Halloween Costume ideas 2015
July 2018

माननीय इब्ने अब्दुल्लाह (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यापाशी सकाळच्या प्रहरी बसलो होतो. इतक्यात काही लोक अंगावर कांबळें लपेटून हातात तलवार घेऊन आले. त्यांच्या शरीराचा बहुतांश भाग विवस्त्र होता आणि त्यांच्यापैकी अधिकांश लोक मुजर कबिल्याचे होते, म्हणजे जवळपास सगळेच मुजरी होते. त्यांचे दारिद्र्य आणि  गरिबी पाहून पैगंबरांचा चेहरा चिंतेमुळे पिवळा पडला. मग पैगंबर घरात गेले आणि बाहेर येऊन बिलाल (रजि.) यांना अजान देण्याचा आदेश दिला. (नमाजची वेळ झाली होती.) तेव्हा  बिलाल (रजि.) यांनी ‘अजान’ आणि ‘तकबीर’ (नमाज सुरू होण्यापूर्वी ‘अल्लाहु अकबर’ म्हणणे) चे पठण केले. पैगंबरांनी नमाजचे नेतृत्व केले आणि नमाजनंतर भाषण दिले, त्यात  पैगंबरांनी ‘सूरह निसा’ची पहिली आयत आणि ‘सूरह हश्र’च्या शेवटच्या ‘रुकूअ’मधील (चरणातील) पहिली आयत पठण केली. त्यानंतर म्हणाले, ‘‘लोकांनी अल्लाहच्या मार्गात सदका  (दान) द्यावे, दीन द्यावे, दिरहम द्यावे, कपडे द्यावेत, दोन शेर गहू द्यावेत, दोन शेर खजूर द्यावेत.’’ पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘इतकेच नव्हे तर एखाद्याकडे खजुराचा अर्धा तुकडा जरी  असेल तरी तो द्यावा.’’ भाषण ऐकल्यानंतर अन्सारांपैकी एक मनुष्य आपल्या हातात एक पिशवी घेऊन आला जी त्याच्या हातात मावतही नव्हती. मग लोकांनी एकापाठोपाठ एक  सदका (दान) देण्यास प्रारंभ केला. इतकेच नव्हे तर मी धान्य आणि कपड्यांचे दोन ढीग पाहिले. लोकांनी अशा पद्धतीने सदका दिल्याचे पाहून पैगंबरांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा  दिसू लागल्या, जणू चेहऱ्यावर सोन्याचे पाणीच लावण्यात आले आहे. मग पैगंबरांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य इस्लाममध्ये एखादी चांगली पद्धत सुरू करील त्याला त्याचा बदला मिळेल  आणि जे लोक या चांगल्या पद्धतीचा नंतर अवलंब करतील त्यांनाही त्याचे पुण्य मिळेल आणि काम करणाऱ्यांच्या बदल्यामध्ये घट केली जाणार नाही. त्याचप्रमाणे ज्याने इस्लाममध्ये  एखाद्या वाईट पद्धतीची सुरूवात केली त्याला त्या पापाची शिक्षा मिळेल आणि नंतर त्याचे अनुकरण करणाऱ्यांचे पापदेखील त्याच्याच कर्मपत्रात लिहिले जाईल. तसेच अनुकरण  करणाऱ्यांचे पापांमध्ये काहीही घट केली जाणार नाही. (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण : इस्लामच्या दोन मूलभूत शिकवणी आहेत- पहिले एकेश्वरत्व आणि दुसरे अल्लाहच्या भक्तांपैकी गरीब व गरजवंतांवर कृपा व दया करणे. याच कारणास्तव पैगंबर  मुहम्मद (स.) यांचा चेहरा चिंतेने पिवळा पडला आणि जेव्हा त्यांच्यासाठी (गरीब व गरजवंतांसाठी) कपडे व अन्नधान्याची व्यवस्था झाली तेव्हा पैगंबरांचे मुखकमल सोन्यासारखे चमकू  लागले. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या भाषणात ‘सूरह निसा’ची पहिल्या आयतीचे पठण केले, त्याचा अर्थ असा आहे- ‘‘लोकहो, आपल्या पालनकत्र्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला  एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याचे जोडपे बनविले आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.’’  (कुरआन,४:१)
या आयतमध्ये अल्लाहने दोन गोष्टी सांगितल्या आहेत. एक ‘वहदत-ए-इलाह’ आणि दुसरी ‘वहदत-ए-बनी आदम’. ‘वहदत-ए-इलाह’चा अर्थ आहे फक्त अल्लाह उपासना व  आज्ञाधारकतेचा हक्कदार आहे, यालाच ‘तौहीद’ (एकेश्वरत्व) म्हणतात. ‘वहदत-ए-बनी आदम’चा अर्थ आहे सर्व मानव एकाच माता-पित्याची लेकरे आहेत, म्हणून त्यांच्यादरम्यान कृपा  व दयेवर आधारित वर्तणूक व्हायला हवी. त्या गरिबांना पाहून सदका (दान) देण्यासाठी आवाहन करून पैगंबर मुहम्मद (स.) यांचे या आयतीचे पठण स्पष्टपणे या गोष्टीकडे निर्देश  करते की समाजातील गरिबांची मदत न करणे अल्लाहचा क्रोध व रागाचे कारण बनते. 
तसेच ‘सूरह हश्र’ची जी आयत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी पठण केली आहे त्याचा अनुवाद असा आहे, ‘‘हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगा आणि  प्रत्येक इसमाने हे पाहावे की त्याने उद्यासाठी काय सरंजाम केला आहे. अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगत राहा. अल्लाह खचितच तुमच्या त्या सर्व कृत्यांची खबर राखणारा आहे जी  तुम्ही करता.’’ (कुरआन,५९:१८) या आयतीचे पठण करून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या गोष्टीकडे इशारा केला आहे की गरिबांवर जी संपत्ती खर्च केली जाते ती मनुष्यासाठी  परलोकात संचय होतो, ती नष्ट होत नाही. ज्या मनुष्याने सर्वांत अगोदर सदका (दान) केले होते त्याची पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्तुती केली आहे आणि म्हणाले, ‘‘त्याला त्याच्या  ‘सदका’चेही पुण्य लाभेल आणि त्याला पाहून इतर लोकांमध्येही सदका देण्याची भावना जागृत झाली त्याचाही बदला त्याला मिळेल.’’ 

(६३) मग जर हे लोक (या अटीवर सामना करण्यापासून) पराङ्मुख होतील तर (त्यांचे द्रोही असणे स्पष्टपणे उघडकीस येईल) आणि अल्लाह तर विद्रोहींच्या स्थितीशी परिचित आहेच. (६४) (हे पैगंबर (स.)!) सांगा,५६ ‘‘हे ग्रंथधारकांनो या, एका अशा बाबीकडे जी आमच्या आणि तुमच्या दरम्यान समान आहे,५७ हे की आपण अल्लाहशिवाय कोणाचीही भक्ती करू नये,  त्याच्याबरोबर कोणासही भागीदार ठरवू नये, आणि आपल्यापैकी कोणीही अल्लाहशिवाय इतर कोणास आपला पालनकर्ता बनवू नये.’’ या आवाहनाला स्वीकारण्यापासून ते जर पराङ्मुख  झाले तर स्पष्ट सांगून टाका की साक्षी राहा आम्ही तर मुस्लिम (केवळ अल्लाहची भक्ती करणारे व त्याचे आज्ञापालन करणारे) आहोत.

(६५) हे ग्रंथधारकांनो, तुम्ही इब्राहीम (अ.) च्या (धर्मा) संबंधी आमच्याशी का वाद घालता? तौरात व इंजिल हे ग्रंथ तर इब्राहीमनंतरच उतरले आहेत. मग काय तुम्हाला एवढीशी  गोष्टदेखील कळत नाही?५८ (६६) तुम्हा लोकांना ज्या गोष्टीचे ज्ञान आहे त्यावर तर तुम्ही खूप वादंग माजविले, आता त्याबाबतीत विवाद का करू पाहता ज्यांचे तुम्हापाशी काहीच ज्ञान  नाही. अल्लाह जाणतो, तुम्ही जाणत नाही.

(६७) इब्राहीम (अ.) यहुदीही नव्हता की खिस्तीदेखील नव्हता किंबहुना तो तर एक एकाग्रचित मुस्लिम (आज्ञापालक) होता५९ आणि तो कदापि अनेकेश्वरवाद्यांपैकी नव्हता.

(६८)  इब्राहीम (अ.) शी संबंध ठेवण्याचा सर्वाधिक हक्क जर कोणाला पोहचतो तर तो त्या लोकांना पोहचतो ज्यांनी त्याचे अनुकरण केले. आणि आता हे पैगंबर (स.) आणि याचे  अनुयायी या संबंधाचे अधिक हक्कदार आहेत. अल्लाह केवळ त्यांचाच समर्थक व मदतगार आहे जे ईमानधारक आहेत.

(६९) (हे श्रद्धावानांनो) ग्रंथधारकांपैकी एक गट इच्छितो की येनकेनप्रकारेण तुम्हाला सरळमार्गापासून दूर करावे. वास्तविक पाहता ते आपल्याशिवाय इतर कोणासही मार्गभ्रष्ट करीत  नाहीत. परंतु त्यांना याचा विवेक नाही.



५६) येथून तिसरे व्याख्यान सुरु होत आहे ज्याच्या विषयावर विचारांती कळते की हे बदर युद्धाच्या आणि उहुद युद्धाच्या मधील काळाचे अवतरण आहे. या तीन्ही व्याख्यानांमध्ये  अर्थाच्या दृष्टीने एकसमानता अशा प्रकारे अबाधित आहे की प्रथमपासून तो अंतापर्यंत कोठेच वाणीची क्रमबद्धता भंग पावलेली जाणवत नाही. म्हणूनच काही टीकाकारांचा संभ्रम झाला  की यानंतरच्या आयतीसुद्धा नजरानच्या प्रतिनिधीमंडळ-साठीच्याच व्याख्यानाचा एक भाग आहे. परंतु येथून जे व्याख्यान सुरु होत आहे त्याच्या शैलीवरुन स्पष्ट कळते की हे व्याख्यान  यहुदी (ज्यू) लोकांना संबोधित केले गेले आहे.
५७) म्हणजे अशा धारणेवर आमच्याशी सहमती करावी की जिला आम्हीसुद्धा मान्य करीत आहोत आणि जिच्या सत्य असण्यास तुम्हीसुद्धा नाकारू शकत नाही. तुमच्या पवित्र  पैगंबराद्वारा हीच आस्थापुढे आली होती आणि तुमच्या पवित्र ग्रंथात याविषयी शिकवण उपलब्ध आहे.
५८) अर्थात तुमचे हे यहुदीमत (ज्युडॅनिझम) आणि इसाई (खिश्चन) मत (विचारसरणी) तर तौरात आणि इंजिल अवतरित झाल्यानंतर निर्माण झाले. आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.)  तर या दोन्ही ग्रंथांच्या अवतरणकाळापूर्वीच होऊन गेले होते. एक सामान्य मनुष्यही सहज समजू शकतो, की इब्राहीम (अ.) यांचा धर्म यहुदी अथवा इसाई मुळीच नव्हता. पैगंबर  इब्राहीम (अ.) सरळमार्गावर होते आणि ते मुक्तीप्राप्त् होते तर सिद्ध होते की मनुष्याचे सरळमार्गावर राहाणे अथवा मुक्ती प्राप्त् करणे यहुदी आणि इसाई मताच्या अनुकरणावर  अवलंबून नाही. (पाहा सूरह २ टीप १३५, १४१)
५९) मूळ अरबी शब्द `हनीफ़' आहे. म्हणजे असा व्यक्ती जो सर्व बाजूंनी विमुख होऊन एका विशेष मार्गावर चालतो याच अर्थाने `अल्लाहचा एकाग्रचित्त आज्ञापालक' म्हटले आहे.

‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थ शांती असा होतो. पण ही शांती फक्त मर्यादित कुठल्याही एका व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी, किंवा घराण्यासाठी नाही तर संपूर्ण विश्वासाठी आहे. इस्लाम हा  असा एकमेव धर्म आहे ज्यात अनेकेश्वरवादाला थारा नाही. जसे एक सुर्य, एक चंद्र, एक पृथ्वी तसेच एकच ईश्वर. इस्लाममध्ये जरी वेगवेगळ्या जाती, पंथ असल्या तरी सर्वांची  शिकवण एकेश्वरवादाचीच आहे. ‘ला इलाह इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह’ म्हणजेच अल्लाह एक आहे व मुहम्मद सलअम् अल्लाहचे प्रेषित आहेत. हा इस्लामचा मुख्य पाया आहे.
मनुष्य त्याची दैनंदिन जीवनशैली जगत असताना एका विशिष्ट चौकटीत जगत असतो. प्रत्येक गोष्टीत, कामात तो काही नियमांचे पालन करत असतो. 
त्याचप्रमाणे ज्याने मानवाला  या सृष्टीला निर्माण केले त्या विधात्याने मनुष्याला एक जगण्याची कला शिकवली. काही नियम त्याच्या भल्या साठी लागू केले. त्या इस्लामी नियमानुसार जर मनुष्य जगत असेल तर खरोखरच त्याचे जीवन आनंदमयी व सुखकारक ठरेल. इस्लाम अत्यंत सोपा, सर्वांना पटेल, रूचेल आणि जीवनात आनंद आणणारा धर्म आहे.  इस्लामची इमारत मूळ पाच स्तंभांवर आधारलेली आहे. हे स्तंभ म्हणजे एकेश्वरवाद, नमाज, रोजा, जकात आणि हज. या पाच स्तंभांपैकी एक जरी स्तंभ मनुष्याच्या आयुष्यातून  ढासळत असेल तर त्या व्यक्तीचा धर्म अधुराच म्हणाव लागेल. 
‘तौहीद’ म्हणजे एकेश्वरवाद. फक्त एकच ईश्वराचा स्वीकार करणे. अल्लाहशिवाय कोणीही ईश्वर नाही व कोणीही पुजनीय नाही या गोष्टीवर मनपूर्वक श्रद्धा ठेवने यालाच तौहीद  म्हणतात.
दुसरा इस्लामी स्तंभ आहे ‘नमाज’. इस्लामचे शेवटचे पैगंबर मुहम्मद (स.) यांना नमाज अल्लाहकडून भेट म्हणुन मिळालेली आहे व प्रत्येक मुस्लिम व्यक्तीसाठी नमाज अनिवार्य आहे.  आनंदाची बाब म्हणजे प्रत्येक मुस्लिम व्यक्ती आपल्या जीवनात नमाजला अनन्य साधारण महत्त्व देतो.

तिसरे इस्लामी कर्तव्य आहे ‘रोजा’. रोजा म्हणजे उपवास. हा रोजा मनुष्याला त्यागाची शिकवण देतो. एक रोजेदार दिवसभर स्वत:ची तहान भूक विसरून पूर्णपणे स्वत:ला अल्लाहच्या  स्वाधीन करतो. रमजान हा असा महिना आहे जो आपल्याला वारंवार अल्लाहविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाग पाडतो. असा हा मंगलमय महिना.

‘जकात’ म्हणजे दान. समाजातील सक्षम लोकांना इस्लाम गरीब व गरजू लोकांना दान देण्याचा आदेश देतो. कोणीही व्यक्ती भुकेला, तहानलेला किंवा निर्वस्त्र राहू नये, निदान त्याच्या  प्राथमिक गरजा तरी लाभाव्यात यासाठी जकात दिली जाते आणि गरजूच्या आयुष्यात एक छोटासा आनंदाचा क्षण देण्याचा प्रयत्न केला जातो.

शेवटचे इस्लामी कर्तव्य आहे ‘हज’. पण जर कोणाची आर्थिक स्थिती नसेल हज करण्याची तर हज माफ आहे.. इस्लाम हा खूप सोपा धर्म आहे.. तुम्ही तुमच्या जन्मदात्या आईकडे  पाहून स्मितहास्य केले तरी हजचे पुण्य पदरात पडले... 
एकंदरीत तथाकथित थोतांड बातम्यावरुन इस्लाम आणि मुसलमान यांची प्रतिमा मलीन झाली आहे. दुसऱ्या समाजांसमोर इस्लामचे चित्र खूप वाईट रितीने मांडले जात आहे. पण  इस्लामचा व्यवस्थितपणे अभ्यास केल्यास लक्षात येते की इस्लाम हा तलवारीच्या जोरावर नव्हे तर सत्य व शांतीच्या जोरावर पसरला आहे. पैगंबर मुहम्मद सलअम् यांनी आयुष्यभर  संपूर्ण मानवजातीला शांतीचा संदेश दिला. समाजात बंधुभाव टिकून राहण्यासाठी अतोनात यातना सहन केल्या. शेवटी असे म्हणावे वाटते,
‘‘असे प्रेषित होउन गेले
समभावाची शिकवण देऊन गेले!
मानवजातीसाठी सर्व जीवन समर्पित केले!!’’

-अल्फिया तौकीर ईनामदार
अकोला / ७७०९०६२६६६

गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात मॉब लिंचिंगचे थैमान माजले आहे. त्यातून आता निष्पाप नागरिकांबरोबरच काही सामाजिक कार्यकर्तेदेखील बळी पडत आहेत. जमावाच्या हातून  सातत्याने होत असलेल्या हत्या रोखण्यासाठी  १७ जुलै २०१८ रोजी सुप्रीम कोर्टाने केंद्र व राज्य सरकारसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली. तसेच अशा प्रकारची झुंडशाही थांबविण्यासाठी  संसदेत कायदा करण्याचा विचार करण्याचीही सूचना केंद्र सरकारला केली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने स्पष्ट केले की, ‘या झुंडशाहीला देशातील  कायदा तुडवू देण्याची परवानगी देता येऊ शकत नाही. खटला आणि न्याय रस्त्यावर केला जाऊ शकत नाही. असे कुणी करत असेल तर त्यांना शिक्षा देण्याची जबाबदारी सरकारी  संस्थांवर आहे. झुंडशाहीतून होणाऱ्या हत्यांचे पिशाच्च रूप होऊ शकते. अफवांतून जन्मलेली असहिष्णुता उलथापालथ घडवू शकते. आज जमावाच्या हिंसाचाराने देशावर परिणाम होत  आहे. सन्मानाने जगण्याच्या अधिकारापेक्षा दुसरा उच्च अधिकार नाही. असहिष्णुता आणि खोट्या बातम्या-अफवा वाढल्या तर जमाव भडकतो. म्हणूनच लोकशाही आणि कायदा- सुव्यवस्था राखणे ही संबंधित राज्यांची जबाबदारी आहे.’ दरम्यान, याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार व राज्य सरकारकडून ४ आठवड्यांत सविस्तर अहवाल मागवला आहे. याप्रकरणी  पुढील सुनावणी २० ऑगस्टला होणार आहे. १७ जुलै याच दिवशी सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना भाजयुमो, अभाविपच्या कार्यकत्र्यांनी मारहाण केली. झारखंडच्या पाकुड येथे  अग्निवेश पत्रकार परिषद घेऊन हॉटेलच्या बाहेर पडताच जमावाने काळे झेंडे दाखवत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत त्यांच्यावर हल्ला केला. अग्निवेश यांना लाथा-बुक्क्यांनी, काठ्यांनी  मारहाण करण्यात आली. यात अग्निवेश गंभीर जखमी झाले आहेत. येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी मंगळवारी अग्निवेश येथे आले होते. कॉम्रेड गोविंद पानसरे, अंनिसचे नरेंद्र दाभोळकर आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्याप्रमाणेच आता अग्निवेश यांच्यावर हल्ला झाल्याचे म्हटले जाते. आता तर मारेकऱ्यांनी उघडपणे, व्हिडिओ शुटिंग करत हल्ला  केल्याचे दिसून येते. समाजातील वाईट रुढी, परंपरा याविरोधात आवाज उठवण्याचे कार्य स्वामी अग्निवेश करीत असतात. प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज सुधारण्यासाठी प्रयत्न  करणाऱ्यांना सध्या झुंडशाहीच्या माध्यमातून लक्ष्य बनविले जात आहे. मागील साठ वर्षांपासून आपल्या सामाजिक जीवनात अग्निवेश यांनी प्रत्येक प्रकारची देशसेवा केली आहे. यापूर्वी  दलित व आदिवासींचे प्रश्न मांडणारे डॉ. विनायक सेन, प्रा. शोमा सेन, सीमा आझाद, चंद्रशेखर यांना कारागृहात पाठविण्यात आले. सोनी सोरी यांना विजेचा शॉक देण्यात आल्याचा  घटना घडल्या आहेत. स्वामी अग्निवेश यांच्यावर झालेला हा तिसरा हल्ला आहे. त्यांच्यावर पहिला हल्ला त्यांच्या ‘अंमरनाथ येथील बर्फाचे पिंड हे एक नैसर्गिक घटना आहे’ या  वक्तव्यावरून झाला होता. त्या वेळी अग्निवेश यांचे मुंडके उडविणाऱ्याला दहा लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. त्यांच्यावर दुसरा हल्ला छत्तीसगढमधील सुकमा येथे झाला  होता. तेव्हा आदिवासींची तीन गावे जाळली होती आणि पाच महिलांवर बलात्कार करण्यात आला होता तेव्हा त्या गावांत जाऊन मदतकार्य करताना अग्निवेश यांच्यावर हल्ला करण्यात  आला होता आणि त्यांना जखमी करण्यात आले होते. झुंडशाहीचा हल्ला रोखण्यासाठी लोकशाही व्यवस्थेत सत्तास्थानी असलेल्या संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. परंतु तसे काही  होताना सध्या तरी दिसत नाही. सरकार आणि शासनाच्या माध्यमातून त्यांचा एक भाग अराजकता माजविणाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आढळून येते. उर्वरित भाग जाणूनबुजून अशा  घटनांकडे दुर्लक्ष करीत आहे. सुप्रीम कोर्टाने मॉब लिंचिंगच्या विरोधात कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असली तरी सरकारतर्फे तातडीची योग्य ती कारवाई होताना दिसून येत नाही.  त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना केराची टोपली दाखविण्यात आली आणि स्वामी अग्निवेश यांच्यासारख्या सामाजिक कार्यकत्र्यावर हल्ला करण्यात आला. देशभर  असहिष्णुतेचे वातावरण, झुंडशाहीचा धिंगाना सुरू असताना विरोधी पक्ष काय करीत आहेत? आज स्वामी अग्निवेश यांना लक्ष्य बनविण्यात आले आहे उद्या आपला नंबर लागणार आहे हे त्यांना समजले पाहिजे. खरे तर सध्या विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांशी दोन हात करण्यात अपयशी ठरले आहेत. आता त्यांच्याकडे कसलेही खंबीर नेतृत्व उरलेले नाही. आता त्यांच्यात  संघर्ष करण्यासाठी त्राणच उरलेला नाही. मात्र यामुळे हताश व निराश होण्याची गरज नाही. भारतीय जनता आता जागृत होत आहे. समाज लढण्यासाठी तयार असेल आणि ती त्याची  आवश्यकता असेल तर तो आपले नेतृत्व स्वत: निर्माण करील. नेभळट विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष करून समाजातील सामान्य लोकांनी उभारी घेण्याची गरज आहे. 
-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

औरंगाबाद (शोधन सेवा) 
लोकांना जोडतो तो धर्म आणि तोडतो तो अधर्म आहे. सर्व माणसे एकाच आई-बापाची लेकरे आहेत. त्यामुळे समाजासमाजात वाद पेटवू नका. पेटवायची फारच हौस असेल, तर गरिबांच्या चुली पेटवा, असा रोखठोक संदेश ’जमाअत-ए-इस्लामी हिंद’चे प्रचारक डॉ. सय्यद रफिक पारनेरकर यांनी दिला. देशात बंधुभाव, शांतता, न्याय, नीती प्रस्थापित होओ, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. 
‘सकाळ’ आणि ‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’ यांच्या वतीने शनिवारी (ता. 14) ईद मिलन कार्यक्रम झाला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, ठसकाळ’ मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड, उपसरव्यवस्थापक रमेश बोडके, जमाअत-ए-इस्लामी हिंदचे शहर अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही, काझी मकदूम मोहियोद्दीन, वाजेद कादरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा ऑडिओ संदेश उपस्थितांना ऐकविण्यात आला. 
‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’चे मराठी प्रचारक डॉ. सय्यद रफिक पारनेरकर यांचे मुख्य व्याख्यान झाले. ते म्हणाले, की आज समाजात अनेक दुखणी आहेत. मुले आई-बापाला विचारत नाहीत. सर्वत्र भ्रष्टाचार आहे. गरिबांची काळजी कुणाला नाही. बेईमान लोकांचा सुळसुळाट झाला आहे. असे एखादे अँटिकरप्शन व्हॅक्सीन निघावे, की ज्याची लस लहानपणीच टोचली, तर तो आयुष्यात कधी भ्रष्टाचार करणार नाही; परंतु असे इंजेक्शन अस्तित्वात येणे शक्य नसले, तरी असे ईद मिलनसारखे कार्यक्रम समाजाला चांगला संदेश देऊन लसीकरणाचेच काम करतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. शहरातील अस्वस्थ वातावरणात समाजासमाजांत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी ’सकाळ’ दरवर्षी असे उपक्रम राबवीत असल्याचे सांगत संजय वरकड यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. फेरोज पठाण यांनी केले. यावेळी यावेळी माजी आमदार कल्याण काळे, नामदेव पवार, उपमहापौर विजय औताडे, निवृत्ती महाराज घोडके गांधेलीकर, माजी महापौर भगवान घडमोडे, नगरसेवक राजू शिंदे, भाऊसाहेब जगताप, शेख सोहेल, सरदार मानधारी, गांधेलीचे सरपंच राहुल सावंत, माजी उपमहापौर भाऊसाहेब वाघ, आदींसह सर्वधर्मीय नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 
अण्णा हजारे यांचा ध्वनिसंदेश 
कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपला संदेश ऑडिओ क्लिपद्वारे पाठविला. तो ध्नविक्षेपकातून उपस्थितांना ऐकविण्यात आला. ते म्हणाले, “आपला देश हा रंग, रूप, वेश, भाषा आणि धर्मांचे वैविध्य बाळगून आहे; मात्र, सर्व धर्मांच्या मुळाशी मानवता हेच तत्त्व आहे. आपण शेजार्यांच्या सुख दुःखात सहभागी होत नाही, तोवर धर्माची तत्त्वे कितीही उदात्त असली तरी गौण ठरतात. त्यामुळे सर्वांशी सौहार्दाने वागावे.” ---------------
“वैचारिक भूमिकेने मन पक्के होते. धर्म, संस्कार आणि संतांच्या सान्निध्यात भूमिका तयार होते. अशा सार्वजनिक कार्यक्रमांमधून आपण परस्परांशी सौहार्दाने वागण्याचे संस्कार करून घेत असतो. मन घडविणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. ’सकाळ’ अशा कार्यक्रमांद्वारे नागरिकांचे मन घडविण्याचे काम करतो.
       - हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष 
---------------
“मुंबईत मोठा इज्तेमा झाला तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोफत जागा उपलब्ध करून दिली होती. आम्हाला सर्व धर्माच्या माणसांना समान वागणूक देण्याची शिकवण त्यांनी दिली. ’सकाळ’ लेखणीच्या माध्यमातून सर्वधर्मीयांना एकत्र आणण्याचेच काम करतो.” 
- नंदकुमार घोडेले, महापौर, औरंगाबाद. 
---------------
“फारच प्रभावी कार्यक्रम झाला. मुख्य वक्त्यांनी संत तुकाराम, संत कबीर आणि इस्लामच्या शिकवणीतील साधर्म्य उलगडून सांगितले. माणसाला माणसाशी जोडणारे असे कार्यक्रम होत राहणे समाजाच्या आरोग्यासाठी हितकारक असते.” - चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त, औरंगाबाद. 
---------------
“ईद मिलन कार्यक्रम स्तुत्य आहे. सध्या आपल्या परिसरासह देशभरात अराजकता निर्माण झाली आहे. अशा कार्यक्रमांमुळे समाजातील तेढ कमी होईल. माणसातले माणूसपण जागे करून सर्वांना सद्बुद्धी मिळावी, असा संदेश आजच्या कार्यक्रमातून मिळाला.” - कल्याण काळे, माजी आमदार. 
---------------
“संत तुकाराम महाराजांसह सर्वच संतांच्या साहित्याचे अध्ययन करा. पैगंबरांनी न्यायाचा संदेश दिला आहे. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) हे शेवटचे पैगंबर आहेत. कुराण फक्त मुसलमानांसाठी नाही. त्यामुळे कुरआनचा अभ्यास करा. अठरापगड जातींच्या शेकडो लोकांना जोडण्याचे काम ’सकाळ’ने केले आहे.“ - डॉ. सय्यद रफिक, पारनेर. 
---------------
“प्रत्येक धर्माची शिकवण मानव कल्याणाचीच आहे. संत तुकाराम महाराजांनी अल्लाहला उद्देशून अभंग लिहिले आहेत. हा विश्वास त्यांनी चारशे वर्षांपूर्वी दाखविला असेल, तर आपण एकमेकांना विश्वासाने का वागवू शकत नाही? एकमेकांची भाषा, आचारविचार समजून घेतले पाहिजेत.”- भास्करराव पेरे, उपसरपंच, आदर्श गाव पाटोदा. 
---------------
“अशा कार्यक्रमांमुळे समाजासमाजांतील गैरसमज दूर होऊन सद्भाव निर्माण होतो. सर्वांची प्रगती होऊन शांतता नांदावी, याच देशहिताच्या हेतूने जमाअत-ए-इस्लामी हिंद कार्य करते. हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे.“ 
- काझी मकदूम मोहियोद्दीन, शहराध्यक्ष, जमाअत-ए-इस्लामी हिंद, औरंगाबाद. 
--------------- 
“सर्व माणसे एकाच ईश्वराची पूजा करतात. ही धरती शांतता आणि समाधानात राहावी, सगळी भांडणे मिटावीत, अशी ईश्वराची इच्छा असते. माणसाने स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवावे, यासाठी रोजा पाळण्याचा संदेश आहे.” - मौलाना इलियास खान फलाही, शहराध्यक्ष, जमाअत-ए-इस्लामी हिंद.

खरीप हंगामापूर्वी कृषिमुल्य आयोग हा बाजार अनुदान तसेच देशातील शासकीय धान्यसाठा आणि कृषीच्या एकंदरित स्थितीचे अवलोकन करून एमएसपी (मिनीमम सपोर्ट प्राईज) अर्थात हमीभावाची घोषणा करीत असते. यावर्षीही ती करण्यात आली. त्यात तुटपूंजी वाढ सुचवून शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असल्याचे समजते. कृषिमुल्य आयोगाने पिकांचे हमीभाव निश्चित करताना पिकाला येणारा खर्च, खते, बियाणे आणि किटकनाशकाच्या किमतीत झालेल्या वाढीचा विचार करून हमीभावाचा अंतिम प्रस्ताव सादर करणे अपेक्षित असते. बोंड अळीमुळे आधीच राज्यातला शेतकरी संकटात आलेला आहे. त्यात भर पडत आहे ती तुरीच्या पडलेल्या दराने. ज्यामुळे सध्या शेतकरी खूप अडचणीत आलेला आहे. केंद्र सरकारने तुरीचा हमीभाव 5 हजार 450 प्रतिक्विंटलवरून 5 हजार 675 रूपये प्रतिक्विटंल असा केलेला आहे. पण हा दर केवळ कागदावरच आहे. सध्या महाराष्ट्रातल्या विविध बाजारपेठेमध्ये  तुरीला 3 हजार 500 ते 4 हजार एवढा भाव दिला जात आहे. म्हणजे जवळपास दीड हजार रूपये कमीने तूर विकली जात आहे. याला जबाबदार कोण? सरकार यात हस्तक्षेप का करत नाही? यामुळे सरकारच्या हमीभावाची विश्वासर्हता कधीच संपलेली आहे.
तुरीला सध्या जो कमीभाव मिळत आहे त्याला सरकारी गलथानपणा जबाबदार आहे. आता सरकारी खरेदी बंद असल्यामुळे व्यापारी किमती पाडून तूर खरेदी करणार आणि थोडे दिवस थांबून सरकारला 5 हजार 650 रूपये प्रतिक्विंटलने विकणार. म्हणजे शेवटी शेतकर्याचा नव्हे तर व्यापार्याचा फायदा होणार. शेतकर्यांनी वारंवार तक्रारी करूनसुद्धा सरकारी खरेदी पुन्हा सुरू झालेली नाही. त्यासाठी कृषी विभागाचे मंत्री जबाबदार असून, त्यांना मुख्यमंत्र्यांनी घरे बसवावे, असे राज्य सरकारचेच प्रतिनिधी आणि वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटलेले आहे. सरकारला हा घरचा आहेर आहे. यवतमाळचा एक शेतकरी मार्केटमध्ये तूर विकायला आला. त्यांने आपल्या 24 एकर कपाशीच्या पिकात आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली होती. पण नापिकीमुळे त्याला फक्त 16 क्विंटल तुरीचे उत्पादन झाले. सध्या 4 हजार रूपये प्रतिक्विंटल दर त्याला मिळत आहे. सध्याच्या दरात तुरीचा उत्पादन खर्चही निघत नाही, अशी भावना त्याने व्यक्त केली. यासंबंधी बोलताना तो म्हणाला, बोंडअळीमुळेच आधीच कापूस केला आणि तुरीचा लागवडी खर्चही निघत नाही. अशा परिस्थितीत कर्ज फेडायचे कसे आणि जगायचे कसे? सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल. 
विदर्भात बर्याच भागात या हंगामात आतापावेतो सरासरी पेक्षा 40 टक्के कमी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे कपाशी, तूर आणि सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होईल, या भितीमुळे शेतकर्यांच्या पोटात आधीच गोळा उठलेला आहे. म्हणून शेतकरी हंगामाच्या अगोदरच मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. बर्याच भागात साधारणतः तुरीचे 30 टक्के उत्पादन कमी होईल, असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत बाजारातही तुरीचे दर कमी असल्यामुळे शेतकरी आसमानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेला आहे. कमी पडलेला पाऊस, सोयाबीनची नापिकी, कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण आणि आता तुरीचे पडलेले दर. शेतकर्यांवर संकटाची मालीकाच सुरू आहे. आसमानी संकटाचा शेतकरी कसाबसा सामना करत आहे. पण सुलतानी धोरणामुळे शेतकर्याचे जगणे कठीण झालेले आहे. शेतमालाचे भाव पडल्यावर त्याला संरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकार हमीभाव जाहीर करते. पण जाहीर झालेल्या हमीभावाने सरकारच शेतकर्याचा माल खरेदी करत नसेल तर मग या हमीभावाचा फायदा काय? शासनाने दुटप्पी वागण्याचे धोरण सोडणे गरजेचे आहे.  
(लेखिका,  शेतकरी नेते शरद जोशी यांच्या स्वीय सहाय्यक राहिलेल्या आहेत)

- मीना नलवार
9822936603

अॅड. गाजीयोद्दीन रिसर्चतर्फे पुस्तकाचा शानदार प्रकाशन सोहळा

सोलापूर (शोधन सेवा) 
‘गुजरात फाईल्स’सारखे पुस्तक इतर देशात प्रकाशित झाले असते तर तेथील सरकार कोसळले असते. या पुस्तकातून मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गुजरातेत केलेल्या कृष्णकृत्यांचा पर्दाफाश केलेला आहे. आता जबाबदारी तुमची आहे. आता काय करायचे ते तुम्हीच ठरवा, असे आवाहन अंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त, धाडसी आणि खोजी पत्रकार व लेखिका राणा अय्यूब यांनी उपस्थितांना केले. आपण संवेदनशील असतो तर मोदी पंतप्रधान झाले नसते, असेही यावेळी त्या म्हणाल्या.
सोलापूर येथील अॅड़ गाजीउद्दीन रिसर्च सेंटरच्या वतीने राणा अय्यूब लिखित ‘गुजरात फाईल्स-अॅनाटॉमी ऑफ ए कव्हरअप’ या पुस्तकाच्या -(उर्वरित वृत्त पान 7 वर)
मराठी अनुवादित आवृत्तीचे प्रकाशन शिवछत्रपती रंगभवन येथे 16 जुलै रोजी संध्याकाळी करण्यात आले. याप्रसंगी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, साम टीव्हीचे संपादक संजय आवटे, या पुस्तकाचे अनुवादक दीपक बोरगावे, सनय प्रकाशनचे शिवाजी शिंदे, डॉ. मिलिंद कसबे, शोधनचे माजी संपादक सय्यद इफ्तेखार अहेमद, अली इनामदार, शब्बीर अत्तार, स्तंभलेखक एम. आय. शेख, महेबूब काझी आदी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये की या कार्यक्रमाचा प्रारंभ संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून झाला. प्रा. युसूफ बेन्नूर यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.
राणा अय्यूब पुढे म्हणाल्या, 2010 साली मी केलेल्या रिपोर्टिंगमुळे अमित शहा यांना अटक झाली. ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. माझे मित्र अॅड़ शाहीद आझमी खोट्या आरोपाखाली पकडलेल्या माणसांसाठी लढत होते. एकेदिवशी दिल्ली येथे गुजरातमध्ये पकडलेल्या निर्दोष तरुणाच्या खटल्यासाठी गेले होते. त्यानंतर त्याचा खून झाला. तो दिवस मला हादरवून टाकणारा होता. मी गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. संघाच्या विचारांशी बांधिल असलेली एक अमेरिकन फिल्ममेकर मैथिली त्यागी बनून स्टिंग ऑपरेशन सुरु केले. अंगावर विविध ठिकाणी आठ कॅमेरे लावून अधिकारी, राजकीय नेते यांच्यासोबत संवाद साधला.
दिवसभर रेकॉर्ड केलेले व्हिडीओ रात्री डाऊनलोड करून ठेवायचे. दोन महिने सतत मला पहाटे सहा वाजेपर्यंत झोप लागत नव्हती. रात्री अचानक दरवाजावर खटखट होईल का, याची कायम भीती असायची. हे काम सुरु असताना एकेदिवशी मोदींकडून निरोप आला.
एक परदेशी फिल्ममेकर गुजरातमध्ये आली पण मला भेटली नाही, असे त्यांना वाटले. कारण परदेशी लोकांनी केलेले कौतुक मोदींना फार आवडते. मी त्यांना भेटले तेव्हा त्यांच्या टेबलावर बराक ओबामा यांचे पुस्तक होते. ते मला दाखवत मोदी म्हणाले, मला एक दिवस यांच्यासारखे बनायचे आहे. मला मोदींचे कौतुक वाटते. पण त्याचवेळी आपल्या असण्याची लाजही वाटते. आपण संवेदनशील असतो तर हा माणूस देशाचा पंतप्रधान झाला नसता, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
16 भाषेत भाषांतर, 4 लाख प्रतींची विक्री
स्टिंग ऑपरेशन पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल तयार केला, पण तो प्रकाशित करण्यास माझ्या संस्थेने आणि इतर प्रकाशकांनीही नकार दिला. अखेर मी माझे दागिने गहाण ठेवून या पुस्तकाच्या 500 प्रती प्रकाशित केल्या. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दखल घेतल्यानंतर आपल्याकडे त्याची चर्चा सुरू झाली आणि आज परिस्थिती वेगळी आहे. 4 लाख प्रतींची विक्री झाली आहे. आता मला अनेक लोक विचारतात की, आम्ही काय करावे. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून लढू नका. देशात घडत असलेल्या घटनांबद्दल तुम्ही किती वेळा व्यक्त झाला आहात, याचा विचार करा. तुम्ही असेच राहिला तर 2019 मध्ये तेच निवडून येतील. या पुस्तकाच्या रूपाने सत्य सर्वांच्या समोर येवूनसुद्धा लोक शांत आहेत. याचे आश्चर्य वाटते. माझी जी जबाबदारी होती ती मी पूर्ण केली. आता लोकशाहीच्या लढाईची जबाबदारी तुमची आहे. विवेकबुद्धी जागवा, एकत्र या, संघटित व्हा आणि लोकशाहीची लढाई लढा असेही आवाहनही राना अय्युब यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.जी. कोळसे पाटील म्हणाले, 2002 मध्ये गुजरात दंगलीचे पत्रकार राणा अय्युब यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री व सध्याचे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना तुरूंगात जावे लागले. आता या स्टिंग ऑपरेशनचे पुराव्यासहित पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही तुरूंगात जावे लागेल; परंतु यासाठी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला प्रामाणिकपणे काम करावे लागणार आहे. मोदी आणि शहांनी गुजरातमध्ये गोंधळ घातला. 2002 च्या गुजरात दंगलीने लोकशाहीच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने प्रामाणिकपणे काम करण्याची सध्या गरज आहे. याबाबत मात्र शंका वाटते, अशी चिंताही कोळसे पाटील यांनी व्यक्त केली.
संविधानाला वाचविण्याची गरज..
सध्या देशात 24 तास खोटे बोलले जात आहे. सुरक्षा यंत्रणा आणि न्यायव्यवस्था सर्व त्यांच्या हातात आहेत. जन्मलो म्हणजे एक दिवस मरण ठरले आहे. त्यासाठी घाबरू नका. संविधानाला वाचवण्याची आज गरज आहे. सध्या समाजात विष पेरले जात आहे. याला विरोध करायचा असेल तर एकत्र येऊन लढा देणे आवश्यक आहे, असेही कोळसे-पाटील म्हणाले.
यावेळी साम टीव्हीचे संपादक संजय आवटे म्हणाले, राणा अय्युब यांचे कार्य ऐतिहासिक आहे. इतिहासात अशा प्रकारची पत्रकारिता कोणी केली नाही. सध्या धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवला जात आहे. राणा यांनी लढा दिला. आता तुम्ही काय करणार हे महत्त्वाचे आहे. राणा यांना युनोने सर्वोत्कृष्ट शोधपत्रकारितेचा पुरस्कार दिला. भारतासाठी ही गौरवास्पद बाब आहे. राना अय्युब या महाराष्ट्रातल्या आहेत. सगळ्या जगात त्यांचे स्वागत होत आहे, कार्यक्रम होत आहे. मात्र महाराष्ट्रात त्यांचा पुस्तक प्रकाशनाचा एवढा मोठा हा पहिलाच कार्यक्रम असल्याचे आवटे म्हणाले. आवटे यांनी 1925 ते 2014 पर्यंतच्या मनुवाद्यांच्या इतिहासाचा पाढा वाचला. त्यांच्या वाटचालीचा इतिहास आपल्या भाषणातून त्यांनी समोर आणला. शेतकरी, मजूर, व्यापारी, सामान्य नागरिक सगळ्यांचे हाल करून सोडले आहेत. मात्र सरकार मजेत चालले आहे. घटनेला वाचवायचे असेल तर सत्तांतर आवश्यक आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभही दबावाखाली वावरत आहे. त्यामुळे राना अय्युब यांनी गुजरात फाईल्सद्वारे मोदी आणि शहांच्या कार्यकाळातील कृष्णकृत्यांचा रहस्यभेद जीवावर उदार होवून तुम्हा- आम्हाला सत्य माहिती दिल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलीम अजीम यांनी केले. सूत्रसंचलन ’सविनय अस्वस्थ’ या सध्या गाजत असलेल्या कविता संग्रहाचे लेखक कवि साहिल शेख यांनी केले. आभार राम गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गाजोयोद्दीन सेंटरचे अध्यक्ष समीउल्लाह शेख, अॅड. मेहबूब कोथिंबिरे, सरफराज शेख,राम गायकवाड, बशीर शेख, फारुख तांबोळी, समीर इनामदार, हमीद शेख, दानिश कुरेशी, वायज सय्यद, आदींनी परिश्रम घेतले.

जुल्म बच्चे जन रहा है कुचा-ओ-बाजार में
अद्ल को भी साहब-ए-औलाद होना चाहिए
गच्या आठवड्यात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या एका सदस्यांने अशी घोषणा केली की बोर्डाच्या पुढील बैठकीमध्ये शरई पंचायतींचा विस्तार देशाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यासंबंधी बोर्ड विचार करणार आहे. या घोषणेबरोबर देशामध्ये गहजब माजला. दोन-तीन दिवस जवळ- जवळ प्रत्येक वाहिनीवर हाच विषय चर्चेला गेला. चर्चा घडवून आणणार्या अँकर्सचे ‘अज्ञान’ आणि ‘पक्षपात’ उघडपणे दिसून येत होता. ज्या लोकांना या विषयातील तज्ज्ञ म्हणवून चर्चेसाठी बोलाविले होते. त्यांनाही शरई पंचायतींच्या बाबतीत फारसे ज्ञान नव्हते. जवळ-जवळ प्रत्येक जण या पंचायतींना’शरिया कोर्ट’ किंवा ’शरिया न्यायालय’ म्हणून संबोधत होता. कोणी म्हणत होता की भारतीय मुसलमानांचा राज्यघटनेवर विश्वास नाही. कोणी म्हणाले, मुस्लिम या देशाला अफगानिस्तान बनवू इच्छितात काय? भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधाशूं यांनी तर चर्चे दरम्यान मुस्लिमांनी आता स्वतःसाठी शरिया आधारित फौजदारी कायद्याचीही मागणी करायला पाहिजे. जेणेकरून कोणी मुस्लिम चोरी करताना पकडला गेल्यास तचा हात कापला जाईल, असे मत मांडले.
शरिया पंचायतीच्या बाबतीत नागरिकांमध्ये अनेक गैरसमजुती आहेत. या आठवड्यात याच निमित्ताने शरई पंचायतीसंबंधी वस्तुनिष्ठ आणि अॅकॅडमिक माहिती वाचकांना पुरवावी म्हणून हा लेखन प्रपंच मांडला आहे. 
कधी पद्मावत तर कधी खिल्जी, कधी टिपू सुलतान तर कधी औरंगजेब, कधी तीन तलाक तर कधी तोंडी तलाक, कधी हलाला तर कधी बहुविवाह पद्धती, कोणत्या ना कोणत्या निमित्ताने अनावश्यक विषयांना अनावश्यक महत्व देवून मुस्लिमांना बदनाम करत राहण्याची जणू सुपारीच अनेक वाहिन्यांनी घेतली आहे की काय? अशी शंका घेण्याइतपत  वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. 
शरई पंचायत 
भारत हा न्यायप्रिय देश आहे. पंचायत व्यवस्था ही प्राचीन काळापासून न्यायदानाची व्यवस्था म्हणून सर्व समाजाला मान्य आहे. पंचांना आजही ग्रामीण भागात महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. याच पंचायतीचे  इस्लामी संस्करण म्हणजे शरई पंचायत होय. यांना शरिया कोर्ट किंवा शरिया न्यायालय म्हणणे व त्यांची तुलना सरकारी न्यायालयांशी करणे हेच मुदलात खोडसाळपणाचे आहे. मीडियाने ठरवून हा खोडसाळपणा केलेला आहे. देशातील पंचायत व्यवस्थेच्या बाबतीत एक कायदेशीर सत्य हे आहे की, भारतीय दिवाणी कायदा कलम 89 प्रमाणे पंचायती स्थापन करता येतात. देशात अनेक समाजाच्या समाज पंचायती अस्तित्वात आहेत. त्यातलीच मुस्लिम समाजाची पंचायत व्यवस्था म्हणजे शरई पंचायत व्यवस्था होय. ही व्यवस्था सीपीसी कलम 89 प्रमाणे कायदेशीरच नव्हे तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या व्यवस्थेला परोक्ष पद्धतीने मान्यताच दिलेली आहे. या संदर्भात 2014 साली इम्राना नावाच्या मुस्लिम महिलेच्या विरूद्ध आलेल्या शरई पंचायतीच्या विचित्र निकालाविरूद्ध अॅड. विष्णू लोचन मदान यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करून या शरई पंचायतींवर प्रतिबंध लावण्याची मागणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी मान्य केलेली नाही. 
ही याचिका निकाली काढताना 7 जुलै 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ”शरई पंचायती ह्या पंचायती आहेत न्यायालय नाहीत. भारतीय न्यायव्यवस्था अशा पंचायतींना समांतर न्यायव्यवस्था म्हणून मान्यता देत नाहीत. या फक्त आर्बीट्रेट्री काऊन्सिल्स (मध्यस्थी करणार्या संस्था) आहेत.” सर्वोच्च न्यायालयाला जर या पंचायतीमध्ये काही असंवैधानिक आढळून आले असते तर त्यांनी या पंचायतींना प्रतिबंधित केले असते. परंतु, न्यायालयाने तसे केलेले नाही. म्हणून या संस्था कायदेशीरच नव्हे तर संवैधानिक सुद्धा आहेत. 
खर्चिक आणि विलंबाने मिळणारा न्याय
भारतात न्याय मिळविणे साधारण माणसाला शक्य नाही. दारिद्रय रेषेखाली असणारा माणूस आपल्यावर कितीही अन्याय झाला तरी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावू शकत नाही. कारण त्यासाठी लागणारा खर्च त्याला पेलवणारा नाही. दुसर्या शब्दात सांगायचे म्हणजे भारतातील गरीब नागरिकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे अघोषितरित्या बंद आहेत. हैद्राबादचे कायदेतज्ज्ञ डॉ. फैजान मुस्तफा यांनी म्हटलेले आहे की, हादियाचा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढण्यासाठी 1 कोटी रूपये खर्च झालेत जे की केरळच्या सामाजिक संस्थांनी जमा केले होते.
डॉ.फैजान पुढे म्हणतात की, देशातील न्यायालयांमध्ये 4 कोटी पेक्षा जास्त खटले प्रलंबित आहेत. एवढ्या खटल्यांच्या निपटार्यासाठी 365 वर्षे लागतील. ते ही तेव्हा, जेव्हा नवीन खटले दाखल होणार नाहीत. नवीन खटले दाखल होऊ न देणे हे शक्य नाही. म्हणजेच वाचकांना सहज कल्पना येईल, की न्यायालयांवर कामाचा किती बोजा आहे आणि किती विलंबाने आपल्याकडे न्याय मिळतो? न्यायशास्त्रात म्हटलेले आहे की, विलंबाने न्याय देणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखे आहे. या पार्श्वभूमीवर शरई पंचायतींमधून जर शीघ्र व मोफत न्याय मिळत असेल तर कोणाला तक्रार असण्याचे कारण काय? 
शरई पंचायतींची वैशिष्ट्ये
भारतात फौजदारी कायदा सर्वांसाठी एकसारखा लागू करण्यात आलेला आहे. म्हणून भारतीय मुसलमान कायद्याचा सन्मान करून आपल्यासाठी वेगळ्या शरई फौजदारी कायद्याची मागणी करत नाहीत. मात्र इतर समाजाप्रमाणे मुस्लिमांनासुद्धा पर्सनल लॉची परवानगी भारतीय राज्यघटना देते म्हणून मुस्लिम समाज हा आपले दिवाणी स्वरूपाचे किरकोळ तंटे या पंचायतींत मांडतो व न्यायप्राप्त करतो. यात देशाच्या न्यायव्यवस्थेला कुठल्याच प्रकारचा धोका नाही. उलट या पंचायतींमुळे न्यायव्यवस्थेवरील कामाचा बोजा कमी होतो.
या पंचायत व्यवस्थेचे पहिले वैशिष्ट्ये म्हणजे ह्या पंचायती ईश्वरीय कायद्याच्या आधीन राहून काम करतात. इस्लाम जीवन जगण्याची एक ईश्वरीय व्यवस्था आहे. म्हणून ती त्रुटी मुक्त आहे. कुरआन या व्यवस्थेचे मूळ स्त्रोत आहे. तर हदीस, कुरआनचे एका अर्थाने भाष्य आहे. या दोहोंच्या समुच्चयातून सामाजिक, आर्थिक, राजकीय तंटे सोडविण्याची एक परिपूर्ण व्यवस्था इस्लाममध्ये देण्यात आलेली आहे. तिला कजात (काझी) च्या माध्यमातून लागू केले जाते. 
भारतात स्वतंत्र संविधान असल्यामुळे आर्थिक, राजकीय आणि फौजदारी प्रकरणे देशाच्या कायद्याप्रमाणे चालतात. तर घटनात्मक मंजूरी असलेल्या पर्सनल लॉ प्रमाणे नित्तांत वैयक्तिक बाबी म्हणजे लग्न, तलाक, किरकोळ घरेलू तंटे, वारसा हक्कासंबंधीच्या तक्रारी याबाबतीतच शरई पंचायतीमध्ये सुनावणी होते. 
खाप पंचायतीमध्ये होतात तशा फौजदारी प्रकरणातील सुनावण्या व निवाडे येथे होत नाहीत. न्यायालयाचे अधिकार स्वतःच्या हातात घेवून जाचक शिक्षा, दंड किंवा सामाजिक बहिष्कार सारखे निर्णय येथे दिले जात नाहीत. उलट शरियतच्या हवाल्याने दोन्ही पक्षकारांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. दोघांच्या राजीखुशीने निवाडा दिला जातो. यावरही दोहो किंवा दोहोंपैकी एका पक्षाला पंचायतीचा फैसला मान्य नसेल तर ते सरकारी न्यायालयामध्ये जाण्यासाठी स्वतंत्र असतात. 
दुसरे वैशिष्ट्ये असे की, या पंचायतीमध्ये कोणाला जबरदस्तीने बोलावले जात नाही. यात तक्रार घेवून येणार्या 95 टक्के महिला असतात. जे 5 टक्के पुरूष येतात ते सुद्धा आपले लग्न वाचविण्यासाठी व पत्नीला नांदविण्याची विनंती करण्यासाठी येतात. शरई पंचायतीमध्ये बहुतेक खटल्यांचा निकाल महिलांच्या बाजूने लागतो. विशेष म्हणजे दोघांच्या संमतीने फैसला होतो म्हणून दोघेही आनंदी असतात. शरई पंचायतीमधून समेट घडवून आणलेल्या फार कमी प्रकरणात पुन्हा लोक सरकारी न्यायालयात जातात. 
गेल्या 70 वर्षात मोठ्या प्रमाणात शासन केलेल्या काँग्रेसने मुस्लिम समाजाला ठरवून गरीबच केले एवढे नव्हे तर त्यांना ठरवून अडाणी सुद्धा ठेवलेले आहे. गरीबी आणि अनाडीपणातून जे तंटे उद्भवतात ते तरी निदान स्वधर्माच्या तत्वाप्रमाणे जर मुस्लिम समाज आपसात मिटवत असेल तर कोणाला तक्रार असण्याचे काही कारण नाही. मोफत आणि शीघ्र न्याय मिळत असल्याने गरीबांसाठी शरई पंचायत व्यवस्थाही वरदान आहे. या व्यवस्थेला थेट न्याय व्यवस्थेला आव्हान समजणे यापेक्षा मोठा विनोद असूच शकत नाही. 
आयआयटी कानपूरच्या समाजशास्त्र विभागातील प्राध्यापिका अनन्या चक्रवर्ती यांनी कानपूर आणि लखनऊच्या शरई पंचायतींमध्ये चालणार्या खटल्यांवर संशोधन करून एक शोधप्रबंध लिहिलेला आहे. त्यात त्या म्हणतात या पंचायतीमध्ये मुस्लिम महिला ह्या आपल्या मर्जीने येतात. त्यांना कोणीही जबरदस्तीने त्या ठिकाणी येण्यास भाग पाडत नाही. 
असेही नाही की मुस्लिम महिला फक्त शरई पंचायतीमध्येच येतात. ज्या महिलांना शरई पंचायतींमधून न्याय मिळण्याची आशा नसते त्या सरकारी न्यायालयामध्ये जातात. शहाबानोपासून ते शायराबानो पर्यंतचा मोठा इतिहास यामागे आहे. आजही देशाचे एकही कोर्ट असे नसेल ज्या ठिकाणी मुस्लिम महिलांचे घरेलू हिंसा, पोटगी किंवा वारसा हक्काचे खटले चालू नसतील. त्यामुळे असे म्हणणे की भारतीय मुस्लिमांना भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये विश्वास नाही. खोडसाळपणाशिवाय काही नाही. 
इस्लाम शरियतवर आधारित जागतिक व्यवस्था आहे. भारतातील कायदे भारतात लागू आहेत. अमेरिकेचे कायदे अमेरिकेत लागू आहेत. इस्लामचे कायदे मात्र सगळ्या जगामधील मुस्लिमांवर लागू आहेत. भारतातच नव्हे तर ब्रिटनसारख्या पुढारलेल्या देशात सहा शरई न्यायालये सरकारी मान्यतेने गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीपणे कार्यरत आहेत. बिहारमध्ये सुद्धा शरई पंचायती या अतिशय सुसंघटित स्वरूपात 1920 पासून कार्यरत आहेत. त्यांच्या अनेक शाखा राज्यभर पसरलेल्या आहेत. त्यांना ’अमारते शरिया’ असे म्हणतात. यातून 50 हजारापेक्षा जास्त खटल्यांमध्ये फैसले सुनावण्यात आलेले आहेत. अनेकदा चार आठवडे चाललेल्या लग्नामध्ये घटस्फोट मिळविण्यासाठी 4-4 वर्षे कोर्टाच्या चकरा माराव्या लागतात. वकीलांचे खिसे भरावे लागतात. या सगळ्या गोष्टी शरई पंचायतमध्ये गेल्याने टाळता येतात. याकडे मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. 
तंटामुक्ती आणि लोकअदालत
या प्रसंगी मी वाचकांचे लक्ष महाराष्ट्र शासनाच्या तंटामुक्ती अभियानाकडे वेधू इच्छितो. दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी ही योजना महाराष्ट्रभर यशस्वीपणे राबविली होती. त्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले होते. तंटामुक्त गावांना पुरस्कार स्वरूप कोट्यावधी रूपयांची राशी दिली होती. याशिवाय, सरकारी न्यायालयातील न्यायाधिश स्वतः सुट्टीच्या दिवशी शामियाना लावून नियमितपणे ’लोक अदालत’ भरवत असतात व त्यातून किरकोळ खटले दोन्ही पक्षकारांच्या संमतीने निकाली काढतात. आश्चर्य म्हणजे या अँकर्स आणि तथाकथित तज्ज्ञांना तंटामुक्ती आणि लोकअदालतीबद्दल काही तक्रार नाही. ते त्यांना स्विकार्ह आहे. फक्त शरई पंचायतच त्यांना मान्य नाही. यापेक्षा उघड पक्षपात तो कोणता? मुळात त्यांच्या पोटात कळा ’शरिया’ या शब्दामुळे येतात. हे उघड गुपीत आहे, असे यासाठी घडते की हे वाहिन्यावरील अँकर्स तसेच त्यांच्या समोर बसलेले तथाकथित तज्ञ हे भांडवलदारांचे प्रतिनिधी असतात. त्यांना भिती असते इस्लामची समतावादी शिकवण कुठल्याही पद्धतीने जर का जनतेच्या लक्षात आली तर आपली काही धडगत नाही. ही तीच मानसिकता आहे जी सातव्या शतकात मक्कातील कुरैश यांची मानसिकता होती. त्यांनीही त्याकाळी इस्लामचा यासाठीच विरोध केला होता की सामान्य माणसांच्या लक्षात इस्लामची कल्याणकारी व्यवस्था आली तर आपली काही खैर नाही. आजही त्याच मानसिकतेतून आजची ही प्रस्थापित मंडळी शरई पंचायतींना विरोध करीत आहेत.  
अनेक शहरांमध्ये या पंचायती स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू आहेत. त्यामुळे आजपर्यंत भारतीय न्यायव्यवस्थेचे काही नुकसान झालेले नाही. ते यापुढे कसे होईल? लॉ बोर्डाचा फक्त त्यांचा विस्तार करण्याचा मानस आहे एवढेच. त्यासाठी एवढा गहजब माजवण्याचे काहीच कार नाही. उलट न्यायव्यवस्थेला कशामुळे आव्हान मिळत आहे, याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायधिशांनी पत्रकार परिषद घेवून देशाला कळविलेले आहे. त्या कारणावर बोलणे  सरकार आणि मिडीया दोघांनीही टाळलेले आहे. त्यावर एवढ्या आक्रमकपणे चर्चा घडवून आणलेली नाही. यातच सर्वकाही आले. 
लातूरमध्ये सध्या एक शरई पंचायत गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. पूर्व जिल्हा व सत्र न्यायाधिश अॅड. आर.वाय. शेख यांच्या नेतृत्वाखाली ती काम करते. यात लातूरच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून तसेच कर्नाटक राज्यातून सुद्धा लोक आपल्या तक्रारी घेवून येतात आणि समाधानी होवून जातात. अॅड. आर.वाय. शेख हे स्थानिक न्यायालयातून सुद्धा त्यांना स्वस्तात न्याय मिळवून देतात. म्हणून मिडीयाच्या अनावश्यक आक्रमकतेमुळे भिऊन शरई पंचायतीबाबत बोर्डाने नमती भुमिका घेवून नये. 
इस्लामचे अनुयायी या नात्याने प्रत्येक मुस्लिम हा इस्लामचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्यातल्या त्यात उच्च शिक्षित मुस्लिमांवर वाढीव जबाबदारी ही आहे की, त्यांनी आपल्या वाणी, लेखनी आणि आचरणाने इस्लामचा संदेश देशबांधवांपर्यंत पोहोचवावा. हेच मिडियाच्या खोट्या प्रचाराला योग्य उत्तर ठरेल. अनेक लोक अलिकडे आपल्या क्षुद्र राजकारणासाठी इस्लाम व मुस्लिमांना हकनाक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इस्लामविरूद्धचा अपप्रचार खोडून काढण्यासाठी सर्व सुशिक्षित मुस्लिमांना त्यांच्यापेक्षा अधिक कष्ट करावे लागतील. तेव्हा कुठे देशबांधवांच्या लक्षात येईल की सत्य काय आहे? शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की आम्हा सर्वांना सत्य मांडण्याची व देशबांधवांना सत्य समजण्याची सदबुद्धी देवो. आमीन.

- एम.आय. शेख
9764000737



मुहम्मद हाशीमच्या नावे काढलेल्या फर्मानात उपकारबुध्दीची भूमिका

औरंगजेबाचे कृषी धोरण स्पष्ट करणारे दुसरे एक फर्मान मोहम्मद हाशीमच्या नावे काढले आहे. हे फर्मान इसवी सन 1669 साली काढण्यात आले आहे. औरंगजेब कोणतेही फर्मान साधारणत: आपली जन्मभूमी असणाऱ्या गुजरातच्या सुभेदाराच्या नावे काढत असे आणि त्याची अंमलबजावणी नंतर संपूर्ण राजवटीत करत असे. मोहम्मद हाशीमच्या नावे काढलेले फर्मान देखील शेतकरी हिताची चर्चा करणारे आहे. या फर्मानात औरंगजेबाने शेतकऱ्यांशी उपकारबुध्दीने वागण्यासाठी सुचना केल्या आहेत, “ हिंदुस्तानी सल्तनतीच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत असलेल्या सध्याच्या आणि भविष्यातील आधिकाऱ्यांनी व अमिलांनी प्रकाशमान कायदा आणि प्राचीन उज्ज्वल पंरपरा यानुसार प्रमाणांत निश्‍चीत करण्यात आलेला महसूल आणि कर महालांकडून वसूल करावा या कायद्यात जे काही सांगण्यात आणि मान्य करण्यात आले आहे ते अचूक आणि विश्वसनीय आहे. त्यांनी प्रत्येक वर्षी नवी मागणी करु नये परंतू या जगात आणि नंतरच्या जगात ( परलौकीक ) त्यांची अप्रतिष्ठा होईल अशा कारणास दूर सारण्याचा विचार करावा. त्यांनी शेतकऱ्यांसोबत उपकारबुध्दीचे होउनच वर्तन करावे. त्यांच्या स्थितीची चौकशी करुन त्यांच्याशी न्यायपूर्ण आणि सौजन्याने वागायला हवे ज्यामूळे ते आनंदाने आणि मन:पुर्वक उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करतील आणि शेतीचा प्रत्येक तुकडा लागवडीखाली आणतील. शक्य झाल्यास वर्षाच्या सुरुवातीसच तुम्ही हे सूचीत करायला हवे की शेतकरी लागवड करीत आहे किंवा नाही वा त्यापासून अलिप्त आहे. जर ते झटून काम करण्यास तयार असतील तर त्यांना उत्तेजन आणि त्यांनी इच्छेने अनुकुलता दर्शविली तर त्यांना साह्य करा परंतू जर चौकशी केल्यानंतर असे आढळले की ते लागवड करण्यात सक्षम आहेत आणि पाउसही चांगला झालेला आहे तरीही ते लागवड करण्यापासून दूर आहेत तेंव्हा त्यासाठी तुम्ही आग्रह करा, दरडावून सांगा, शक्तीचा वापर करा, दंड द्या. ” पळून गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमीनी भाडेपट्ट्याने द्या.
    जो शेतकरी पळून गेला आहे त्यांच्या जमीनी भाडेपट्ट्याने द्याव्यात हा आदेश लागवडीचे क्षेत्र वाढवण्याचे औरंगजेबाचे धोरण अधोरेखीत करणारे आहे. तो म्हणतो, “ जर शेतकरी शेतीची साधने घेण्यासाठी असमर्थ असेल किंवा शेती न पिकविता सोडून पळून जाईल तेव्हा ती शेती दुसऱ्याला भाडेपट्ट्याने द्यावी आणि महसूलाची रक्कम ज्याने शेती कराराने घेतली आहे, त्याच्याकडून वसूल करावी किंवा लागवडीच्या दृष्टीने मालकाच्या भागातून वसूल करा. जर अधिकचे उरले तर शेतीच्या मालकास देण्यात यावे किंवा पळून गेलेल्या मालकाच्या स्थानी अन्य माणसाची नेमणूक करुन , त्याने शेती करुन महसूल भरावा आणि आधिक उत्पादन त्यालाच उपभोगू द्यावे. जेव्हा केव्हा मूळ मालक शेती करण्यास सक्षम होईल, तेव्हा त्यास त्याची शेती परत देण्यात यावी. जर शेतमालक शेती पडीक सोडून पळून गेला असेल तर ती शेती चालू वर्षानंतर करारावर देण्यात यावी.”  याच आदेशात पडीक जमीनीविषयी पुढे म्हटले आहे की, “ जर पडीक जमीनीचा मालक माहित असेल तर ती जमीन मालकाकडेच राहू द्या, ती अन्य कोणास देण्यात येउ नये. जर मालक माहित नसेल तर धोरणाची अंमल बजावणी करा व तुम्ही ज्या कोणास तिची काळजी करण्यास योग्य समजाल त्यास ती जमीन देण्यात यावी. जो त्या जमीनीवर लागवड करेल तो मालक म्हणून ओळखण्यात येईल आणि ती जमीन त्याच्याकडून हिसकावून घेण्यात येणार नाही. जर त्या जमीनीत खनिज असेल तर ती जमीन खोदण्यास सर्वप्रकारे मनाई करण्यात यावी. ”
    नैसर्गिक आपत्तीवेळी लागवडीआधी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास करमाफी - अनेक वेळा दुष्काळ, वादळी वारे, अतिवृष्टी आणि पुरामूळे पिकांचे नुकसान व्हायचे. अशावेळी शेतकऱ्यांकडून कर वसूल करणे योग्य नसल्याचे सांगताना या फर्मानात औरंगजेब म्हणतो, “ कोणत्याही अडचणीशिवाय लागवड करण्याची क्षमता असतानाही जर कोणी त्याची शेती पडीक ठवली असेल तर अन्य कामासाठी राखून ठेवलेल्या त्याच्या दुसऱ्या जमीनीपासून महसूल प्राप्त करावा. जर शेतीत पुराचे पाणी घुसले असेल किंवा जेथे अतिवृष्टी झाली असेल किंवा कोणतेही न टाळता येणारे संकट हंगामापुर्वी पिकावर आले असेल ज्यामूळे रयतेस काही शिल्लक राहिले नसेल तर पुढचे वर्ष सुरु होण्यापूर्वी दुसरे पीक घेण्यासाठी पुरेसा वेळ उरला नाही, अशा वेळी महसूल माफ आहे असे समजावे. परंतु जर कापणी झाल्यावर संकट आले असेल किंवा संकट आल्यावरही दुसऱ्या पिकांसाठी पुरेसा वेळ उरला असेल तर महसूल गोळा करावा.
    शेतीचा मालक निश्चित केलेला महसूल देण्यास बांधील आहे. त्याने लागवड केल्यावर वर्षाचा महसूल देण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या वारसदारांना शेतीतील उत्पन्न मिळाले अशावेळी त्यांच्याकडून महसूल घेण्यात यावा. परंतू अशा व्यक्तीचा मृत्यू लागवडीपुर्वीच झाला आणि त्यावर्षी लागवड करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही तर अशा वेळी काहीही घेऊ नका. ” पुढे याच फर्मानात म्हटले आहे , “ जर मुकासिमा   जमिनीचा मालक वारसदाराशिवाय मृत झाल तर मुअज्जफ जमिनीशी संबंधित असलेल्या कायद्याच्या अनुसार करावाई करुन जमीन लागवडीसाठी भाडेपट्टावर देण्यात यावी. मुकासिमा संबंधात जर कोणत्या संकटाने पिकांना ग्रासले तर नुकसानीच्या प्रमाणांत महसुलाची रक्कम कमी करण्यात यावी आणि जर संकट धान्य कापणीनंतर आले किंवा पूर्वी आले तर सुरक्षित राहिलेल्या धान्यावर महसूल आकारण्यात यावा.” 
फळबाग लागवडीविषयी सुचना - फळबागा लावताना योग्य अंतर न ठेवता रोपे लावल्याने बागांचे नुकसान होते. त्यामुळे अशापध्दतीने लागवड करणाऱ्यांना दंड म्हणून जास्त महसूलाची आकारणी करण्यात यावी. तथा फळझाडांच्या लागवडीमुळे बराच काळ त्याची वाढ होण्यात जातो. मग महसूल बुडण्याची शक्यता असते.  त्यामुळे ही झाडे फळधारणा करत नसली तरी महसूल घ्यावा.  याबाबत या फर्मानात आदेश दिले आहेत, “ लागवडीसाठी योग्य अशा जमीनीवर, लागवडीसाठी योग्य म्हणून महसूल कराची आकारणी झाली होती, अशी जमीन जर त्याने कोणत्या उद्यानात रुपांतरीत केली आणि दोन झाडांच्या दरम्यान मोकळी जागा न सोडता फळ झाडे लावली तर त्याच्याकडून 2.2/3 रुपये घेण्यात यावेत, जो अद्यापी फलधारणा न करणाऱ्या झाडासाठीच्या उद्यानासाठी म्हणून आधिकाधिक आहे. परंतु द्राक्ष आणि बदामाच्या झाडांच्या संबंधात त्यांना फलधारणा झालेली नसली तरीही महसूल घेण्यात यावा. जेव्हा ती झाडे फलधारणार करतील  तेंव्हा 2.3/4 रुपये जे एक बिघा म्हणजे 45ु45  शहाजहानी गजमधील उत्पन्नासाठी आहे, इतका महसूल घेण्यात यावा, किंवा 60ु60 अशा अधिकृत गजमधील उत्पन्नासाठी 5.1/2 किंवा त्याहून अधिक महसूल घेण्यात यावा, नाहीतर उत्पन्नाचा अर्धाभाग घेण्यात यावा. जर उत्पन्नाचे मूल्य हे पाव रुपयापेक्षा कमी आहे जसे एक रुपयास पाच शहाजहानी शेर धान्य विकल्या जाते, तेव्हा  शासनाचा भाग एक शेर धान्याचा होतो, यापेक्षा कमी घ्यायचे नाही. ”
    औरंगजेबाच्या काही अन्य आदेशातून देखील त्याची कृषी क्षेत्राविषयक भूमिका व्यक्त झाली आहे. औरंगजेब दक्षिणेत आल्यानंतर त्याने शेतकऱ्यांच्या संदर्भात काही आदेश दिले आहेत. तर उत्तरेत राजवटीच्या सुरुवातीच्या काळात त्याने असे आदेश दिले आहेत. औरंगजेबाच्या कृषी धोरणाचा समग्र आकलन होण्यासाठी त्या फर्मानांचा संपूर्ण अभ्यास आवश्यक आहे.

- सरफराज अ. रजाक शेख
ऍड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर

पुणे (शोधन सेवा) 
पुणे येथील एस.एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात समविचारी पुरोगामी संघटनांच्यावतीने “ अघोषित आणिबाणीविरोधात आम्ही सारे ” या शिर्षकाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील, माजी खा. डॉ. प्रकाश आंबेडकर आदी उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
    यावेळी बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती न्या. पी.बी. सावंत म्हणाले, भारतामध्ये मनुवादी आणि अ-मनुवादी असे दोन संघर्ष प्राचीन काळापासून सुरु आहेत. अ-मनुवादी हा साध्या माणसांचा वर्ग आहे. त्याच्या शोषणासाठी मनुवादी लोक नेहमी प्रयत्न करत आले आहेत. आजही अ-मनुवद्यांविरोधात मनुवाद्यांकडून प्रचंड कारस्थाने रचली जात आहेत. त्यामुळे भारतीय समाजात प्रचंड अस्वस्थता माजली आहे. येत्या काही दिवसात या देशामध्ये कोणते अराजक माजेल याची कल्पना आपण करु शकत नाही. संघ हा माणसांच्या बाजूने असू शकत नाही. त्यामुळे त्याच्या सैतानीपणाविरुध्द आपल्याला लढावेच लागेल. समाजवादी राष्ट्रनिर्मिती हे ध्येय ठरवून आपले संविधान आपण स्विकारले आहे. मात्र मागील काही दिवसात धर्मवादी उजवे राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रश्‍न विचारु पाहणाऱ्या प्रत्येकाशी भांडण पुकारले गेले आहे. त्यामुळे विचारवंतापासून सामान्य माणसांपर्यंत अनेकांच्या हत्या सैतानी झुंडीच्या मार्फत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही राजवट संपवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. इव्हीएमचा विरोध करुन मतपत्रिकेद्वारे मतदान घेणे गरजेचे असल्याचे देखील न्या. सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले.
    वंचित बहुजनांसाठी यापुढे राज्यभरात महाआणीबाणीविरोधी परिषदा घेतल्या जाणार असल्याचे न्या. बी. जी. कोळसे पाटील यांनी सांगितले. भिमा कोरेगाव येथे झालेला हल्ला हा मनुवादी व्यवस्थेच्या समर्थकांनी केला आहे. मात्र शासन आयोजकांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप देखील यावेळी बोलताना कोळसे पाटील यांनी केला. संघाच्या दडपशाहीविरोधात लढताना तुरुंग, मृत्यू अशा गोष्टींची तमा न बाळगता आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.    या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते रमेश राक्षे, विरा दामोदर, ज्येष्ठ साहित्यीक अन्वर राजन, ऍड. महिबूब कोथिंबीरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सुबह होती है शाम होती है
    उम्र यूं ही तमाम होती है

माणसाचे अर्धे जीवन नशीबावर आधारित असते तर अर्धे शिस्तीवर. शिस्तीवर आधारित जीवन अधिक महत्त्वाचे असते, कारण त्याच्याशिवाय माणूस नशिबाने मिळालेल्या संधींचा पूरेपूर उपयोग करून घेऊ शकत नाही. जगात आज जगण्याचे दोन सर्वमान्य उद्देश आहेत. एक जीवनाचा स्तर उंचवणे, दोन मनोरंजन. या दोन्ही उद्देशांच्या प्राप्तीसाठी पैशांची गरज असते. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी अधिकाधिक खर्च करण्यासाठी प्रेरित केले जाते. तर मनोरंजनामध्ये कोट्यावधी डॉलरची अनुत्पादक गुंतवणूक केली जाते.
    जगातील बहुतेक मुस्लिम लोक पश्चिमेच्या मानसिक गुलामगिरीत जगत आहेत. त्यामुळे पश्चिमेने दिलेले जीवन जगण्याचे वर नमूद दोन्ही उद्देश्य त्यांनी नकळत स्विकारलेले आहेत व ते साध्य करण्यासाठी ते रात्रं-दिवस कष्ट करीत आहेत. वस्तूंवर प्रेम करीत आहेत तर माणसांचा उपयोग करीत आहेत. वास्तविक पाहता माणसांवर प्रेम करून वस्तूंचा उपयोग करणे अपेक्षित होते.
    पूर्वीच्या काळी जगात सर्वत्र गुलामगिरीची पद्धत रूढ होती. गुलामांची खरेदी-विक्री होत असे. त्यासाठी बाजार भरत असत. गुलाम हे शरिरानेच नव्हे तर मनाने सुद्धा गुलाम असत. अत्यंत दयनीय अवस्थेत जगावे लागत असले तरी स्वतंत्र होण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात येत नसे. कोणी धाडस केलेच तर त्याचा अमानुष छळ करून कत्तल करण्यात येई, म्हणून गुलाम लोक स्वतंत्र होण्याची संधी मिळूनही प्रयत्न करत नसत. अपवादात्मकरित्या एखादा गुलाम कधीकाळी गुलामगिरीतून पळून जावून स्वतंत्र झालाच तर तो इतर गुलामांच्या नजरेत नायक ठरत असे व ही घटना इतर गुलामांसाठी उत्सवाची घटना मानण्यात येत असे.
    आजचे मुस्लिम सुद्धा पश्चिमेच्या मानसिक गुलामगिरीत जगत आहेत. म्हणूनच एखाद्या मुस्लिमाने पाश्चिमात्य विधीमागे एखादे उच्चस्थान पटकाविले. उदाहरणार्थ ऑस्कर किंवा नोबेलसारखे पुरस्कार मिळविले, क्रिकेट किंवा टेनिसच्या रँकिंगमध्ये उच्च मानांकन मिळविले, चित्रपटामध्ये व्यावसायिक यश मिळविले तर बाकी मुस्लिमांना आनंदाचे भरते येते. त्यांच्यात उत्साह संचारतो. शाहरूख खान, सलमान खान, ए.आर. रहमान यांच्याबद्दल मुस्लिमांच्या मनामध्ये जो अभिमान आहे तो याच मानसिकतेतून आलेला आहे. कोणीही हा विचार करीत नाही की हे नाचे समाजामध्ये अनैतिकतेला प्रोत्साहन देत आहेत. त्यांचे वर्तन इस्लामविरोधी आहे. ते आपले नायक होवूच शकत नाहीत.
    पाश्चिमातीकरण म्हणजे आधुनिकीकरण अशी आमची धारणा झालेली आहे, जी की चुकीची आहे. आज भारतीय मुस्लिमांची परिस्थिती अशी आहे की, 10 आशरा-ए-मुबश्शीरा (ते दहा भाग्यवान व्यक्ती ज्यांना अल्लाहने जीवंतपनी जन्नतची शुभवार्ता दिली होती) ची नावे एक टक्का मुस्लिमांना सुद्धा माहित नसतील. मात्र शाहरूख खान, सलमान खान सारख्यांची नावे त्यांच्या चित्रपटांच्या बारीक-सारीक तपशीलासहित बहुसंख्य मुस्लिमांना पाठ आहेत.
    जीवनमान उंचावणे गैर नाही. मात्र ते उंचावण्यासाठी, ” काही पण” करणे गैर आहे. भ्रष्ट पद्धतीने जीवनमान उंचावणे इस्लामला मान्य नाही. आज कुठले ना कुठले अनैतिक कृत्य केल्याशिवाय माणसाला गबर बनता येत नाही, हे कटू सत्य आहे. अमेरिका आणि युरोपची प्रगती जगातील गरीब देशांचे रक्त (अर्थ) शोषण करून झालेली आहे. भारतातही शहरांचा विकास ग्रामीण भागावर अन्याय करून झालेला आहे. आपल्या देशातच नव्हे तर जगात सुद्धा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समता प्रस्थापित झालेली नाही. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये ती शक्यही नाही.
    जीवनमान उंचावणे आणि मनोरंजन या प्रक्रिया सतत चालू असतात. त्यातून अनुत्पादक गोष्टींना अकारण महत्व प्राप्त होत जाते तर जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीचे महत्त्व कमी होत जाते. मुठभर लोकांच्या हाती त्यांच्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त पैसा जमा होतो. तर बहुसंख्य लोकांच्या वाट्याला फार कमी पैसा येतो. यातूनच अगोदर विषमता व नंतर वर्गकलह निर्माण होतो. समाजात नेहमी असे लोक मोठ्या संख्येने असतात जे आपल्या पोषणासाठी श्रीमंतांकडे आशाळभूत नजरेने पाहत असतात. मात्र श्रीमंतांना त्यांची दया येत नाही. समाजात गरीबी कायम राहणे त्यांच्या हितासाठी आवश्यक असते. कारण त्यांच्या कारखान्यांना स्वस्तात मजूर मिळत असतात. याच मानसिकतेतून बहुसंख्यांना कायम गरीबीत ठेवण्याचे षडयंत्र रचले जाते.
जीवन जगण्याचे खरे उद्देश्य
    जीवनाचा स्तर सतत उंचवत ठेवणे व सतत मनोरंजनात व्यस्त राहणे हे मानवी जीवनाचे उद्देश्य असूच शकत नाही. ही बाब किमान साहेब-ए-शरियत (मुस्लिम) लोकांच्याही लक्षात येवू नये, यासारखे दुर्देव नाही. कुरआनने मानवजातीसाठी जगण्याचे जे उद्देश्य ठरवून दिलेले आहे ते खालीलप्रमाणे आहे.
1. ”मी जिन्न आणि माणसांना याशिवाय कोणत्याही अन्य कामासाठी निर्माण केले नाही की त्यांनी माझी भक्ती करावी” (कुरआन : सुरे अज्जजारियात आयत नं. 56). 
    या आयातीवरून स्पष्ट होते की, माणसाच्या जीवनाचे उद्देश्य अल्लाहची भक्ती हेच आहे. या ठिकाणी वाचकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे म्हणून स्पष्ट करू इच्छितो की, भक्ती या शब्दाचा अर्थ केवळ कलमा, नमाज, रोजा, जकात, हज इथपर्यंतच मर्यादित नाही तर या ठिकाणी जीवन जगण्याची अल्लाहला मान्य असलेली पद्धती अशा व्यापक अर्थाने भक्ती हा शब्द उपयोगात आणलेला आहे. जीवन जगताना अल्लाहने शरियाच्या माध्यमातून दिलेल्या आदेशांची अवहेलना होणार नाही याकडे लक्ष दिल्यास दुसऱ्यांना त्रास होत नाही व आदर्श समाजाची रचना होते. आदर्श समाजाच्या रचनेपेक्षा दूसरे कोणते महान उद्देश असूच शकत नाही.
    2. ”तुम्हा लोकांना जास्तीत जास्त आणि एकमेकापेक्षा जास्त धन प्राप्त करण्याच्या मोहाने बेसावध करून टाकले आहे. इथपावेतो की (याच चिंतेत) तुम्ही थडग्यापर्यंत पोहोचा. कदापि, नाही! लवकरच तुम्हाला कळून येईन. पुन्हा (ऐकून घ्या) कदापि नाही! लवकरच तुम्हाला कळून येईल. कदापि नाही! जर तुम्ही खात्रीचे ज्ञान म्हणून (या चालीच्या परिणामाला) जाणत असता तर (तुमचे वर्तन असे नसते). तुम्ही नरक पाहणारच. पुन्हा (ऐकून घ्या) तुम्ही अगदी खात्रीने नरक पहाल. मग नक्कीच त्या दिवशी या देणग्यां (जीवनात मिळालेल्या गोष्टीं) संबंधी तुम्हाला जाब विचारला जाईल” (सुरे अत्तकासूर : आयत नं. 1 ते 8).
    या आयातींमध्ये कुठल्याही मार्गाने जास्तीत जास्त धन प्राप्त करण्यासाठी केल्या जाणाऱ्या अनैतिक उठाठेवी संबंधी सावध करण्यात आलेले आहे. या आयातींच्या शब्दरचनेमध्ये पुन्हा-पुन्हा ही गोष्ट लोकांच्या लक्षात आणून देण्यात आलेली आहे की, तुम्ही जीवनमान उंचवण्यासाठी उलट-सुलट मार्गाने आज जरी धन गोळा करण्यामध्ये यशस्वी झालात तरी एक दिवस तुम्हाला नक्कीच त्याच्या बदल्यात नरकात जावे लागेल. इमानधारकांच्या मनाचा थरकाप उडविण्यासाठी या आयाती पुरेशा आहेत.
    3. ”ऐहिक जीवन तर एक खेळ-तमाशा आहे. वास्तविक पाहता मरणोत्तर जीवनाचे ठिकाणच त्या लोकांकरिता अधिक उत्तम आहे जे दुराचारापासून अलिप्त राहू इच्छितात. मग काय तुम्ही बुद्धीचा उपयोग करणार नाही? (सुरे अल्अनाम : आयत नं. 32).
    या आयातींचा अर्थ सांगताना सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ”जीवनाला जरी खेळ-तमाशा म्हणून संबोधिले आहे तरी याचा अर्थ असा बिल्कुल नाही की जीवनामध्ये कुठलेही गांभीर्य नाही आणि जीवन फक्त खेळ-तमाशासाठी बनविले गेले आहे. वास्तविक पाहता या आयातीचा अर्थ असा आहे की, आखिरत (मृत्यूनंतरच्या जीवना)च्या असीमित जीवनाच्या तुलनेत या पृथ्वीवरील जीवन असे आहे जसे एखादा व्यक्ती काही वेळा करिता मनोरंजनासाठी एखादा खेळ खेळतो आणि परत आपल्या वास्तविक जीवनामधील गंभीर गोष्टींकडे वळतो.” (तफहिमुल कुरआन खडं 1 - आयत नं.32, पान क्र. 533). 
    शेवटी एवढेच सांगू इच्छितो की, मानवी जीवन अत्यंत सुंदर आहे व जबाबदारीने जगण्यासाठी देण्यात आलेले आहे. हे जीवन एकदाच मिळालेले आहे. या जीवनात आपण कसे वागतो यावरच मृत्यूनंतर आपली काय गत होईल हे अवलंबून आहे. बुद्धीमान माणसासाठी एक तर्क सादर करत आहे की, आपल्या जन्माअगोदरच्या जीवनावर आपला काहीच अधिकार नव्हता व मृत्यूनंतरच्या जीवनावरही काहीच अधिकार राहणार नाही. मग या 60-70 वर्षाच्या जीवनावरच आपल्याला अमर्याद अधिकार कसा मिळू शकतो की आपण कसेही वागलो तरी काहीही फरक पडणार नाही. क्षणभर डोळे मिटून याचा विचार केल्यास आपल्याला साक्षात्कार होईल की हे जीवन अल्लाहने दिलेल्या मार्गदर्शनाशिवाय व्यतीत केल्यास त्याचे वाईट परिणाम  मृत्यूनंतरच्या जीवनावर झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून मृत्यूनंतरच्या असीमित जीवनामध्ये आनंद मिळवायचा असेल तर हे जीवन जबाबदारीने, काटेकोरपणे आणि नैतिक पद्धतीने जगणे आवश्यक आहे. जगण्यासाठी मार्गदर्शन अतिशय सोप्या शब्दात कुरआन आणि हदीसमध्ये उपलब्ध आहे. त्यातूनच हस्तगत केलेल्या संहितेला शरिया असे म्हणतात. नैतिक जीवन जगण्याचा एकमेव मार्ग शरिया हाच आहे. मग तो कोणाला आवडो किंवा न आवडो.

- एम.आय.शेख
9764000737

द्वेषपूर्ण अफवा...जहरी प्रचार-प्रसाराच्या सक्षम यंत्रणा, यामुळे जगण्याचा विचार करणाऱ्यांची निष्ठाच ढवळून रसातळाला नेण्याची ही पूर्वापार छुपी चाल आहे. सामान्य नागरिकांची सूजाण बुद्धी गहाण पडण्याची मालिका अखंडपणे भारतात आजही सुरु आहे. निसर्गचमत्कारातून आलेल्या देवांची रूपे पासून महिलांचे केशकर्तन करणाऱ्या माकडमाणूस पर्यंत... हा मंकीमॅन सापडला नाही तरी नंतर मनकीबात ची जाहिरात वाढलीच ! गोशाला-गोभक्ती, गोमांस यावर अक्कलचे वांदे करुन, संशयावरून माणसे माणसांचे मुडदे पाडू लागले. गाईला माता आणि बाईला भाजता अशी विचित्रता सरेआम झालीय. आणि आत्ता पोरंचौर्य टोळी...मग पुन्हा मरणं...  पुन्हा तेच. समाज सातत्याने दाबलेला, वंचित,पीड़ित भयप्रदच राहून विकास कुठे हरवला हा प्रश्‍न विचारू नये म्हणून अशा जीवघेण्या अफवांची द्युतक्रीडा सुरुय.
    पावसाळा सुपिकतेची नांदी घेउन येतो. शेतशिवारात, रानावनांत, मनातही सृजन, सर्जनाचा खेळ सुरू होतो... पण या पावसाच्या सुरूवातीलाच अफवांच्या भरतीला ऊधाण आले. राईपाडा, धुळे येथल्या डवरीगोसावी समाजातील 5 जणांची जमावानं निर्घृण हत्या केली. ’मुलं चोरणारी, पळवणारी टोळी आपल्या भागात आली आहे’ अशा अफवेचा हा वाईट पडसाद. मानवी मन, बुद्धी, समज, संवेदनशीलता या साऱ्या गोष्टी कोसो दूर ठेवत केवळ अफवांवरचा तत्कालीक धादांत खोटा पण पक्का विश्वास, त्याचबरोबर 
जोडीला व्यवस्थेची अल्पसंख्यांकाविरूद्धची द्वेषपूर्ण पेरणी हीच या हत्याकांडाची सरळ सोपी कारणे. अशा हत्या होताना फोटो, व्हीडीओज, पुरावे व्हायरल असताना जीव घेणाऱ्यांना जराशी भिती वाटू नये? या घटनेच्या भोवती उभ्या समुहाने मुकपणे हे सर्वमान्य करावे... म्हणजे हा पावसाळा नव्या भयप्रद घटनांची बीजे सुपिक करतोय हेच खरे! आपण सातत्याने कुणाला तरी मारलं पाहिजे ही खुनशी वृत्ती, अमानवीय मानसिकता जोमाने घट्ट रूजते आहे. गोमांसाच्या मुद्द्यावरून सुरू असलेला हा भयप्रद प्रवाह अख्लाक, पहलू, मोहसीन पासून केवळ घोड्यावर बसला म्हणून, आंबेडकरांचे गाणे वाजवले म्हणून किंवा विहीरीत आंघोळ केली म्हणून हत्या होण्यापर्यंत सुरूच आहे. माध्यमे आणि व्यवस्था यांच्यातील तीव्र समरसता, अल्पसंख्यांक, शोषीत सर्वहारा वर्गाला अधिकाधिक वंचित करत आता जगण्यापासूनही वंचित करताहेत. मारेकऱ्यांना पाठीशी घालणारे बहुमत, समुहा-समुहात अधिक तिखटपणे वाढलेला दुरावा दिवसेंदिवस अशा घटनांना सुफल वातावरण देत आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली देशाच्या राजधानीत अकराजणांची आत्महत्या आणि धर्माचा रंग लावत रंगवलेली मंदसौर मधली चिमुरडीच्या बलात्काराची घटना, अस्वस्थपणाच्याही चिंधड्या होतील असा विखारी-विषारी प्रचार अफवांनी सुरूच ठेवला आहे. मंदसौर घटनेचे अपराधी नावासकट सापडतात. पण त्यापूर्वी जुन्या फोटो पेस्टींगच्या व्हायरल अफवांनी निष्पाप तरूणांना केवळ मुस्लिम म्हणून अपराधीत्व सहन करून, देशभरातल्या धार्मिक उन्मादाची भूक भागविली जाते. या सगळ्यांना तुकड्यांना जोडत लोकलशी मुंबैकरांच नातं जीवनमरणाचं नातं यात ब्रीज कोसळून मरणं येत. कधी खड्ड्यात पडून!
    उरली संवेदना जपून कुठल्या मयतांना श्रद्धांजली द्यायची? मारले गेले ते सगळे भारतीय. मग् अफवेने असो की ब्रीज अपघाताने... उरली संवेदना जपून यांना श्रद्धांजली द्यायची मनोमन, तरी शुद्धमनांमध्ये शंकेच वादळ घोंघावतय... माणूस म्हणून, नागरिक म्हणून असणारी सहनशीलता, प्रेम नष्ट करण्याचं अलिकडे अपडेट झालेलं हे मुनवादी सॉफ्टवेअर तितक्याच सॉफ्टली, रितसर एकेक फाईल ओपन करत, प्रोग्राम लॉन्च करत आहेत. मानवतेच्या बाजूने असणारे सगळे आपण केवळ ’व्हायरस’ ठरत आहोत, तात्पुरते!! ऍन्टीव्हायरस म्हणून की काय डॉ. रिचा जैन यांच्या बोकड निर्यातबंदीची पोस्ट, बातमी सहेतुक पेरली जाते आणि उतावीळ प्रतिक्रियांचा खचाखच ढीग पुन्हा एक अल्पसंख्य समाजाविरूद्ध तीव्रतेने पडत जातो. पुन्हा मांसाहार- शाकाहार यावर वैज्ञानिक चर्चा घडविल्या जातात. लिहिते- बोलते, बांधव- बहिणींची एकमेकांवर चिखलफेक होते. सर्वांगानी उकल होते... आणि छोट्या छोट्या जातसमुह, अल्पसंख्य जमातींच्या बंदिस्त वर्गीकरण सुरू होतं...
    ख्रिश्‍चनांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभागाविषयी पद्धतशीरपणे विधान करून, त्यालाही तुफानी चर्चेला वेग आणला जातो. त्यावर झाडाझडती घडत राहते. एकूण कार्य अनेकविध जातीधर्मांच्या मुद्यावर प्रत्येक धर्मजातीला धर्मप्रीयतेकडे ओढून आणायचं. प्रत्येकाची धर्मवाटणीचा कंपू पक्का तयार करायचा, भावनिक अस्मिता, तात्पुरती कट्टरता, अंधभक्ती या गोष्टीत विशेषत: तरूणांनी गुरफटून घ्यायचं... मग विकास, ’2020 महासत्ता’ कलामांचे स्वप्न, किंवा कालाधन, अच्छे दिन यांची विस्मृती.
    गर्दीला चेहरा नसतो असे म्हणून नामानिराळे होण्यापेक्षा अलीकडे गर्दीला जात असते, धर्म असतो असे म्हणणे रास्त... पण गर्दी जेव्हा समतेची शिकवण देत वाळवंटात, चंद्रभागोतिरी जाणारी असेल, तिथे पुन्हा ’मनु’चं मोठा अशी घोकंपट्टी उधळली जात असेल तर...
    राईनपाड्याच्या भटक्या जातीतल्या, भाकरी शोधणाऱ्या जीवांची हत्या करणाऱ्या समुहाची भित्री-द्वेषी जात ही प्रस्थापित व्यवस्थेन निर्माण केलेली जात आहे तर...
    बलात्कारासारख्या घटनेतूनही धार्मिकतेचा कट्टर परिचय द्यावा असा प्रयत्न करणाऱ्यांची जात आहे तर...अशा जातीची नापिक मातीच व्हावी...
    यंदा पावसाळ्यात किमान यांचा येणारा 2019 साठीचा प्रोग्राम डेटा करप्ट करण्याची ताकत, मानवतेच्या बाजूने उभ्या असणाऱ्या सर्वांमध्ये येवो... भाकरीचा चंद्र प्रत्येकाला प्रेमाने लाभो...


- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर)
 9923030668

महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी पाण्यावर तरंगत आहे़   जनजीवन विस्कळीत झाले असून, सर्वत्र हाहाकाराची स्थिती आहे. या दोघांही शहरातील सत्ताधारी मित्र पक्षांचे हे होम पीच़  कित्येक वर्षांपासून या दोघाकडे आपापल्या शहराच्या महापालिका ताब्यात आहेत़ त्यामुळे आपसुकच या शहराच्या भल्याच्या आणि वाईटाच्या कामाचे श्रेय या दोघांकडे अधिक जातेय. मी बोलतोय भाजप आणि शिवसेनेबद्दल दोघांकडेच महाराष्ट्राची सत्ता आहे़ परंतु, काळाने दाखवून दिले की या शहरात त्यांनी कशा पद्धतीने पाणी मुरविले आहे. त्यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे आणि भावनेच्या
राजकारणात मुंबईची गटारगंगा कधी झाली हे कळालेच नाही. तर दूसरीकडे संत्रासिटी म्हणून प्रसिद्ध केलेल्या नागपूरला पाण्याने कधी वेटाळा घातला ते कळालेच नाही. त्यामुळे पाण्यात ’नाग’पूर येवून किती जणांना डसतोय ही बघण्याची वेळ आहे. खरं तर या दोन्ही प्रमुख शहराच्या अवस्थेला सत्ताधारी जेवढे जबाबदार आहेत तेवढीच येथील जनता भावनेच्या भरात यांना निवडून देणारीही जबाबदार आहे.
    आपत्ती व्यवस्थापण पूर्णपणे ढासळले आहे. त्यामुळे खरं तर नैतिक जबाबदारी स्विकारून या दोन्ही पक्षांनी आपली सत्ता सोडली पाहिजे. परंतु, अशी मागणी करणारा ठाम विरोधक सध्यातरी अस्तित्वात नाही. मिळमिळीत भुमिका घेवून कपड्यांना डाग न लागू देणारा विरोधक अजूनही ए.सी.रूमच्या तेवढा बाहेर निघाला नाही जेवढा निघणे गरजेचे आहे. अखेर न्यायालयाला याबाबत तोंड उघडावे लागले आणि सरकारवर ताशेरे ओढावे लागले. यापेक्षा मोठी नाचक्की सरकारची काय असू शकते. त्यामुळे असे म्हणावेसे वाटते की विकासाच्या नावावर करोडे रूपये निधी घेवून विकासकामे निकृष्ट करून आपले उखळ पांढरे केले. पांढरे उकळ मुठीत दाबून ठेवता येते मात्र पाणी कसे दाबता येते. पावसाच्या नावावर गोळा केलेला निधी कसा वापरला हे पाऊस पडल्यानंतर कळाले.  ’मुंबई शहर पावसाच्या पाण्यात बुडण्याची स्थिती निर्माण झाली असताना सरकार मात्र काहीच करताना दिसत नाही,’ अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या कारभाऱ्याला फटकारले.
    न्यायालयाने एखाद्या बाबतीत हस्तक्षेप केल्यास न्यायिक सक्रियतेच्या नावाने शंख केला जातो, असे नमूद करताना जेव्हा सरकार बेजबाबदारपणे वागते तेव्हा काय केले पाहिजे, असा खरमरीत सवालच सर्वोच्च न्यायालयाने केला.
    वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये सर्वच न.पा. आणि म.न.पा. यांची आर्थिक परिस्थितीची हलाकीची आहे. मात्र मुंबई याला अपवाद आहे. इशान्येकडील सात राज्यांच्या अंदाजपत्रकाच्या बरोबरीचे अंदाजपत्रक असलेल्या या मनपावर अनेक वर्षापासून शिवसेनेचा एकछत्री अमल आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करूनही भाजपला मुंबई मनपामध्ये भाजपचे पाय रोवता आले नाहीत. मुंबईमधून मिळणाऱ्या ऑक्सिजनवरच शिवसेनेचा महाराष्ट्रभर संचार असतो. अशा आर्थिकदृष्ट्या संपन्न मनपामध्ये केवळ प्रशासकीय संतुलन नसल्यामुळे मुंबईची दर पावसाळ्यात दयनीय परिस्थिती होवून जाते. स्लममधून येणारी प्रचंड दुर्गंधी, स्वच्छतेचा अभाव त्यात पावसाचा प्रादुर्भाव यामुळे अनेक लोक पावसाळ्यात मरण पावतात. परंतु, नैसर्गिक मृत्यू म्हणून त्यांची नोंद होते. त्यामुळे पावसाळ्यातील मुंबईतील गरीबांच्या जीवनमानाचे खरे चित्र देशासमोर येत नाही. सततच्या पावसाच्या सरींमुळे लहान मुलांना आणि वृद्धांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नाल्या तुंबून राहतात. दारात प्रसंगी घरात सतत पाणी साचून राहते. त्यामुळे सरदी पडश्यासारखे साधे आजार सुद्धा जीवघेणे होवून जातात. प्लास्टिकमुळे नाल्या तुंबून राहिल्याने पाण्याच्या निचऱ्यासाठी मार्ग मिळत नाही व मुंबई पाण्याखाली जाते. प्लास्टिक बंदीचा स्वागतार्ह निर्णय राज्य शासनाने घेतला मात्र प्लास्टिक उत्पादकांच्या दबावाखाली फिरवला. म्हणून प्लास्टिक ही मुंबईची कायमची डोकेदुखी होवून राहिली आहे. याच प्लास्टिकच्या समस्येने नागपूरसारख्या विस्तृत रस्ते आणि नाल्या असलेल्या शहराला वेढल्याने अर्धे नागपूर पाण्यात गेले.
    वास्तविक पाहता प्लास्टिक ही समस्या नसून कुप्रशासन आणि भ्रष्टाचार ही समस्या आहे. त्यामुळेच प्लास्टिकची विल्हेवाट वेळेवर लावली जात नाही आणि ऐनवेळेस पावसाळ्यात सामान्य नागरिकांना नको त्या अडचणींना सामोरे जावे लागते. कोट्यावधी रूपयांचा सॅनिटेशनचा फंड कोठे जातो हे सगळ्यांनाच माहित असते. मात्र राजकीय लागेबांधे असे असतात की संबंधित लोक आवाज उठवित नाहीत व सामान्य माणसाला बोलण्याची मुभा नसते. बोलल्यास त्यांना कोणी महत्व देत नाही. कोर्टाच्या निर्देशांची सुद्धा अमलबजावणी पूर्णपणे होत नाही. शासनात बसलेली मंडळी कोर्टालाही जुमानत नाही. अशी अवस्था झालेली आहे. स्वच्छ भारत अभियानावर मुंबई आणि नागपूरच्या पूरपरिस्थीतीने प्रश्‍न उपस्थित केले आहे.
एकंदर राजधानी आणि उपराजधानीची दयनीय अवस्था पाहून भंपकपणाचे राजकारण करणाऱ्या पक्षांनी नेकनियतेने या शहरांच्या मुलभूत गरजांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

- बशीर शेख
bashirshaikh12@gmail.com

नमाज कायम करणे
    आपण आणि मी कोणते गुण बळगले पाहीजेत जेणे करुन ईश्वराचे मार्गदर्शन आणि पाठींबा प्राप्त करु व त्यास पुढे चालू ठेऊ. आता पाहूया तिसरी  गुणवत्ता ‘ नमाज कायम करणे’ ज्याची कुरआनात ईश्वर वारंवार आपणास आठवण करुन देत आहे.  नमाज कायम करणे म्हणजे आपल्या मनाला वाटेल तेव्हा अदा करणे नव्हे तर ती वेळेवर अदा करणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा अजान होते तेव्हा एका मुस्लिम पुरुषाने आपले सर्व काम बाजूला सारून मस्जिदीकडे प्रस्थान करावे व त्याचबरोबर एका मुस्लिम स्त्रीने घरची सर्व कामे बाजूला ठेवून आपल्या मुलाबाळांना सोबत घेवून नमाज अदा करावी. असे का? कारण ही एक अशी प्रार्थना आहे जी आपल्यासाठी  ईश्वर आणि आपल्यामधे संबंध ठेवण्याचे काम करते. आणि आपल्यासाठी ईश्वराविषयी प्रेम, निष्ठा आणि नम्रता व्यक्त करण्याचे हे साधन आहे. हे नाते कधीही तुटू नये हीच अल्लाहची इच्छा आहे. म्हणून अल्लाहने आपल्याला सर्व परिस्थितीत दररोज प्रार्थना चालू ठेवण्याचा आदेश दिला आहे. आपण उभे राहून आपली प्रार्थना करण्यास असमर्थ असल्यास, अल्लाह तुम्हाला खाली बसून प्रार्थना करण्यास सांगतो. आपण तसे करण्यास असमर्थ असल्यास, आपण अंथरूणावर पडल्या-पडल्या प्रार्थना करावी, किंवा आवश्यक असल्यास डोळ्यांच्या हालचालीने देखील प्रार्थना करावी. जर तुम्हाला ईश्वराचे विशेष मार्गदर्शन पाहिजे असेल आणि ऐहिक जीवन व परलोक जीवनात यश हवे असेल तर जोपर्यंत आपण मृत्यूच्या पुढे जात नाही तोपर्यंत दररोजच्या प्रार्थनांचे पालन करण्याच्या कर्तव्यातून मुक्त होऊ शकत नाही. अल्लाहला तुमच्या प्रार्थनेची गरज नाही तर तुम्हाला त्याची गरज आहे जेणेकरून तुम्ही सरळ मार्गाने चालावे. परिणामत: आज काही मुस्लिम पाच वेळेची नमाज कायम करतात परंतु आजही ते अशांत का? का त्यांच्या कामात यश येत नाही? का तो अल्लाहचा गुलाम न बनता दुनियावी पशाचा गुलाम बनला आहे? कारण तो मस्जिदमध्ये नमाज तर पढतो परंतु  घरच्यांशी व बाहेरच्यांशी चांगली वर्तणूक ठेवत नाही, गोरगरिबांना दान करत नाही, कधी जकात दिली तर बँकेत ठेवलेल्या पैशाच्या व्याजाला जकातचे नाव देवून मनाची समजूत घालतो की मी ईश्वराच्या आज्ञेेचे पालन करतो पण एवढे  असून त्याच्या  कामात यश नाही. असे का?कधी डोळसपणे मनाशी खोलवर जाऊन विचार केला का? आपण नमाजमधे ईश्वराशी काय संवाद करतो? त्याला काय मागतो?  त्याचबरोबर  काही मुस्लिमांची विचारधारणा अशी  आहे की जुम्मा ते जुम्मा नमाज पडायची. कारण त्याना आज नमाज दुय्यम दर्जाची वाटते व पैसा प्रथम दर्जाचा वाटतो. मग तो कसाही येवो. मग तो हलाल असो वा हराम; त्यांना काही फरक पडत नाही. मुस्लिमांना हे समजत नाही आहे की जो संपत्ती देणारा आहे, जो खऱ्या यशाच्या मार्गाकडे अजानद्वारे आपणास वारंवार बोलावत आहे, त्या पालनकर्त्याची वाट ठोकरून तो नकळतपणे मनुष्याचा गुलाम बनत आहे. कारण त्याला भीती असते की मी नमाज कायम केली तर ह्या दुनियावी स्थान मला गमवावे लागेन आणि अगदी कहर म्हणजे घरातील कुणी व्यक्ती  कुरआनचे नियम सांगत असेल तर त्या व्यक्तीला कुरआन वाचण्यास प्रवृत्त करत नाही. आज तर बोटावर मोजण्याचे इतके  मुस्लिम पुरुष पाच वेळा नमाज पढत असतील व त्यातूनही तुरळक स्त्रीया नमाज पढत असतील. कारण त्यांचे प्रमुख कर्तव्य टीव्ही पाहणे, एकमेकांना जेवण्याची दावत देणे व लग्नात अगदी जोराने स्पर्धा लावून नटणे-थटणे ,एकमेकांची निंदा करणे हे समजून बसलेल्या आहेत. त्यांचे हे विचार आचरण कळत-नकळत पणे हेच सांगत आहेत की नमाज ने काहीच होत नाही. बरं मग पैशातूनच आपण सर्वकाही प्राप्त करु शकतो तर आज मुस्लिम समाज अधोगतीवर का? जेव्हा की पैगंबरांनी सगळीकडे  इस्लाम संबंधी जागृती केली होती तेव्हा मुस्लीम समाजाने सर्वात जास्त राज्य प्रस्थापित केले होते व ते पैगंबरानंतर सतत 600-800 वर्ष कायमही राहीले होते. पण तो आज प्रत्येक क्षेत्रात मागे का? जसे शैक्षणिक क्षेत्रात जेव्हा तुम्ही  नजर टाकाल तर तुम्हाला तिथे खालच्या दर्जाचे शिक्षण घेणारे मुस्लिमच दिसतील. आज परिस्थिती थोडीफार सुधारलेली आहे परंतु ती आधीच सुधारायला हवी होती. मुस्लिमांनी मुलांना शिक्षणात पुढे आणनाऱ्या स्त्रीला कधी शिकविलेच नाही! जेव्हा की फक्त इस्लामम सर्वप्रथम शिक्षणाचा हक्क स्त्रीलाच देण्यात आला. पण आचरणात याउलट आहे. कारण तिचे कमी वयात लग्न करुन द्यायचे मग शिकवायचेही नाही. कारण तिला सांगण्यात आले चुल आणि मुल हेच तिचे जीवन आहे. परिणामत: आज आईला मुलाला ळलीश इेरीव चा अभ्यासक्रम शिकविता येत नाही म्हणून ती त्यांना ीील बोर्ड च्या शाळेत टाकते. आणि मग ती या भौतिक दुनियेला आकर्षित होवून फक्त त्याला पैसा कमविण्याचे शिकविते. जर मुले बिघडली तर इंग्रजी भाषेला नाव ठेऊन स्वत:च्या चुकांना आवरण घालते पण खरे कारण तिच्यामधील धार्मिक शिक्षण व तांत्रिक शिक्षणाच्या कमतरतेमुळे ही परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच मुस्लिम समाज शिक्षण क्षेत्रात मागासलेला आहे . तसेच सामाजिकरित्या पाहिले तर मुस्लिम आचरणात सर्वात  कमी दर्जाचे आहेत असे इतर समाजातील लोकांचा दृष्टीकोण आहे म्हणूनच इतर कुठल्याही समाजात त्यांचे विशेष स्थान नाही. सतत स्वार्थ, बंडखोरी, एकमेकांना शिविगाळ, पैशाचे लोभी हे  त्यांचे गुणविशेष सांगण्यात येतात. जेव्हा की याउलट इस्लाम न्यायाची शिकवण देतो व प्रत्येक मनुष्याला नैतिक कर्माने माणूस बनायला शिकवितो. बाकी समाजात सोडा त्यांनी स्वत: मध्येच विघटन केले आहे जसे सुन्नी, शिया, अहले हदीस, दर्गेवाले अजून बरेच काही. ते इस्लामची एकात्मता आचरणात आणण्याऐवजी ते एकमेकांना खाली खेचण्यामधे व्यस्त आहेत. अगदी तसेच आज अरब देश दुसऱ्या अरब देशाशी भांडण्यात व्यस्त आहेत. मात्र कधी देशाच्या पंतप्रधानाने यांच्यावर अत्याचार दर्शविला असता तेव्हा मात्र काही क्षणाला मुस्लिम संघटित असल्याचा दावा करतात. त्याशिवाय अगदी कहर म्हणजे मुस्लिम समाजाने ईश्वराच्या प्रार्थनेमधे (नमाज) विघटन केले आहे जसे ते एकदम गुर्मीने म्हणतात जमातनुसार नमाज पडायची असते . काय खरंच ईश्वराने तुम्हाला वेगवेगळी नमाज पडण्याची आदेश दिला आहे? काय पैगंबराने तशी शिकवण दिली? सत्याची पडताळणी करण्यासाठी कधी कुरआन वाचन्याचे धाडस केले आहे का? ही प्रश्‍नावली ऐकून तुमचे मन अगदी सहज उत्तर देते- नाही! !!! याचे कारण म्हणजे आपणास यासाठी मौलाना/इमाम  यांनी कधीच प्रोत्साहित केलेच नाही. कुरान सामान्य मुस्लिमांनी वाचले व समजले तर  त्यांची मक्तेदारी कमी होईल. मौलाना/इमाम यांचा हा विचार आणि  मंदिरातल्या  पुरोहितांच्या विचारांमधे फारसा फरक दिसून येत नाही. तसे असले असते तर प्रत्येक मुस्लिमाला अरेबी भाषा समजली असती व कुरान समजून घेण्यात गोडी निर्माण झाली असती आणि मुस्लिम पुरुष मस्जिदीमध्ये मोमिन व मस्जिदीबाहेर आचरणात बंडखोर न बनता मोमिन बनला असता. त्याचबरोबर मुस्लिम स्त्री घरामध्ये आचरणात बंडखोर न बनता मोमिन बनली असती. तुम्ही पहाल कोणताही मनुष्य जेव्हा पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचे जेव्हा जीवन चरित्र वाचतो तेव्हा अगदी मनातून उद्गारतो मनुष्य असावा तर असा. मी जेव्हा-जेव्हा इस्लामची सत्यता मुस्लिमेत्तर लोकांना सांगते तेव्हा ते एकच प्रश्‍न घेवून बसतात इस्लाम एवढा सुंदर असताना मुसलमान वागणुकीत खराब का? मित्रांनो! मी इथे आपण किती खराब झालो हे सांगत नाही आहे तर मी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपण असे का झालो?  आपणच अधोगतीवर का? आपल्यासोबतच अन्याय का? याचे कारण म्हणजे तुम्ही दिवसा पाचवेळा जेव्हा ईश्वराला प्रार्थना करता तेव्हा त्याच्याशी काय संवाद करता? त्याला काय मागता?  तो तुम्हाला काय देतो आहे आणि तुम्हाला काय करायचे आहे? हे कधी समजून घेतले आहे का? जसे आपण ईश्वराला नमाजमधे सरळ मार्गदर्शन (हिदायत) मागतो तेव्हा ईश्वर म्हणतो तुला माझे मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते कुराणात आहे मग त्यातून आत्मसात कर व आचरणात आण. मग पुन्हा अजानद्वारे यशाकडे ये. पुन्हा मला माग. मी तुला विशेष मार्गदर्शन (तौफिक) देईन. विचार बदला परिस्थिती बदलेल. पहा आपण विचार उत्पन्न करु शकत नाही तर ते अल्लाहच आपल्या मनामध्ये  उत्पन्न करतो मात्र ते निवडण्याचे स्वातंत्र्य त्याने आपणास दिले आहे. मग कोणता विचार निवडायचा? कुठल्या मार्गावर ठाम राहिल्यास माझे कर्म आचरण सात्विक बनेल. ते समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहुया . एकदा जर आपणासमोर दारू  पिण्याची परिस्थिती निर्माण झाली असता आपल्या मनात तीन विचार येतात पहिला दारु पिली तर या दुनियेत उच्च स्थान मिळते  दुसरे आज पिऊन घेवुया उद्यापासून पिणार नाही आणि तिसरे मी पिणार नाही. कारण मला माझ्या ईश्वराने सांगितले आहे. मग दुनियेतील स्थान माझ्यासाठी दुय्यम दर्जाचे  आहे.  तुम्ही तिसऱ्या विचारावर तेव्हाच ठाम राहाल जेव्हा तुम्ही कुराण वाचाल आणि कुराण तेव्हाच वाचाल जेव्हा याचे मार्गदर्शन तुम्ही ईश्वराला मागाल. जेणेकरून तुम्ही तोच मार्ग निवडाल ज्याने तुमचे आचरण सात्विक बनेल आणि या दुनियेतील तुमचे यश जणूकाही एका वाळवंटात गुलाबाचे फुल उमलल्यासारखे असेल. आणि परलोकातील यश तुमची वाट पाहत असेल. कारण ही सात्विकता नैतिक आचरण व यश हे तुम्हाला ईश्वराने दिलेले असेल. मग तिथून तुम्हाला कोणीही खाली खेचू शकत नाही. पण तुमची श्रद्धा चुकली तर विचार चुकतात आणि विचार चुकले तर आचार चुकतात मग निश्चितच अधोगाती, अन्याय, अत्याचार याचा सामना या दुनियेत व मृत्युनंतरही करावा लागेल. यावरुन तुम्ही म्हणाल इतर लोक तर ईशमार्गावर नसून यश प्राप्त करत आहेत मग आम्हीच अपयशी का? याचे उत्तर अगदी सोपे आहे, असे की, अल्लाह आपल्याला या दुनियेत व परलोकात कायमस्वरूपी यश देऊ इच्छित आहे. मात्र ईश्वराने आपणास यशाचा मार्ग सांगूनही आपण जाणूनबुजून  अपयशी मार्ग स्वीकारतो आहे. या यशाची चव तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही ईश्वराच्या जवळ जाल आणि ती वाट दुसरी कुठलीही नाही तर नमाज आहे. ती समजून पठण केली तर तुमचे ईश्वराशी नाते अतूट बनेल. तुमच्यात कुराणविषयी गोडी निर्माण होईल. ईश्वराच्या प्रेमापोटी तुमचे आचरण सात्विक बनेल त्याच्या विशेष मार्गदर्शनाने तुम्हांला ईशमार्गावर ठाम राहण्यास मदत होईल.”श्रद्धावंत पुरुष व श्रद्धावंत स्त्रिया हे सर्व एकमेकांचे मित्र आहेत, भलेपणाचा आदेश देतात व वाईट गोष्टीपासून रोखतात, नमाज कायम करतात, जकात देतात आणि अल्लाह व त्याच्या पैगंबराचे आज्ञाधारक आहेत, हे ते लोक आहेत ज्यांच्यावर अल्लाहचा कृपावर्षाव होणारच. खचितच अल्लाह सर्वांवर प्रभावी आणि चतूर व बुद्धिमान आहे.”(कुरआन 9:71-72). ”या श्रद्धावंत पुरुष आणि स्त्रियांसाठी अल्लाहचा वायदा आहे की त्यांना अशा बागा प्रदान करील ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील, आणि ते त्याच्यात सदैव राहतील, त्या सदाबहार बागांत त्यांच्याकरिता स्वच्छ निवासस्थाने असतील, आणि सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे अल्लाहची प्रसन्नता त्यांना प्राप्त होईल. हेच मोठे यश आहे.  (कुरआन 9:71-72). हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही नमाजमधील प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घ्याल. चलातर नमाजमधील प्रत्येक श्‍लोकाचा सविस्तर अर्थ पाहूया पुढील भागात

- सीमा देशपांडे
7798981535


 गुण २ : परोक्षावर श्रद्धा ठेवणे -  (कुरआन 2: 3)
आपण आणि मी कोणते गुण बळगले पाहीजेत जेणे करुन ईश्‍वराचे मार्गदर्शन आणि पाठींबा प्राप्त करु, त्यास पुढे चालू ठेऊ. आता पाहूया दुसरी गुणवत्ता ‘ परोक्षावर  श्रद्धा’ म्हणजे अदृश्य ईश्‍वरावर विश्‍वास ठेवणे. शब्दश:, अदृश्याचा संदर्भ असा होतो की अश्या गोष्टी ज्या आपल्या ज्ञानेंद्रियांपासून वंचित (अनुपस्थित) आहेत. ’ अल्लाहने त्याचे मार्गदर्शन व संरक्षण प्राप्त करण्यासाठी याला प्रमुख अट का बरे ठरविले आहे? अदृश्य काय आहे? जसे मनुष्यात प्रामुख्याने, पाच मुख्य इंद्रिय असतात   ( ऐकणे, दृष्टी, गंध, चव आणि स्पर्श ) ज्या  गोष्टी  आपल्या या इंद्रियांपासून कळतात, अश्या गोष्टीं बद्दल कोणतेही वाद नाही, कारण आपण त्या वस्तू पाहू शकतो, ऐकू शकतो, स्पर्श करू शकतो, स्वाद घेऊ शकतो आणि गंध करू शकतो. अगदी तसेच आपण अदृश्य भावनांना सामोरे जाऊ शकत नाही व त्याची अनुभुती करु शकत नाहीत.
    याव्यतिरिक्त आपल्याकडे  ज्ञानेंद्रियांच्या  क्षमतेशिवाय  अनेक अशा क्षमता आहेत ज्या आपल्याला गोष्टी समजून घेण्यास, अनुभुती करण्यात मदत करतात. उदाहरणार्थ,जेंव्हा तुम्हाला भूक लागते तेंव्हा तुम्ही भुकेले आहात हे तुम्हांला कोणते इंद्रीय  सांगत आहे? कोणता इंद्रीय आपल्याला झोपेतून जाग आणतो? तसेच, स्त्रीला गर्भ राहिल्यास तो गर्भ तिच्या शरिराचा भाग असूनदेखील ती जाणू शकत नाही की तिच्या गर्भात काय वाढत आहे? म्हणून एक अदृश्य शक्ती जी आपल्या पाच इंद्रीयांना समजत नाही व दिसत नाही म्हणून ती उद्भवत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. म्हणून या (आयात) वचनात ज्या अदृश्य शब्दांचा उल्लेख आहे ते सर्व आपल्या ज्ञानेंद्रियांच्या क्षमते पलीकडचे आहे.
    चला एक पाऊल पुढे जाऊया. जर एखाद्या विद्यार्थ्याला बीजगणितचे समीकरण सोडवण्यासाठी दिले गेले, आणि नंतर तो किंवा तीने सोडवून उत्तर काढले, तर आपण म्हणतो की या विद्यार्थ्याने अदृश्य शोधून काढले आहे? अजीबात नाही, कारण विद्यार्थ्यांनी ठराविक नियम आणि तत्त्वे यावर आधारित उपाय योजले व उत्तर काढले. त्याचप्रमाणे, हवामानशास्त्राच्या केंद्राने उद्या पावसाळा घोषित केला असेल, तर हवामानशास्त्रज्ञांनी अनदेखीचा खुलासा केला आहे का? पुन्हा, उत्तर नाही असेच आहे, कारण त्यांनी ज्ञान आणि संशोधनावर त्यांचे निष्कर्ष काढले आहेत. तसे नसल्यास कुठल्या मनुष्य /प्रेषित /अवताराने सूर्य पूर्वेकडुन पश्‍चिमेकडे उगविन्याचे धाडस दाखविले?  पृथ्वीवर पाऊसच पडला नाही तर मनुष्य समुद्र, विहीर, तलाव, नदी याची निर्मिती करु शकतो का? हे प्रश्‍न आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात की मनुष्य यासाठी असमर्थ आहे. म्हणून या कुरआनच्या (आयात) वचनात उल्लेख केलेल्या अदृश्य शब्दांचे अर्थ निष्कर्ष आणि संशोधन या ज्ञानाने काढता येत नाही.
    आणि अखेरीस, जर एखाद्या मित्राने आपल्याला सूचित केले की आपला चोरीस गेलेला मोबाईल फोन अमक्याकडे  आणि अमूक ठिकाणी आहे, याचा अर्थ आपल्या मित्राला अदृश्य गोष्टीची माहिती आहे का? उत्तर नाही असेच आहे. तसे नसल्यास मनुष्य स्वत: व इतरांचे जन्म-मृत्यू सांगू शकतो का? अर्थातच नाही. कारण अदृश्य तुम्हाला किंवा तुमच्या सारख्या कोणालाही ज्ञात नाही. म्हणून या आयात (वचनात)मधील उल्लेखित ‘ अदृश्य’ शब्द आपल्यासाठी ज्ञात नाही. या अर्थानेच घ्यावा लागेल.
    त्याचप्रमाणे, अगदी संदेष्टे (प्रेषित) आणि दूत यांना देखील अदृश्याबद्दल  ज्ञान व जाणिव नसते. खरं तर, अदृश्याचे ज्ञान अल्लाह  सर्वशक्तिमान वगळता कोणालाही नाही. आणि फक्त अल्लाहच स्वत: निवडतो ज्यास त्याला याचे ज्ञान द्यायचे आहे. कुरआनमध्ये अल्लाह म्हणतो,”तो परोक्षाचा(अदृश्य) ज्ञाता आहे, आपले परोक्ष कोणावरही उघड करीत नाही” ( कुरआन 72:26).
    ’ त्या प्रेषिताखेरीज ज्याला त्याने (परोक्ष ज्ञान देण्यासाठी) पसंत केले असेल. तर त्यांच्या पुढे व मागे तो रक्षक ठेवतो’ (   कुरआन 72:27)
    ईश्‍वर त्याच्या ज्ञानापैकी काही  अंश आपल्या प्रेषितांना  सामायिक (शेअर) करतो आणि ते त्यांच्यासाठी पाठोपाठ जगात एक चमत्कार बनते. याचा अर्थ असा होत नाही एखाद्या प्रेषितांना परोक्षाचे पूर्ण ज्ञान आहे व आपण त्यांची उपासना करावी. कदापि नाही! !! ईश्‍वर पैगंबर मुहम्मद (स.) यांना कुरआनात म्हणतो, ”हे लोक तुम्हाला विचारतात की शेवटी ती पुनरुत्थानाची घटका अवतरणार तरी कधी? सांगा.” ”त्याचे ज्ञान माझ्या पालनकर्त्याजवळच आहे, तिला तिच्या वेळेवर तोच जाहीर करील. आकाशात व जमिनीत ती अत्यंत कठीण वेळ असेल, ती तुमच्यावर अकस्मात येईल.” हे लोक त्यासंबंधी तुम्हाला अशाप्रकारे विचारतात जणू काही तुम्ही तिच्या शोधात लागला आहात. सांगा, ”त्याचे ज्ञान तर केवळ अल्लाहला आहे पण बहुतेक लोक या सत्यापासून अनभिज्ञ आहेत.” ( कुरआन 7:187)
    ” हे पैगंबर (सल्ल.), यांना सांगा की, मी (अर्थात पैगंबर सल्ल.) स्वत:करिता कोणत्याही नफा तोट्याचा अधिकार बाळगत नाही, अल्लाहच जे काही इच्छितो ते होते आणि जर मला परोक्षाचे ज्ञान असते तर मी पुष्कळसे लाभ स्वत:साठी प्राप्त करून घेतले असते व मला कधीही एखादे नुकसान पोहचले नसते. मी तर केवळ एक खबरदार करणारा व खुषखबर ऐकविणारा आहे, त्या लोकांसाठी  जे  माझे  म्हणणे  मान्य  करतील. ”(कुरआन 7:188)
    अल्लाहवर विश्‍वास म्हणजे अदृश्य गोष्टींवर विश्‍वास ठेवण्याचे सर्वात उच्च स्वरूप, म्हणजे त्याचे स्वर्गदूत, ग्रंथ आणि न्यायाचा दिवस ह्यांवर विश्‍वास. जरी या सर्व गोष्टी आपल्यापासून पड्द्याआड ठेवल्या आहेत. तरी, आपण देवदूतांच्या उपस्थितीवर विश्‍वास करतो कारण अल्लाहने  त्यांच्या अस्तित्वाविषयी आपणास प्रेषित व ग्रंथाद्वारे सांगितलेले आहे. आम्ही पुनरुत्थानाच्या दिवसावरही(स्वर्ग-नर्क) विश्‍वास करतो कारण अल्लाहने याची पण माहिती आपणास दिलेली आहे.
    आता आणखी एका जिव्हाळ्याच्या गोष्टीचे उदाहरण बघूया. जे तुम्हाला अदृश्य ईश्‍वर कळण्यास मदत होईल. तुमच्या शरीरातील  आत्मा तुम्हाला जीवन प्रदान करतो. मग विचार करा तुम्ही तुमचे प्राण पाहीलेले आहे का? किंवा आपण त्याची चव घेउन पाहिली किंवा सुगंध घेतला किंवा त्याला स्पर्श करुन पाहिले आहे का? नक्कीच नाही! परंतु ईश्‍वराने आपल्या शरीराला जीवन देण्याच्या त्याच्या प्रभावामुळे आपल्याला आपल्या आत्म्याबद्दल कळणे शक्य झाले. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या  शरीरातल्या काही गोष्टी शोधणे आणि समजून घेणे कठीण व अशक्य  आहे, तर तुम्ही  तुमच्या इंद्रीयांमार्फत ईश्‍वराच्या अस्तित्वाची जाणीव कशा प्रकारे करू शकता? विचारात पडलात ना! परंतु, अल्लाहने आपण सर्वाना  असेच सोडून दिलेले नाही. आपणास विवेकशील मन  दिले आणी अनेक संकेत दिलेत जेणेकरून आपण त्यावर विचार करावा. अल्लाहने आपल्यासाठी (परिसरात) आजूबाजूला अशी चिन्हे मांडली व दर्शविली आहेत. त्यांचे बारकाईने निरक्षण करा, जाणीव करा आणी निष्कर्षावर पोहोचा. या विश्‍वाचा एक निर्माणकर्ता आहे. इतके तंतोतंत व काटेकोरपणे निर्माण केलेली  निर्मिती योगायोगाने स्वत:हून निर्माण होऊ शकली असती का? उलट योगायोगाने स्वत:हून तयार झालेल्या  गोष्टी यादृच्छिक असंगठित अल्पायुषी असतात. जर विश्‍वाची निर्मिती आणि परिरक्षणामागे ब्रह्मरुप शक्ती नसली असती तर सूर्य, चंद्र, तारे आणि पृथ्वी एकमेकांपासून दुभंगले असते आणि एक निर्मात्या विना, जीवन आणि संपूर्ण प्रणाली नष्ट झाली असती.
    वरील उदाहरणांवर विचार करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी मी माझ्या बुद्धीचा पूर्ण उपयोग केलेला आहे आणि मी या निष्कर्षावर पोहचले आहे की या विश्‍वाची तंतोतंत व काटेकोर निर्मिती, त्यातले जीवन आणि सौंदर्य फक्त आणि फक्त अल्लाह/परमेश्‍वर  मुळेच आहे व फक्त तोच या विश्‍वाचा निर्माता आहे. म्हणून जर प्रेषित सल्ल. यांनी  आपल्याला सांगितले की अल्लाह (एकेश्‍वरत्व) हाच विश्‍व निर्माण करणारा आहे आणि  चमत्कारांचा दावा करीत आहे तर आपण त्याच्यावर विश्‍वास ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुमच्या मनात ही निश्‍चितता कायम होते तेव्हा तुमची श्रद्धा, तुमचे आचार-विचार सुद्धा हाच दावा करतात की अल्लाहकडून मिळणारे सर्वस्व हेच अंतिम सत्य आहे, आणि मी त्याच्याच नियमावलीच्या मार्गानुसार जीवन व्यतीत करेन. मग मला पर्वा नाही आपल्या संवेदनांना (नफ्स) ते समजून घेऊ शकते किंवा नाही. पण आज मनुष्य त्याच्या हृदयावर  आपल्या संवेदनांचे आपल्या वाडवडिलांच्या विचारांचे व या दुनियावी आकर्षकतेचे आवरण घातले आहे व तो कळतनकळत पणे आपल्या अदृश्य ईश्‍वराला विसरून गेला आहे. कारण तो आज सर्वात जास्त भीती बाळगतो त्याच्या मृत्यूची. त्यामुळे तो याच संभ्रमात पडलाय की हेच अंतीम जीवन आहे. पण हे जीवन तर क्षणभंगुर आहे. ईश्‍वर म्हणतो ’ आणि हे लौकिक जीवन काही नाही परंतु एक खेळ आणि मनोरंजन. वास्तविक जीवनाचे घर तर पारलौकिक घर आहे, हाय, या लोकांनी जाणिले असते (कुरआन 29:64.)
    जेव्हा आपण आपल्या आई-वडिलांना सोडून दूर राहतो तेव्हा आपल्याला पदोपदी त्याना भेटण्याची आस लागते व त्यांच्या गैरहजेरीत आपण त्यांची आठवण व त्यांचा आदर म्हणून त्यांच्या नियमांचे पालन करतो. हेच प्रेमाचे आवरण आपण आपल्या पालनकर्त्याविषयी का बाळगत नाही? का आपण मृत्युला घाबरतो? आपण का बरे विचार करत नाही की माझा मृत्यु हा शेवट नसून त्यानंतर माझ्या जीवनाची खरी सुरुवात आहे आणि तिथे मला माझ्या ईश्‍वराला भेटायचे आहे. ही विचारसरणी आपणास मृत्युची भीती बाळगू देत नाही तर ईश्‍वराविषयी प्रेम निर्माण करते व त्याच्या नियमाचे पालन करण्यास भाग पाडते . ईश्‍वराची सदैव इच्छा हीच आहे की त्याचे भक्त श्रद्धा-विचार-आचारणाने चांगले बनावेत व मृत्युनंतर स्वर्गात जावेत.
    अशाप्रकारे, जोपर्यंत कुठलाही मनुष्य परोक्षावर श्रद्धा ठेवत नाही व न्यायाच्या दिवसाचे भय बाळगत नाही तोपर्यंत तो मोमीन बनू शकत नाही. ईश्‍वर म्हणतो, ’ त्या दिवसाच्या संकटापासून आपला बचाव करा जेव्हा तुम्ही अल्लाहकडे परत जाल, तेथे प्रत्येक माणसाला त्याने कमाविलेल्या पुण्य व पापाचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कोणावरही कदापि अन्याय होणार नाही.’  ( कुरआन 2:281)
    उर्वरित गुण पाहूया पुढील लेखात.


- सीमा देशपांडे
7798981535

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget