Halloween Costume ideas 2015

महाराष्ट्रात ध्रुवीकरणाचे नवे राजकारण

सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात जातीय घटनांना सुरुवात झाली असली तरी गेल्या चार महिन्यांत 'जातीय तेढ' तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. कधी मंदिरे, कधी मशिदी, लाऊडस्पीकर, लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर तर कधी सोशल मीडिया पोस्टच्या नावाखाली हिंसाचार. पण चांगली बाब म्हणजे नागरी समाज आणि पोलिसांनी आतापर्यंत परिस्थिती कशीबशी नियंत्रणात ठेवली आहे, पण आता 'उकळी' नियंत्रणाबाहेर जात असून जातीय तणावाच्या या छोट्या-छोट्या घटनांचे रूपांतर मोठ्या प्रमाणात दंगलींमध्ये होणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठवड्यात कोल्हापूर आणि बीडमधील आष्टी भागात जातीय हिंसाचार उसळला असून या ठिकाणी तणावाचे वातावरण असून पोलिस संवेदनशील ठिकाणी तळ ठोकून आहेत. मार्च ते जून या कालावधीत औरंगाबाद, अकोला, शिवगाव, अहमदनगर, जळगाव, संगमनेर, मुंबई, कोल्हापूर, बीड, नाशिक या भागांत १२ वेळा जातीय हिंसाचार, जीवित व वित्तहानी, लोक जखमी, सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. यावर्षी २४ मार्च रोजी कोल्हापूर जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण होण्याची सुरुपात झाली होती. दोन मुस्लीम तरुणांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्यास आक्षेप घेतल्याने कट्टर हिंदू संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आणि दोन दिवसांच्या बंदची हाक देण्यात आली. मात्र या घटनेनंतर कोल्हापूर जिल्ह्लात तणाव निर्माण झाला होता तो काही दिवसांपूर्वी ८ जून रोजी पुन्हा उफाळून आला. आता राज्यभरात हळूहळू जातीय तणाव पसरला असून सर्वत्र हिंसाचाराच्या घटना सुरू झाल्या आहेत. 

मार्चमधील कोल्हापूरच्या घटनेच्या चार दिवसांनंतर ३० मार्च रोजी जळगावात मशिदीसमोर डीजे वाजवण्यावरून हाणामारी झाली होती. ३१ मार्च रोजी रामनवमीच्या दिवशी मुंबईतील मालोणी, मालाड परिसरात रामनवमीची मिरवणूक काढण्यात आली आणि मशिदीसमोर थांबवण्यात आली. 'हिंदू सकल समाजा'च्या बॅनरखाली राज्यभर 'हिंदू जनआक्रोश मोर्चा'च्या रॅलींमध्ये मुस्लिमांना खुलेआम धमकावले जात होते, लव्ह जिहाद आणि लँड जिहादच्या नावाखाली द्वेष पसरवला जात होता, हे लपून राहिलेले नाही. मुंबईतही या रॅली काढण्यात आल्या आणि त्यातून पसरलेल्या विषाचा परिणाम मालाडच्या मालोनीमध्येही झाला. रामनवमीच्या निमित्ताने औरंगाबादसह अन्य ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. अकोल्यात 13 मे रोजी जातीय हिंसाचार उसळला. अकोल्यात झालेल्या हिंसाचारात विलास गायकवाड या दलित तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १४ मे रोजी अहमदनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शेवगाव परिसरात हाणामारी होऊन लोकांचे आर्थिक नुकसान झाले.

त्र्यंबकेश्वरमधील मंदिरात मोठ्या संख्येने मुस्लीम बळजबरीने प्रवेश करत असल्याचा आरोप करण्यात आला. नंतर ती प्राचीन परंपरा असल्याचे सिद्ध झाले. ४ जून रोजी पुन्हा एकदा अहमदनगरने लोकांचे लक्ष वेधून घेतले जेव्हा हजारी बाबा दर्ग्याच्या उर्सवर लोक औरंगजेबाचे पोस्टर घेऊन जात असल्याची बातमी आली. दोन दिवसांनंतर ६ जून रोजी अहमदनगरमधील संगमनेर येथे सकल हिंदू समाजाचा मोर्चा काढून तोडफोड करण्यात आली. वाहतुकीच्या मुद्द्यावरून दोन समाजातील दोन व्यक्तींमध्ये झालेल्या वादाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरात ७ जून रोजी व्हॉट्सअॅपवर सम्राट औरंगजेब आणि हुतात्मा टिपू सुलतान यांची स्तुती केल्याने हिंसाचार झाला, दुकाने लुटण्यात आली आणि व्हॉट्सअॅपवर पोस्ट टाकणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यात आली, पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांवर गुन्हे दाखल करून ३६ जणांना अटक केली. ८ जून रोजी अहमदनगरमध्ये औरंगजेबाचे पोस्टर बाळगल्याचा प्रकार घडला आणि ९ जून रोजी आष्टी येथील एका १४ वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर औरंगजेबाचे कौतुक केले.

प्रश्न असा आहे की, औरंगजेबाच्या नावाखाली अचानक जातीय दंगली का सुरू झाल्या? कोल्हापूर आणि अहमदनगरला केंद्रस्थानी ठेवून या दंगली का केल्या जात आहेत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नांच्या सोप्या उत्तरात असे म्हणता येईल की, या सर्व दंगली, तणाव आणि जातीय हिंसाचार हा घाणेरड्या राजकारणाचा भाग आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र जळत आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्यात आले. नामांतराच्या विरोधात मुस्लिमांनी आंदोलन छेडले आहे, हे प्रकरण न्यायालयात गेले असून सध्या औरंगाबाद हे नाव वापरण्यास मुभा आहे.

महाराष्ट्रातील एक वर्ग औरंगजेबास केवळ शिवरायांचा, धर्माचा प्रतिस्पर्धीच नव्हे तर इतिहासातून काढून टाकू इच्छितो. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून ते भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांपर्यंत कोणताही राजकीय पक्ष शिवरायांकडे दुर्लक्ष करण्याचे धाडस करू शकत नाही, त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने शिवरायांच्या नावाने राजकारण करतो. आता स्वत:ला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा मोठे शिवभक्त सिद्ध करण्याचा भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे आणि त्याचा राजकीय फायदा घेऊ इच्छित आहे.

इंडियन एक्स्प्रेसने (१० जून २०२३) अचूकपणे म्हटले आहे की "महाराष्ट्रातील ध्रुवीकरणाचे नवे राजकारण अल्पसंख्याकांची संख्या कमी किंवा नसतानाही राज्याच्या काही भागात आणि प्रदेशात शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि जिथे कोल्हापूरप्रमाणे सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेची मूल्ये जपणाऱ्या पुरोगामी राजकारणाचा वारसा आहे". वरवर पाहता मुस्लिम जनतेत दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न वाटत असला, तरी अशा कारवायांमुळे राजकीय हेतू अधिक चव्हाट्यावर येतो. कोल्हापूर संस्थानावर २८ वर्षे राज्य करणाऱ्या शाहू महाराजांनी (१८७४-१९२२) हिंदूंमधील शूद्र व कनिष्ठ जातींची स्थिती सुधारण्यासाठी भरीव पावले उचलली. त्याचा आजही सामाजिक रचनेवर कायमस्वरूपी परिणाम होत आहे. त्यांनी अस्पृश्यता नष्ट केली. दुर्बल घटकांना नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण देणारे शाहू महाराज हे भारतीय इतिहासातील पहिले शासक होते. सवर्णांना मिळालेले सर्व विशेषाधिकार त्यांनी काढून घेतले. त्यांनी सवर्ण पुजाऱ्यांना राजवाड्यातून व दरबारी कामातून काढून टाकून एका मराठा युवकाला सवर्णेतरांचे पुजारी म्हणून नेमले. विशेषाधिकारप्राप्त उच्चजातींचा तीव्र विरोध असूनही त्यांनी आपल्या राज्यातील मुलींच्या शिक्षणाचे समर्थन केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात जे समतावादी, स्त्रीहिताचे आणि दलित होते, ते सर्व स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट उराशी बाळगणाऱ्यांचे मनसुबे येथील जनतेने उधळून लावून राज्यातील सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेची मूल्ये जपणाऱ्या पुरोगामी राजकारणाचा वारसा जपण्यासाठी पुढे आले पाहिजे.

- शाहजहान मगदुम

(कार्यकारी संपादक)


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget