(१) येऊन ठेपला अल्लाहचा निर्णय,१ आता त्याच्यासाठी घाई करू नका. तो पवित्र आहे आणि श्रेष्ठ आहे त्या अनेकेश्वरत्वापासून जे हे लोक करतात.
(२) तो या दिव्य प्रकटनाला ज्या दासावर इच्छितो आपल्या आज्ञेने दूतांव्दारे२ अवतीर्ण करतो. (या सूचनेसह की लोकांना) ‘‘सावध करा, माझ्याशिवाय तुमचा कोणीही ईश्वर नाही, म्हणून तुम्ही माझीच भीती बाळगा.’’
(३) त्याने आकाशांना व जमिनीला सत्याधिष्ठित निर्माण केले आहे, तो फार उच्च व श्रेष्ठ आहे त्या अनेकेश्वरत्वापासून जे हे लोक करीत आहेत.
(४) त्याने मानवाला एका लहानशा थेंबापासून निर्माण केले आणि पाहता पाहता तो भांडखोर बनला.३
(५) त्याने जनावरे निर्माण केली ज्यांच्यात तुम्हाकरिता पोषाखही आहे आणि अन्नदेखील आणि तर्हेतर्हेचे दुसरे फायदेसुद्धा.
१) म्हणजे तो प्रकट होण्याची व अंमलात येण्याची वेळ जवळ आली आहे. बहुधा या फैसल्याने अभिप्रेत पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मक्केहून हिजरत करणे आहे. थोड्याच कालावधीनंतर तसा हुकूमही दिला गेला. कुरआनच्या अध्ययनाने कळते की पैगंबर ज्या लोकांमध्ये नियुक्त केला जातो, ते जेव्हा इन्काराची सीमा गाठतात तेव्हा पैगंबराला हिजरत-स्वदेश त्यागाची आज्ञा दिली जाते व हाच हुकूम त्यांच्या भाग्याचा निकाल लावतो. त्यानंतर त्या लोकांवर एकतर विनाशकारी प्रकोप येतो किंवा पैगंबर व त्याच्या अनुयायींकरवी त्यांचे मूळ कापून टाकले जाते.
२) आत्म्याने अभिप्रेत पैगंबरी कार्य आणि दिव्य प्रकटन होय ज्यांनी समृद्ध होऊन पैगंबर कृती व उक्ती करीत असतो.
३) याचे दोन अर्थ असू शकतात व बहुधा दोन्ही अभिप्रेत आहेत. एक अर्थ असा की अल्लाहने वीर्याच्या क्षुद्र अशा थेंबापासून तो मनुष्य जन्मास घातला, जो वादविवादाची क्षमता बाळगतो व आपल्या उद्देशासाठी युक्तिवाद करू शकतो. दुसरे असे की ज्या माणसाला अल्लाहने वीर्यासारख्या क्षुद्र द्रव्याने जन्मास घातले आहे, त्याच्या अहंभावाचा अतिरेक तर पाहा की खुद्द अल्लाहविरूद्धच भांडण्यासाठी तो तत्पर बनला आहे.
Post a Comment