शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांनी पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे नेतृत्व केले, जे इंग्रजांविरुद्ध भारतातील लोकांच्या संतापाचे प्रतीक म्हणून इतिहासात ओळखले जाते. त्यांचा जन्म २४ ऑक्टोबर १७७५ रोजी झाला. त्यांचे वडील अकबर शाह-द्वितीय हे चौदावे मोगल सम्राट होते. लालबाई त्यांची आई होती.
बहादूर शाह जफर हे केवळ विद्वान-कवी म्हणून ओळखले गेले नाहीत तर त्यांनी युद्धकलेचे प्रशिक्षणही घेतले. १८५७ मध्ये मेरठ येथे ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध उठाव करणारे भारतीय सैनिक दिल्लीत पोहोचले. १ मे १८५७ रोजी जेव्हा ते लाल किल्ल्यावर दाखल झाले तेव्हा बहादूर शाह जफर यांनी १२ मे रोजी आपला दरबार चालवला आणि सम्राट म्हणून विविध नियुक्त्या केल्या आणि इंग्रजांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. नंतर, त्यांनी ग्रेटर प्रशासकीय कामकाज परिषद स्थापन केली आणि धार्मिक संबंधांची पर्वा न करता वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या क्षमता आणि निष्ठेनुसार वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या.
बहादूर शाह जफर यांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या धार्मिक भावना न दुखावता क्रांतिकारी पावले उचलली. त्यांनी आपल्या सैनिकांना आणि ‘भारतीय जनतेला’ इंग्रजांचा पराभव करण्याचे आवाहन केले. इंग्रजांच्या माघारीनंतर बहादूर शहा जफर यांनी दिल्लीबाहेर ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध बंड करणाऱ्या योद्ध्यांना निमंत्रण दिले. भारतीय योद्ध्यांनी दिल्ली गमावणार नाही असा निर्धार केला होता. पण इंग्रज दिल्ली काबीज करण्याचा कट रचून वारंवार प्रयत्न करत होते. अशा गंभीर परिस्थितीत भारतीय योद्धा आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात १४ सप्टेंबर १८५७ पर्यंत ७२ वेळा घनघोर युद्ध झाले. अखेरीस ब्रिटिश सैन्याने लाल किल्ल्यावर प्रवेश केला आणि १९ सप्टेंबर १८५७ रोजी तो पूर्णपणे ताब्यात घेतला.
बहादूर शाह जफर यांना माघार घेत आपल्या कुटुंबातील काही सदस्यांना सोबत घेऊन हुमायूनचा टोंब येथे आश्रय घ्यावा लागला, जेथे २१ सप्टेंबर १८५७ रोजी जफर यांना इंग्रजांनी अटक केली. नंतर इंग्रजांनी त्यांना गुन्हेगार घोषित केले आणि ८ डिसेंबर १८५८ रोजी रंगून तुरुंगात हद्दपार केले. त्यांच्यासोबत त्यांची प्रिय बेगम जीनत महल आणि त्यांची दोन मुलेही होती. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रंगून तुरुंगात चार वर्षे अत्यंत हलाखीचे जीवन व्यतीत केले. नंतर शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह जफर यांनी ७ नोव्हेंबर १८६२ रोजी तुरुंगातच अखेरचा श्वास घेतला.
ते स्वतःला मार्मिकपणे म्हणाले, ‘जफर तू किती दुर्दैवी आहेस! तुझ्या लाडक्या मातृभूमीत तुझ्या थडग्यासाठी किमान दोन गज जमीन असण्याचे भाग्य तुला नाही’.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment