Halloween Costume ideas 2015

माणुसकीची मुद्रा उमटवणारी कविता

‘माझ्या तीन वर्षाच्या मुलाने
माझं बोट धरून
फिरायला नेण्याचा हट्ट धरला
म्हणून घेऊन गेलो
चौकातील मशीद पाहून
तो म्हणाला,
काय आहे?
मी म्हणालो अल्लाहचं घर
पुढे दुसऱ्या चौकात
मंदिर पाहून
तोच म्हणाला,
अब्बू अल्लाहचं घर?
मात्र मी निशब्द... निरूत्तर
त्याच्या हातून माझं बोट काढून घेतलं
अनं मीच त्याचं बोट धरलं...’ (पृ.क्र. 60)

मानवी सौंदर्याचा सुगंध कवीच्या वरील ओळींमधून येतो. लहान मुलं हे निरागसच असतात.निरागस मुलांच्या मनात येथील समाज,शिक्षणपद्धती, आईबाप परधर्मद्वेष बिंबवत असतात. या यंत्रणा मुलांच्या मूळ नैसर्गिक सौंदर्यापासून मुलांना वेगळे करीत असतात. मुलांच्या मनात जातिधर्माच्या चौकटी निर्माण करून या यंत्रणा मुलांना परस्परकौर्याच्या भट्टीत तावूनसुलाखून काढण्याचे काम करीत असतात.
‘मीच त्याचं बोट धरलं’ ही शीर्षककविता आहे. या कवितेमधून व्य्नत झालेला निरागसपणा हेच शेख बिस्मिल्ला सोनोशी यांच्या कवितासंग्रहाचे देखणे सौंदर्य आहे. समाजातील सनातन्यांनी मंदिर-मशिदीच्या निमित्ताने समाजात धार्मिक आणि सांस्कृतिक दरी निर्माण केली आहे. त्यांनी समाजामध्ये असहिष्णुतेचा अंधारच पसरविला आहे. कवीला आपल्या तीन वर्षाच्या मुलाचे धरलेले बोट  सोडून मुलाचे बोट का धरावे लागले? कारण तीन वर्षाचा निरागस मुलगा कवीला मंदिर-मशिदीचे तत्त्वज्ञान समजावून सांगतो. मंदिर-मशिदीच्या सुंदर नात्याची जाणीव तीन वर्षाच्या निरागस मुलाच्या व्नतव्यावरून होते. मुलाचे मनोगत अत्यंत जबाबदार आणि समजूतदारपणाचे आहे. मुलाचे मनोगत हे उसवलेल्या मानवी नात्याला सांधणारे आहे. खरे पाहता वडीलधारी माणसांनी लहान मुलांवर योग्य संस्कार करावे, लहान मुलांच्या मनावर बंधुभावाचा संस्कार बिंबवावा हे अपेक्षित आहे. पण येथे कवीचा तीन वर्षाचा मुलगाच कवीवर बंधुभावाचा आणि सहिष्णुतेचा संस्कार रुजविताना दिसतो. हा संस्कार केवळ कवीसाठीच नाही तर सर्व भारतीयांसाठीच आहे. कवीच्या कोवळ्या मुलाचे ऐकले तर या देशात हिंदू-मुस्लिम असा भेदच उरणार नाही, भारतीय एकसंधत्वाला विघटनाची कीड लागणार नाही. पण येथील धर्ममार्तंडांच्या गळी या निरागस मुलाचे म्हणणे उतरेल का? धर्ममार्तंडांनी निरागस मुलाच्या मनोगतातील ध्येयवाद नीट लक्षात घ्यावा, असे नम्रमणे वाटते.

महापुरुषांविषयीची कृतज्ञता व्य्नत करणारी कविता
‘मीच त्याचं बोट धरलं’ हा महापुरुषांविषयी आदर व्य्नत करणारा कवितासंग्रह आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्राचे वैचारिक प्रबोधन हे महाराष्ट्रातील महापुरुषांनी केले आहे याची तीव्र जाणीव कवीला आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांनी सांस्कृतिक शुध्दिकरणाची चळवळ उभी करून येथील प्रतिक्रांतीवाद्यांच्या विरोधात संग्राम उभा केला आणि लोककल्याणाचे उद्घोष करणारे प्रमाणशास्त्र महाराष्ट्रातील लोकांना दिले. कवी शेख बिस्मिल्ला सोनोशी यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचा इतिहास नीट अभ्यासला आहे याचा प्रत्यय ‘मीच त्याचं बोट धरलं’ या संग्रहातील महापुरुषांवरील कवितेतून दिसून येतो.जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, सवित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महामानवांनी महाराष्ट्रातील जातीयतेला आणि धर्मांधतेला सुरुंग लावला. येथील दीनदुबळ्यांचे यातनातांडव संपावे म्हणून समाजरचनेची पुनर्रचना केली. कवीने जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी आदरणीय माहामानवांविषयी कृतज्ञता व्य्नत करणाऱ्या कविता लिहिल्या आहेत. यावरून कवीची काव्यदृष्टी लक्षात येते. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मानवीमूल्यांनी समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. या मानवीमूल्यांच्या केंद्रस्थानी माणूस आहे हेच वारंवार येथील समाजाला महामानवांनी पटवून दिले. या मूल्यांच्या बळावरच येथील मूलतत्त्ववादाशी त्यांनी निकराचे बंड पुकारले आणि समतेचे ध्वज खाली पडू दिले नाही. या महामानवांमुळेच महाराष्ट्रात माणुसकीचा विजयोत्सव साजरा करता आला याची जाणीव कवीला आहे.

‘स्वराज्याची प्रेरणा तू
महाराष्ट्राची शान
मुजरा तुला मानाचा
झुकवून मान
लेखणी ही नाते माझी
लीन तुझ्या पायी
धन्य तू जिजाऊ’ (पृ.क्र. 76)

स्वराज्याची ज्योत पेटविणारी जिजामाता या महाराष्ट्राची राष्ट्रनायिका आहे. ज्यावेळेस महाराष्ट्रावर मोघलशाही, आदिलशाहीआणि कुतुबशाहीचे राज्य होते त्यावेळेस जिजामातेने स्वराज्याच्या स्वाभिमानाचे बिगूल वाजविले. महाराष्ट्रातील लोकांमध्ये स्वराज्याचे जागरण करण्याचे काम जिजामाता या राष्ट्रमातेने केले आहे. त्याचबरोबर धर्माची चिकित्साही त्यांनी केली. महाराष्ट्रधर्माचा आदर्श त्यांनी समाजापुढे मांडला. महाराष्ट्रातील शूरवीर मराठ्यांनी इतरांकडे चाकरी करण्यापेक्षा स्वतंत्र स्वराज्याची स्थापना करावी असे त्यांना वाटत होते. स्वराज्य हा त्यांचा ध्यास होता. सर्वांना कवटाळणाऱ्या मातृत्वाविषयी कवीने कृतज्ञता व्य्नत केली आहे.

‘परस्त्री तुज माते जैसी
तू ऐसा नीतिमान
असो कुठल्या ही धर्मपंथाचा
तुझ्या दरबारी एकसमान’ (पृ.क्र. 42)
 
वरील ओळींमधून शिवाजी महाराजांचा परस्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कवीने अधोरेखित केला आहे. शिवाजी महाराजांनी स्त्रीप्रतिष्ठेची काळजी घेतली. परस्त्री ही मातेसारखी आहे. स्त्रीचा कोणत्याही प्रकारचा अपमान महाराजांनी खपवून घेतला नाही. प्रस्थापित इतिहासकारांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा मुस्लिमविरोधी राजा म्हणून जाणीवपूर्वक उभी करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे. या इतिहासकारांनी मुस्लिमांचीही प्रतिमा हिंदूविरोधी अशीच निर्माण केली आहे. या चुकीच्या इतिहासातून हिंदू-मुस्लिम समाजाने बाहेर पडावे आणि महाराजांचा खरा इतिहास सर्वसामान्य माणसांनी जाणून घ्यावा. इतिहासद्रोही इतिहासकारांच्या भूलथापांना बळी पडून सर्वसामान्यांनी द्वेषाच्या जंगलात स्वतःला हरवू नये. समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या इतिहासकारांच्या निरर्थक गोष्टींमध्ये महाराष्ट्राच्या सुज्ञ लोकांनी आपला वेळ गमवू नये. शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. शिवाजी महाराज हे जाणते राजे होते. शिवाजी महाराज हे मुस्लिमांचेही राजे होते. अठरापगड जातीला एकतेच्या सूत्रात बांधण्याचे त्यांचे कसब अजोड होते याची जाणीव कवीला आहे.

‘बहुजनांच्या हाती दिली
शिक्षणाची मशाल
तुझ्या बुद्धीचा होता हा
प्रभाव जोतिबा’ (पृ.क्र. 50)

बहुजन समाजाच्या जीवनाची धुळधाण करणारा घटक महात्मा जोतीबांनी नीट समजून घेतला होता. शिक्षणाशिवाय बहुजन समाजाला मूळ माणुसकीशी जोडता येऊ शकत नाही हे महात्मा जोतीबांनी ओळखले. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षित करण्यासाठी हवी असलेली साधनसामग्री अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध करून दिली. महात्मा जोतीबा फुले हे बहुजन समाजाच्या क्रांतीचे शिल्पकार आहेत. प्रतिगामी शिक्षणाने बहुजन समाजाला गुलाम केले. आधुनिक शिक्षणाने बहुजनाची संवेदनशीलता जपली जाईल म्हणून त्यांनी आधुनिक शिक्षणाचे महाद्वार बहुजनांसाठी उघडले. ही व्यापक समाजक्रांती होती. या समाजक्रांतीच्या महोत्सवाला कवीने मानाचा सलाम केला आहे.

‘स्त्री जन्मा उद्धारले,
तोडून सारे बंधन
माय माऊली सावित्री,
तुला आमचे वंदन’ (पृ.क्र. 51)

कवी सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो कारण सावित्रीबाई फुले ह्या एकोणविसाव्या शतकातील आद्यशिक्षिका, तत्त्ववेत्त्या आहेत. ज्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे पाप समजले जात होते त्याकाळात सावित्रीबाईंनी महात्मा जोतीबा फुलेंच्या मार्गदर्शनाखाली स्त्रियांना शिक्षित करण्याचा विडा उचलला. त्यांनी भारतीय स्त्रियांना शिक्षणाचा नवा आयाम दिला. भारतीय स्त्रियांच्या मनात वसलेल्या रूढी-परंपरांना बाहेर काढण्यासाठी महाआंदोलन उभे केले. स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला, म्हणून कवी सावित्रीबाईंना वंदन करतो.

‘ज्याने लेखणीवरती तारला हा देश सारा
होता घटनेचा तो शिल्पकार भीम माझा
समतेचे निशाण घेऊन गाडली जातीयता
कर्मठ रूढीवर केलेला प्रहार भीम माझा’
(पृ. क्र.70)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेला बाणेदारपणा शिकविला. आपल्या लेखणीद्वारे त्यांनी समतेची पायाभरणी केली. भारतीय समाज जातिविहीन, धर्मविहीन, स्त्री-पुरुषभेदविहीन व्हावा यासाठी देशात महाआंदोलन उभे केले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर आधारित समाजरचना निकालात काढली. येथील समाजाची पुनर्रचना करून सामाजिक न्यायाची प्रस्थापना त्यांनी केली. सर्वच वंचितांचा वंचितपणा नष्ट करण्यासाठी त्यांनी महाआंदोलन उभारले. या महाआंदोलनाला कवीने आपल्या शब्दांतून उजाळा दिला आहे.
‘मीच त्याचं बोट धरलं’ या कविता-संग्रहामधील प्रत्येक कवितेमधून नैतिकतेच्या भावमुद्रा उमटल्या आहेत. धार्मिक उन्मादाला बळी न पडता प्रत्येकाने आपली माणुसकी जपायला हवी. परस्परांतील द्वेषाचे रूपांतर माणसाच्या नैसर्गिक प्रेमात व्हावे असे कवी म्हणतो. कवी स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेता घेता समूहाच्या मानसशास्त्रात बदल घडवू इच्छितो. समूहातील दुभंगलेपणा कवीला अस्वस्थ करतो. ही अस्वस्थता कवीला घायाळ करते. येथील व्यवस्था सर्वसामान्य माणसांना यातनांच्या हवाली करण्याचे षडयंत्र करीत आहे. या षडयंत्रातून समाजाने बाहेर पडायलाच हवे. हा क्रांतिकारी आशय येथील जाणत्या आणि विचार करणाऱ्या माणसांच्या मनात निर्माण करण्यात ‘मीच त्याचं बोट धरलं’ हा कवितासंग्रह यशस्वी झाला आहे. कवी शेख बिस्मिल्ला सोनोशी यांचा ‘मीच त्याचं बोट धरलं’ हा कवितासंग्रह या देशाचे देशपण हरवू नये, या राष्ट्राचे राष्ट्रपण हरवू नये आणि या समाजाचे समाजपण हरवू नये आणि या समाजाच्या परिवर्तनाचे पंख कोणी कापू नये म्हणून धडपडणारा कवितासंग्रह आहे.
या कवितासंग्रहाच्या निमित्ताने कवीने सामान्य माणसाच्या ऊर्जेची महत्ता विशद केली आहे. सर्वच प्रकारच्या वाताहतीतून नव्याने उगवता येते हा मौलिक संदेश कवीने दिला आहे. शेख बिस्मिल्ला सोनोशी यांच्या पुढील काव्यप्रवासाला हार्दिक शुभेच्छा!
(उत्तरार्ध)

-डॉ. अक्रम पठाण
अंजुमन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नागपूर.
मो.: ८६००६९९०८६

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget