लष्करों की कसरत (सर्व शक्तीनिशी) और अपने गंदे हथियारों की (वाममार्गाला नेणाऱ्या गोष्टीनिशी) तेजी के बावजूद भी शिकस्त (पराजित) खाकर रहेंगी’’ मौलानांच्या या म्हणण्याच्या पार्श्वभूमीवर समाज सुधारणेचे किती महत्व आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. 

आज समाजसुधारणेची संकल्पनाच बदललेली आहे. वर्षभर चुकीच्या मार्गाने संपत्ती कमवून वर्षाअखेर गरीबांना मोफत चष्मे वाटून, पाच किलो गहू मोफत देऊन, ग्रीष्म ऋतूत रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्या काही गरीबांच्या अंगावर पांघरून टाकून संतूष्ट होणे म्हणजे समाजसेवा समजली जाते. वास्तविक समाजसेवा ती आहे जी अशी व्यवस्था देशात निर्माण करेल ज्यात प्रत्येक माणसाला सन्मानाने स्वतःचे पोट भरण्यासाठी सक्षम केले जाईल. 

5. वाईट काळात संयम बाळगणे : वाईट परिस्थिती वाट्याला आली तर माणसाचा जीव तडफडतो. बदला घेण्याची तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण होते. अशा परिस्थितीत संयम ठेवण्याचा उपदेशही हकीम लुकमान यांनी आपल्या मुलाला केला. 

या पाच मुख्य उपदेशांशिवाय, त्यांनी आपल्याला मुलाला खालील उपदेश केले -

’कोणाशीही बोलतांना तोंड फिरवून बोलू नकोस.’ आजकाल दुसऱ्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकण्याची प्रवृत्तीच लोकांमधून नष्ट होत आहे. प्रत्येकजण फक्त ‘मेरी आवाज सुनो’ म्हणत आपलेच म्हणणे रेटत आहे. मोठे लोक गरीबांशी बोलतांना साधी नजरवर करून त्यांच्याकडे पाहत नाहीत. मोबाईलवर बोलत असतांना तर समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे आता सामान्य बाब झालेली आहे. अशात आपले म्हणणे समोरची व्यक्ती ऐकत नाही याच्या किती वेदना बोलणाऱ्याला होतात याचा अंदाजही लोकांना नाही. म्हणून हकीम लुकमान यांनी लोकांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकण्याचा उपदेश आपल्या मुलाला केला आहे ही बाब किती महत्त्वाची आहे हे लक्षात येते. जेव्हा आपण दुसऱ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतो, त्यांच्या नजरेत नजर मिळवून त्यांच्याशी बोलतो तेव्हा त्यांच्या मनामध्ये आपल्याप्रती सन्मानाची भावना निर्माण होते. कारण बोलणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात येते की, तुम्ही त्यांना महत्त्व देत आहात. म्हणून तर त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत आहात. 

याशिवाय, हकीम लुकमान यांनी आपल्याला पुत्राला सांगितले की, ‘‘जमिनीवर ऐटीत चलू नको. तुला मातीपासून जन्माला घातले गेले आहे आणि शेवटी तुझी मातीच होणार हे लक्षात ठेव.‘‘ गर्वाने जमिनीवर ऐटीत चालणे ही गर्वाची निशाणी आहे आणि गर्व फक्त ईश्वराला शोभतो, माणसाला नव्हे. आज चित्रपटांमधून ऐटीत चालण्याचे वेगवेगळे प्रकार दाखविण्यात येतात. जे पाहून आजची तरूण पीढि प्रत्यक्ष जीवनामध्ये तशीच ऐटित चालण्याची नक्कल करते आणि अयशस्वी होते. टिकटॉकवरून तरूणांच्या वेगवेगळ्या चालींचे व्हिडीओ पाहिले तर मती गुंग होऊन जाते आणि या गोष्टीचे दुःख होते की, मुस्लिमांची आजची तरूण पीढि कुरआनच्या उपदेशापासून किती लांब गेलेली आहे. 

हकीम लुकमान यांनी परत आपल्या मुलाला सांगितले की, ‘‘कोणाशीही बोलताना आपला स्वर लघू ठेव.’’ म्हणजे मोठ्या आवाजात बोलू नको. हा सुद्धा अतिशय शहानपणाचा उपदेश आहे. कारण अनेकवेळा मोठ्या आवाजात बोलण्यामुळे बनत असलेले कामही बिघडून जाते. 

थोडक्यात हे ते सारे उपदेश आहेत जे की, हकीम लुकमान यांनी आपल्या मुलाला केले होते. ज्यांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवायचे आहेत त्यांनी कुरआनमधील सुरे लुकमान क्र. 31 चे आवर्जुन वाचन करावे नव्हे या संबंधीचे वेगवेगळे भाष्य अभ्यासावेत आणि त्यातील बारकावे हेरून आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत. कारण हा सर्वात महत्त्वाचा पण तेवढाच दुर्लक्षित विषय आहे. 

आज कुठलाच दिवस किंवा तास असा जात नाही जेव्हा आपल्या देशात गुन्हे होत नाहीत. गुन्हेगारी केवळ वाईट संस्काराच्या पीढिद्वारेच केली जाते. कितीही पोलीस भरती करा, कितीही कायदे बनवा, कितीही कोर्ट तयार करा, त्यात कितीही न्यायाधिश बसवा, कितीही प्रॉसिक्युटर नेमा गुन्हेगारी कधीच संपणार नाही. ती संपेल तर केवळ चांगल्या संस्कारातून निर्माण झालेल्या आत्मसंयमाने. आदर्श समाज निर्मितीचा हाच एकमेव मार्ग आहे दूसरा नाहीच आणि हे करण्याची संधी फक्त मुस्लिमांनाच उपलब्ध आहे दुसऱ्यांना नाही. ही किती सौभाग्याची गोष्ट आहे हे प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने लक्षात घ्यावे. शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, ‘‘हे अल्लाह आम्हाला आमच्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी सुरे लुकमानमधील उपदेशांचे पालन करण्याची सद्बुद्धी आणि शक्ती प्रदान कर.’’ आमीन. 

- एम.आय. शेख 


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget