Halloween Costume ideas 2015

मुल्ला अब्दुल कय्युम खान

(१८५३-१९०६)



मुल्ला अब्दुल कय्युम खान यांचा जन्म १८५३ मध्ये मद्रास येथे झाला. ब्रिटीश आणि निजामांविरुद्ध लढण्यासाठी लोकांना जागृत करणारे ते एक प्रणेते होते, त्यांना बलाढ्य शक्तींच्या रोषाला तोंड देणे हे चांगलेच माहीत होते. त्यांचे आईवडील बालपणीच हैदराबादला स्थायिक झाले. दार-उल-उलूममध्ये पर्शियन आणि उर्दू शिकल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे उच्च शिक्षण पूर्ण केले. ते हैदराबाद संस्थानात कर्मचारी म्हणून सेवेत रुजू झाले आणि लवकरच उच्च पदावर पोहोचले.

१८८० मध्ये प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी नायडू यांचे वडील अघोरानाथ चटोपाध्याय यांना भेटले. त्यांच्यात निर्माण झालेली मैत्री हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून उभी राहिली आणि ऐतिहासिक घटनांना कारणीभूत ठरली.

अब्दुल कय्युम खान यांना लहानपणापासून लोकसेवेची आवड होती. त्यांनी शिक्षण आणि प्रबोधनाच्या प्रसाराला प्राधान्य दिले आणि त्यासाठी विविध संस्था आणि संघटना स्थापन केल्या. त्यांनी डॉ. अघोरानाथ यांच्यासमवेत “चांदा रेल्वे प्रकल्प विरोधी आंदोलन” मध्ये सक्रिय सहभाग घेतला.

निजामाचे आदेश जर मोठ्या प्रमाणावर लोकांच्या कल्याणासाठी नसतील तेव्हा अब्दुल कय्युम खान यांनी सामान्य लोकांमध्ये नियमभंग करण्याची जागृती निर्माण केली. या कारणास्तव त्यांना निजामाच्या रागाचा सामना करावा लागला आणि काही काळासाठी हैद्राबाद राज्यातून हद्दपार करण्यात आले.

१८८५ मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये सामील होणारे हैदराबाद राज्यातील पहिले मुस्लिम नेते म्हणून त्यांनी इतिहास रचला. सर सय्यद अहमद खान यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसविरोधी मोहिमेला तोंड देण्यासाठी त्यांनी ‘सफिरे-ए-डेक्कन’ नावाच्या वृत्तपत्रात निबंध लिहिले.

अब्दुल कय्युम खान यांनी १९०५ मध्ये त्यांच्या टीकाकारांना शांत करण्यासाठी एक पुस्तिका प्रकाशित केली. त्यांनी केवळ मुस्लिमांनाच नव्हे तर सर्व लोकांना निजामाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील होण्याचे आवाहन केले.

१९०५ मध्ये बंगालच्या फाळणीच्या विरोधात झालेल्या आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि स्वदेशी चळवळीला वेग आणि शक्ती दिली. सांप्रदायिक सौहार्द वाढवण्याच्या त्यांच्या कार्यासाठी त्यांचा केवळ ‘हिंदू-मुस्लिम ऐक्याचे महात्मा’ म्हणून नव्हे तर ‘हिंदू मुस्लिम ऐक्याचे मूर्त रूप’ म्हणूनही लोकांनी गौरव केला. त्यांचे समतावादी विचार, देशप्रेम, वैश्विक बंधुत्वाच्या आदर्शांनी सरोजिनी नायडू यांना ‘एक महान मुस्लिम, एक महान भारतीय आणि एक महान मानव’ असे वर्णन करण्यास प्रभावित केले. अशा या महान देशभक्त मुल्ला अब्दुल कय्युम खान यांनी २७ ऑक्टोबर १९०६ रोजी अखेरचा श्वास घेतला.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget