Halloween Costume ideas 2015

खोटा लव जिहाद!

नगीना ना़ज साखरकर
9769600126
लव जिहाद ही संज्ञा कुठल्याच पुस्तकात नाही. हा शब्द सर्वप्रथम केरळमधून समोर आला आणि भारतभर पसरला. या
शब्दावरून 2013 ची मुज्जफरनगरची दंगल घडली. या शब्दाबद्दल कधीच कुठल्याच मुस्लिम व्यक्तिने विचारसुद्धा केला नसावा. हे जरूर आहे की अगदी प्राचीन काळापासून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये प्रेम प्रसंग आणि त्यातून लग्न करण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. अनेक लग्न यशस्वीसुद्धा झालेली आहेत. वास्तविक पाहता इस्लाममध्ये लग्नापूर्वी प्रेम करण्याची परवानगीच नाही. ज्या मुलीशी लग्न करावयाचे आहे तिला सर्व नातेवाईकांसमक्ष एक नजर पाहून घेण्याची परवानगी  आहे. मात्र प्रेमाशिवाय लग्न होवूच शकत नाही, हे आधुनिक समीकरण इस्लामला मान्य नाही. प्रेम करणे तर लांबच राहिले, परस्त्रीकडे टक लावून बघणेसुद्धा इस्लामला मान्य नाही. हे सर्व मुस्लिम समाज जाणून आहे. अशा पार्श्वभूमीवर काही दक्षीणपंथी संस्थांचा हा आरोप की मुस्लिम तरूणांना टू व्हीलर्स व काही पैसे देवून मुस्लिमेत्तर मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याच्या कामाला लावले जाते व त्याला लवजिहाद म्हणतात. अशा पद्धतीने मुस्लिमेत्तर मुलींना मुस्लिम बनविण्याचे व्यापक षडयंत्र रचण्यात आलेले आहे, हा आरोप हास्यास्पदच नव्हे तर मुस्लिमेत्तर मुलींचा अपमान करणारा सुद्धा आहे. मुस्लिम पालकांना आपल्या मुलांना शिकविण्याचे सोडून हे असले प्रकार करायला लावणे परवडणारे नाही. एवढी साधी समज आरोप करणार्यांना नाही.
    अल्पवयीन मुलींना गाठून, त्यांना आपल्या जाळ्यात ओढून, गरोदर करून सोडणारे लोक सर्व समाजात मुठभर का असेना आहेत. काही विकृत मानसिकता असलेले लोक असले अश्लाघ्य प्रकार करीत असतात. पण त्यात मुस्लिम तरूणाांच सहभाग अपवादानेच आढळतो. ते ही नामधारी मुस्लिम असतात. इस्लामची खरी शिकवण त्यांच्यात उतरलेली नसते. कारण ज्याच्या मनामध्ये इस्लामची शिकवण उतरते तो स्वतः होवून वाम मार्गापासून दूर राहतो. त्याला कायद्याचीही गरज लागत नाही. त्याच्यामध्ये एवढी नैतिकता असते की, कायद्याची भीती दाखविण्याची गरजच पडत नाही. भारतातच नव्हे तर ऑस्ट्रेलियापासून ब्रिटनपर्यंत बिगर मुस्लिम तरूण-तरूणींचे मुस्लिम धर्मात होणारे स्वेच्छेने धर्मांतर हा याचा पुरावा आहे.
    इस्लाममध्ये लग्नापूर्वी शरीर संबंध ठेवणे हा अत्यंत घृणास्पद गुन्हा मानला गेलेला असून, शरियतने त्याला शंभर फटक्यांची शिक्षा फरमाविलेली आहे. केवळ लग्नासाठी इस्लामधर्म स्विकारणे याला सुद्धा इस्लाममध्ये मान्यता नाही. कोणालाही जबरदस्तीने मुस्लिम बनविता येत नाही. स्वेच्छेने इस्लामचा अभ्यास करून त्यातील स्वच्छ, साधी व तणावरहीत जीवन व्यवस्था आवडल्याने जर कोणी मुस्लिम होवू इच्छित असेल तरच त्याचे धर्मांतर हे वैध मानले जाते, अन्यथा नाही. इस्लामी विचारधारा स्वतःच इतकी शक्तीशाली आहे की, इतरांना या धर्मामध्ये आणण्यासाठी लवजिहाद सारखे तदन् फालतू प्रकार करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आजकाल सैतानाचे राज्य चालू आहे. लग्नाशिवाय स्त्री पुरूषांमध्ये उघडपणे असलेल्या संबंधांना प्रेमाचे गोंडस नाव देण्यात येत आहे. विशेष म्हणजे समाजातील काही वर्गामध्ये अशा संबंधांना स्वीकारलेले देखील आहे. इस्लामी शिकवणीचा अव्हेर करून प्रेम करणारे महाभाग प्रत्येक काळामध्ये होते. आजही आहेत. याचा इन्कार करता येणे जरी शक्य नसले तरी इस्लामी समाजामध्ये अशा लोकांना चांगल्या नजरेने पाहिले जात नाही, हे मात्र खरे. अशा संबंधांना मान्यता देणे तर दूरच अशा जोडप्यांकडे तिरस्काराने पाहण्याची पद्धत मुस्लिम समाजात रूढ आहे.
    भारतीय समाज एक संयुक्त समाज आहे. शेकडो वर्षांपासून हिंदू-मुस्लिम एकमेकांच्या शेजारी राहतात. यातून हिंदू-मुस्लिम प्रेम संबंधांच्या काही घटना घडणे स्वाभाविक आहे. मात्र याला लव जिहाद म्हणणे अत्यंत बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. मुस्लिम समाजाने अशा प्रेम प्रसंगाच्या घटनांतून अनेक वेळा कटू अनुभव घेतलेला आहे. अनेकवेळेस कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. अनेक शालीन मुस्लिम आपल्या पाल्यांच्या अशा कृत्यामुळे तुरूंगामध्ये सुद्धा गेलेले आहेत. अशा वेळेस मुस्लिम समाजाने आपल्या पाल्यांना अशा प्रेम प्रसंगापासून सावध राहण्याची शिकवण देण्याची वेळ येवून ठेपलेली आहे, असे माझे मत आहे. अनेक मुस्लिम मुली हिंदू मुलांबरोबर लग्न करतात व इस्लाम सोडून इतर धर्म स्विकारतात. तेव्हा सर्वकाही शांत असते. मात्र मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी असेल तर लगेच लव जिहादच्या नावाने हाका मारल्या जातात. लोकांना संघटित केले जाते आणि तनाव निर्माण केला जातो. प्रत्येक वेळेस निशाण्यावर मुस्लिमच असतात. प्राचीन काळापासून भारतात एक म्हण प्रचलित आहे की, प्रेम आंधळे असते. त्याला जात, धर्म, समाज काही दिसत नाही. परंतु, तणाव निर्माण करणार्या लोकांच्या लक्षात ही म्हण राहत नाही.
    मुस्लिमांची संख्या वाढविण्यासाठी मुद्दामहून लव जिहादचे प्रकार घडविले जातात. हा आरोप मुळातच चुकीचा आहे. इस्लामचा प्रचार आणि प्रसार हा नैसर्गिकरित्या होतो. हे त्रिकालाबादित सत्य आहे. इस्लामची विचारधारा एवढी जबरदस्त आहे की, ती लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेते. म्हणून मुस्लिमांची संख्या वाढते. मुस्लिमांना आपली संख्या वाढविण्यासाठी लव जिहादसारखे तद्न फालतू प्रकार करण्याची मुळीच आवश्यकता नाही. काही लोक मुद्दाम असा अपप्रचार करून गरीब मुस्लिमांममध्ये दहशत निर्माण करीत आहेत. सर्वसामान्य हिंदूही या दुष्प्रचाराचे बळी ठरून इस्लाम आणि मुस्लिमांचा द्वेष करीत आहेत. समाजात विष पसरविणार्या या शक्तींपासून दोन्ही समाजांनी सावध राहण्याची गरज आहे. हा एक असा मार्ग आहे ज्याचा कुठेच अंत नाही. हा मार्ग फक्त द्वेष, दुश्मनी आणि विनाशाकडे घेऊन जाणारा आहे.
    आश्चर्य म्हणजे अनेक चित्रपट नट आणि नट्यांनी शिवाय राजकारण्यांनी आंतरधर्मीय लग्न केलेली आहेत व आजही करीत आहेत. सागरिका घाटगे आणि जहीर खान यांच्या लग्नाची घटना तर अगदी ताजी आहे. याला मात्र विरोध झालेला नाही. झाडून सगळे उच्च भ्रू या लग्नाच्या पार्टीला हजर होते. मरण फक्त गरीबांचे होत आहे. सर्वसाधारण लोकांमध्ये असे लग्न झाले की लगेच त्याचे पडसाद उमटू लागतात आणि लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. श्रीमंत हिंदू-मुस्लिमांचे प्रेम प्रकरण लव जिहाद ठरत नाहीत. मात्र सर्वसामान्यांचे ठरतात. यापेक्षा मोठे सामाजिक ढोंग दूसरे असूच शकत नाही. खरे पाहता लव जिहादच्या माध्यमातून दोन समाजामध्ये फूट टाकून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा काही संस्था कायम प्रयत्न राहिलेला आहे. जोपर्यंत ही खेळी हिंदू-मुस्लिम समाजाच्या सामान्य लोकांच्या लक्षात येणार नाही, तोपर्यंत यापासून होणारे नुकसान दोन्ही समाजांना भोगावे लागणार आहे. खरे पाहता देशाला स्वतंत्र होवून 70 वर्षे झालेली आहेत. मात्र मानसिकदृष्ट्या अजून आपण गुलामगिरीतच आहोत. खरे पाहता लव जिहाद हा शब्द कोणाच्याच जिभेवर यायला नको. कारण याच्यात सत्यता नाही. खोट्या प्रचाराला बळी पडणे ही मानसिक गुलामगिरी नव्हे तर दूसरे काय आहे? लव जिहाद असो का दूसरा आणखीन कुठला आरोप. खोटी गोष्ट पुन्हा-पुन्हा खरी आहे म्हणून सांगितली गेली तर काही काहानंतर सामान्य लोकांना ती खरीच वाटू लागते. आपल्या प्रिय देशाला होणार्या नुकसानापासून वाचविण्यासाठी लव जिहादसारख्या फालतू गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा राष्ट्रनिर्माणाच्या इतर महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याची सद्बुद्धी आम्हा सर्वांना अल्लाह देवो हीच प्रार्थना.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget