Halloween Costume ideas 2015

अल्लाउद्दीन-पद्मावती : इतिहासावर लादलेली कल्पना

सरफराज अ. रजाक शेख
कोषाध्यक्ष : अ.भा. मुस्लीम इतिहास संशोधन मंडळ, (मो.नं.8624050403)

भारतात इतिहासाचे लेखन इतिहासलेखन शास्त्रीय पध्दतीने करणार्‍या इतिहासकारांची संख्या अत्यल्प आहे. त्या तुलनेत इतिहासावर पुर्वाग्रह, श्रध्दा, राजकीय विचार आणि सामाजिक अस्मीता लादण्यार्‍या इतिहासकारांची परंपरा मोठी आहे. भारतीय इतिहास लेखनाची सुरवात मुसलमान राज्यकर्त्यांच्या काळात झाली. तेंव्हापासून भारतीय इतिहास, इतिहासकारांच्या व्यक्तीगत अभिनिवेषाचा बळी ठरला आहे. मध्ययुगीन काळात बादशाही दरबारातील इतिहासकारांच्या ग्रंथात एकच घटना वेगवेगळ्या पध्दतीने लिहलेली आढळते. कित्येकवेळा एका इतिहासपुरुषाविषयी मध्ययुगीन इतिहासकारांत मतांतरे आढळतात. अबुल फज्ल सारख्या प्रख्यात इतिहासकाराच्या लेखनात बादशाही दरबारातील अनेक सरदारांविषयी रोष आढळतो. जौहर आफताबची, अब्दुल हमीद लाहोरी, इश्‍वरदास नागर, मुहम्मद बिन मन्सुर, मुहणोत नेणसी, शैम सिराज आफिक यांच्या ग्रंथात देखील काही समकालीनांविषयी पुर्वाग्रह आढळतात. निकोलाय मनुची हा इटालीयन प्रवासी सातत्याने औरंगजेबाला दुषणे देतो. कित्येक अवास्तव प्रसंग देखील इतिहास म्हणून सांगतो. खाफी खान हा मोगल इतिहासकार कित्येकवेळा उत्तरेत बसून दक्षिणेतील प्रसंग आपल्या बौध्दीक कुवतीप्रमाणे रंगवतो. अनेक दंतकथा इतिहास म्हणून सादर करतो. फरिश्ता हा सतराव्या शतकात झालेला मोठा इतिहासकार. त्याचे गुलशने इब्राहीमी हे ग्रंथ मध्ययुगीन इतिहासाचं महत्वाचं साधन. समकालीन राज्यकर्त्यांच्या इतिहासाचे वस्तुनिष्ठ लेखन त्याने केले आहे. त्यासोबतच या ग्रंथात पंधराव्या  शतकाचा इतिहासही त्याने लिहला आहे. हा इतिहास त्याने ऐकीव माहीतीच्या आधारे लिहला आहे. त्यामुळे त्यात अवास्तव माहीती आधिक आहे. चिटणीसाची बखर देखील समकालीन नाही. ती उत्तरकालीन श्रेणीत मोडणारी आहे. त्यामुळे त्यात अनेक भाकडकथा आहेत. ज्यामुळे संभाजी राजांची बदनामी झालेली आहे. आग्रा येथील प्रकरण देखील असेच आहे. उत्तर भारतातील समकालीन कागदपत्रे वेगळा प्रसंग नोंदवतात. तर दक्षिण भारतातील समकालीन कागदपत्रे मिठाईच्या पेटार्‍यांची कथा सांगतात. तवारीखकार आणि बखरकारांनी इतिहासलेखनात मोठा गोंधळ मांडला आहे.
    त्यातही मध्यकाळात लिहलेला पद्यात्मक इतिहास तर मोठा गंमतशीर आहे. सुफी कवी, भक्ती आंदोलनातील काही संत, काही दक्षिण भारतीय कवींनी इतिहासाचे पद्यात्मक लेखन केले आहे. मुळात या कविंच्या सामाजिक प्रेरणा, विचारांची पार्श्‍वभूमी वेगळी आहे. त्याला अनुरुप ते इतिहासाची मांडणी करतात. इतिहासातील घटनांचे संदर्भ पुराणात शोधतात. रुपकांचा वापर करतात. आपले विचार वाचकांच्या गळी उतरवण्यासाठी काल्पनिक पात्र आणि घटनांचाही आधार घेतात. सुफी कवी जायसी ने लिहिलेले पद्मावत देखील इतिहासावर लादलेली अशीच एक कल्पना आहे. जायसीची प्रतिभा मोठी असली तरी कल्पनाविलासातून त्याने इतिहासाला विकृत केले आहे. त्याने रंगवलेल्या अल्लाउद्दीन खिलजी आणि पद्मावतीच्या प्रकरणाने आज मोठी समस्या निर्माण झाली आहे.
सुफी कवी मलिक मोहम्मद जायसी आणि त्याचे ग्रंथ पद्मावत
    मध्ययुगीन कवी जायसी ने आपल्या प्रतिभेने इतिहासाला व्यापून टाकले आहे. प्रेम साहीत्याचा इतिहास जायसीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होउ शकत नाही. जायसीचे मुळ नाव मलिक मोहम्मद. त्यांचे जन्मवर्ष इसवी सन1462. जन्म जायस नगरात झाला म्हणून मलिक मोहम्मदांना जायसी हे नाव मिळालं. असे हे जायसी अध्यात्मिक प्रकृतीचे समाजचिंतक, कवी, तत्ववेत्ते होते. त्यांनी 18 ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या ग्रंथात अरबी, संस्कृत आणि फारसी साहीत्यमुल्यांचा मिलाफ झालेला आहे. लिखाण हिंदी भाषेत असले तरी शैली फारसी मसनवी सारखी आहे. जायसींनी लिहिलेल्या पद्मावताला हिंदी साहीत्यात मोठ्या सन्मानाचे स्थान आहे. पद्मावत हे प्रेमकाव्य आहे. पद्मावती आणि रत्नसेन यांच्या प्रेमाची ती कथा आहे. अल्लाउद्दीनच्या पद्मावती वेडाची ती काल्पनिक कहाणी आहे. पद्मावतीसाठी अल्लाउद्दीनने लढलेल्या लढाईचा हा ग्रंथ तथाकथित इतिहास आणि जमातवादी इतिहासकारांसाठी आज अल्लाउद्दीनच्या इतिहासाचं एक महत्वाचं साधन देखील ठरलं आहे.
काय आहे पद्मावतात?
    जायसीने लिहलेले पद्मावत आज मुळ स्वरुपात उपलब्ध नाही. पाटण्याच्या खुदाबक्ष लायब्ररीत त्याची एक प्रत आहे. पण त्यातही काही प्रक्षेप झाल्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. तरीही खुदाबक्ष लायब्ररीची प्रतच आज अभ्यासासाठी ग्राह्य मानली जाते. देशराजसिंह भाटी यांनी त्या ग्रंथांच्या आधारे ही कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते लिहितात, “ गंधर्वसेन हा सिंहलगढचा राजा होता. राणी चंपावती पासून त्याला एक कन्या झाली. तिचे नाव पद्मावती. पद्मावती खूप सुंदर आणि मोठी विद्वानसुध्दा होती. तिचा पिता गंधर्वसेनला स्वत:च्या राज्याचा आणि संपत्तीचा मोठा अभिमान वाटे. तो सर्वांनाचा तुच्छ लेखत असे. त्यामूळे तो पद्मावतीचा विवाह कुणाशीच करत नव्हता.
 पद्मावतीने हिरामन नावाचा एक गुणी पोपट पाळला होता. तिने ही परिस्थीती हिरामन पोपटाला सांगितली. पोपट म्हणाला, “ देवी जर तुझी आज्ञा असेल तर मी देशोदेशी स्थलांतर करतो. तुझ्या रुपाच्या कथा लोकांना सांगतो. तुझ्यासाठी एका योग्य वराचा शोध घेतो.”  पद्मावती आणि हिरामन मध्ये सुरु असलेला हा संवाद राजा गंधर्वसेनच्या गुप्तहेरांनी ऐकला. राजाच्या कानी ही वार्ता गेली. तेंव्हा राजाने हिरामन पोपटाला मारण्याचा आदेश दिला. राजाचा आदेश येताच पद्मावतीने हिरामनला वनात जाण्यास सांगितले. हिरामन पोपट आपले प्राण वाचवण्यासाठी आणि पद्मावतीसाठी वर शोधण्याकरिता जंगलात निघून गेला. तिथे एका शिकार्‍याने हिरामनला आपल्या जाळ्यात पकडले. विकण्यासाठी सिंहलद्वीपच्या बाजारात आणले. चितोडचा एक ब्राम्हण देखील व्यापारासाठी तिथे आला होता. त्याची नजर हिरामनवर पडली. शिकार्‍याच्या पिंजर्‍यातील हिरामनशी त्याने संवाद साधला. त्याला हिरामन पसंत पडला. त्यामुळे त्या ब्राम्हणाने हिरामनला विकत  घेतले. तो चित्तोडला आला. तेथे अवघ्या काही दिवसातच हिरामन पोपटाच्या विद्वत्तेची कथा चर्चिली जाऊ लागली. चित्तोडचा राजा रत्नसेनला देखील हिरामनची माहीती मिळाली. राजाने ब्राम्हणाला पोपटासह दरबारात हजर करण्याचा आदेश दिला. ब्राम्हणाने हिरामन पोपटाला राजाच्या सेवेत हजर केले. राजा रत्नसेनने हिरामनशी संवाद साधला. हिरामनच्या विद्वत्तेने रत्नसेन खूपच प्रभावित झाला. त्याने हिरामनला विकत घेतले. अवघ्या काही दिवसात हिरामन राजाचा प्राणप्रिय सेवक बनला. या हिरामनने पद्मावतीच्या रुपसौंदर्याविषयी राजा रत्नसेनला सांगितले. पद्मावतीच्या रुपसौंदर्याचे वर्णन ऐकून रत्नसेनच्या मनात तिच्याविषयी प्रेमभावना निर्माण झाल्या. योग्याचा वेष परिधान करुन राजा रत्नसेन सिंहलगडला रवाना झाला. तिथे त्याने एका मंदीरात आश्रय घेतले. पद्मावतीच्या प्राप्तीसाठी त्याने तिथेच तपश्‍चर्या आरंभली.
    सिंहलगडला आल्यानंतर पद्मावतीचा पिता गांधर्वसेनच्या कोपास रत्नसेन बळी पडला. पद्मावतीसाठी त्याने तुरुंगवासही भोगला. त्याची तपश्‍चर्या पाहून देवी पार्वती अप्सरेच्या रुपात त्याला भेटावयास आली. तिने रत्नसेनच्या प्रेमाची प्ररिक्षाही घेतली. त्यात रत्नसेन उत्तीर्ण झाल्यानंतर पार्वतीने महादेवाला रत्नसेनच्या प्रेमप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. तद्नंतर आणखी काही दिव्यातून गेल्यानंतर रत्नसेनला पद्मावती प्राप्त झाली. रत्नसेन विवाहानंतर पद्मावतीला घेउन आपल्या राज्यात आला.” (2)
    रत्नसेनच्या राज्यात परतण्याची कथा देखील जायसी ने मोठ्या कल्पकतेने रंगवली आहे. समुद्रातील वादळ, राक्षस, समुद्रपुत्री लक्ष्मी असे अनेक पात्र त्या प्रवासातून त्यांनी सादर केले आहेत. रत्नसेन चित्तोडला परत आल्यानंतर या प्रेमकथेत अल्लाउद्दीन खिलजी हा खलनायक अवतरतो. “रत्नसेनच्या दरबारात राघव चेतन नावाचा एक पंडीत होता. त्याला यक्षिणीसिध्दी प्राप्त होती. अमावस्येवरुन राजा रत्नसेन आणि राघव चेतन मध्ये वाद झाला. रत्नसेनने रागाच्या भरात राघवचेतनला आपल्या राज्यातून बाहेर जाण्यास सांगितले. राघवचेतन सारख्या विद्वानास राज्यातून बाहेर काढले गेल्याचे ऐकून पद्मावतीस खूप वेदना झाल्या. पद्मावतीने आपल्या हातातील कंगन भेटस्वरुप राघवचेतनच्या दिशेने फेकले. ते कंगन पाहून राघव चेतन बेशुध्द झाला. पद्मावतीच्या मैत्रीणींनी त्याला शुध्दीवर आणले. मग राघव चेतन ते कंगन घेउन दिल्लीला अल्लाउद्दीन खिलजीकडे आला. अल्लाउद्दीन मोठा स्त्रीलंपट. राघवचेतनने त्याच्यासमोर पद्मावतीच्या सौंदर्याचे वर्णन केले. पद्मावतीच्या सौंदर्याचे वर्णन ऐकून अल्लाउद्दीन कामाग्नीत होरपळू लागला. राघवचेतनला अमाप संपत्ती देउन अल्लाउद्दीनने त्याचा मोठा सन्मान केला. आणि रत्नसेनला पत्र लिहून पद्मावतीला दिल्लीला पाठवण्यास सांगितले. पत्र वाचून रत्नसेनने प्रतिक्रोधीत होउन अल्लाउद्दीनच्या दुतास आल्या पाउली परत पाठवले. दूत दिल्लीस रिकाम्या हाती आल्याचे पाहून अल्लाउद्दीनने पद्मावतीसाठी चित्तोडवर हल्ला केला. हे युध्द कित्येक वर्ष चालले. शेवटी अल्लाउद्दीनने विजय मिळत नसल्याचे पाहून रत्नसेनशी तह केला.    तहानंतर रत्नसेनला बादशाह मित्रत्वाने वागवू लागला. एकेदिवशी बादशाहला रत्नसेनने भोजनास आमंत्रीत केले. भोजनानंतर महालात रत्नसेन आणि बादशाहने बुध्दीबळाचा डाव मांडला. बुध्दीबळ खेळताना बादशाह अल्लाउद्दीन खिलजीने समोर एक आरसा ठेवला होता. महालातील स्त्रीयांचे प्रतिबिंब त्या आरशात त्याला दिसत होते. त्याचवेळी पद्मावतीला देखील बादशाहने आरशात पाहीले. पद्मावतीचे रुप पाहून बादशाहची शुध्द हरपली. बादशाह जमीनीवर कोसळला. काही वेळाने शुध्दीवर आल्यानंतर बादशहाने रत्नसेनचा निरोप घेतला. बादशाहला पोहचवण्यासाठी रत्नसेन महालाच्या बाहेर आला. तिथेच बादशहाने रत्नसेनला बंदी बनवले. त्याला घेउन बादशाह अल्लाउद्दीन खिलजीने दिल्ली गाठली. बंदी बनलेल्या आपला प्रियकर राजा रत्नसेनला सोडवण्यासाठी पद्मावतीने खूप प्रयत्न केले. अल्लाउद्दीनला मुर्खात काढून तिने राजाला चित्तोडला परत आणले.
    राजा रत्नसेन दिल्लीत बंदी असताना चित्तोडमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. त्याचा प्रतिस्पर्धी देवपालने पद्मावतीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी षडयंत्रही आखले होते. या षडयंत्रामुळे पद्मावतीदेखील त्रासली होती. रत्नसेनला दिल्लीहून परत आणल्यानंतर पद्मावतीने त्याला देवपाल प्रकरणाची माहीती दिली. देवपालला धडा शिकवण्यासाठी रत्नसेनने त्याच्यावर हल्ला केला. दोघांमध्ये प्रंचड अशी लढाई झाली. या युध्दात रत्नसेन देवपाल दोघेही मारले गेले. आणि रत्नसेन सोबत पद्मावती आणि त्याची पहीली पत्नी नागमती दोघी सती गेल्या.” (3)
समकालीन इतिहासकारांनी नाकारलेले कल्पीत उत्तरकालीन इतिहासकारांनी इतिहास म्हणून स्वीकारले.
    जायसीच्या पद्मावताचा अभ्यास करणार्‍या अभ्यासकांना देखील रत्नसेन-पद्मावती- अल्लाउद्दीन ही कथा काल्पनिक वाटते. तसे अनेक संदर्भ खुद्द जायसीच्या पद्मावतातच आहेत. जायसीने लिहिलेल्या पद्मावतातील प्रेमकथेला इतिहास मानता येत नाही. कारण त्याला कोणताही ऐतिहासीक आधार नाही. अल्लाउद्दीनच्या समकालीन एकाही इतिहासकाराने पद्मीनी प्रसंगाचा उल्लेख केलेला नाही. सुफी संत हजरत अमीर खुसरो हे अल्लाउद्दीनच्या दरबारात उच्चपदस्थ अधिकारी होते. त्यांनी इतिहासाविषयी बरेच लिखाण केले आहे. चित्तोडच्या मोहीमेत देखील ते अल्लाउद्दीनसोबत होते. त्यांच्या कोणत्याच ग्रंथात अल्लाउद्दीनच्या पद्मावती वेडाचा उल्लेख नाही. अमीर खुस्रो प्रमाणे इसामी देखील अल्लाउद्दीनचा समकालीन आहे. त्याने लिहलेल्या ‘फतुहस्सलातीन’ मध्ये देखील पद्मावती प्रकरणाचे संदर्भ सापडत नाहीत. बादशाहच्या दरबारातील तवारीखकारांनी देखील या प्रेमकथेची कुठेच नोंद घेतलेली नाही. समकालीन एकाही कागदपत्रात पद्मावतीचे संदर्भ सापडत नाहीत. चित्तोडच्या इतिहासाची साधने देखील पद्मावतीच्या कथेला कोणाताही आधार पुरवत नाहीत. शिलालेखातील माहीती देखील जायसीच्या पद्मावतातील कथेला पुरक नाही. जायसीच्या कल्पनेला इतिहासाचे स्वरुप प्राप्त झाले ते उत्तरकालीन इतिहासकारांमुळे. पद्मावतीची कथा सर्वप्रमथम इतिहासाच्या ग्रंथात आली ती ‘आईने अकबरी’ मध्ये. अबुल फज्ल याने हा ग्रंथ इसवी सन 1570 च्या सुमारास लिहला. अल्लाउद्दीन खिलजीचे शासनकाळ इसवी सन 1296 ते 1316 आहे. (4) म्हणजे अबुल फजल ने अल्लाउद्दीनच्या इतिहासाविषयी त्याच्या शासनकाळाच्या 250 वर्षानंतर लेखन केले आहे. त्यामूळे साहजिकच त्याने यासाठी काही जुन्या ग्रंथकाराचा आणि ऐकीव माहीतीचा आधार घेतला असण्याची शक्यता आहे. कारण त्याने आपल्या ग्रंथातील पद्मावतीच्या कथेची सुरवताच मुळात “जुने ग्रंथकार नमुद करतात-” अशा शब्दात केली आहे. (5) पण त्या ग्रंथकाराचा उल्लेख मात्र टाळला आहे. त्यामूळे जायसीच्या पद्मावताचा त्याने आधार घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जायसी हा  अबुल फज्लच्या (जन्म 1551) (6) समकालीन म्हणता येईल इतक्या जवळचा आहे. आणि अबुल फज्ल पुर्वी राणी पद्मीनीची कथा जायसी शिवाय कुणीच सांगितलेली नाही. त्यामुळे अबुल फज्लने पद्मावती प्रकरणाची त्याच्या ग्रंथात दिलेली माहीती इतिहास म्हणून स्वीकारता येणार नाही.    पद्मावतीच्या बाबतीत अबुल फज्ल आणि फरिश्ता मध्ये मोठे साम्य आहे. फरिश्ता हा अल्लाउद्दीनच्या समकालीन नाही तर उत्तरकालीन आहे. सतराव्या शतकाच्या सुरवातीला त्याने ‘गुलशन-ए-इब्राहीमी’ या ग्रंथाची रचना केली आहे. (7) त्याने दिलेल्या पद्मावतीच्या कथेत आणि अबुल फज्लच्या आयीने अकबरीतील एकसारखीच आहे. (8) पण त्याने लिहलेल्या इतिहासात चितोडच्या अनेक अक्षम्य चुका केल्याचे सेतु माधव पगडी यांनी सप्रमाण सिध्द करुन दाखवले आहे. (9)
कर्नल टॉडमुळे पद्मावतीच्या कथेला इतिहासाचे स्वरुप
    आधुनिक काळात इंग्रज इतिहासकारांनी इंग्रजी सत्तेला पुरक अशा पध्दतीने वसाहतवादी (साम्राज्यवादी) धारणेने भारतीय इतिहासाचे लेखन केले आहे. सम्राज्यवादी आसुयेप्रमाणे मुसलमान राज्यकर्त्यांची आत्यंतिक बदनामी हे इंग्रज इतिहासकारांच्या ग्रंथाचे वैशिष्ट आहे. इंग्रज इतिहासकारांनी महाराष्ट्र आणि राज्यस्थानचा इतिहास सर्वाधिक विकृत केला आहे. कर्नल टॉड हा राज्यस्थानातला इंग्रज अधिकारी होता. त्याने लिहलेला ‘अ‍ॅनल्स ऑफ राजस्थान’ हा ग्रंथ खूप लोकप्रिय आहे. या पुस्तकात त्याने मुसलमान राज्यकर्त्यांच्या विरोधात राजपुतांनी केलेल्या संघर्षाच्या कथा मोठ्या रंजकतेने सादर केल्या आहेत. सेतु माधव पगडी त्याच्या इतिहासलेखनाविषयी म्हणतात, “जो जो राजस्थानच्या इतिहासाचे आधिकाधिक संशोधन होऊ लागले, तो तो टॉडच्या ग्रंथातील उणिवा नजरेत भरु लागल्या. टॉडचा ग्रंथ म्हणजे इतिहास आणि दंतकथा यांचे मिश्रण होय हे अभ्यासकांच्या लक्षात आले.” (10) अशा या टॉडने आधुनिक इतिहासलेखनाचा मुखवटा धारण करुन पद्मावतीची कथा इतिहास म्हणून ‘अ‍ॅनल्स ऑफ राजस्थान’ मध्ये घुसडली. 
अल्लाउद्दीन लढला तो लक्ष्णसिंहांशी रत्नसेन तर त्याच्या अश्रित होता
    सेतु माधव पगडी अल्लाउद्दीनने चित्तोडवर केलेल्या हल्ल्याविषयी म्हणतात,“ अल्लाउद्दीनने चित्तोडला वेढा घातला.शेवटच्या हल्ल्याच्या वेळी चित्तोडचा राणा रत्नसिंह हा अल्लाउद्दीनकडे आश्रयार्थ आला.पण राजपुतांनी लक्ष्मणसिंह सिसोदीयाच्या नेतृत्वाखाली वेढा लावून लढा दिला.” (11) ज्या रत्नसेनसला अल्लाउ्ददीन खिलजीने बंदी बनवल्याचे सांगितले जाते तो स्वत:च त्याच्या आश्रयाला आला होता. राजपूतांच्यावतीने लढणारा तर राणा लक्ष्मणसिंह होता. त्यामुळे रत्नसिंहाचे प्रकरण पुर्णत: जायसीच्या कल्पनेची उपज आहे. नरहर कुरुंदकरांच्या शब्दात सांगावयाचे तर ‘अनेकांच्या मनात वर्तमानकाळातील हिंदूविरोधी मुसलमान अशा प्रकारचा झगडा असतो. स्वत:च्या मनातील हा असत्य आणि अनुचित संघर्ष मागच्या इतिहासामध्ये पाहण्याची काही जणांची धडपड असते.”(12) मग त्या प्रवृत्तीतून पद्मावतीसारख्या काल्पनिक कथा इतिहासावर लादल्या जातात. भूतकाळात न घडलेला हिंदू मुस्लीमांचा संघर्ष वर्तमानात मात्र घडत राहतो. 
- संदर्भग्रंथ -
1) जायसी एक विवेचन - भाटी देशराज सिंह - पृष्ठ क्र. 41 सन 1965, (2) कित्ता पृष्ठ क्र. 64 ते 68. (3) कित्ता पृष्ठ क्र. 68, 69. (4) चंद्र सतीश, मध्यकालीन भारत, राजनिती, समाज और संस्कृती पृष्ठ क्र. 93 इसवी सन 2008, ओरिएंट ब्लैकस्वान
5)    पगडी सेतु माधव, भारतीय मुसलमान शोध आणि बोध, पृष्ठ क्र. 247 आवृत्ती तिसरी, परचुरे प्रकाशन मुंबई
6)    डॉ.सक्सेना आर.के. मुगलकालीन इतिहासकार व इतिहासलेखन, पृष्ठ क्र.41, सन 1987. (7) फरिश्ता, गुलशने इब्राहीमी (भाषांतर डॉ. भ.ग. कुंटे, सन 1983). (8) डॉ सक्सेना आर.के. सल्तनतकालीन इतिहासकार व इतिहासलेखन पृष्ठ 75 सन 1985 (9)    पगडी सेतुमाधव पुर्वोक्त पृष्ठ क्र.226,227, 10) कित्ता पृष्ठ क्र. 222,223
11) कित्ता पृष्ठ क्र. 235
12) कुरुंदकर नरहर, छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य,पृष्ठ क्र.15 आवृत्ती पाचवी,सन 2016

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget