(७३) तोच आहे ज्याने आकाश व पृथ्वीला सत्यानिशी निर्माण केले आहे.४६ आणि ज्या दिवशी तो सांगेल की पुनरुत्थान व्हावे तेव्हा त्याच दिवशी ते होईल. त्याचे कथन सर्वस्वी सत्य आहे. आणि ज्या दिवशी नरसिंग फुंकले जाईल४७ त्या दिवशी सत्ता त्याचीच असेल.४८ तो परोक्ष आणि अपरोक्ष४९ प्रत्येक वस्तूचा ज्ञाता आहे आणि बुद्धिमान व जाणकार आहे. (७४) इब्राहीम (अ.) च्या घटनेची आठवण करा जेव्हा त्याने आपल्या पित्या आजरला सांगितले होते, ‘‘काय तू मूर्तींना ईश्वर बनविलेस?५० मी तर तुला व तुझ्या लोकांना उघड पथभ्रष्ट पाहात आहे.’’
४६) कुरआनमध्ये ही गोष्ट अनेकदा सांगण्यात आली आहे, की अल्लाहने जमीन व आकाशांना सत्याधिष्ठित निर्माण केले आहे. या कथनाचा अर्थ व्यापक आहे. याचा पहिला अर्थ म्हणजे जमीन व आकाशांची निर्मिती फक्त मनोरंजनासाठी झालेली नाही, किंवा ही एखाद्या देवीदेवताची लीलासुद्धा नाही. हे एखाद्या लहान मुलाचे खेळणे नव्हे की ज्याच्याशी तो मन रमण्यासाठी खेळत राहील आणि खेळता खेळता शेवटी तोडून देईन! वास्तविकपणे हे एक मोठे गंभीर निर्मितीकार्य आहे, ज्याला बुद्धीविवेकाच्या व तत्त्वदर्शितेच्या आधारावर निर्माण केले आहे. एक महान उद्देश त्यात सामावलेला आहे आणि याचे एक युग संपल्यानंतर अनिवार्यत: निर्माणकर्ता त्या सर्व निर्मितीकार्याचा आढावा घेईल, जे या युगात केले गेले आणि त्यांच्याच आधारावर पुढील युगाचा पाया ठेवील. कुरआनमध्ये हेच अशा पद्धतीने दुसरीकडे सांगितले, ``हे आमच्या पालनकत्र्या प्रभु! हे सर्व काही तू व्यर्थ निर्माण केले नाही.'' आणि ``आम्ही जमीन व आकाशांना आणि त्यांना जे जमीन व आकाशांमध्ये आहेत, खेळ तमाशा म्हणून निर्माण केले नाही.'' तसेच ``तर काय तुम्ही समजून बसला आहात का आम्ही तुम्हाला असेच निरर्थक जन्माला घातले आणि तुम्ही आमच्याकडे परत फिरविले जाणार नाहीत?''
दुसरा अर्थ हा आहे की अल्लाहने सृष्टीची ही संपूर्ण व्यवस्था सत्याच्या ठोस आधारशिलेवर स्थापित केली आहे. न्याय, तत्त्वदर्शिता, बुद्धीविवेक आणि सत्य नियमांवर याची प्रत्येक बाब आधारित आहे. खरे तर या व्यवस्थेत असत्याचे मूळ रूजण्यास व त्याची वृध्दी होण्यास मुळीच वाव नाही. ही वेगळी गोष्ट आहे की अल्लाहने असत्यवादींना संधी द्यावी की ते जर आपला टेपणा, अन्याय व असत्यतेला वृद्धिंगत करू इच्छित असतील तर आपल्यापरीने प्रयत्न करून पाहावा आणि शेवटच्या हिशोबात प्रत्येक असत्यवादी हे पाहील की त्याने या विषारी रोपांची शेती व सिंचन करण्यात जे अथक प्रयत्न केले होते ते सर्व व्यर्थ गेले.
तिसरा अर्थ हा आहे की अल्लाहने या समस्त सृष्टीला सत्याधिष्ठित निर्माण केले आहे आणि आपल्या व्यक्तिगत अधिकारातच तो सृष्टीवर शासन करीत आहे. त्याचा आदेश येथे यामुळे चालतो की तोच आपल्या निर्माण केलेल्या सृष्टीवर पूर्ण अधिकार बाळगून आहे. दुसऱ्यांचा आदेश प्रत्यक्षात वरकरणी लागू होतांना दिसत ही असेल तरी त्यापासून धोका खाल्ला जाऊ नये. खरे तर दुसऱ्या कोणाचाच आदेश चालत नाही आणि भविष्यातही चालणार नाही कारण सृष्टीच्या कोणत्याच वस्तूवर त्यांना अधिकार प्राप्त् नाही जेणेकरून तिच्यावर त्यांनी आपला हुकूम चालवावा.
४७) ``सूर फुंकणे'' (रणिंशग फुंकणे) याचे खरे स्वरुप काय असेल त्याचे विवरण करणे आमच्या बुद्धिपलीकडचे काम आहे. कुरआनद्वारा जे काही ज्ञान आम्हाला प्राप्त् होते ते म्हणजे कयामतच्या दिवशी (प्रलय) अल्लाहच्या आदेशाने एकदा सूर (रणिंशग) फुंकले जाईल आणि सर्व जग नष्ट केले जाईल. नंतर काही कालावधीनंतर (ज्यास अल्लाह जाणतो) दुसऱ्यांदा सूर फुंकले जाईल आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या सर्व माणसांना पुन्हा जिवंत करून `हश्र'च्या मैदानात एकत्र केले जाईल. पहिल्यांदा सूर फुंकल्यावर सृष्टी व्यवस्था पूर्ण छिन्नविछिन्न होईल आणि दुसऱ्यांदा (दुसरा रणिंशग फुंकल्यावर) एक नवीन व्यवस्था नवीन रूपात नवीन नियमानुसार स्थापित होईल.
४८) हा अर्थ नाही की आज त्याची बादशाही नाही, तर अर्थ आहे की त्या दिवशी जेव्हा पडदा उठविला जाईल आणि वास्तविकता समोर येईल मग माहीत होईल की ते सर्व वरकरणी अधिकारप्राप्त् दिसत होते अथवा समजले जात होते ते सर्व पूर्णत: अधिकारविहीन आहेत. बादशाहीचे संपूर्ण अधिकार त्याच एक अल्लाहसाठी आहेत ज्याने सृष्टी निर्माण केली आहे.
४९) गैब (परोक्ष) म्हणजे ते सर्व काही जे निर्मितीपासून अदृश्य आहे `शहादत' (अपरोक्ष) ते सर्व जे सर्वांना माहीत आहे आणि सर्वांना प्रकट आहे.
५०) येथे आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या घटनेचा उल्लेख या गोष्टीच्या समर्थनार्थ आणि साक्षीसाठी केला आहे की अल्लाहच्या मार्गदर्शनाने ज्याप्रमाणे आज पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या साथीदारांनी अनेकेश्वरत्वाचा (शिर्क) इन्कार केला आहे. सर्व कृत्रिम व बनावटी ईश्वरांना सोडून ते फक्त एकाच विश्वव्यापी ईश्वराला समर्पित झाले. ठीक त्याचप्रमाणे गतकाळात हीच भूमिका इब्राहीम (अ.) यांनी पण स्वीकारली होती. पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्यावर श्रद्धा बाळगणाऱ्यांशी त्यांचे अज्ञानी लोक भांडत आहेत त्याचप्रमाणे गतकाळात इब्राहीम (अ.) यांच्याशी त्यांचे समाजबांधव हेच भांडण करीत होते. त्या वेळी आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांनी आपल्या समाजबांधवांना जे उत्तर दिले होते तेच उत्तर आज पैगंबर (स.) आणि त्यांचे सहकारी आपल्या समाजबांधवांना देत आहेत. आदरणीय पैगंबर मुहम्मद (स.) हे त्याच मार्गावर आहेत जो नूह व इब्राहीम (अ.) आणि इब्राहीमी वंशातील सर्व पैगंबरांचा मार्ग होता. आता जे कोणी त्यांचे अनुसरण करण्यासाठी नकार देत आहेत, त्यांना कळून चुकले पाहिजे की ते पैगंबरांच्या मार्गाला सोडून भ्रष्टतेच्या मार्गावर जात आहेत. येथे हेसुद्धा समजून घेतले पाहिजे की अरबचे लोक सर्व साधारणात: आदरणीय इब्राहीम (अ.) यांना आपला नेता, मार्गदर्शक आणि अनुकरणीय मानत होते. मुख्यत: कुरैश लोकांच्या गर्वाचा पायाच यावर आधारित होता की ते आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांनी बांधलेल्या काबागृहाचे सेवक आहेत. म्हणून त्यांच्यासमोर आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या एकेश्वरीवादी धारणेचा तसेच अनेकेश्वरत्वाला त्यांनी दिलेला नकार आणि अनेकेश्वरवादींशी त्यांचा झालेला विवादाचा उल्लेख येथे आला आहे, जेणेकरून कुरैशचा गर्व आणि अहम्भाव तसेच अरबच्या अनेकेश्वरवादींचा आत्मसमाधान पुरता काढून घेतला जावा. विरोधकांना सुनिश्चित केले जावे की आज मुस्लिम त्या जागेवर आहेत, ज्या जागेवर आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) होते. आता विरोधकांची जागा ती आहे जी आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांचे विरोधक, अज्ञानी लोकांची होती. हे असेच आहे जसे आज कोणी शेख अब्दुल कादिर जिलानी (रह.) यांचे श्रद्धाळू आणि कादरी वंशाचे पिरजादे यांच्यासमोर शेख साहेबांची मूळ शिकवण आणि त्यांच्या जीवनघटना सांगून त्यांनी सिध्द करावे की ज्या महात्म्यांचे नांव तुम्ही घेता, परंतु तुमचे आचरण त्यांच्या शिकवणीच्या ठीक विरुद्ध आहे. तुम्ही तर त्याच मार्गभ्रष्ट लोकांच्या मार्गावर चालला आहात ज्यांच्याविरुद्ध शेख जिलानी साहेबांनी आपल्या आयुष्यात संघर्ष केला होता.
Post a Comment