माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, मुआज बिन जबल (रजि.) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबरोबर ('मस्जिद-ए-नबवी'मध्ये 'नफ्ल' (अनिवार्य नसलेली- ऐच्छिक) नमाज अदा करीत आणि मग आपल्या समुदायाची इमामत करीत असत. त्यांनी एके रात्री इशाची नमाज पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासह अदा केली आणि मग आपल्या समुदायाची इमामत केली आणि 'सूरह बकरा'चे पठण सुरू केले तेव्हा एका मनुष्याने नमाज समाप्त केली आणि वेगळी आपली नमाज अदा करून घरी गेला. दुसऱ्या नमाजींनी (नमाज अदा केल्यानंतर) त्याला म्हटले,
''तू विद्रोहाचे काम केले.'' तो म्हणाला, ''नाही. मी धर्मद्रोहाचे काम केलेले नाही. अल्लाहची शपथ! मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे जाईन. (आणि मुआज यांच्या दीर्घ नमाजची गोष्ट सांगेन.)''
मग तो पैगंबरांकडे येऊन म्हणाला, ''हे अल्लाहचे पैगंबर! आम्ही उंटांद्वारे शेताला पाणी देण्याचे काम करतो (मजुरीवर लोकांच्या बागा आणि शेतीच्या सिंचनाचे काम करतो). दिवसभर आमच्या कामात व्यस्त असतो आणि मुआज यांची स्थिती अशी आहे की इशाची नमाज पैगंबरांसमवेत अदा करून गेले आणि सूरह बकराचे पठण सुरू केले (आम्ही दिवसभर कंटाळलेलो असल्याकारणाने इतका वेळ कसे उभे राहू शकतो)?'' हे सर्व पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ऐकल्यानंतर मुआजकडे वळले आणि म्हणाले, ''हे मुआज! तुम्ही लोकांमध्ये भांडणे लावू इच्छिता काय? 'वश्शमसि व जुहाहा'चे पठण करा, `वल्ललि इज़ा यग़शा'चे पठण करा, 'सब्बिहिस्मा रब्बिकल अअला'चे पठण करा.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) इशाची नमाज एकतृतियांश रात्र उलटल्यानंतर अदा करीत असत. माननीय मुआज (रजि.) पैगंबरांबरोबर `नफ्ल'च्या संकल्पासह सहभागी होत असत, मग पोहोचण्यात काही वेळ निघून जात असे, मग `सूरह बकरा'सारखे सूरहचे पठण करीत, त्यासाठी बराच वेळ व्यतीत होत असे आणि तिकडे परिस्थिती अशी होती की लोक दिवसभर शेतात आणि बागांमध्ये काम करून थकून जात होते. अशा स्थितीत आणि अशा लोकांदरम्यान दीर्घ नमाज अदा करण्याचा परिणाम असा होऊ शकतो की लोक (नमाज अदा न करताच) निघून जातील. याबाबत पैगंबरांनी माननीय मुआज (रजि.) यांना सतर्क केले.
Post a Comment