Halloween Costume ideas 2015

का पत्रकारांनी घाबरायला हवं? का विरोधकांनी घाबरायला हवं? का न्यायाधिशांनी घाबरायला हवं? का पक्षातील सहकाऱ्यांनी घाबरायला हवं ?

-निरंजन टकले
न्या. लोयांच्या शवविच्छेदन अहवालामध्ये हृदय घाताने मृत्यू असे कारण दिलेले आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट जो जास्त अचुक असायला पाहिजे त्यात अचानक मृत्यू (सडन डेथ) असे म्हटलेले आहे. म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्ट पूर्णपणे असंबद्ध आहे, जो की नेमका असायला पाहिजे होता. पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये बॉडीचे तीन व्हिसेरा सँपल काढले असे नमूद आहे. तर हिस्टोपॅथिक रिपोर्टमध्ये तब्बल 32 व्हिसेरा सँपल तपासल्याचे नमूद आहे, हे सगळं संशयास्पद होतं. अशा विशेष परिस्थितीमध्ये मृत्यू झालेल्यांची पोस्टमार्टमची व्हिडीओग्राफी करण्याची महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे. असे असतांना सीबीआय स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश असणाऱ्या लोयांच्या पोस्टमार्टमची व्हिडीओग्राफी करण्यात आली नाही. वेळेमधील फरक, रायगर मॉर्टिसमधील फरक आणि सँपलमधील फरक कसा आला? याबाबतीत कोणीच काही बोलत नाही. माझ्या स्टोरीमध्ये मी हे सर्व प्रश्‍न उपस्थित केले.
    स्टोरीमध्ये जे दोन न्यायाधीश मोडक आणि कुलकर्णी त्यांना मुंबईहून घेवून गेले होते व त्यांच्या सोबत नागपूरच्या रविभवन विश्रामगृहामध्ये थांबले होते. त्यांनी सांगितलेली माहिती अशी की, रात्री 12.30 वाजता त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि आम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो. माझी स्टोरी प्रकाशित झाल्यानंतर सात दिवसांनी दोन न्यायाधीश इंडियन एक्सप्रेस व एनडीटीव्ही इंग्लिशशी बोलले. की आम्ही गाडी घेऊन त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो. स्टोरी 20 तारखेला आली होती. मग हा खुलासा 21 ला का नाही केला? हा 27 ला का बरं? दुसरी गोष्ट मला मिळालेल्या माहितीप्रमाणे रिक्षाने नेलं. तुमच्या सांगण्यानुसार कारने नेलं. रविभवन हे व्हीव्हीआयपी विश्रामगृह आहे. जिथे फक्त अति महत्वाचे लोक राहतात. जिथे 7 डिसेंबरला महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार होतं. अशा परिस्थितीत ही घटना 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरच्या रात्री घडते. मुंबईतलं अख्ख मंत्रालय महिना पंधरा दिवस अगोदर तिथे शिफ्ट केलेल असतं. सगळे अधिकारी तिथे राहत असतात. तिथे 10-15 लाल दिव्यांच्या गाड्या कायमस्वरूपी असतात. तुम्ही गाडीने नेलं म्हणता माझी स्टोरी रिक्षाने नेलं म्हणते. मग सीसीटीव्ही फुटेज दाखवा ना. त्यात जे काय असेल ते दिसेल. मग रिक्षा असेल की गाडी जे असेल ते दिसेल. याबद्दल कोणीच बोलत नाही. या स्टोरीमधील महत्वाचे लोक मग ते न्या. मोडक असो की न्या. कुलकर्णी, न्या. मोहित शहा असो बाहेती असो कोणीच काही बोलत नाही आणि ज्यांचा स्टोरीमध्ये कुठेच उल्लेख नाही तेच सगळेजण बोलतात.
    इसीजी रिपोर्ट इंडियन एक्सप्रेसने छापला. त्यात हार्ट अटॅक स्पष्टपणे दिसतोय. असे जर असेल तर मृत्यूच कारण स्पष्ट आहे. मग पोस्ट मार्टम का केलं? कपड्यावर पोस्ट मार्टम करताना रक्त लागलं असावं अस उत्तर दिले गेले. वास्तविक पाहता पोस्ट मार्टम पूर्वी कपडे काढून सील केले जातात. पोस्ट मार्टम झाल्यावर बॉडी बॅगमध्ये ठेवली जाते. बॉडीला पुन्हा कपडे घालत नाहीत. मग कपड्याला रक्त लागलं कसं? टाक्यामधून निघालेल रक्त बॉडी बॅगला लागेल. सील केलेल्या कपड्यांना कसे लागेल. खोटं बोलण्याच्या नादात हे लोग अनेक प्रश्‍न नव्यान उपस्थित करण्याची संधी देत आहेत.
    12 जानेवारीला पुढे येवून सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधिशांनी जे प्रश्‍न उपस्थित केले त्यात न्या. लोयांच्या मृत्यू संबंधीचाही प्रश्‍न होता. अचानक देशभर गदारोळ सुरू झाला की, या न्यायाधीशांनी न्यायपालिकेची प्रतिष्ठा धोक्यात आणली. न्याय पालिकेला कलंक लावला. त्यांनी हे बोलण्याच्या दीड महिना अगोदर नागपूरमधील दोन न्यायाधीश इंडियन एक्सप्रेसशी बोलले ते स्वागतार्ह होते? कदाचित ते सोयीचं होतं आणि त्यानंतर दीड महिन्यांनी सुप्रिम कोर्टाचे चार न्यायाधिश बोलतात. तर लगेच न्यायापालिकेला कलंक! मुंबईमध्ये असे विशेष वकील बघितलेले आहेत की जे आमुक-आमुक आरोपीला बिऱ्याणी खाऊ घातले म्हणून सांगतात. दोन वर्षानंतर मी कसं खोटं बोललो होतो म्हणून सांगतात आणि मग त्यात न्यायपालिकेला काय होत नाही. ते हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईच्या खटल्यातून पत्र देऊन माघार घेतात आणि बलात्काराच्या केसेसमध्ये हिरीरीने सहभाग घेतात. माणसाला फाशी झाली की अबतक 50 म्हणतात. कोणाचाही मृत्यू हा विजय कसा काय वाटू शकतो? आपण अशा थराला येवून पोहोचलेलो आहोत की, आपण एखाद्याच्या मृत्यूचा आदेश साजरा करतो! वर्तमान पत्रामध्ये बातमी आली की आमुक- आमुक माणसांना फाशीची शिक्षा सुनावली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. समाज म्हणून, माणूस म्हणून इथक्या खालच्या थराला येवून पोहोचलेलो आहोत, की आपणाला एखाद्याचा मृत्यू साजरा करावासा वाटतो. अशा मृत्युमधून होणाऱ्या एकाही प्रश्‍नाच उत्तर मिळत नसतं. 26 जानेवारीला मी एक फेसबुकवर पोस्ट टाकली. त्यात लिहिलं, दांडे हॉस्पिटलमधून त्यांना ज्या मेडेट्रीना हॉस्पिटलमध्ये नेलं त्यातही मृत अवस्थेत आणण्यात आले, असे नमूद आहे. मात्र मेडेट्रीना हॉस्पिटलच्या बिलामध्ये लिहिलेलं आहे की, डॉ. पंकज हारकुट यांनी ब्रिजगोपाल लोया यांच्यावर न्युरो सर्जरी केली. म्हणजे हार्टचा पेशंट अगोदर दांडे हॉस्पिटलला नेलं जे की आर्थोपेडिक हॉस्पिटल होतं आणि कार्डियाक हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथं काय केल तर न्युरोसर्जरी. ती का केली? डोक्याला काय जखम होती काय? कोणी मारलं होत काय? म्हणून न्युरोसर्जरी केली. मात्र या जखमीची नोंद इन्क्वेस्ट पंचनाम्यापासून ते फॉरेन्सिक रिपोर्ट कशातच कशी नाही? मग ह्या जखमेचं रक्त होतं का शर्टवर? म्हणजे परवापर्यंत प्रश्‍नच उभे राहत आहेत. सर्वोच्च न्यायालयात जेव्हा याचिका दाखल झाली तेव्हा कोर्टाने महाराष्ट्र सरकारला सांगितले की या प्रकरणातील सर्व मेडिकल रेकॉर्ड सादर करा. महाराष्ट्र सरकारने लोयांची पत्नी, मुलगा, बहिण आणि दोन न्यायाधीश यांचे जबाब आणि मेडिकल रिपोर्ट असा दस्तावेज सादर केला. चौकशी करा असे सांगितलेलेच नव्हते, जबाब कोर्टाने मागितलेलेच नव्हते. या केसमध्ये महाराष्ट्र सरकार पक्षकार सुद्धा नाही. मग मेडिकल रिपोर्ट सोबत कुटुंबियांचे जबाब पाठविण्याची आवश्यकता नव्हती. वकील देण्याची आवश्यकता नव्हती पण महाराष्ट्र शासनाने वकील सुद्धा दिलाय. अनुज लोयांनी मुख्य न्यायाधिशांना पत्र लिहून सांगितलं की, सुरूवातीला अने लोकांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामुळे आम्हाला संशय आला होता पण आता संशय नाही. पण प्रश्‍न उपस्थित होतात. कारण माझी स्टोरी प्रसिद्ध झाली 20 नोव्हेंबर 2017 ला. 17 नोव्हेंबरला लोयांच्या बहिणीचा आणि वडिलांचा इंटरव्युव्ह औरंगाबादमध्ये त्यांच्या राहत्या घरी रेकॉर्ड केला. त्याच इंग्रजी भाषांतर करून प्रसिद्ध होईपर्यंत 20 तारीख उजाडली व जगाला कळाले. ही स्टोरी 10 ते 12 कोटी लोकांनी वाचली. 20 नोव्हेंबरपर्यंत कुटुंबियांच्या मनामध्ये शंका होती. 29 नोव्हेंबर 2017 ला जेव्हा अनुजनी मुख्य न्यायाधिशांना पत्र दिलं तेव्हा संशय संपलेला होता. संशय संपला असेल तर उत्तम. 20 ते 29 या 9 दिवसांमध्ये तुमच्या मनातला संशय कोणी दूर केला? किती जणांनी दूर केला? कसा दूर केला? असं काय दाखवलं की ज्यामुळे तुमचा संशय दूर झाला? हे पण कळायला हवं. कारण सगळ्या शंका उपस्थित करतांना तुम्ही माझे खांदे वापरले. आता तो कसा दूर झाला हे तुम्ही सांगायला पाहिजे ना. खुलाश्यामुळे सुद्धा नवीन प्रश्‍न उपस्थित झालेले आहेत.  एक न्यायाधिश आहेत त्यांचे नाव राठी असे आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून दिले आहे की, त्या दिवशी मी दांडे हॉस्पिटलमध्ये होतो. हॉस्पिटलचे इसीजी मशीन बंद पडलेले होते. त्यांनी दुरूस्त करण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र शेवटपर्यंत ते बंदच होते. आता पुन्हा प्रश्‍न इसीजी मशीन जर बंद पडलेलं होतं तर छापून आणलेला ईसीजी रिपोर्ट कोणी दिला? बंद पडलेल्या मशीनमधून इसीजी निघाला का? आणि तो रिपोर्ट इंडियन एक्सप्रेसपर्यंत कोणी पोहोचविला? इसीजी जर निघालाच नाही तर असं का म्हणता की मृत्यू हृदय घाताने झाला आणि तिकडे न्युरोसर्जरी. ’आग सोमेश्‍वरी बंब रामेश्‍वरी’ असा हा प्रकार. आजार हार्टचा आणि उपचार मेंदूवर! म्हणून हे प्रश्‍न उपस्थित होतात. म्हणून या प्रश्‍नांची उत्तरे हवीत.
    नातेवाईकांनी हे सांगितलं की निरंजन टकले नावाचा एक पत्रकार आला होता आणि आम्ही त्याच्याशी बोललो पण त्याने हे सगळं रेकॉर्ड करून घेतलं हे आम्हाला माहितच नाही. मी तुमच्या समोर बसलेलो आहे, स्टँडवरती कॅमेरा लावलेला आहे, तो ऑन केल्यानंतर अगोदर मी तुमची परवानगी घेतली, तुम्ही हो रेकॉर्ड करा, असं म्हटल्यानंतर हा इंटरव्यूव्ह मी रेकॉर्ड केला. मी उघड-उघड कॅमेरा लावून हा इंटरव्यूव्ह रेकॉर्ड करतो आहे, हे दुसऱ्या कॅमेऱ्यावरसुद्धा रेकॉर्ड केलं. मनात आलं आणि हौसेने मी पत्रकार झालो असा प्रकार नाही. मी सर्वतोपरी काळजी घेतली. मला माहित होत या स्टोरीनंतर बोट कुठे दाखविल जाणार. सर्व प्रकारची दक्षता घेवून हा इंटरव्यूव्ह रेकॉर्ड केला. असे असतांना नुसत्या शंका दूर झाल्या असं म्हणणं कितपत योग्य आहे? या प्रश्‍नांची उत्तर द्याना.
    परवा पुण्यामध्ये एका कार्यक्रमात परिचय करून देतांना माझा उल्लेख निर्भय पत्रकार असा करण्यात आला. तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की असा माझा परिचय का करून देण्यात आला? म्हणजे मी भयग्रस्त असायला हवं का? मी निर्भयपण नाही आणि भयग्रस्तपण नाही. मी नॉर्मल आहे. ज्यांच्याकडे या स्टोरीमुळे अंगुलीनिर्देश होतो त्यांच्याबद्दल त्यांचे समर्थक म्हणतात, ते फार न्यायप्रीय आहेत. त्यांचा घटनेवरती, कायद्यावरती, अहिंसेवरती भरपूर विश्‍वास आहे. ते जर इतके चांगले आहेत तर मी भय बाळगायचं काय कारण आहे? मी भ्यायला हवं असं वाटत असेल तर कारण मला सांगाना. का पत्रकारांनी घाबरायला हवं? का विरोधकांनी घाबरायला हवं? का न्यायाधिशांनी घाबरायला हवं? का पक्षातील सहकाऱ्यांनी घाबरायला हवं? सुषमा स्वराज अशा विदेशमंत्री की त्या भुटान आणि नेपाळ सोडून कुठल्याच देशात गेल्या नाहीत. हे दोन्ही देश असे आहेत जिथे जायला पासपोर्ट लागत नाही. त्या का गप्प आहेत? पूर्वी त्या खूप बोलायच्या. पक्षातील बाकीचे लोक का गप्प आहेत? कोणी विरोध केला की तो देशद्रोही. असे एकंदर देशाचे वातावरण आहे.
    (सोलापूर येथील रंगभवन मध्ये 30 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 7 वाजता  ऍड. गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निरंजन टकले यांच भाषण झालं. ते भाषण आणि मुलाखत आम्ही अंक नं. 8 मध्ये प्रकाशित केली. त्याचा हा शेवटचा दूसरा भाग.)
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget