(खऱ्याखुऱ्या गमतीदार गोष्टी)
एके दिवशी एक स्त्री प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे आली. प्रेषित तिला म्हणाले, "घरी जा लवकर आणि बघ! तुझ्या नवऱ्याच्या डोळ्यांचा बराचसा भाग पांढरा शुभ्र झाला आहे."
हे ऐकून ती बाई घाबरली. प्रेषित अगदी सहज बोलून गेले. त्या इस्त्रीला काय वाटले कुणास ठाऊक. प्रेषितांनी अचानक असे का सांगितले असावे याची कोणतीच शहानिशा न करता किंवा त्यावर काहीही विचार न करता ती सरळ धावतच घरी आली आणि नवऱ्याच्या डोळ्यात बघू लागली.
नवऱ्याने विचारले, "काय बघतेस?"
बाई म्हणाली, "प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असे सांगितले की तुझ्या पतीच्या डोळ्यांचा बराचसा भाग पांढरा झाला आहे."
हे ऐकून तिचा पती हसू लागला. पतीला हसतांना पाहून ती अधिकच बुचकळ्यात पडली. तिला काहीच सुचत नव्हते.
पती म्हणाला, "अल्लाहचे प्रिय प्रेषित खरे म्हणाले, माझ्या डोळ्यातील काळ्या बुबुळाभोवतीचा भाग पांढराच आहे आणि ही काही नवीन गोष्ट नाही. प्रत्येक व्यक्तीचे डोळे असेच असतात."
असे सांगून पती पुन्हा हसू लागला.
आता तिला समजले की, प्रेषितांनी आपली गंमत केली. या गोष्टीचा तिला खूप आनंद झाला. ही मजेशीर गोष्ट ती इतरांना मोठ्या अभिमानाने सांगायची.
--------------------------
दौलत
तैमूर लंग राजा झाला. तो खूप शक्तिशाली आणि क्रूर राजा होता. तो एका पायाने लंगडा होता. त्याने भारतावर आक्रमण करून हजारो निष्पाप लोकांची हत्या केली. भारताचा राजा त्याच्याकडून हरला. शेवटी शांतीसाठी खूप दबावात त्याने तैमूर लंगशी तह केला.
समेटानंतर, तैमूर लंगला भारतीय नृत्य दाखवण्यात आले आणि एक गाणे ऐकविले गेले. तैमूरसमोर एक नृत्यांगना (वेश्या) नाचत होती. ती आंधळी होती. तैमूरला तिचं नृत्य आणि गाणं खूप आवडलं.
त्याने नृत्यांगणाला तिचे नाव विचाराले.
नृत्यांगणा म्हणाली, "दौलत!"
तैमूर हसला आणि म्हणाला, "दौलत (संपत्ती) कुठे आंधळी असते?"
नृत्यांगणाने लगेच उत्तर दिले, "हुजूर! दौलत (संपत्ती) आंधळी नसती तर लंगड्याकडे आली नसती."
या उत्तराने तैमूर खूप खूश झाला आणि त्याने नृत्यांगणाला भरपूर बक्षीस दिले.
संपत्तीला आंधळी म्हणतात कारण, ज्याला संपत्ती मिळते तो खूप गर्विष्ठ होतो, मनमानी करतो आणि अनेक प्रकारच्या पापांमध्ये अडकतो. जणू तो आंधळा होतो.
मात्र, जर अल्लाहचे भय हृदयात राहिले तर असे होत नाही. निश्चितच माणसाने मोठ्या प्रमाणावर संपत्ती मिळवावी त्याला काही हरकत नाही आणि खर्चही करावे परंतु संपत्ती मिळवण्याचा मार्ग आणि खर्च करण्याचा मार्ग दोन्हीही वैध असणे आवश्यक आहे. निवाड्याच्या दिवशी जेव्हा माणूस अल्लाहच्या समक्ष उभा राहील तेव्हा त्याने संपत्ती कुठून मिळवली आणि कुठे खर्च केली या प्रश्नांची उत्तरे त्याला द्यावी लागणार आहेत. तेव्हा संपत्ती मिळवण्यासाठी वाम मार्गाचा अवलंब करू नये किंवा वाम मार्गात संपत्ती खर्चही करू नये.
- सय्यद झाकीर अली
परभणी,
9028065881
Post a Comment