उच्च शिक्षणाच्या सोयी संस्था असोत की उच्चतम नोकऱ्या देणाऱ्या संस्था, सगळीकडे लूट माजलेली आहे. एक मुलगी जिचा बाप सनदी अधिकारी निवडणुकीच्या वेळी जाने आपली संपत्ती ४० कोटींची जाहीर केली होती, त्याची अनेक एकर जमिनीवर कब्जा करण्याची तयारी. या नगरात दोन इमारती, त्या गावात जमीन, पलीकडच्या नगरात आलिशान इमारत, गाडी-घोडे एकापेक्षा एक वरचढ. त्या अशा बापाची मुलगी डॉक्टर होते आणि नंतर तिला कलेक्टर व्हायची इच्छा. तिने त्या वाटेवर सुरू केला आपला प्रवास. या प्रवासात ती कोणत्याही नकषावर यूपीएससीमध्ये एन्ट्री मिळवायची होती. सक्षम, सधन, शारीरिकदृष्ट्या टकाटक, मग तिने खोटेनाटे कारनामे सुरू केले. खोटे प्रमाणपत्र, १०० एक कोटींची वडिलोपार्जित संपत्ती असली तरीही गरीबीचे सोंग, क्रीमी लेयरमध्ये नसल्याचे दाखले. विकलांग, डोळ्यांना दिसत नाही, एकन् एक प्रकार सगळे खोटे. नंबर एकची लबाड, बाप शासकीय सेवेत उच्च पदस्थ असताना त्यास सगळे नियम माहीत. तरीदेखील आपल्या मुलीला खोटे दाखले मिळवून देताना त्यांना काहीच वाटले नाही. शासकीय सेवेतील विश्वसनीय अधिकारी होता तरी हा स्वतःची मुलगी सगळे नियम धाब्यावर ठेवते. इतका कसला मानमरातब आणि संपत्तीची लालसा! पाहिली न ऐकली. आपले नाव बदलते. ४२० चा गुन्हा नाही होत. आपल्या माता-पित्याचे नाव बदलते. विकलांग नसताना असल्याचा दाखला. डान्स करते. कोणताच गुन्हा नाही.
आएएस, आयपीएस वगैरे भारतातील सर्वांत महत्त्वाच्या आणि आदरणीय नोकऱ्या. दरवर्षी ११ लाख उमेदवार परीक्षा देतात. त्यातले २५००-३००० निवडले जातात. आणि ते कसे? जसा घोळ या मुलीने केला तसाच घोळ घालून खोटेनाटे जातीचे, उत्पन्नाचे, विकलांगतेचे आणखी कशाकशाचे दाखले. तेवढ्यावरच न राहता ऐन परीक्षेच्या वेळी पेपर फोडतात. ज्या गरीब मुलांनी आपले उभे आयुष्य लावून जे यश मिळवण्याचा प्रयत्न केला होता त्याचा लाभ हे श्रीमंत, लबाड, लुटारू मंडळींना जाते. NEET असो, उच्च पदव्या, नोकऱ्या असोत, लोकसेवा आयोग या सर्व संस्थांवर ह्या लुटारू मंडळींना ताबा मिळवला. सौजन्य सरकार. गरीबांच्या मुलांना हर प्रकारे वंचित ठेवण्याचे शेकडो उपायांपैकी हादेखील एक उपाय.
ही मंडळी ज्ञानविज्ञान संमत होऊन संपत्तीच्या स्रोतांचा शोध घेत असते. यातलेच मग मोठे उद्योगपती होतात. हेच एक टक्का लोक ४० टक्के लोकांच्या साधनांवर डल्ला मारतात. मग आपल्या मुला-मुलींच्या विवाहाचे एक नव्हे दोन नव्हे तर ४-५ समारंभांचे आयोजन करतात. शासन हर प्रकारची सेवा त्यांना बहाल करते. हजारो कोटी जे गरीवांच्या खिशातून एनकेन प्रकारे काढून घेतले होते, त्याच्या बळावर गरीबांना आपली ऐशइशरत दाखवून त्यांना हिनवतात. डान्सरला ८५ कोटी, ८० कोटी एका शोचे देतात. कशाचे? कुणाचे? कुणाच्या बापाचे? ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्यावर गुजराण करावी लागते, ते ३००० नमुन्याच्या पक्वान्नाने पाहुणचार करतात. २-२ कोटींचे गिफ्ट एका एका व्यक्तीला देतात. येणारे पाहुणे २०-२० कोटींचे गिफ्ट अर्पण करतात. गरीब देशाचे श्रीमंत. गरीबांसाठी केलेल्या सोयीसुविधा संस्था बळकावून त्यावर ताबा करतात. त्यांचा देखावा मांडतात. १५०० रुपयांसाठी किती लाडक्या बहिणी काम कष्ट करुन कागदपत्रे काढत आहेत ते पिक्चर अजून बाकी आहे. सत्ताधारी हजारो कोटींच्या लग्नसमारंभात गुंतलेले आहेत. त्यांना त्यांच्या पाहुण्यांना रस्ते, विमान आणि इतर सोयी पुरवण्यात व्यस्त आहेत. ह्यांचे कामच आता अशा धनदांडग्यांची चाकरी, ते तरी काय करतील!
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक
मो. : 9820121207
Post a Comment