मालवणी (मुंबई)
समान नागरी कायद्याबद्दल लॉ कमिशनने फक्त सूचना मागविल्या आहेत. लॉ कमिशनच्या संकेतस्थळावर जाऊन आपण हा कायदा कसा असावा, करावा की करू नये या विषयी सूचना देऊ शकता. समाजमाध्यमांवर समान नागरिकता कायद्याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहेत. यातून काही लोक धु्रवीकरण करण्याचा प्रयत्न करून अस्वस्थता माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला कोणत्याही नागरिकांनी बळू पडू नये आणि विनाकारण चर्चेत वेळ घालवू नये, असे आवाहन मुंबई एपीसीआरचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध वकील अॅड. करीम पठाण यांनी केले.
मालवणी येथे जमाअते इस्लामी हिंद तर्फे 9 जुलै रोजी समान नागरी कायदा जागरूकता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. पठाण बोलत होते. मंचावर मौलाना रिझवान नदवी, अन्वरभाईसह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना अॅड. करीम पठाण म्हणाले, युसीसीचा मसुदा तयार झाल्याशिवाय यावर विस्तृत भाष्य करता येणार नाही. तरी परंतु, ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे या कायद्याचा फटका सर्वांनाच बसणार आहे. विविधतेत एकता असणारा, जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे. अनेक धर्म, हजारो जाती, विविध भाषा असणारा हा देश एकसंघ आहे त्याचे मूळ कारण म्हणजे सर्वांना आपापल्या धर्म व परंपरेनुसार जगण्याची मुभा आहे. जसा एका भाषेत हा देश बोलू शकणार नाही तसाच एकाच कायद्यात राहण्याच्या मानसिकतेत हा देश असणार नाही. सर्व समाज घटकातून याचा विरोध सुरू झाला आहे. दिवाणी, फौजदारी, शैक्षणिक कायदे सर्वांसाठी एकच आहेत. मात्र प्रत्येकाची खाजगी जीवनातले काहीच कायदे वेगवेगळे आहेत. समान नागरिकता कायद्यात लैंगिक समानता, घटस्फोट, पोटगी, मालमत्ता, वारसा आणि मुलांचा ताबा यावर अधिक भाष्य केले जाईल असे वाटते. परंतु, ज्या धर्मात या कायद्याबद्दल सविस्तर आणि मानवीय कल्याण समोर ठेऊन नियम आखून दिलेले आहेत त्याला बाजूला ठेवता येणार नाही. बहुसंख्यांकांना समोर ठेऊन जर हा कायदा बनविला तर देशाच्या एकात्मतेला तडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉ कमिशनने याचा मसुदा बनविताना सर्वांगीन हित डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. तरच या कायद्याचा फायदा होईल अन्यथा इतर कायद्यासारखा हा कायदाही गुंडाळला जाईल, अराजकता माजेल आणि शेवटी कृषी कायद्याप्रमाणे हा कायदाही मागे घ्यावा लागेल, असे अॅड. करीम पठाण म्हणाले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यपूर्व इतिहासातील दाखले देत युसीसीबद्दल माहिती सांगितली. याबद्दल जे गैरसमज पसरविले जात आहेत, त्यावरही सखोल मार्गदर्शन करीत उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांचे निरसन केले.
मौलाना रिझवान नदवी यांनी इस्लामी शरिया कायद्याचे महत्त्व सांगून यावर प्रखर विचार मांडले. चर्चासत्रा दरम्यान, उपस्थित नागरिकांनी आपल्या मनातील प्रश्न विचारले. ज्याची कायदेशीर आणि समर्पक उत्तरेही अॅड. करीम पठाण यांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, महिला उपस्थित होत्या.
Post a Comment