Halloween Costume ideas 2015

लोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेसमोर आव्हाने आहेत : निरंजन

निरंजन टकले हे नाव न्या. लोया यांच्या मृत्यूच्या संबंधी कारवान मॅक्झीनने छापलेल्या एका स्टोरीबरोबर एकदम राष्ट्रीय पटलावर आलं. त्यांनी तयार केलेल्या ’खोजी रिपोर्ट’मध्ये एवढा दारूगोळा होता की, त्या रिपोर्टच्या प्रकाशनानंतर देशभरात एकच खळबळ माजली. इतकी की 12 जानेवारी 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या चार माननीय न्यायमुर्तींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा निरंजन यांनी प्रकाशित केलेल्या स्टोरीची झालर होती.
    सोलापूर येथील रंगभवन मध्ये 30 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 7 वाजता  ऍड. गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला निरंजन टकले येणार ही बातमी कळताच शोधनचे उपसंपादक बशीर शेख व स्तंभलेखक एम.आय. शेख यांनी त्यांना भेटून त्यांची व त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली.ती शोधनच्या वाचकांसाठी दोन भागात सादर होत आहे.
    निरंजन टकले हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असून 1988 ते 1998 पर्यंत ते याच क्षेत्रात होते. त्यानंतर मात्र स्वत:च्या मर्जीने त्यांनी पत्रकारितेचा व्यवसाय स्वीकारला. सुरूवात त्यांनी नाशिक केबल चॅनलपासून केली. त्यानंतर सीएनएन -आयबीएन मध्ये ब्युरो चीफ म्हणून 2006 ते 2010 पर्यंत काम केले. त्यानंतर त्यांनी ’द विक’मध्ये काम केले. व गेल्या 6 नोव्हेंबरला ’द विक’च्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या काळात 2006 व 2008 चा मालेगाव ब्लास्ट वरही स्टोरी केली होती. 2006 चा मालेगाव ब्लास्ट हा दक्षीणपंथी संस्थेनी केला असल्याचे सर्वप्रथम त्यांनीच आपल्या स्टोरीतून उघडकीस आणले होते. विशेष म्हणजे ही स्टोरी तेव्हा आली जेव्हा सीमीचे आरोपी पकडले जात होते. ’द विक’मध्ये आल्यानंतर कांदा माफिया, इंडियन प्रिझनर्स इन पाकिस्तानवर त्यांनी स्टोरी केली होती. ही स्टोरी प्रकाशित झाल्यानंतर 59 भारतीय कैदी पाकिस्तानच्या जेलमधून सुटले होते. शिवाय, महात्मा गांधी जेव्हा दक्षीण आफ्रिकेतून भारतात आले होते व आल्या-आल्या त्यांनी भारतभर ज्या मार्गाने प्रवास करून भारत समजून घेतला होता. त्या प्रवासाला 2015 साली 100 वर्षे होणार होती म्हणून निरंजन यांनी त्याच मार्गाने 17432 किलोमीटरचा प्रवास जनरल क्लासने करून भारत समजून घेण्याचा प्रयत्न केला व 100 वर्षानंतरचा भारत त्यांनी आपल्या लेखनातून उभा केला. ’द विक’चा पूर्ण अंकच त्या स्टोरीने व्यापून गेला होता. सध्या ते कारवान मॅग्झिनसाठी लिहितात. त्यांनी सोलापूरच्या रंगभवन येथे पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून केलेले भाषण वाचकांच्या माहितीसाठी खालीलप्रमाणे सादर आहे.
    ”मी दोन वर्षापूर्वी द विकमध्ये असतांना सावरकरांवर एक स्टोरी केली होती. त्या स्टोरीचे नाव ’एक शेळी ज्याला सिंह म्हणून दाखविले जाते’ असे होते. 10 ते 12 हजार शब्दांच्या त्या स्टोरीसाठी मला 20 ते 21 हजार कागदपत्रांची पडताळाणी करावी लागली होती. अनेक ठिकाणी प्रवास करून ती कागदपत्रे मिळवावी लागली होती. ती स्टोरी केल्यानंतर उस्मानाबादचा माझा एक मित्र आहे ऍड. राज कुलकर्णी त्याचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितले की, टिपू सुलतानवर ’सल्तनत-ए-खुदादाद’ नावाचे एक पुस्तक आलेले आहे ते नक्की वाच. तेव्हा मी ते पुस्तक शोधलं ते मला मिळालं आणि अक्षरश: तीन साडेतीन दिवसात मी ते पुस्तक वाचून काढलं. त्यातील बरेच संदर्भ पुन्हा दोनदा तीनदा वाचले. त्यानंतर या पुस्तकाचे लेखक सरफराज शेख यांच्या मी अक्षरश: प्रेमातच पडलो. एका दहा हजार शब्दांच्या स्टोरीसाठी मला जी मेहनत घ्यावी लागली होती त्यावरून मी समजत होतो की मी फार कष्ट घेतले आहे. पण जेव्हा सरफराज यांचे पुस्तक वाचले तेव्हा लक्षात आले की त्यांनी हे पुस्तक लिहिण्यापूर्वी जे कष्ट घेतले ते माझ्या कष्टांपेक्षा जास्त पराकोटीचे कष्ट होते. आणि ज्या पद्धतीने त्यांनी या पुस्तकाची सुसंगत मांडणी केली, ती ही अशा पद्धतीने की सर्वसाधारण वाचकांच्या लक्षात येईल. हे काम सोपे नव्हते. टिपू सुलतानवर लिहिणे हे काम मुळातच आव्हानात्मक होते. आजच्या परिस्थितीत तर लिहावं का न लिहावं असंही काही जणांना वाटू शकतं. अशा काळामध्ये इतकी रिसर्च करून, इतकी प्रचंड मेहनत घेवून ते पुस्तक आणणं हे सोपं काम नव्हतं. पुस्तक वाचल्यानंतर मी परत राज कुलकर्णीला फोन करून सांगितलं, ” हॅट्स ऑफ”. एवढी मेहनत कोणीतरी अशा कॉन्ट्राव्हर्शियल विषयासाठी घेऊ शकतं, हे कौतुकास्पद होतं. मग आमची भेट पनवेलच्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात झाली. मी त्या वेळेसही बोललो आणि आत्ता ही सर्वांसमोर बोलतो, आपली इच्छा असेल तर परवानगी द्या मी त्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करतो. हे काम मी शंभर टक्के करेन.
    आज सोलापूर येथे आल्यानंतर त्यांनी ऍड. गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरतर्फे आजपावेतो करण्यात आलेल्या व भविष्यातील प्रस्तावितकामाचा धावता आढावा माझ्यासमोर मांडला. तेव्हा माझ्या लक्षात आले की हे किती अफाट काम आहे. मात्र ही सगळी मेहनत केल्यानंतर ती वाचली गेली पाहिजे. ते नुसतं लिहून ठेवतील, बनवून ठेवतील आणि ते नुसतं आर्काइव्ह मध्ये पडून राहील, अशी त्या साहित्यावर वेळ येवू नये. ती जास्तीत जास्त किंबहुना प्रत्येक घरात ही मेहनत वाचली जायला हवी, हे सगळं व्हायला हवं. त्यासाठी जे काही सहकार्य माझ्याकडून अपेक्षित असेल, मी ते आनंदाने मनापासून करेन.
    आता आजच्या कार्यक्रमाचा जो आपण विषय घेतला, ’ लोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थे समोरील आव्हाने’ याबाबतीत मला असं वाटतं की, लोकशाही आणि न्यायव्यवस्था दोघांसमोरही आव्हानं आहेत. आपलं संविधान असं म्हणतं की, विधीमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे भारतीय लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत. मात्र आपण पत्रकार स्वत:हूनच म्हणतो की, माध्यमं हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहे. हे जरी मान्य केले तरी हे चारही स्तंभ मजबूत असणे अपेक्षित आहे. यापैकी एकजरी स्तंभ डगमगायला लागला तर बाकीचे तीन डगमगायला वेळ लागणार नाही आणि म्हणून मी जे करीत आहे, ते मी ज्या वातावरणात शिक्षण घेतलं त्यातून जी बांधिलकी निर्माण झाली त्याप्रमाणे मी जर काम केलं तर बाकीचे तीन स्तंभ आपोआप स्थिर होतील. पण ते मी केले पाहिजे.
    ज्या स्टोरीची खूप चर्चा केली. न्या. लोया यांच्या मृत्यूची. त्या संबंधी जेव्हा प्रथमत: मला कळालं की अशा-अशा संशयीत परिस्थितीमध्ये न्या.लोया यांचा मृत्यू झाला आहे. तेव्हा मी या प्रकरणाचा पाठपुरावा करायला सुरूवात केली. त्यात बराच वेळ गेला. सुरूवातीला या प्रकरणाकडे मी एक महत्वाची, मोठी बातमी एवढ्याच दृष्टीकोनातून पहात होतो. माझ्या एका मित्राने जो आता इथेही आहे, सर्वप्रथम न्या. लोयांची बहिण नुपूर बियाणी यांची भेट घालून दिली होती. त्याच वेळेस मला या प्रकरणातलं गांभीर्य लक्षात आलं होतं. या सगळ्यांचा अंगुली निर्देश कुठे होणार आहे याची कल्पना होती. म्हणून ही स्टोरी किती ठोस असावी याचीही जाणीव झाली होती. त्यानंतर तीन-साडेतीन महिन्यांनी पुण्यात अनुज लोया यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो. तेव्हा तो आणि त्यांचे आजोबा बसलेले होते. माझा मित्र, माझा फोटोग्राफर व मी असे तिघं त्यांना भेटायला गेलो होतो. संवाद सुरू करावा म्हणून अनुजला पहिला प्रश्‍न विचारला तू काय करतोस? त्याने आजोबाकडे पाहिले. आजोबांनी सांगितले की हा शिकतो. त्याच्या शिक्षणासंबंधी दोन-तीन जुजबी प्रश्‍न विचारले सर्व प्रश्‍नांची उत्तरे आजोबांनी दिली. तेव्हा मी विचारले की, हा का नाही बोलत? तेव्हा ते म्हणाले की, याचा कोणावरच विश्‍वास नाही. विचार करा तुम्ही 18-19 वर्षाचा मुलगा याचा जगात कोणावरही विश्‍वास नाही. याचा इथल्या व्यवस्थेवर विश्‍वास नाही, कायद्यावर, पत्रकारितेवर विश्‍वास नाही. मी त्यांना विचारलं पत्रकारितेवर का बरं विश्‍वास नाही? तेव्हा त्याचे आजोबा म्हणाले की, ही घटना घडल्यानंतर आम्हाला विश्‍वास होता की, नागपूर ते दिल्लीपर्यंतचे पत्रकार ही घटना कशी घडली हे शोधायचा प्रयत्न करतील. मात्र सर्वानी हृदयविकाराने मृत्यू या पलिकडे काही लिहिले नाही. त्यामुळे आता आमचा कोणावरच विश्‍वास राहिलेला नाही. मी हे सगळं ऐकूणच बेचैन झालो आणि त्यांना सांगितलं की, यासंबंधी तुम्ही जर मला काही सांगितलं तर नक्कीच ही स्टोरी करेन.
    बाहेर निघाल्यावर मी अस्वस्थ झालो आणि ही गोष्ट मी माझ्या मुलीशी शेअर केली. तिला विचारलं की तुमच्या पिढीचा जर कोणावरच विश्‍वास नसेल तर तुम्ही जगाल कसे? तेव्हा ती म्हणाली, बाबा तुम्ही यात काय करू शकता? तो विश्‍वास तुम्ही अनुजच्या मनात निर्माण करू शकत नाही? मात्र तुमच्या व्यावसायाबद्दल त्याच्या मनामध्ये विश्‍वास निर्माण होईल असे तुम्ही नक्कीच करू शकाल. हे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच करा. हाच माझ्यासाठी ही स्टोरी करण्याचा ट्रिगर पॉईंट ठरला. परिणामाची चिंता न करता मग ही स्टोरी करण्याचा मी निर्णय घेतला. मला एक पिता म्हणून एवढं नक्कीच वाटतं की माझ्या मुलीचा माझ्या व्यवसायावर विश्‍वास नक्कीच असायल हवा.
    मग जसा-जसा मी पुढे जात गेलो तसे-तसे मला धक्के बसत गेले. न्या. लोया यांच्या शरिराचे पोस्ट मार्टम व हिस्टोपॅथ एकाच डॉक्टरने केला असतानासुद्धा दोन्ही रिपोर्टमध्ये फरक होता. पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये लिहिलेलं होतं की, रायगर मॉर्टिस (मृत्यूनंतरचा शरिरात येणारा ताठरपणा) शवाच्या वरच्या अवयवांमध्ये (मांड्यांमध्ये) होता. त्याच डॉक्टरने दिलेला हिस्टोपॅथिक रिपोर्ट (न्याय सहाय्यक शास्त्र अहवाल) मध्ये नमूद होते की, रायगर मॉर्टिस हा संपूर्ण शरिरात होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूची वेळ सकाळी 6.15 ची तर पोस्टमार्टम सुरू झाल्याची वेळ सकाळी 10 वाजून 50 मिनिटाची, मग साडेचार तासात हिवाळ्यामध्ये शवामध्ये रायगर मॉर्टिस सुरू कसं झालं? साधारणपणे रायगर मॉर्टिस सुरू व्हायला 10-12 तास लागतात. त्यात तो हिवाळा. इथपासून शंका यायला सुरूवात झाली. कारण पहाटे 5 पासूनच त्यांच्या कुटुंबियांना फोन यायला सुरूवात झाली की न्या. लोया यांचा मृत्यू झाला, पोस्टमार्टम झालं आणि बॉडी रवानासुद्धा झाली. या वेळेमधील व वैद्यकीय वर्णनामधील काय घोळ आहे, हे सगळं संशयास्पद होतं.     (क्रमश:)   

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget