द्राक्षांत स्वादही आणि उपजीविकाही
द्राक्ष एक चविष्ट आणि उपयुक्त फळपीक, जे आपल्या विशेष रचनेसाठी वनस्पतीशास्त्रात महत्वाचे समजले जाते. वनस्पतींच्या अवयवांच्या रचनेवरून खूप विविधता आढळते. त्यावरून गवतवर्गिय, झुडपे, वृक्ष आणि लता किंवा वेली असे प्रकार पडतात. यामध्ये वेलींची रचना फार विशिष्ट असते. लवचिक खोडाच्या दोन कांड्यांमध्ये लांब पेरे असतात म्हणून वेली इतर प्रकारच्या वनस्पतींसारख्या स्वबळावर सरळ वाढू शकत नाहीत. त्या जमिनीवरच पसरतात आणि प्रकाश संश्लेषन आणि प्रजनन करण्यासाठी त्यांना आपले क्षेत्र वाढवावे लागते. म्हणजे इतर झाडे किंवा वस्तुंचा आधार घेऊन त्या जमिनीपासून वरच्या दिशेला आपल्या शाखा पसरवतात. यासाठी त्यांना एक तंतुमय अवयव असतो ज्याला आपण टेंड्रिल म्हणतो.
वनस्पतिशास्त्रानुसार टेंड्रिल हे एक विशेष परिवर्तित खोड, पान किंवा देठ असतो ज्याचा आकार दोऱ्यासारखा असतो, ज्याच्या आधारे वेल इतर वनस्पतींवर चढू शकते तसेच अमरवेलासारख्या परजीवी वनस्पतींद्वारे टेंड्रिलचा वापर अन्न शोषण्यासाठी केला जातो. अशा अनेक वनस्पती आहेत ज्यांना टेंड्रिल्स आहेत; वाटाणे, कारले, दोडकी, द्राक्षे ही त्यांपैकी काही उदाहरणे आहेत. यांत द्राक्ष हे दिर्घकाळ टिकणारे पीक आहे. द्राक्षाच्या योग्य वाढीसाठी मळ्यात चांगला मांडव तयार करतात ज्यावर द्राक्षाच्या वेली टेंड्रिलच्या मदतीने पसरतात, आपल्या शाखा पसरवल्याने फलधारणा जास्त होते आणि पर्यायाने उत्पन्न वाढते.
याव्यतिरिक्त द्राक्षाचा प्रकार, भरपूर खतपाणी, योग्य हवामान, पद्धतशीर लागवड, छाटणी व मशागत, रोग व किडींपासून वेलांचे संरक्षण या गोष्टींवर द्राक्षाचे उत्पन्न अवलंबून असते. पहिल्या वर्षी उत्पन्न कमी येते परंतु ते पुढील वर्षापासून वाढते. vishwakosh.marathi.gov.in नुसार महाराष्ट्रात साधारणपणे हेक्टरी १० ते १५ टन द्राक्षे मिळतात. भारतात द्राक्षांचे सरासरी उत्पन्न हेक्टरी १० टनांपेक्षा जास्त आहे व ते कॅलिफोर्नियातील उत्पन्नापेक्षा जास्त तसेच फ्रान्स, इटली व स्पेनसारख्या द्राक्षोत्पादनाच्या जगातील प्रमुख राष्ट्रांपेक्षा पुष्कळच जास्त आहे. ईजिप्तमध्ये ६,००० वर्षांपूर्वीपासून द्राक्ष पिकविली जात आहेत. यावरून हे लक्षात येते की द्राक्ष हे फळ जागतिक पातळीवर पिकवल्या जाते आणि यापासुन कित्येक शेतकरी आपली रोजी कमावतात आणि उदरनिर्वाह करतात.
द्राक्षाचा उल्लेख कुरआनमध्ये अध्याय अल्-मुअमिनूनच्या आयत क्रमांक १९ मध्ये आहे,
"मग त्या पाण्याद्वारे आम्ही तुमच्यावर खजूर व द्राक्षाच्या बागा उत्पन्न केल्या, तुमच्यासाठी या बागांमध्ये पुष्कळशी स्वादिष्ट फळे आहेत आणि यांच्यापासून तुम्ही उपजीविका मिळवता."
येथे फळशेती करणाऱ्यांसाठी प्रोत्साहन दिले गेले आहे म्हणजे फळे फक्त स्वतः खाण्यासाठी नसून उपजीविकेचे साधन सुद्धा आहेत.
(क्रमशः)
- डॉ. हर्षदीप बी. सरतापे
मो. ७५०७१५३१०६
Post a Comment