Halloween Costume ideas 2015

अन्यायाच्या प्रतिकारार्थ सामाजिक भांडवलाचे बळकटीकरण!

help
अनुसूचित जाती / बौद्ध व मुस्लिमांना आपल्यावरील अन्याय अत्याचाराचा परिणामकारक मुकाबला करायचा असेल तर विविध प्रकारचे सामाजिक भांडवल पुरेशा प्रमाणात उभारून  आर्थिक व भौतिक दृष्टीने सक्षम व्हावे लागेल. भांडवल म्हणजे केवळ आर्थिक ऐपत नव्हे. समाजाचे प्राथमिक भांडवल म्हणजे व्यक्ती अथवा व्यक्तींचा समूह हे असते. समाजातील  प्रत्येक व्यक्तीकडे आणि व्यक्तीसमूहांकडे स्वतःची अशी काही गुणवैशिष्ट्ये, बलस्थाने असतात. व्यक्ती समाजाचा घटक म्हणून वावरत असताना आपल्या या गुणवैशिष्ट्यांचे व  बलस्थानाचे म्हणजेच आपल्याकडील भांडवलाचे योगदान आपल्या समाजाला देत असतो. हे भांडवल चार प्रकारचे असते. १) ग्राहक भांडवल, २) गुंतवणूक भांडवल, ३) कौशल्य आणि  बुद्धिमत्ता यांचे भांडवल आणि ४) सामाजिक संचित भांडवल.

ग्राहक भांडवल
ग्राहक भांडवल समाजातील सदस्यांच्या आर्थिक उत्पन्नाशी निगडीत असते. आर्थिक उत्पन जेवढे अधिक तेवढा राहणीमानाचा दर्जा अधीक उन्नत हे बाजारपेठीय तत्त्व येथे लागू होते.   व्यक्तीला मिळणाऱ्या उत्पन्नानुसार व्यक्तींचे खाणेपिणे, कपडेलत्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण, मनोरंजन, पर्यटन, सेवासुविधांचा वापर यावर होणारा खर्च अवलंबून असतो. अनुसूचित  जाती / बौद्धांच्या आर्थिक उत्पनात वाढ होण्यास नोकऱ्या व शिक्षण यातील ‘आरक्षण’ या सामाजिक भांडवलाचे सर्वांत मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे चळवळीच्या माध्यमातून   पारंपरिक गावकीच्या व्यवसायाचा त्याग करून नवीन व्यवसाय स्वीकारण्यास दिले गेलेले प्रोत्साहन याचाही मोठा वाटा आहे. बौद्ध-दलितांच्या आर्थिक उत्पन्नात झालेली वाढ चळवळीतून  प्राप्त झालेल्या सामाजिक भांडवलामुळे झाली आहे, याचे भान बौद्ध दलितांना अजूनही आलेले नाही. यामुळे इतर काही समाजगटांप्रमाणे आपल्या ग्राहकशक्तीचा वापर करून  अन्यायकर्त्यांना जरब बसविण्याचा विचार बौद्ध दलितांनी अद्याप केलेला नाही. तो करण्याची आता खरोखर गरज निर्माण झाली आहे.
औद्योगिक व औद्योगीकोत्तर काळात प्रत्येक  समाजाची रचना बहुस्तरीय झालेली आहे. आरक्षणातून मिळालेल्या नोकऱ्या, पारंपरिक जातीय व्यवसाय सोडून देऊन बुद्धी व कौशल्यावर आधारित नवीन व्यवसाय स्वीकारणे, यामुळे   सामाजिक उतरंडीत कनिष्ठ समजले गेलेल्या समाजात उच्च उत्पन्न मिळविणारा वर्ग अस्तित्वात आला आहे. हा वर्गसुद्धा बऱ्यापैकी खरेदीशक्ती असलेला वर्ग आहे. मात्र जातीश्रेष्ठ्त्व हे  व्यवच्छेदक लक्षण असलेल्या बाजारपेठीय व्यवस्थेत या उच्च खरेदीशक्ती असलेल्या निम्नजातीय जातवर्गाची / मुस्लिमवर्गाची सन्मानपूर्वक दखल घेतली जात नाही. उदा. ब्राह्मण,  जैन अथवा तथाकथित उच्चजातीय वसाहतीत घर विकत/भाड्याने घेण्याची ऐपत असूनही केवळ विशिष्ट जातीचे (किंवा मुस्लिम) म्हणून घर विकत किंवा भाड्याने दिले जात नाही.   ब्राह्मण, जैन अथवा तथाकथित उच्चजातीय शिक्षण संस्थामध्ये, क्लब, जिमखाना इत्यादीमध्ये विहित फी भरण्याची ऐपत असूनही तेथे जातवर्गाच्या कारणावरून प्रवेश दिला जात   नाही. अशी अनेक उदाहरणे दाखविता येतील. पुरेशी ग्राहकशक्ती / खरेदीशक्ती असूनही जातीय आधारावर अपमान आणि अन्याय होत असेल तर अशा  अन्यायग्रस्त समूहातील   ग्राहकांनी आपल्या ग्राहक शक्तीचा वापर करताना जेथे शक्य आहे तेथे सामाजिक भान ठेवून सेवा-सुविधा पुरवठादारांची निवड  केल्यास आपल्या ग्राहकशक्तीचा वापर स्वतःच्या समाजधारणेसाठी करता येऊ शकतो. जेथे स्वतःच्या समूहातील सेवासुविधा पुरवठादार उपलब्ध नसतील तेथे आपल्या सामाजिक  आर्थिक न्यायाच्या लढ्यास साहायक ठरू शकतील अशा समाज समूहांच्या सेवा-सुविधा पुरवठादारांची निवड करता येऊ शकते. उदा. बनिया, मारवाडी, जैन तसेच उच्चजातीय हिंदू  व्यापारी आपल्या नफ्यातून हिंदू मंदिरांना दान दक्षिणा देणे, हिंदू बाबा-बुवांची मठ-मंदिरे, आश्रम बांधणे अखंड हरीनाम सप्ताह, रामकथा, भागवत पारायण सप्ताह आयोजित करणे  यासारख्या ब्राह्मणवाद बळकट करणाऱ्या उपक्रमांना आर्थिक साहाय्य देतात. हे व्यापारी अनुसूचित जाती/बौद्ध व मुस्लिमांचा तिरस्कार करतात. म्हणून बनिया, मारवाडी, जैन तसेच उच्चजातीय हिंदू व्यापारी यांच्याकडून काहीही खरेदी न करणे, त्यांच्याशी कोणतेही आर्थिक व्यवहार न करणे हे मार्ग अवलंबिता येऊ शकतात. याऐवजी अनुसूचित जाती/बौद्ध व  मुस्लिम खरेदीदार/वितरक आणि मुस्लिम, खिश्चन उत्पादक/पुरवठादार अशी व्यापार साखळी विकसित करता येऊ शकते. इंटरनेट व ऑनलाइन व्यापाराच्या आजच्या काळात आपल्या  ग्राहकशक्तीचे मजबूत नेटवर्किंग व त्याचा सुनियोजित वापर करून ब्राह्मणवादाच्या आर्थिक मर्मस्थळावर आघात करता येऊ शकतो.

गुंतवणूक भांडवल
व्यक्तीजवळ असलेल्या बचतीचे भांडवलात रुपांतर करून या भांडवलाचा वापर संपती निर्माणासाठी करण्याची शक्ती म्हणजे गुंतवणूक शक्ती होय. गुंतवणूक शक्ती उत्पन्नाशी नव्हे तर  बचत व भांडवल संचय यांच्याशी निगडीत आहे. भारतामध्ये बचत व भांडवलाचा संचय आणि वितरण जातीय आधारावर केले जाते. जातीसमूहांचे नियंत्रण असलेल्या नागरी सहकारी  बँका, जातीच्या आधारावर कार्य करणाऱ्या अशासकीय संस्था यांच्यातर्पेâ आपल्या जातीच्या युवकांना व्यवसायासाठी बिनव्याजी किंवा नाममात्र व्याजाने कर्ज/भांडवल उपलब्ध करून देणे  इत्यादी कामे केली जातात. अनुसूचित जाती/ बौद्ध व मुस्लिमांनी आपल्याजवळील बचत आणि संपत्तीचे रुपांतर भांडवलामध्ये करण्याची व भांडवलाची कार्यक्षमता अधिकाधिक  वाढविण्याची यंत्रणा/क्षमता विकसित केलेली नाही. यामुळे काही प्रमाणात गुंतवणूक शक्ती असूनही या शक्तीचा वापर अन्यायकर्त्या समाजघटकास जरब बसविण्यासाठी होत नाही. ही यंत्रणा व क्षमता कशी विकसित करता येईल यावर अनुसूचित जाती / बौद्ध तसेच मुस्लिम युवकांनी जास्तीतजास्त लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

कौशल्य आणि बुद्धिमत्तेचे भांडवल
एखाद्या समाजात अथवा कुटुंबात विशिष्ट प्रकारची कला व कौशल्ये परंपरेने चालत आलेली असतात. यामुळे या विशिष्ट प्रकारच्या कला व कौशल्यावर त्या समाजाची पकड बसते.  असा समाज आपल्याकडील कला व कौशल्ये इतर समाजाकडे जाऊ नयेत यासाठी कमालीचा दक्ष असतो. जेथे मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते अशा कला व कौशल्यात  इतरांचा शिरकाव होऊ नये यासाठी विविध प्रकारच्या समस्या आणि अडसर निर्माण केले जातात. उदा. उच्च व व्यावसायिक शिक्षणाचे खाजगीकरण करून यासाठी प्रचंड महागडी फी  आकारली जाणे, शिक्षणसंस्थांना विशिष्ट दर्जा मिळवून इतर समाजाचा प्रवेश रोखणे, शासकीय शिक्षण संस्थामधील शिक्षणाचा दर्जा कमकुवत करणे, देशभरात एकच सामायिक प्रवेश  परीक्षा घेऊन प्रादेशिक भाषेतून शिक्षण घेतलेल्या दुर्बल घटकातील विद्याथ्र्यांची कोंडी करणे इत्यादी. यामुळे सामाजिक उतरंडीत कनिष्ठ जातीचे व आर्थिक दुर्बल विद्यार्थी उच्च व  व्यावसायिक शिक्षणापासून आणि व्यवसायोपयोगी कला कौशल्य शिकण्यापासून वंचित होतात. असे होऊ नये यासाठी कला-कौशल्य व उच्च व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था शक्य  असेल तर स्वबळावर उभ्या करणे हा उपाय करता येऊ शकतो. अनुसूचित जाती/बौद्ध व मुस्लिमांची स्वतःच्या दर्जेदार शिक्षण संस्था उभ्या करण्याइतकी आर्थिक ऐपत नाही. या  स्थितीत सरकारवर संघटित दबाव आणून सर्व प्रकारचे उच्च व व्यावसयिक शिक्षण घेण्यासाठी सरकारी साहाय्य मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासोबतच विज्ञान, क्रीडा,  शारीरिक क्षमतेचे खेळ यामध्ये अधिकाधिक प्राविण्य मिळविण्यासाठी अनुसूचित जाती /बौद्ध व मुस्लिम युवकांना प्रोत्साहित केले पाहिजे. यासाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून   आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले पाहिजे. यामुळे जागतिक स्तरावर कीर्ती व पैसा मिळविण्याची संधी मिळू शकते. यातून कनिष्ठ जातीय न्यूनगंड नाहीसा होण्यास मदत होऊ शकते.

सामाजिक संचित भांडवल
यामध्ये परंपरेने चालत आलेली विशिष्ट कला-कौशल्ये, समाजाला मिळालेल्या विशिष्ट प्रकारच्या सोयी-सवलती, हक्काअधिकार यांचा समावेश होतो. यासोबतच समाजात अस्तित्वात  असलेल्या विविध संस्था, संघटना, मंडळे, कुटुंबे, मित्रपरिवार, समविचारी आणि समव्यवसायी गट इत्यादींचा समावेश होतो. यातून व्यक्तीला भावनात्मक आधार व सामाजिक  साहाय्याची हमी मिळत असते. तसेच संकटप्रसंगी आर्थिक मदत मिळविता येते. विविध ठिकाणी असलेल्या नोकरीच्या, व्यवसायाच्या संधींची माहिती मिळते. आपल्यातील नेतृत्वगुण,  संघटन कौशल्य दाखविण्याची संधी मिळते. सामाजिक प्रतिष्ठा मिळविता येते. भारतात समाज संस्थांची निर्मिती, संचालन, सदस्यत्व यावर जातीय, भाषिक आणि प्रांतीय स्वरूपाच्या  मर्यादा पडलेल्या आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जाती/जमाती, बौद्ध, मुस्लिम अल्पसंख्य यांना देण्यात आलेल्या संवैधानिक अधिकाराविषयी उच्चजातीय समूहांमध्ये द्वेषाची व चीडीची  भावना आहे. यामुळे सामाजिक भांडवलाचा उपभोग व वितरण या क्षेत्रात अनुसूचित जाती/जमाती, बौद्ध, मुस्लिम अल्पसंख्य यांच्या सोबत मोठ्या प्रमाणावर अन्याय आणि भेदभाव केला जातो.
देशाची अथवा समाजाची भरभराट समाजसमूहांकडून मिळालेल्या वरील चार प्रकारच्या भांडवलावर अवलंबून असते. प्रत्येक समाजव्यवस्थेत समाजसदस्यांना त्यांच्या योगदानानुसार  सामाजिक लाभ व हानी याचे वितरण होत असते. मात्र ज्या समाजाकडे ग्राहक भांडवल, गुंतवणूक भांडवल, कौशल्ये व बुद्धिमत्ता यांचे भांडवल, सामाजिक संस्था-संघटना यांचे भांडवल  अधिक असते, तो समाज जास्त लाभ पदरात पाडून घेतो. भारतीय समाज व्यवस्थेचे या दृष्टीने परीक्षण केल्यास परंपरेने कनिष्ठ ठरविले गेलेल्या समाज समूहांना रोजगार, शिक्षण,  आरोग्य सुविधा, स्वच्छतेच्या सोयी, पिण्याचे शुद्ध पाणी, किफायतशीर घरे इत्यादी लाभ मिळण्यापासून वंचित केले जाते. दुसरीकडे या समाज समूहांवर होणारे शारीरिक अत्याचार,  बलात्कार, लहानसहान गुन्ह्यासाठी अटक करणे, पोलिसांची दडपशाही, नोकरशाहीकडून होणारी अडवणूक इत्यादीचे प्रमाण फार मोठे आहे. या स्थितीत अनुसूचित जाती/बौद्ध, मुस्लिम व  अन्य कमकुवत समाजघटक यांनी आपल्या स्वतंत्र सामाजिक भांडवलाचे बळकटीकरण करण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे.

- सुनिल खोबरागडे
(संपादक, दै. जनतेचा महानायक)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget