(२१) मृतावस्थेत, जीवंत नाहीत आणि त्यांना स्वत:लाच ठाऊक नाही की पुन्हा कधी जीवंत केले जाईल.६ (२२) तुमचा ईश्वर तर केवळ एकच अल्लाह आहे. परंतु जे लोक परलोकाला मानत नाहीत त्यांच्या मनात नकार वास्तव्य करून आहे आणि ते घमेंडीत पडले आहेत.
(२३) अल्लाह निश्चितच यांची सर्व कृत्ये जाणतो, मग ते उघड असोत की छुपे. तो त्या लोकांना मुळीच पसंत करीत नाही जे मनाच्या अहंकारात पडले आहेत.
(२४) आणि जेव्हा एखादा त्यांना विचारतो की तुमच्या पालनकर्त्याने ही काय चीज अवतरली आहे.७ तर म्हणतात, ‘‘अहो, त्या तर जुन्या काळातील पुराणकथा आहेत.’’
(२५) हे अशासाठी करीत आहेत की कयामतच्या दिवशी आपले ओझेही पूर्णपणे उचलतील आणि त्याचबरोबर त्या लोकांचा काही भारदेखील उचलतील ज्यांना हे अज्ञानापायी पथभ्रष्ट करीत आहेत, पाहा, किती कठीण जबाबदारी आहे ही जिला ते आपल्या डोक्यावर घेत आहेत?
(२६) यांच्यापूर्वीदेखील बरेचसे लोक (सत्याला परास्त करण्याकरिता) अशीच कुटिलता करीत राहिले आहेत. तर पाहून घ्या की अल्लाहने त्यांच्या कुटिलतेचा इमला पायासकट उखडून टाकला आणि त्याचे छप्पर त्यांच्या डोक्यावर कोसळले आणि अशा दिशेने त्यांच्यावर प्रकोप आला जिकडून त्याचे आगमन त्यांच्या कल्पनेतही नव्हते.
६) हे शब्द स्पष्टपणे असे दर्शवीत आहेत की या ठिकाणी विशेषकरून ज्या बनावटी देवांचे खंडन केले जात आहे ते मृत माणसे आहेत कारण फरिश्ते तर मृत नसून जीवंत आहेत. तसेच लाकडी व दगडी मूर्तींसंबंधी दुसर्यांदा जीवंत उठविल्या जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
७) अरबस्थानात जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांची चर्चा होऊ लागली तेव्हा बाहेरचे लोक मक्कावासियांशी पैगंबर (स.) यांच्या व कुरआनसंबंधी प्रश्न विचारीत असत.
Post a Comment