प्रेषितपूर्व काळात मुहम्मद (स.) रमजानच्या महिन्यात मक्काजवळील हिरा नामक गुहेत एकाग्र होऊन विचारविनिमय करत होते. मक्का अरबस्थानमध्ये एक असे शहर होते जिथे काबागृह होते. या काबागृहाचे दर्शन करण्यासाठी अरबस्थानातून विभिन्न भागांचे लोक दरवर्षी एकत्र येत होते. आणि म्हणूनच मक्केचे व्यापारी अरबस्थानच्या इतर भागांपेक्षा जास्त श्रीमंत होते. अरबस्थानात सर्वत्र कबिल्या-कबिल्यांमध्ये भांडणे आणि लढाया सर्रास चालायच्या. पण मक्केत काबागृह आणि त्या काबागृहाचे दर्शन करण्यासाठी अरबस्थानच्या कानाकोपऱ्यांतून लोक येत असत. म्हणून या शहरात कधी लढाया वा तंटे होत नसत, तर नेहमी शांतता नांदत असे. काबागृहाचा अभिमान अरबस्थानातील ज्यू आणि ख्रिस्ती धर्मियांनाही होता. अरबांना ही गोष्ट नेहमी खटकत होती की ख्रिस्ती आणि ज्यू धर्मियांना जसे अल्लाहने धर्मग्रंथाने नवाजले आहे तसे त्यांच्यासाठी कोणी धर्मग्रंथ पाठवला नाही. अल्लाहने त्यांना दैवी योजनेपासून वेगळे ठेवले अशी त्यांना खंत होती. पण अरबांच्या स्थितीत एका घटनेपासून विलक्षण बदल झाला. मुहम्मद (स.) ज्या गुहेत झोपलेले होते तेथे त्यांना हाक देऊन जागवले गेले आणि त्यांना एक अनुभव आला ज्याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. त्यांच्याकडे एक देवदूत (जिब्रईल अ.) आले आणि त्यांना म्हणाले, “वाचा, अल्लाहच्या नावाने.” मुहम्मद (स.) म्हणाले, “मला वाचता येत नाही.” त्या देवदूतांनी त्यांना आलिंगन दिले आणि पुन्हा वाचायला सांगितले आणि त्यांनी सांगितले तसे वाचायला सुरुवात केली. हा दैवी ग्रंथ होता ज्याच्या अवतरणाची सुरुवात मुहम्मद (स.) यांच्यावर झाली. अल्लाहने मुहम्मद (स.) यांची प्रेषित म्हणून निवड केली आणि त्यांच्याद्वारे अरबांचाच सन्मान वाढवला. पुढे जाऊन प्रेषित मुहम्मद (स.) सर्व मानवजातीसाठी प्रेषित म्हणून निवडले गेले. अशा प्रकारे अरबांची शतकानुशतकांची खंत संपली. त्यांनाही दैवी ग्रंथ अल्लाहने प्रेषितांद्वारे पाठवला. ही घटना रमजान महिन्यातील सातव्या रात्रीची होती. अल्लाहने प्रथमच अरबांशी प्रेषितांद्वारे संवाद साधला होता. त्यांच्या स्वतःच्या भाषेत ह्या धर्मग्रंथाला पवित्र कुरआनचे नाव दिले गेले.
पण या महत्त्वाच्या घटनेचे पडसाद भयंकर होते. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जेव्हा अल्लाहचा संदेश अरबांना पोहोचता करण्याची सुरुवात केली, तेव्हा सबंध अरबस्थानात भयंकर अराजकता होती. जितके अरबांचे कबिले तेथे होते तितकेच त्यांचे स्वतःचे कायदे आणि नियम होते. कोणत्याही एका कबिल्याच्या वर्चस्वाला कुणी मानत नव्हते आणि म्हणून वर्षाच्या बारा महिने कोणत्या न् कोणत्या कबिल्यामध्ये भांडण होई आणि पुढे जाऊन युद्ध होत असे. आणि ह्या लढाया वर्षानुवर्षे, पिढ्यान् पिढ्या चालत राहत. हिजाझचा संपूर्ण भूभाग आणि तिथले निवासी जगातल्या कोणत्याच सभ्यतेत सामील नव्हते. मुक्त सभ्यतेशी त्यांचे काहीही देणेघेणे नव्हते. पण जेव्हा २३ वर्षांनंतर प्रेषित मुहम्मद (स.) यांनी या जगाचा निरोप घेतला ८ जून ६३२ रोजी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अरबस्थानातल्या साऱ्या कबिल्यांना एकत्र करून त्यांना मुस्लिम समुदायात सामील केले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असंख्य अडचणी, विरोध, लढाया या सर्वांचा सामना करून अरबमध्ये ही एकता घडवून आणली. आपल्या ह्या महान राजकीय कामगिरीद्वारा प्रेषितांनी आपल्या लोकांच्या जीवनात कायापालट केला. त्यांनी अरबांना सतत चालत आलेल्या हिंसेपासून आणि रक्तपातापासून वाचवले आणि त्यांना अभिमान वाटावा अशी ओळख जगभर मिळवून दिली. ज्या लोकांचा कोणत्या संस्कृती-सभ्यतेचा कसलाही संबंध नव्हता त्यांना एक विशेष संस्कृती दिली. प्रेषित मुहम्मद (स.) यांमच्या शिकवणींनी अशी शक्ती त्या लोकांना प्रदान केली की केवळ शंभर वर्षांमध्ये अरबांच्या साम्राज्याचे स्पेनपासून हिमालयापर्यंत विस्तार झाला. मुहम्मद (स.) यांनी फक्त हेच साकार केले नव्हते तर त्यांनी ज्या धर्माच्या शिकवणी अरबांना दिल्या त्या धर्माची जी कल्पना त्यांनी लोकांसमोर ठेवली त्याचा परिपाक म्हणजे त्यांना हे अनन्यसाधारण यश प्राप्त झाले. कारण त्यांच्या अनुयायांनी स्वतःची एक आध्यात्मिक गरज म्हणून त्या शिकवणींचे पालन केले. त्यांचे अनुयायी आणि सबंध अरब लोकच एका संघर्षाला सामोरे जात होते जर धर्म आणि धर्माच्या शिकवणींचा त्यांना आधार मिळाला नसता तर ते टिकू शकले नसते की जगू शकले नसते. तत्कालीन मुस्लिमांना प्रेषितांच्या अभूतपूर्व सामर्थ्याची जाणीव होती आणि म्हणूनच त्यांना हे भान होते की प्रेषितांनी अरबस्थानाचीच नव्हे तर जागतिक इतिहासाचे चक्रच बदलून टाकले.
(अनुवाद – सय्यद इफ्तिखार अहमद)
Post a Comment