Halloween Costume ideas 2015

आम्ही इतके व्यस्त आहोत की आमच्याकडे वेळ नाही


आजकाल आपण बरेचदा ऐकतो की “आम्ही खूप व्यस्त आहोत, वेळ कुठे आहे?”, असे विधान लोकांच्या ओठावर नेहमीच असते आणि ते सोशल मीडियावर अमूल्य वेळ वाया घालवून तिथे अपार आपुलकी दाखवतात, पण प्रत्यक्ष भेटायला त्यांना वेळ मिळत नाही. आधुनिकता आणि दिखाऊपणाच्या नादात आपण आपल्या संस्कृती, परंपरा, घर, कुटुंब, नातेसंबंध आणि प्रियजनांपासून फार दूर गेले आहोत. बाह्य सुखाच्या मृगजळात आपण आपल्याच आंतरिक आनंदाची होळी केली आहे. सुंदर, साधे आणि समाधानी जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन आता पूर्णपणे बदलला आहे. पैसा बघून लोक आता आदर दाखवतात. जे लोक लोकांच्या सुखात आनंदी असायचे ते आता ईर्षेने पेटू लागले आहेत आणि ज्या चेहऱ्यावर एकेकाळी निरागस हास्य असायचे त्या चेहऱ्यावर खोटे हास्य दिसू लागले आहे. सत्य, न्याय आणि चांगुलपणाऐवजी आता खोटे-वाईट झटपट व्हायरल होतात आणि अशाच अफवांचा बाजार सतत पेटत राहतो. मनोरंजनाच्या जगात अश्लीलतेला एक सभ्य आचरण समजून प्रोत्साहन दिले जात आहे आणि दुसरीकडे नैतिकता आणि ज्ञानाची उपेक्षा केली जात आहे. जरी शहरी लोक ग्रामीण लोकांपेक्षा अधिक सुखसोयींनी साधनसंपन्न आहेत, तरीही ते अधिक आजाराने ग्रासले आहेत. आपले शरीर आजारी करून, आपण हॉस्पिटलमध्ये मोठी बिले भरणार परंतु आपल्या प्रियजनांशी मन मोकळे करायला देखील वेळ नाही. जे करू नये, नेमके तेच आपण करत असतो, त्यामुळेच आपले आरोग्य झपाट्याने बिघडत आहे. सोशल नेटवर्क "पब्लिक ऍप" द्वारे केलेल्या संपूर्ण भारतातील सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 90% भारतीय लोक मानसिक आरोग्याच्या समस्या वाढण्याचे कारण आधुनिक जीवनशैलीला देतात.

"जागतिक मानसिक आरोग्य दिन" दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जगभरात वेगाने वाढणाऱ्या मानसिक आरोग्याच्या समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. वर्ल्ड फाऊंडेशन ऑफ मेंटल हेल्थच्या नुसार या वर्षाची २०२३ ची थीम "मानसिक आरोग्य एक सार्वत्रिक मानवी हक्क" ही आहे. मानसिक आरोग्य हा एक मूलभूत मानवी हक्क आहे जो प्रत्येकाला, मग ते कोणीही असो किंवा ते कुठेही असो, मानसिक आरोग्याच्या सर्वोच्च प्राप्य मानकाचा अधिकार आहे. यामध्ये मानसिक आरोग्य धोक्यांपासून सुरक्षित राहण्याचा अधिकार, उपलब्धता, प्रवेश योग्यता, स्वीकार्यता, चांगल्या दर्जाच्या काळजीचा पूर्ण प्रवेश, स्वातंत्र्य आणि समाजात समाविष्ट यांचा समावेश होतो. जागतिक स्तरावर आठपैकी एक व्यक्ती मानसिक आरोग्य स्थितीसह जगत आहे, मानसिक आरोग्य समस्या किशोर आणि तरुणांवर वेगाने परिणाम करत आहेत. आज, मानसिक आरोग्य स्थिती असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा सामना करावा लागतो. अनेकांना घर, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातून वगळले जाते, भेदभाव केला जातो, अनेकांना मानसिक आरोग्य वैद्यकीय सेवेपासून वंचित ठेवले जाते, हे त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. डब्ल्यूएचओने मानसिक आरोग्याचे महत्व, प्रोत्साहन, संरक्षण आणि तातडीने निराकरण करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून प्रत्येकजण त्यांच्या मानवी हक्कांचा वापर करू शकेल आणि त्यांना आवश्यक असलेली गुणवत्तापूर्ण मानसिक आरोग्य सेवा मिळू शकेल. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, नैराश्य हा एक सामान्य मानसिक विकार आहे. जगातील अंदाजे ७ पैकी १ किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक विकार आहे. दरवर्षी ७००,००० हून अधिक लोक आत्महत्या करून जीव गमावतात. गंभीर मानसिक विकार असलेले लोक सामान्य लोकसंख्येपेक्षा १० ते २० वर्षे आधी जीव गमावतात. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये दर १००,००० लोकसंख्येमागे एकापेक्षा कमी मानसिक आरोग्य कर्मचारी आहेत, तर उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ६० पेक्षा जास्त आहेत. नैराश्य आणि चिंतेमुळे दरवर्षी जागतिक अर्थव्यवस्थेच्या उत्पादकते मध्ये तोटा अंदाजे १ ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतका आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या वर्षात जगभरात चिंता आणि नैराश्याचे प्रमाण २५% वाढले. भारताचे वर्णन "सर्वाधिक नैराश्यग्रस्त देशांपैकी एक" म्हणून केले गेले आहे, देशात आत्महत्येचे प्रमाणही जास्त आहे. आता तर  १०-१२ वर्षांचे शाळकरी लहान मुलांमध्ये देखील आत्महत्येचे प्रमाण दिसून येत आहे. २०२२ मध्ये मानसिक आरोग्यासाठी एकूण आर्थिक आरोग्य बजेटपैकी फक्त ०.८% तरतूद करण्यात आली होती. 

आपली जीवनशैली, यांत्रिक संसाधने, प्रदूषण, वागणूक, लोभीवृत्ती आणि असंतुलित दैनंदिन दिनचर्या यामुळे आपण आजारी आहोत. भौतिक सुख कधीच आत्मिक आनंदाची जागा घेऊ शकत नाही, तरीही आपण त्याच्या मागे धावत आहोत आणि मानसिक शांतता आणि आनंद गमावत आहोत. जगात अनेक असे श्रीमंत लोक आहेत जे आपले वैभव सोडून निसर्गाच्या सानिध्यात सामान्य जीवन जगतात कारण त्यांना त्यामुळे मानसिक शांतता मिळते. आजच्या काळात, मानसिक विकार वाढण्यास आपण स्वतःच सर्वात जास्त जबाबदार आहोत, कारण आपण स्वतःला नकारात्मक विचारांनी घेरले आहे. सहिष्णुता, परिश्रम आणि जागरूकता यांचा अभाव, रात्रंदिवस वाईट विचार, चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, दुसऱ्यावरचा अतिविश्वास, दूरदृष्टीचा अभाव, दिखाऊपणा, वाईट लोकांची संगत यामुळे आपली विचारसरणी बिघडली आहे. लोकांमधील सहिष्णुता इतकी संपली आहे की, जर एखाद्याला चुकीचे काम करण्यापासून रोखले तर तो आपल्यालाच मारायला तयार होतो आणि छोट्या-छोट्या गोष्टींवर भान हरपतात. केवळ पालकांनी रागावल्याने मुले अनुचित पावले उचलू लागतात. तरुणांमध्ये अंमली पदार्थांचे व्यसन, सोशल मीडियाचे व्यसन आणि गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. मूल्यांची खुलेआम पायमल्ली केली जाते. आज अनेक पालकांना आपली मुलं कुठे जात आहेत, कोणाला भेटतात, आपला वेळ कुठे घालवतात हेच माहीत नाही. पालक आपल्या मुलांना आवश्यक पोषक वातावरण देत आहेत का? शेवटी, आपण इतके व्यस्त आहोत की आपल्याजवळ स्वतःसाठी किंवा आपल्या मुलांच्या उत्तम संगोपनासाठी वेळ नाही. गैरवर्तन आणि मतभेद यामुळे तणाव निर्माण होतो. आपल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने न पार पाडल्याने भविष्यात समस्या निर्माण होतात, ज्यामुळे मानसिक आरोग्याचे विकार वाढतात. 

लोक इतके व्यस्त दिसतात की वर्षानुवर्षे एकाच परिसरात राहूनही जुन्या ओळखीच्यांना किंवा मित्रांना भेटता येत नाही. लोकांच्या मोठमोठ्या गोष्टी हृदयातील अंतर वाढवतात. अहंकार आणि द्वेषाने लोकांना व्यस्त ठेवले आहे अन्यथा प्रत्येकाकडे वेळ आहे, फक्त तुमच्याकडे लोकांना भेटण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. कोणत्याही कामाशिवाय निस्वार्थपणे कोणाला भेटायला वेळ काढणे आता दुर्मिळ झाले आहे. रक्तदान आणि अन्नदानाप्रमाणेच आजच्या काळात वेळ दान हे देखील अत्यंत महत्त्वाचे दान बनले आहे. प्रत्येकाने इतरांसाठी वेळ काढायला शिकले पाहिजे. मानसिक आरोग्य राखणे खूप सोपे आहे, आपल्याला फक्त आपल्या व्यस्त जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. दररोज स्वत:साठी देखील वेळ काढायला शिका, सकारात्मक विचार असलेल्या लोकांशी संपर्क साधा, नशा आणि खोटा देखावा टाळा, पौष्टिक आहार घ्या, रोजचा व्यायाम आणि पुरेशी झोप महत्त्वाची आहे. भावनिक आणि रडण्याच्या सिरियल्समुळे मेंदूला त्रास होतो, अशा सिरियल्स मानसिक शांतता भंग करतात. मुलांना सुसंस्कृत आणि उत्तम नागरिक बनवणे ही पालकांची जबाबदारी आहे. आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडा. ज्येष्ठांचा आदर करा आणि निरोगी दैनंदिन दिनचर्या राखा. आपल्यामुळे कोणाचेही नुकसान होऊ नये, नियमांचे प्रामाणिकपणे पालन करा. नेहमी मानवतेच्या मार्गाने जगा. निसर्ग आणि प्राणी-पक्षींचे संरक्षण करा. आपल्यात एखादा चांगला छंद किंवा चांगली सवय असेल तर ती आपण कधीही सोडू नये. आपल्या प्रियजनांना भेटा, हसत-खेळत राहा, आयुष्य मोकळेपणाने जगा. आपलं आयुष्य खूप छोटं आहे, समाधानी बनून तणावमुक्त जीवन जगा.

मानसिक आरोग्य समस्या असल्यास निसंकोचपणे त्वरित मदत मिळवा. भारताच्या राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत ही एक व्यापक मानसिक आरोग्य सेवा आहे. समुपदेशकाशी संपर्क साधण्यासाठी हा टोल फ्री नंबर १४४१६ किंवा १-८०० ८९१ ४४१६ डायल करू शकता. भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेसद्वारे चालवल्या जाणाऱ्या मानसिक आरोग्य सेवांसाठी हा २४x७ टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक ०८० - ४६११ ०००७ आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ रिहॅब हेल्पलाइन क्रमांक १८०० ५९९ ००१९ उपलब्ध आहे. याशिवाय अनेक संस्था आणि एन.जी.ओ. मानसिक आरोग्याशी संबंधित सेवांसाठी २४ तास उपलब्ध आहेत, त्यांच्याशीही संपर्क साधू शकतो.

- डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget