Halloween Costume ideas 2015

समाजात शांती प्रस्थापनेकरिता सामाजिक विवेक आवश्यक

ज्या प्रकारे मनःशांतीशिवाय अभ्यास, अध्ययन शक्य नाही, परिक्षेत पास होणे शक्य नाही, त्याचप्रकारे कुटूंबात शांतीशिवाय कुटूंबियांची प्रगती शक्य नाही. तसेच गावात, शहरात संचारबंदी, तणाव असेल, तरीही गावात उद्योगधंदे, शिक्षण वगैरे हे सुरळीत चालणे शक्य नाही. यामुळे देशाची प्रगती शक्य नाही. शांती नांदावी यासाठी अशांती पसरविणारी तत्वे कोण व त्यांची मानसिकता कोणती आहे, त्याचे निदान होणे आवश्यक आहे. जाऊ द्या, उगीच कशाला नकारात्मक गोष्टींची घुसळण कशाला? असं म्हणून जर आपण याकडे दुर्लक्ष करत गेलो तर हा रोग आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. म्हणून काही कटू सत्ये पचवणेदेखील आवश्यक आहेत. त्याला फाटा देऊन प्रगती करणे शक्य नाही.
    समाजात अफवा, गैरसमज पसरवून, तेढ निर्माण करून, ध्रुवीकरण आणि विषमता पसरवून आपली पोळी भाजवून घेणारी एक मानसिकता जोपासणारा फॅसिस्ट गट नेहमी राहिला आहे. हा गट समाजात कालांतराने एक एक टूम सोडत असतो. त्यासाठी तो गट फक्त निमित्त शोधत असतो. समाजात तेढ निर्माण करण्याची जी निमित्ते वापरली जातात, त्यापैकी एक म्हणजे आंतर धर्मीय किंवा आंतरजातीय विवाह.  उदाहरणार्थ अशीच एक टूम नुकतीच या गटाने सोडली होती, ती म्हणजे हादिया प्रकरण.
    लव जिहाद हा शब्द सर्वात आधी हिंदू जनजागृतीच्या वेब साइटवर आलाय. तथाकथित ’लव जिहाद’ अपराध आहे, असा कोणताही कायदा घटनेत नाही. धर्मांतरासाठी जबरदस्ती ही कोणीही करो, तो अपराधच असतो, पण त्याला विशिष्ट धार्मिक विशेषण लावणे, हा अपराध आहे. पूर्वोत्तर राज्यात ख्रिश्चन लोकं हे ’गन पॉइंट’वर धर्मांतर करत असल्याचाही आरोप होतो, त्याला काय म्हणाल? वस्तुस्थिती अशी आहे की, कोर्टात लग्न करण्यापूर्वी एक महिना अगोदर रजिस्ट्री कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्यामुळे पालकांची मर्जी नसेल तर दोघांच्याही पालकांना याचा सुगावा लागतो आणि ते आपल्या पाल्यांना यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. कधी-कधी यातून नितीन आगे सारखे प्रकार घडतात, तर कधी सैराट सारखे ऑनर किलींगचेही प्रकरण समोर येतात. हे टाळण्यासाठी वकील लोकं दोघांना ’वन डे मॅरेज’चा सल्ला देतात. वन डे मॅरेज म्हणजे कोणत्याही एका धर्म संस्कृतीनुसार लग्न करायचं आणि त्याच लग्नाची नोंदणी रजिस्ट्री कार्यालयात करून टाकायची. यासाठी दोघेही एका धर्माचे असणे आवश्यक असते. म्हणून दोघांपैकी एक जण दुसर्‍याचा धर्म स्वीकारून टाकतो. यात नेहमी इस्लामच स्वीकारला जातो असं नाही. धर्मयुग मासिकात दर महिन्याला काही मुस्लिम मुली हिंदू बनून हिंदू युवकांशी लग्न केल्याच्या बातम्या देणारं एक नियमित स्तंभच आहे. त्यात त्या धर्माशी काही घेणं देणं नसते. फक्त ती एक कायदेशीर पळवाट असते. यात कोणतंही षडयंत्र, योजना वगैरे नसते. हे केरळ न्यायालयानेही मान्य केलंय की, हिंदू मुली इस्लाम स्वीकारून मुस्लिम युवकांशी लग्न करण्याचे प्रमाण जास्त आहे, मात्र त्यामागे कोणतीही देशविरोधी अशी योजना नाही.
    परंतु मुस्लिम युवकांशी लग्न केल्यानंतर त्यांना जेंव्हा इस्लाम कळतो, तेंव्हा ते इस्लामच्या प्रेमात पडतात. मग त्या मुस्लिम युवकाने काही वर्षांनंतर तीला सोडूनही दिलं, तरी त्या इस्लाम सोडत नाहीत. कारण एक कायदेशीर गरज म्हणून स्वीकारलेला समतावादी इस्लाम त्यांना आता मूक्तीचा एकमेव मार्ग वाटतो. म्हणून त्या दुसरं लग्न करतात तेही मुस्लिम युवकांशीच. अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो, अशा लोकांशी प्रत्यक्ष भेट करवून देऊ शकतो. मात्र स्वधर्म अहंकारापायी या गोष्टी अनेक जण मान्य करत नाही. हे कटू सत्त्य पचविण्यासाठी विवेक असावा लागतो. फक्त माझंच किंवा फक्त माझ्याच समाजाचं योग्य, याशिवाय सर्वकाही खोटं, कारण ते दुसर्‍यांचं आहे म्हणून, ही अविवेकी भुमिका सोडली पाहिजे. जे-जे माझं तेच चांगलं म्हणण्यापेक्षा जे-जे चांगलं तेच माझं म्हणून चांगुलपणा आत्मसात करण्याचा सामाजिक विवेक जोपासला गेला पाहिजे. याचे एक उदाहरण अमेरिकेत पाहायला मिळते.
    एक ज्यू महिला दोन वेगळे स्वयंपाक करत होती. तीला कारण विचारले तर म्हणाली की, माझ्या एका मुलाने ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय तर दुसर्‍याने इस्लाम स्वीकारलाय. माझ्या मुस्लिम मुलाला वराहाचे मांस चालत नाही, म्हणून मी त्याच्यासाठी वेगळा स्वयंपाक करतेय.
    असे उदार स्वातंत्र्य आपले भारतीय संविधानदेखील प्रत्येकाला देते. ती उदारता प्रत्येक भारतीयात असली पाहिजे. याचा अर्थ सगळेच अविवेकी आहेत, असं नाही. विशेषकरून काही अपवाद वगळता हिंदू समाज हा नक्कीच विवेकी, सहिष्णु आहे. आनो भद्राय कांता क्रतवो यन्तु विश्‍वतः म्हणजे विश्‍वभरातून चांगले विचार आमच्याकडे येऊ द्या असे उदात्त विचार हिंदूंचा यजुर्वेद देतो. म्हणूनच भारतात सर्वात जास्त उदात्त इस्लाम, उदात्त अशा हिंदूंनीच स्वीकारला आहे. पण हळूहळू आता वातावरण बदलत आहे. देशाची ओळख असलेली ही उदात्त अशी सहिष्णुता कमी कमी होत चालली आहे, पण संपलेली नाही. आजही या देशातले बहुसंख्य लोकं शांतीवादी, सहिष्णु आहेत. फॅसिस्ट लोकांना मिळालेल्या मतांची टक्केवारी याचा पुरावा आहे. पण देशातली ही शांती, सहिष्णुता टिकवून ठेवण्याची, त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन सामुहिक प्रयत्न करण्याची जबाबदारीही याच उदारवादी लोकांची आहे.

नौशाद उस्मान, औरंगाबाद
9029429489



Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget