पद्मश्री पोपट पवार यांचे प्रतिपादन
अहमदनगर
भारतात सर्व धार्मिक उत्सव, सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. विविध धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र अलिकडे समाजा- समाजात तेढ निर्माण होताना दिसत आहे. सर्व धर्मियांना एकत्र बोलावून सामाजिक सलोखा, समता बंधूता टिकविणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.
अहमदनगर येथील समस्त मुस्लिम डॉक्टर्स व सहकाऱ्यांच्या वतीने ईद-मिलन कार्यक्रमाप्रसंगी सर्व धर्मीय, डॉक्टर्स, वकील, सामाजिक कार्यकर्ते आदि मान्यवर नागरिकांसमोर ते बोलत होते. यावेळी मंचावर डॉ. बापुसाहेब कांडेकर, डॉ.एस.एस. दीपक, डॉ.रफिक सय्यद, डॉ. सचिन महांडूळे, डॉ.किरण दिपक, डॉ.नदीम शेख, डॉ.एम.के.शेख, डॉ.माजीद, डॉ.सईद शेख, डॉ. जहीर मुजावर, ऐसाचे अध्यक्ष अन्वर शेख,अॅड. फारुक बिलाल आदि उपस्थित होते.
पद्मश्री पवार पुढे म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांनाच आपण शतक महोत्सवाचे स्वप्न पाहतोय, मात्र दोन धर्मामध्ये वाद जर असाच राहिला तर त्या स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्याचे फलित काय? तेंव्हा प्रत्येकाने या विषयावर चिंता करुन चिंतन करावे. एकमेकांविषयी माणुसकी धर्म पाळावा म्हणजे, समाजात एकीचे बळ वाढेल, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ.रफिक सय्यद यांनी हिंदू-मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडा. ईद-मिलन म्हणजे स्नेह बंधू-भाव वाढीसाठी हा कार्यक्रम उत्सवाप्रमाणे साजरा होतो. समाजकंटक जे नारे देतात कि ‘हिंदू भी खतरे में है..मुस्लिम भी धोके में है... उनको मैं बताना चाहता हूँ एन.आर. लॉन मे आकर देखे हिंदू भी मजेमे हैं मुस्लिम भी मजे मे हैं, हा शायद किसी की खुर्ची है जो खतरेमे हैं, हे सांगताच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून साद दिली. यावेळी डॉ. रफीक सय्यद यांनी पैगंबरांच्या वाडमयातील सुंदर उदाहरणे देऊन सांगितले की, मानवजातीमध्ये हिंदु-मुस्लिम एकाच नौकेतील प्रवासी समान आहे व या नौकेत समाज विरोधक शक्ति छेद करुन नौका बुडविण्याचा घात करत आहे. ज्यामुळे हिंदू मुस्लिम दोघांची हानी होईल. हे समाजाने ओळखले पाहिजे, असे ते म्हणाले.
डॉ.बापुसाहेब कांडेकर, डॉ.दीपक, डॉ.सचिन महांडूळे, डॉ.मार्सिया वॉरन, डॉ.आनंद शितोळे, डॉ.सतीश सोनवणे आदिंनी राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी सर्वांची एकजूट महत्वाची असल्याचे आपल्या मनोगतामधून व्यक्त केले. प्रहार अॅकॅडमीच्यावतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सुत्रसंचालन डॉ. निखिल कुलकर्णी यांनी केले तर डॉ माजीद यांनी आभार मानले.
Post a Comment