Halloween Costume ideas 2015
2021


अलिकडेच केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाचे वय 18 वरून 21 करणारे विधेयक लोकसभेत मांडून ते मंजूरही करून घेतले आहे. त्यानिमित्ताने देशाच्या विविध भागातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. या विधेयकाचा विरोध फक्त मुस्लिमांनीच केलेला आहे असे नाही तर खा. सुप्रिया सुळेसह अनेक महिलांनी या विधेयकाचा विरोध केलेला आहे.

1- वयाच्या अठराव्या वर्षी तुम्ही देशाचा पंतप्रधान ठरवू शकता पण तुमच्या आयुष्याचा जोडीदार ठरवू शकत नाही. म्हणजे या वयात तुम्ही देशाचे भवितव्य ठरवू शकता पण स्वतः चे नाही... काय हा हास्यास्पद कायदा! 18 व्या वर्षी तुम्ही मतदान करू शकता, स्वतः चा व्यवसाय सुरु करू शकता, कायदेशीर कागदपत्रावर सह्या करू शकता. इतके सगळे महत्वाचे निर्णय या वयात घेतले जातात. म्हणजेच जी व्यक्ती कायद्याच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे संज्ञान ग्राह्य धरली जाते, ती मग या वयात जर लग्न करू इच्छित असेल तर हा हक्क कसा हिरावून घेतला जाऊ शकतो? हे मानवाधिकाराचे उल्लंघन नाही काय? 

लग्न ही नित्तांत खाजगी बाब आहे. ते कधी करावे याचा अधिकार ज्याला-त्याला असायला हवा. बरं, लिव्ह-इन-रिलेशनशिपसाठी वयाची अट नाही, म्हणजे अनैतिक मार्गाने काहीही करा ते चालेल, पण नैतिकरित्या ने समाजाने मान्य केलेला लग्न विधी केला तर तुम्ही गुन्ह्यास पात्र ठरणार. ही थट्टा नव्हे तर काय?

2- या कायद्यासाठी जे कारण दिले गेले आहे ते म्हणजे स्त्री-पुरुष समानता. पण सर्वांनाच माहित आहे कि लग्नावेळी वधू -वरात वयाचे अंतर असते जे साधारण 5 वर्ष असते आणि हे समाजातील सर्व स्तरातून मान्य आहे. म्हणजे         अप्रत्यक्षपणे मुलाच्या लग्नाची वयोमर्यादा पण पुढे वाढणार हे साहजिक आहे. मुलामुलींच्या लग्न वयातील हे अंतर का आहे ते आधी आपण जाणून घेऊयात. तर या मागे दोन कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे मुलींची मासिक पाळी प्रक्रिया लवकर सुरु होते. भारतासारख्या उष्ण कटीबंध प्रदेशात तर आणखी लवकर सुरु होते- म्हणजे साधारण 12 ते 14 या वयात. आणि तिची रजोनिवृत्ती 40 नंतर  व्हायला  सुरु होते. हे बंधन निसर्गाने स्त्रीवर घातलेले आहे. पुरुषा ला हे बंधन नाही. पुरुष 40 नंतर सुद्धा बरीच वर्ष प्रजननक्षम असतो आणि म्हणूनच लग्नावेळी मुलीचं वय मुलापेक्षा कमी असावं हे समाजमान्य आहे.

दुसरं कारण म्हणजे पुरुष हा घरातला कर्ता असल्याने त्याच्या वर आर्थिक जबाबदारी असते. नोकरीं, करिअर, घर इ.पैलूवरून त्याची पारख केली जाते. मुलींना या जबाबदाऱ्या नसतात. मग असं असताना मुलीच लग्न वय उगीच च वाढवण्यात काहीच तथ्य नाही.

3-  वयाच्या साधारण 14, वर्षापर्यंत मुली ची मासिक पाळी सुरु होते, म्हणजे  शारीरिक दृष्ट्या ती प्रजननक्षम होते. आणि आधीच जे लग्न वय होतं, म्हणजे 18... या वया पर्यंत ती मानसिकरित्या सुद्धा पक्व झालेली असते, म्हणून तर तिला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. मग जर का ती 18 व्या वर्षी मानसिक व शारीरिकरित्या परिपक्व होते असं आपण मानतो, तर मग जेव्हा या वयात ती स्वमर्जीने विवाहास तयार असेल आणि चांगलं स्थळ असेल तर तिचा लग्न करण्याचा हक्क का बरं हिरावला जावा? लग्नाचे वय उगीचच पुढे वाढवून उलट तिचे नुकसानच होणार. काय काय नुकसान होणार हे पुढील मुद्यात पाहूया :

4- नैतिक अवमूल्यन -

आजकल जिकडे तिकडे लैंगिक विचारांना प्रोत्साहित करणाऱ्या साधनांचा समाजामध्ये सुळसुळाट झालाय. टीव्ही, चित्रपट कमी होतं कि काय तर आता ओटीटी, वेब सिरीस, सगळं सहज साध्य झालंय आणि स्वस्तही झालंय. मोबाईलमधून सगळं जग च जणू उघडं नागडं झालंय. अशावेळी सर्वच तरुण पिढीला स्वतःच्या शारीरिक गरजांवर नियंत्रण ठेवणे कमालीची अवघड गोष्ट झालेली आहे. अशातच लग्नाच वय वाढत गेल्यास  शारीरिक भूक भागविण्यासाठी ही तरुण पिढी मग वाम मार्गाला लागली तर त्यास जबाबदार कोण? अलिकडे अगदी 18 पेक्षा कमी वयाच्या मुलीसुद्धा डेटिंग, विवाहपूर्व शारीरिक संबंध, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये लिप्त असल्याचे सत्य नाकारण्यासारखे नाही. अशा परिस्थिती लग्नाचे वय वाढविण्यात काय हाशिल? आधीच सामाजिक बंधने सैल झाल्यामुळे लैंगिक साहित्य सहज उपलब्ध झाल्यामुळे महिलांची छेडछाड, विनयभंग आणि बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. (हे सर्व प्रकार वाईट आहेत माहित असून ही) तरुणाई याकडे ओढली जात आहे. नकळत या गोष्टीतून गर्भपात, नैराश्य, हत्या-आत्महत्या इथं पर्यंत येऊन पोहोचतात.  यामुळे समाजाचे नैतिक पतन होते आणि हे समाजासाठी घातक आहे. मग हे सर्व टाळण्यासाठी, शील रक्षणासाठी स्वच्छ सरळ मार्ग कोणता?- अर्थातच पवित्र विवाह बंधनाचा वासनेच्या वेगाला मोकळं सोडलं तर तो बेभान सुटलेल्या बैला सारखा सर्वांना तुडवत सुटतो. तेच जर योग्य वेळी विवाह झाल्यास ही वासना विवाहाच्या पवित्र बंधनात शमून जाते व समाजाची नैतिक पातळी सुधारते.

5-लवकर लग्न झालं तर स्त्री मुलं जन्माला घालनारी मशीन बनून जाते हा ही एक गैरसमज आहे. सध्याची पिढी प्रत्येकच बाबतीत पुढारलेली आणि समजूतदार आहे. त्यांना सगळं ज्ञान आहे. संतती नियमनाचे सगळे धडे ते जाणतात. त्यामुळे लवकर लग्न झाले तरी मुली त्यांचे शिक्षण सुरु ठेवू शकतात, नोकरी ही करू शकतात, योग्य वेळी संततीचा निर्णय घेऊ शकतात.

6- या लेखातील सगळ्यात महत्वाचं विश्लेषण म्हणजे : कमी वयात लग्न होणाऱ्या 90% मुली या गरीब घरातल्या असतात. म्हणजे याचं मूळ हे देखील देशाच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीत लपलेले आहे. वर्तमान व भाविष्यातील आर्थिक विवंचणेतून मुलीचे लग्न लवकर उरकले जाते. देशात लोकांना नोकऱ्या नाहीत, शेतकरी रोज मरतोय, गरिबी वाढतच चाललीय, विकासाची फक्त हवाच आहे. आणि अशा परिस्थितीत सरकार फक्त पुतळे, मंदिरे यावर भरमसाठ खर्च करून स्वतःची पाठ थोपटून घेतंय, धार्मिक राजकारण करून स्वतः ची मतपेटी सुरक्षित करतंय. लोकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर हवा जेणेकरून आर्थिक धास्तीपोटी मुलींची लग्न लवकर उरकली जाणार नाहीत. नोकरी, आर्थिक सुबत्ता असली कि तरुण पिढी आपोआपच लवकर लग्न करून स्थिरावते... हे सिद्ध करण्या साठी खाली काही प्रगत देशातील मुलामुलींचे लग्नाचे किमान कायदेशीर वय दिले आहेत.

अमेरिकेसारख्या प्रगत देशात लग्ना साठी मुलाचे किमान वय 18 व मुलीचे 16 आहे. (किमान एका पालकाच्या संमतीने)

कॅनडामध्ये मुलामुली दोन्ही साठी किमान वय 16 वर्षे आहे. युरोपमधील हस्टेनिया येथे हीच मर्यादा फक्त 15 वर्षे आहे (पालकांच्या संमतीने )

7- या बाबतीत इस्लाम चा दृष्टिकोन काय आहे, हे ही इथे जाणून घेऊयात. इस्लाममध्ये प्रत्येकच बाबतीत स्त्रीला वैयक्तिक स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. वारसा हक्क, पुनरविवाह, खुला ( काडीमोड) आणि याचप्रमाणे.. वयात आल्यानंतर स्वमर्जीने निकाह करण्याचा हक्क. भारतासह इतर देशात हे हक्क अठरा व एकोणीस व्या शतकात देण्यात आले, परंतु इस्लाममध्ये हे हक्क 1443 वर्षापूर्वी देण्यात आले आहेत.

त्यामुळे मुलीच्या संमती व सही शिवाय निकाह होत नाही. हुंडा घेणे हराम असल्याने मुलीच्या वडिलांना आर्थिक दबाव नसतो कुंडली वगैरे प्रकार नसल्याने निकाह सोयीस्कर होतात. मुलामुलींच्या वयातील अंतरासाठीही काही निकष नाहीत. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या सुविद्य पत्नी हजरत खतीजा रजि. ह्या लग्नाच्या वेळेस त्यांच्यापेक्षा 15 वर्षे वयाने मोठ्या होत्या.

इथे प्रेषित सल्ल. यांची एक शिकवन आवर्जून सांगावी वाटते, ती म्हणजे निकाह सोपे करा आणि व्याभिचार अवघड. आणि सरकारच्या निर्णयाने बरोबर याच्या उलट परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणूनच सामान्य जनतेने सरकारला ओरडून सांगायची ही वेळ आहे कि हे विधेयक नुकसानदायी आहे जेणेकरून सरकारच्या भ्रमाचा भोपळा फुटावा.

8- अलीकडच्या काळात आय व्ही एफ, फर्टीलिटी सेंटर इ. चे किती पेव फुटले आहे. 10 एक वर्षा पूर्वी हे क्वचितच लोकांना माहित होतं. याचाच अर्थ असा कि करिअर आधी लग्न उशिरा, मूल उशिरा अशी मुलींची मानसिकता झाली आहे. मग याचा परिणाम व्यंध्यत्व, गुंतागुंतीची गर्भ धारणा, नैराश्य इ. मध्ये होतो. आता कायद्यानेच हे किमान वय आणखी वाढवले कि वरील समस्या आणखीचं वाढण्याची भीती आहे. त्यातल्या त्यास समाधानाची बाब अशी की सदरचे विधेयक हे सिले्नट कमिटीकडे पाठविण्यात आल्यामुळे यावर सांगोपांग चर्चेअंती अंतीम निर्णय होईल. संसदेच्या सिले्नट कमिटीच्या सदस्यांच्या विवेकावर आपण विश्वास ठेवून हा कायदा प्रत्यक्षात येणार नाही, अशी आशा करूया. 

- मिनाज शेख, 

पुणे


 झारखंड विधानसभेत ’मॉब व्हायलंस अँड मॉबलिंचिंग बिल 2021’ झाले मंजूर. 
अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह मध्येही इस्लामोफोबियाच्या विरूद्ध विधेयक.


मागच्या आठवड्यात झारखंड विधानसभेमध्ये ’मॉब व्हायलंस अँड मॉबलिंचिंग बिल 2021’ मंजूर करण्यात आले. आता हे बिल राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह मध्येही इस्लामोफोबियाच्या विरूद्ध एक बिल मंजूर करण्यात आले असून ते सुद्धा आता सिनेटमध्ये चर्चेसाठी पाठविले जाणार आहे. सिनेटमध्ये डेमोक्रेटस्चे बहुमत असल्यामुळे हे विधेयक तेथेही मंजूर होईल अशी आशा आहे. डेमोक्रेट महिला सिनेटर इलहान उमर यांना रिपब्लिकन सिनेटर लॉरेन बोपट यांनी मुलतत्ववादी म्हणून संबोधल्यानंतर अमेरिकेमध्ये मोठा गदारोळ झाला, ज्याची परिणीती सकृतदर्शनी या बिलाच्या रूपाने समोर आल्याचे दिसून येते. या बिलाचे वैशिष्टये म्हणजे हे बिल फक्त अमेरिकेतच मुस्लिमांविरूद्ध होणाऱ्या घटनांची दखल घेणार नाही तर जागतिक स्तरावर मुस्लिमांविरूद्ध होणाऱ्या घटनांची दखल घेणार आहे. या बिलाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर अमेरिकन सरकारकडून एका विशेष दूताची नेमणूक केली जाईल. तो दूत देश आणि विदेशात घडणाऱ्या मुस्लिमांविरूद्धच्या घटनांची दखल घेईल आणि त्याची वर्गवारी करून त्याच्यावर वार्षिक अहवाल सरकारला सादर करील, ही माहिती बिगर सरकारी संस्थांन, तसेच मीडियामधून रिपोर्ट झालेल्या बातम्यांमधून गोळा केली जाईल. 

सकृतदर्शनी या कायद्याचा उद्देश चांगला दिसतो, परंतु हे बिल त्या देशाकडून सादर केले जाणे, ज्याने इराक, अफगानिस्तान आणि लिबियासह अनेक मुस्लिम देशांवर आक्रमण करून तेथील नागरिकांची जीवाची आणि मालमत्तेची अपरिमित अशी हानी केली ही दुर्दैवी बाब आहे. 

हे बिल जरी कायद्यात रूपांतर झाले आणि जरी त्यात नमूद केल्याप्रमाणे विशेष दूत नेमला गेला आणि त्यांने वार्षिक रिपोर्ट जरी सादर केला तरी इस्लामोफोबिया अंतर्गत घडणाऱ्या घटनांमध्ये फारसा फरक पडेल असे वाटत नाही. केवळ एक दबाव म्हणून या कायद्याचा उपयोग होऊ शकेल. या सर्व पार्श्वभूमीवर इस्लामोफोबिया म्हणजे काय? याबद्दल या आठवड्यात चर्चा करणे अनाठायी होणार नाही. म्हणून हा लेखन प्रपंच. 

इस्लामोफोबिया म्हणजे काय?

इस्लाम म्हणजे इस्लाम धर्म, फोबिया म्हणजे भीती. म्हणजे इस्लाम धर्माची भीती असा याचा अर्थ होतो. आता ही भीती खरी आहे का खोटी आहे? हे आपण पाहू. 

हे सत्य आहे की अलिकडे काही लोकांना इस्लामची अवास्तव भीती वाटते. इस्लामची म्हणण्यापेक्षा मुस्लिमांविषयी अवास्तव भीती वाटते, असे म्हणणे जास्त संयुक्तीक राहिल.  ही भीती वाटण्याचे कारण म्हणजे काही देशांकडून अशी भीती मुद्दाम निर्माण केली जाते. विशेष म्हणजे अशी भीती निर्माण करण्यामागचे कारण धार्मिक नसून आर्थिक आहे, ते कसे हे समजून घेणे गरजेचे आहे. 

विसाव्या शतकामध्ये दोन महासत्ता होत्या. 1. अमेरिका 2. सोवियत रशिया. अमेरिका ही भांडवलशाही लोकशाहीचे नेतृत्व करत होती तर सोव्हियत रशिया साम्यवादी राज्यव्यवस्थेचे. 1991 साली सोव्हियत रशियाच्या विघटनानंतर साम्यवादी रशियाचे विघटन झाले. जगात आजमितीला कुठल्याही देशात शुद्ध स्वरूपात साम्यवादी अर्थव्यवस्था अस्तित्वात नाही. 1991 साली शीतयुद्ध संपल्यानंतर अमेरिकेने ’न्यू वर्ल्ड ऑर्डर’ची घोषणा केली. त्या अंतर्गत भांडवलशाही अर्थव्यवस्था ही जगाच्या प्रत्येक राष्ट्रात अस्तित्वात आली. व्याज हा या अर्थव्यवस्थेचा पाया असून, यात गरजू लोकांचे शोषण अगदी त्यांच्याच मर्जीने केले जाते. गरजवंत आपल्या मर्जीने कर्ज घेतात आणि ते फेडता येत नसल्याने ते फेडण्यासाठी पुन्हा नव्याने कर्ज घेतात व कर्ज फेडत-फेडतच मरून जातात. या अर्थव्यवस्थमध्ये श्रीमंतांची संपत्ती फारसे श्रम न करता (व्याजामुळे) वाढत जाते तर गरीबांची संपत्ती सर्व प्रयत्न करूनही न वाढता कमी होत जाते. या व्यवस्थेचे चटके सहन न झाल्याने आजपर्यंत लाखो लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 

याला पर्याय म्हणून व्याजरहित इस्लामी अर्थव्यवस्थेची चर्चा अलिकडे जगात मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पूर्व गव्हर्नर एस.रघुराम राजन यांनीसुद्धा या व्यवस्थेचे समर्थन केलेले आहे. या अर्थव्यवस्थेचे सविस्तर विवेचन मौलाना सय्यद अबुल आला मौदुदी रहे. यांनी विसाव्या शतकामध्ये अनेक पुस्तके लिहून केलेले आहे. युरोपमध्ये सुद्धा या पर्यायी अर्थव्यवस्थेबद्दल आकर्षण वाढत असून, अगदी लंडन सहीत अनेक शहरांमधील बँकामध्ये व्याजविरहित बँकिंग व्यवस्थेचे काऊंटर सुरू करण्यात आलेले आहे. या व्यवस्थेवर मुस्लिमच नव्हे तर अनेक बिगर मुस्लिम लेखकांनी सुद्धा चिंतन, मनन सुरू केलेले असून या विषयावर त्यांनी मुस्लिमांपेक्षा जास्त पुस्तके लिहिलेली आहेत व सातत्याने लिहिली जात आहेत. यावर संशोधन सुरू असून, व्याजाधारित अर्थव्यवस्थेला पर्याय म्हणून व्याजविरहित इस्लामी अर्थव्यवस्था कशी उभी करता येईल, यावर विचार मंथन सुरू आहे. आज जरी हा विचार ’व्यवस्था’ म्हणून मांडण्याइतपत प्रगत झालेला नसला तरी आज ना उद्या तो कुठल्या ना कुठल्या देशात प्रत्यक्षात लागू करण्यात येईल यात शंका नाही. एकदा का हा विचार प्रत्यक्षात आला आणि लोकप्रिय झाला तर भांडवलशाहीचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही व आपल्या व्यवस्थेचे धिंडवडे आपल्याच डोळ्यासमोर याची देही याची डोळा पहावे लागतील, या भीतीतून इस्लामविषयक मुद्दाम भीतीदायक वातावरण निर्माण केले जात आहे. इस्लामोफोबिया पसरविण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे आणि ही भीती पसरविण्यामध्ये सर्वात मोठा पुढाकार स्वतः अमेरिकेनेच घेतलेला आहे, ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. 

इस्लामोफोबिया पसरविण्याचे दूसरे कारण नैतिक आणि अनैतिक जीवन व्यवस्थेमधील द्वंद्व आहे. चंगळवाद आणि अमर्याद व्यक्तीस्वातंत्र्यातून निर्माण झालेली अनैतिक जीवन व्यवस्था आजमितीला युरोप आणि अमेरिकेमध्ये स्थिरावलेली आहे. या जीवन व्यवस्थेतील फोलपणा व मानवतेला होत असलेली हानी इस्लामी जीवन व्यवस्थेच्या तौलनिक अभ्यासामुळे एव्हाना स्पष्ट झालेली आहे. त्यामुळे युरोप आणि अमेरिकेमध्ये इस्लामविषयी वाढते आकर्षण लपून राहिलेले नाही.   आपलेच नागरिक आपल्याच व्यवस्थेला कंटाळून इस्लामकडे आकर्षित होत असल्यामुळे त्यातून निर्माण झालेल्या भीतीतून त्यांना इस्लाम स्विकारण्यापासून रोखण्यासाठी म्हणून इस्लाम आणि मुस्लिमांच्याविरूद्ध मोठ्या प्रमाणात भीती निर्माण करणारे मटेरियल रात्रंदिवस जनतेसमोर सादर केले जात आहे. 

इस्लामोफोबिया निर्माण करण्याची गरज

इस्लाम हा धर्म आणि व्यवस्था दोन्ही आहे, म्हणून  कुठल्याही देशात इस्लाम आधारित अर्थव्यवस्थेचे समर्थक सरकार येऊ नये यासाठी अमेरिका रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून दक्ष असते. त्यासाठी अगदी पाश्चिमात्य लोकशाही पद्धतीने म्हणजे बॅलेट पेपरवर निवडून आलेले इस्लामप्रिय सरकारेसुद्धा पाडली जातात. याचे ताजे उदाहरण इजिप्त आहे. अरबस्प्रिंग नंतर तहेरीर चौकाच्या आंदोलनातून इजिप्तमध्ये 51 टक्के मत घेवून निवडून आलेल्या मोहम्मद मुर्सी सरकारला पाडून इजिप्तची सुत्रे अमेरिकेच्या बटिक असलेल्या सेनाप्रमुख अब्दुल फतेह अल सिसी याच्या हाती दिले हे आहे. 

आजपासून 1443 वर्षापूर्वी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ज्या कल्याणकारी, समतामूलक, व्याजमुक्त अशा आदर्श समाजरचनेसाठी मक्कामध्ये जे आंदोलन सुरू केले होते त्याला तेव्हा ज्या कारणासाठी विरोध झाला होता ते कारणही आर्थिकच होते. आज जो 21 व्या शतकात जो विरोध होत आहे तो ही आर्थिकच आहे. इस्लामने त्यावेळेही म्नका शहराच्या व्याजाधारित अर्थव्यवस्थेला जे आव्हान दिले होते तेच आजही कायम आहे. ते अरबस्थानामध्ये जसे यशस्वी झाले तसे आज ना उद्या जगात इतरत्रही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, याची खात्रीशीर भीती अमेरिका आणि त्याच्या भांडवलशाही समर्थकांना वाटत आहे. तसेच आपल्या अर्थव्यवस्थेतील फोलपणा आणि इस्लामी अर्थव्यवस्थेतील ठोसपणा याची पुरेशी कल्पना असल्याने त्यातून इस्लामोफोबिया पसरविण्याची गरज निर्माण झालेली आहे. 

इस्लामविषयक वैचारिक भीती

अमेरिकेमध्ये इस्लामविषयक भीती 1993 साली प्रकाशित झालेल्या ’्नलॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ या पुस्तकामुळे सर्वप्रथम निर्माण झाली. हे पुस्तक सॅम्युअल फिलिप्स हंटिंग्टन या अमेरिकी लेखकाने लिहिलेले आहे. या पुस्तकातून त्याने इस्लामविषयक अशी मांडणी केली आहे की, ’’यापुढे जागतिक स्तरावर युद्धे देशा-देशात होणार नाहीत तर इस्लाम आणि इतर संस्कृतीला मानणाऱ्या देशांमध्ये होतील. त्यात पाश्चिमात्य देशांना जगावरचे आपले वर्चस्व गमवावे लागेल.’’ इस्लामविषयक भीती निर्माण करणारे दूसरे पुस्तक सुद्धा अमेरिकेच्याच मायकल एच.हार्ट या लेखकाने लिहिलेले असून, त्याने द हंड्रेडस नावाच्या पुस्तकातून स्वतः ख्रिश्चन असूनही झिजस क्राईस्ट (अलै.) यांच्या नावा अगोदर क्रमांक एकवर इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद सल्ल. यांचे नाव घेऊन जगावर सर्वात जास्त प्रभाव टाकणाऱ्या 100 व्यक्तींची यादी बनविली. यातूनही इस्लामच्या सत्यतेची ओळख अमेरिका आणि युरोपच्या जनतेला झाली. ती ओळख पुसली जावी म्हणून इस्लामोफोबिया पसरविण्याची गरज निर्माण झाली. 

युरोप-अमेरिकेच्या वैचारिक विश्वामध्ये खळबळ माजविणारा तीसरा लेखकही अमेरिकन असून त्याचे नाव डॉ. जोसेफ अ‍ॅडम पिअरसन असे आहे. त्याने उघडपणे असे म्हटले की, ’’जे पाश्चिमात्य लोक असा विचार करून घाबरत आहेत की, अरबांच्या हातात अणुबॉम्ब आल्यास काय होईल? त्यांना या गोष्टीची कल्पनाच नाही की शांतीचा इस्लामी अणुबॉम्ब त्याच दिवशी जगावर पडला आहे ज्या दिवशी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा जन्म झाला होता.’’ 

खऱ्याला खरे म्हणणाऱ्या या सर्व अमेरिकी लेखकांच्या भविष्यवाणीतून स्पष्ट झाले होते की, इस्लामच्या नैतिक शक्तीसमोर पाश्चिमात्य देशांची आर्थिक आणि लष्करी शक्तीसुद्धा पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांची ही भविष्यवाणी 15 ऑगस्ट 2021 रोजी खरी ठरली. जेव्हा अफगानिस्तानमधून 20 वर्षे लढूनही विजय न मिळाल्यामुळे अपमानास्पदरित्या अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांना तेथून माघार घ्यावी लागली. 

इस्लामोफोबिया पसरविण्यामध्ये मीडियाची भूमिका

जेव्हा इस्लामोफोबिया पसरविण्याचा निर्णय झाला तेव्हा अमेरिका आणि युरोपने आपल्या हाती असलेल्या सर्व मार्गांचा या कामासाठी उपयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रमुख भूमिका मीडियाने बजावली. जागतिक मीडियाची सुत्रे अमेरिकेच्या हाती असल्याने मीडियाला या कामासाठी जुंपण्यात आले आणि रात्रंदिवस मीडिया इस्लाम आणि मुस्लिमांच्या विरूद्ध दुष्प्रचार करू लागला. इस्लामोफोबियाची एक वैश्विक मोहिम सुरू झाली. त्यात आपल्या देशातील मीडियानेही त्वेषाने भाग घेतला. याच मोहिमेचा एक भाग म्हणून भोळ्या-भाबड्या इमाम सदृश्य लोकांना स्टुडिओत बोलावून त्यांना वेडे वाकडे प्रश्न विचारून, त्यांच्यावर सामुहिक शाब्दिक आक्रमण करून, त्यांना निरूत्तर केल्याचा देखावा तयार करून लोकमनावर असे बिंबवण्यात मीडियाला बऱ्याच प्रमाणात यश आले की, ’इस्लाम हा एक मध्ययुगीन धर्म असून, त्याला मंजूर असलेली व्यवस्था जुनाट असून 21 व्या शतकातील आधुनिक प्रश्नांना हा धर्म आणि या धर्माच्या व्यवस्थेमध्ये उत्तरे शोधून काही हाती लागणार नाही.’ 

अगोदरपासूनच जगातील बहुसंख्य लोक इस्लाम संबंधी अनभिज्ञ असल्याने त्यांच्यावर मीडियाच्या या दुष्प्रचाराचा जबरदस्त परिणाम झाला. त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला की इस्लामी व्यवस्था ही एक प्रतिगामी व्यवस्था आहे. मात्र भांडवलशाही समर्थकांचे दुर्दैव असे की, सोशल मीडियाचा शोध लागला आणि इस्लामच्या बदनामीचे मेनस्ट्रीम मीडियाचे गणित पार बिघडून गेले. सोशल मीडियातून सत्य मांडले जाऊ लागले व ज्यांची सारासार विवेक बुद्धी शाबूत आहे अशा लोकांच्या लक्षात मेनस्ट्रीम मीडियाची चालाखी आली. ज्याचा परिणाम असा झाला की, इस्लामचा रास्त अभ्यास करून त्याचा स्वीकार करण्याकडे युरोप आणि खुद्द अमेरिकेचा कल वाढला. 

इस्लामच्या मुलभूत शिकवणी उदा. शांती, सन्मार्ग, समानता, न्याय, व्याजमुक्त व्यवस्था, महिलांचे अधिकार, जकात, नैतिकता, नशाबंदी, अश्लीलतेवर प्रतिबंध, परदा पद्धती, घर फोडणाऱ्या वाईट सवयींवर प्रतिबंध, हलाल-हरामची व्यवस्था, भ्रष्टाचाराला लगाम, बंधुभाव इत्यादी मुल्यांवर मीडियात चर्चा न होतांना सुद्धा लोकांच्या अभ्यासातून इस्लामची ही वैशिष्ट्ये ठळकपणे लक्षात आली. या उलट गोहत्या, बहुपत्नीत्व, जनसंख्या वृद्धी, जिहाद, दाढी, टोपी, हिजाब, लवजिहाद, अजान, लाऊड स्पीकर, मदरसे, मध्ययुगीन मुस्लिम शासकांचे अत्याचार इत्यादी मुद्यांवर मीडिया अनावश्यक चर्चा घडवून आणते, हे सुद्धा लोकांच्या लक्षात आले. म्हणून इस्लामफोबियाच्या विरूद्ध जनमत तयार होत असून झारखंड आणि अमेरिकेमध्ये इस्लामोफोबियाच्या विरूद्ध निर्माण केले गेलेले कायदे हे सकारात्मक पाऊल असल्यामुळे त्यांचे स्वागत करणे आवश्यक आहे. शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, ऐ अल्लाह! आम्हा भारतीय मुस्लिमांना एवढे बळ दे की आम्ही कल्याणकारी इस्लामच्या शिकवणीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवू शकू. आमीन. 

- एम.आय. शेख



दक्षिणपंथी राजकारणाच्या वाढत्या दबावामुळे, भारतातील अनेक राज्यांनी धर्म स्वातंत्र्य अधिनियम बनविले आहे. दुर्दैव हे आहे की, हे सगळे कायदे, धर्म आणि आस्थेच्या स्वातंत्र्याचा संकोच करीत आहेत. यांचा घोषित उद्देश कथित धर्मपरिवर्तन थांबविणे आहे. आपले संविधान आपणास धर्माला मानने, त्याच्यावर आचरण करने आणि त्याचा प्रसार, प्रचार करण्याचे स्वातंत्र्य देतो. या कायद्यांचा दुरूउपयोग अल्पसंख्यांक समुदायाला भेडसावणे, धमकावणे आणि त्रास देण्यासाठी केला जात आहे. असाच कायदा कर्नाटक राज्यात बनविण्यासाठी प्रस्तावित आहे आणि हा ही कायदा इतर कायद्यांप्रमाणे बनविला जात आहे. 

असले कायदे बनविणाऱ्या राज्य सरकारांच्या टार्गेटवर ख्रिश्चन आणि मुस्लिम अल्पसंख्यांक आहेत. सध्यस्थितीत ख्रिश्चन यांचे सर्वात मोठे शिकार बनत आहेत. मागील चार दशकांपासून देशात ख्रिश्चनांविरोधी वातावरणनिर्मिती केली जात आहे. अगोदर नन आणि पादरी यांच्यावर हल्ले सुरू केले आणि नंतर सामान्य ख्रिश्चनांवर सन 1990 च्या दशकामध्ये रानी मारिया यांची हत्या केली गेली. अशाच हल्ल्यात सगळ्या मोठा आणि भयावह हल्ला 1999 मध्ये पास्टर ग्राहम स्टेंस आणि त्यांच्या दोन निरागस मुलांना जाळले जाणे. गुजरातच्या डांग, मध्यप्रदेशच्या झाबुआ आणि ओडिशाच्या कंधमाल मध्ये ख्रिश्चनांवर हल्ले करणे असे प्रकार बरेच दिवस चालत राहिले. प्रचार असा केला गेला की ख्रिश्चन मिशनरी, दलित आणि आदिवासींना जोर-जबरदस्तीने आणि लोभ लालसेने ख्रिश्चन बनवत आहेत.

1970 च्या दशकात स्वामी असीमानंद यांनी डांग, गुजरात मध्ये, स्वामी लक्ष्मणानंद यांनी कंधमाल, ओडिशामध्ये आणि आसाराम बापूच्या समर्थकांनी झाबुआ, मध्यप्रदेशशात आदिवासी भागात आपले आश्रम स्थापित केले. वनवासी कल्याण आश्रम आणि विश्व हिन्दू परिषदेचे त्यांना संपूर्ण समर्थन आणि सहकार्य प्राप्त होते. बजरंग दल यांच्यासोबत होते. बजरंग दलाचेही दारासिंह उर्फ राजेंद्र पाल याने पास्टर स्टेंस यांची हत्या केली होती. यावेळी ते जेलमध्ये या अपराधी शिक्षा भोगत आहेत. हे सगळे निवडणुकीत लाभ मिळविण्यासाठी तसेच आदिवासी लोकांना आपल्या झेंड्याखाली आणण्याचा सांप्रदायिक शक्तींच्या अभियानाचा एक भाग होता. यासोबतच, आदिवासींचे हिन्दूकरण करणयासाठी आदिवासी भागात शबरी आणि हनुमानाची मंदिरे उभारण्यात आली आणि शबरी महाकुंभ आयोजित केले. या आयोजनामध्ये आरएसएसच्या नेत्यांची प्रामुख्याने उपस्थिती असायची.  

या आरोपात कोणते तथ्य नाही की, आदिवासींचे जोर-जबरदस्तीने व लालसेने धर्मपरिवर्तन केले जात आहे. ख्रिश्चन धर्म भारतात अनादीकाळापासून आहे. असं म्हटलं जाते आहे की, 52 ईसवीमध्ये सेंट थॉमस यांनी मालाबार तटावर चर्चची स्थापना केली होती. याप्रमाणे भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रवेश जवळपास 2 हजार वर्ष पूर्वीच झाला होता. सन 2021 च्या जनगणनेनुसार, भारतामध्ये ख्रिश्चनांची एकूण लोकसंख्या 2.3 टक्के आहे. लोकसंख्येत त्यांच्या टक्केवारीची गेल्या पाच दशकात थोडीशी घसरण झाली आहे. सन 1971 मध्ये ते लोकसंख्येच्या 2.60 टक्के होते. सन 1981 मध्ये 2.44 टक्के, 1991 मध्ये 2.34 टक्के, 2001 मध्ये 2.30 टक्के आणि 2011 मध्ये 2.30 टक्के.  पास्टर स्टेंस यांच्या हत्येच्या घटनेच्या तपासासाठी त्यावेळेसचे केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांनी वाधवा आयोगाची स्थापना केली होती. आयोग या निष्कर्षावर पोहोचला होता की, ओडिशाच्या क्योंझार आणि मनोहरपूर भागात जिथे पास्टर स्टेंस सक्रीय होते, तिथे ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत कुठलीच वाढ झाली नाही. तथ्य आणि आकडे काहीही सांगत असले तरी, सांप्रदायिक संघटना वारंवार असा प्रचार करत आहेत की, मिशनरिज धर्मपरिवर्तन करत आहेत आणि हा प्रचार लोकांच्या ध्यानीमनी बसला आहे. अशी धारणा ही मनात घर करून आहे की, मिशनरीजना विदेशातून पैसा मिळत आहे. आम्ही हे सगळं जानतो की, विदेशातून येणारा पैशाचे नियमन एफसीआरए अंतर्गत होते आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला या संबंधात पूर्ण माहिती असते. सुरूवातीला ख्रिश्चनांविरोधी हिंसा आदिवासी क्षेत्र आणि गावांपर्यंतच होत होती. हळू-हळू ती लहान शहरांनाही शिकार बनवत आहे. कान्वेंट शाळांवर हल्ले होत आहेत. नुकतेच मध्यप्रदेशच्या गंजबासौदा येथे एका कान्वेंट शाळेवर हल्ला झाला. आतापर्यंत कान्वेंट शाळा उच्च गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी ओळखल्या जात होत्या. आता द्वेष इतका वाढला आहे की, त्या शाळांवर हल्ले केले जाऊ लागले आहेत. जे लोक हे हल्ले करत आहेत ते तर केवळ मोहरे आहेत. या हल्ल्यांच्या पाठीमागे ते लोक आहेत जे द्वेष पसरवत आहेत. सांप्रदायिक राजकारणी असे मानतात की ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम विदेशी आहेत. महात्मा गांधी यांनी लिहिले होते की, प्रत्येक देश असा मानतो की त्याचा धर्म अन्य कोणत्याही धर्माएवढाच चांगला धर्म आहे. खरेच की भारताचे महान धर्म त्याच्या लोकांसाठी पुरेसा आहे आणि त्यांना एक धर्म सोडून दूसरा धर्म स्वीकार करण्याची गरज नाही. यानंतर ते भारतीय धर्मांची यादी सांगतात. ख्रिश्चन धर्म, ज्यू धर्म, हिन्दू धर्म आणि त्याच्या विभिन्न शाखा तसेच इस्लाम आणि पारसी धर्म भारतातील जीवित धर्म आहेत. (गांधी कले्निटड वर्क्स, खंड 47, पृष्ठ 27-28). खरे तर सर्व धर्म वैश्विक असतात आणि त्यांना राष्ट्रांच्या सीमांमध्ये सीमित केले जाता येत नाही. आजच्या जगात हिन्दू पूर्ण विश्वात पसरले आहेत. धर्म स्वातंत्र्य विधेयके / अधिनियमांच्या मागे सांप्रदायिक राजकारण आणि त्याचा दबाव आहे. ज्याच्यामुळे ’दुसऱ्यांशी द्वेष करा’ या अभियानाला नव्या स्तरावर पोहोचविले जात आहे. या सारखा कायदा कर्नाटक राज्यात बनविला जात आहे. यामुळे भारतातील ख्रिश्चनांप्रती द्वेषाच्या भावनेत वाढ होईल आणि आपल्या देशातील एकतेला तडा देणारी प्रवृत्ती मजबूत होईल. 

जे लोक धर्मपरिवर्तन करत आहेत त्यांच्याबद्दल असे म्हणावे की, त्यांना भीती दाखवून धमकावले जाते आणि ते लालसेपोटी असे करत आहेत, खरे तर असे म्हणणे त्यांचा अपमान करणे आहे. काय लोक आपल्या मर्जीनुसार धर्मपरिवर्तन करू शकत नाहीत? कायद्याने, सामाजिक आणि नैतिक मापदंडानुसार प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार आहे की तो आपल्या पसंतीनुसार धर्म निवडावा आणि त्याचे आचरण करावे.  

आपल्या संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी आपल्या याच अधिकाराचा वापर करताना हिन्दू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्विकारला होता. हे दुर्दैव आहे की आम्ही हिन्दू धर्मातून ख्रिश्चन धर्म परिवर्तन करण्याला एक अपराध समजत आहोत परंतु,  अन्य धर्मांचा त्याग करून हिन्दू धर्म स्विकारणाऱ्याला घर वापसी संबोधले जात आहे. नुकतेच वसीम रिजवीने हिन्दू धर्म स्वीकारला आणि आपले नाव जितेंद्र त्यागी ठेवले. याला सकारात्मकतेने पाहिले गेेले.  

मागील काही वर्षांपासून चर्चेस आणि ख्रिश्चनांच्या प्रार्थना सभांवर हल्ले होण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. मात्र कंधमाल सारखा व्यापक हिंसाचार जरी होत नसला तरी ख्रिश्चनांविरूद्ध हिंसा सुरू आहे आणि ती वाढत आहे. आपण  सर्वांनी हे स्वीकार केले पाहिजे की, प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म निवडण्याचा अधिकार आहे. असे समजून आम्ही एका मानवीय आणि नैतिक समाजाचे निर्माण करू शकू. एक असा समाज जो लोकांच्या व्यक्तीगत अधिकारांचा सन्मान करत आहे. 

- राम पुनियानी

(मूळ इंग्रजी लेखाचे हिंदीत भाषांतर अमरिश हरदेनिया यांनी केले तर हिंदीचे मराठी भाषांतर बशीर शेख, एम.आय.शेख यांनी केले) (लेखक आयआयटी मुंबई शिकवित होते आणि सन 2007 च्या नेशनल कम्यूनल हार्मोने पुरस्काराने सन्मानित आहेत. )


खाजगी वाहतुकीचे राज्यात दररोज 40 अपघाती मृत्यू !


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने व सरकारच्या नीष्काळजीपणाने संपूर्ण हद्दी पार केल्याचे दिसून आले. कारण एसटी कर्मचाऱ्यांचा संप हाताळण्यात सरकार पुर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येते.तब्बल 54 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळे राज्यात निरंकुश, बेकायदेशीर खाजगी वाहतूक खुलेआम सुरू आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्यात रस्ते अपघातामध्ये वाढ झाली असून दररोज 40 प्रवाशांना अपघातामध्ये आपला प्राण गमवावे लागले आहेत. यावरून असे दिसून येते की एसटी संपामुळे बेकायदेशीर खाजगी वाहतूकदारांना सरकारने खुली सुट दिली की काय असे वाटत आहे. 

महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात 2663 अपघात झाले. या अपघातामध्ये 1180 प्रवाशांचा मृत्यू तर 2774 प्रवासी जखमी झाले. हा आकडा जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. एसटी संपामुळे काळी-पिवळी जीप,मॅक्सीकॅब,वडाप, टेम्पो-ट्रॅव्हलर, खासगी बस यांनी बेधडक खुली प्रवासी वाहतूक सुरू केली आहे आणि यावर सरकारचे काहीच नियंत्रण नसल्याने अपघातात मोठ्या वाढ होतांना दिसत आहे. कारण या वाहनांमध्ये नियमबाह्य पद्धतीने क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबले जातात. यामुळे रस्ता सुरक्षा नियम पायदळी तुडवून अपघात वाढतांना दिसत आहेत. नोव्हेंबर महिन्यात सरासरी पेक्षा अधिक अपघात आणि मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.खाजगी वाहनचालक संपाचा पुर्णपणे फायदा घेत आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांतुन प्रवास, वेगाने वाहने चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबने,गाडी चालवताना मोबाईलचा वापर करने, पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालवणे ही रस्ते अपघाताची मुख्य कारणे आहेत. नोव्हेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात 81 मृत्यू, नाशिकमध्ये 72 मृत्यू, पुणे 65 मृत्यू, अहमदनगरमध्ये 52 मृत्यू,, नागपूर जिल्ह्यात 44 मृत्यू ,औरंगाबादमध्ये 41 मृत्यू तर मुंबई शहरात 31 मृत्यू ह्या वाढत्या अपघातांना एसटी कर्मचाऱ्यांचा संपच कारणीभूत असल्याचे दिसून येते. महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा संप पुर्णपणे हाताळण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसुन येते आणि त्यांचाच संपूर्ण फायदा खासगी वाहतूक चालत घेत आहेत.परंतु खासगी वाहतूक सुरक्षित नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. एसटी जर सुरळीत सुरू रहाल्या असत्या तर यदाकदाचित एवढे अपघात टाळता आले असते. कारण महाराष्ट्रातील संपूर्ण प्रवाशांचा एसटी वर एवढा दृढ विश्वास आहे की अपघात नाहीच्या बरोबरीनेच असतात. त्यामुळे सर्वसामान्यांना एसटीचा प्रवास सुरक्षित, सुलभ, समाधानी व आनंददायी वाटतो. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी व महाराष्ट्र सरकारने प्रवाशांच्या बाबतीत संपूर्ण हद्दी पार केल्याचे दिसून येते. 

परीवहन मंत्री अनिल परब ठोस पाऊल उचलत नसल्याने ते राज्यातील प्रवाशांच्या प्रती निष्क्रीय दिसतात. त्याचप्रमाणे सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे सामंजस्य नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप्निलष्ट बनला आहे. आता शंका आहे की परब परिवहन मंत्री आहेत की आघाडी सरकारचे परिवार मंत्री आहेत.54 दिवसात करोडो प्रवाशांचे हाल झाले आणि होत आहेत. त्याच सोबत महाराष्ट्राचे करोडो रुपयांचे नुकसान सुध्दा झाले. तरीही संपकरी कर्मचारी अडुनच आहे. महाराष्ट्रात तब्बल तीन नामांकित पक्षांची सरकार(महाविकास आघाडी)असुनसुद्धा संपावर तोडगा निघता-निघत नाही हे महाराष्ट्रातील प्रवाशांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. आता महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न आहे की खासगी वाहतूकदारांसोबत सरकारची साठगाठ तर झाली नसेल! कारण अजूनपर्यंत लालपरीची चाके रुळावर आलेली दिसत नाहीत. त्यामुळे सरकारला आग्रहाची विनंती आहे की खासगी वाहतूकीचे वाढते अपघात रोखण्यासाठी एसटीचा संप ताबडतोब संपुष्टात आणावा. 

एसटीच्या संपामुळेच रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे कारण आहे. राज्यात सुरक्षित व सुलभ प्रवास सरकारकडुन मिळत नसल्याने महाराष्ट्रातील तळागाळातील प्रत्येक प्रवासी अत्यंत दु:खी व चिंतेत आहे याकडे सरकारने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.

आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते.कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने महाराष्ट्रातील संपूर्ण प्रवाशांचे जनजीवन विस्कळित झालेले आहे. त्यामुळे जनतेसमोर प्रश्न आहे की लालपरी कोणासाठी व कुणाची! कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत.ते सरकार व एसटी महामंडळाचा प्रश्न आहे. परंतु यात संपूर्णपणे भरडल्या जात आहे सर्वसामान्य नागरिक.महाराष्ट्रातील 12 कोटी 94 लाख लोकांनी कोणते पाप केले की गेल्या दिड महिन्यांपासून त्यांचा प्रवास एसटी महामंडळाने किंवा सरकारने बंद केला. एसटी महामंडळाचा कोणताही प्रश्न असो तो सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी जर महाराष्ट्राच्या 12 कोटी 94 लाख लोकांना धारेवर धरणार असेल तर ही सरकारकडून व एसटी महामंडळाकडून महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर हत्याच म्हणावी लागेल. कारण आता एसटीच्या संपामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या नाकातोंडात पाणी शिरले आहे. दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या काळात एसटीचा संप म्हणजे नागरिकांच्या प्रती संपकऱ्यांची मनमानीच म्हणावी लागेल. कर्मचाऱ्यांच्या मागण्या वाजवी असाव्यात व त्या मान्य पण व्हाव्यात यात दुमत नाही व याला माझे समर्थन सुध्दा आहे. परंतु जर संपकरी एसटी कर्मचारी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा गळा दाबून आपल्या मागण्यांसाठी अडुन असेल तर हे बरोबर नाही. कारण एसटीच्या संपामुळे आटोचालक, फेरीवाले,चायवाले, छोटे-मोठे व्यवसायीक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.पहीला कोरोना काळ गेला, नंतर दुसरी लाट आली, आता ओमिक्रानचा प्रवेश आणि आर्थिक संकट या संपूर्ण बाबींनी महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. आता एसटीच्या संपाने त्यात भर टाकुन सर्वसामान्यांचे वाटोळे करीत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गरीब, सर्वसामान्य,आबाल वृध्द, लहान मोठे,नाती-गोती टीकवीने व विद्यार्थी या सर्वांना एकसुत्रीत बांधून ठेवण्याचे काम लालपरीने नेहमीच केले आहे. एसटीच्या या दीर्घ काळीन संपाने महाराष्ट्रातील जनतेचा मनस्ताप जास्तच वाढल्याचे दिसून येते. 

आतापर्यत संपूर्ण महाराष्ट्रातील जनता एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात पाठीशी उभी होती.परंतु आता संपाने सरळ सर्वसामान्यांवर उलट प्रहार केल्यामुळे सर्वच स्तरातून संपाचा निषेध होतांना दिसत आहे.कारण एसटी बंद असल्याने शाळेत जाण्याकरिता विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त आहे, रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो, कामगार-कर्मचाऱ्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खाजगी वाहन चालक यांची चांदी असल्याचे दिसून येते.सध्याच्या परीस्थितीत ट्रॅव्हल्स वाल्यांनी महाराष्ट्रातील प्रवाशांकडून खुली लुट सुरू केल्याचे दिसून येते. ह्या सर्व घटना सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.हे चालय तरी काय! एसटीचा प्रवास म्हणजे 10 किंवा 20 हजार लोकांपर्यंत मर्यादित नसुन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील 12 कोटी 94 लाख प्रवाशी नागरिकांचा प्रश्न आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सरकारच कारणीभूत असल्याचे दिसून येते.हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट व कायदा ह्या संपूर्ण बाजु सरकार जवळ आहे.मग सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला एवढा कालावधी का लावावा? सरकार ठोस निर्णय का घेत नाही? सरकारला नागरिकांच्या व्यथा दिसत नाहीत काय? सरकारने राजकारणाला जास्त महत्त्व न देता एसटी ताबडतोब सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आताही काही बिघडले नाही.एसटी कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत त्या सरकार सोबत बोलनी करून किंवा कायद्याच्या चाकोरीतून करायला हव्यात. यासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरू नये असे मला वाटते .मी सरकार कडून व संपकरी एसटी कर्मचाऱ्यांकडुन हीच अपेक्षा करतो की जास्त वेळ न लावता लालपरीला पुर्ववत करावे.यातच सर्वाचे खरे हित आहे.

- रमेश कृष्णराव लांजेवार, नागपूर

 मो. 9325105779



गेल्या दोन वर्षांपासून कोरोना, डेल्टा, आणि आता नव्याने येऊ घातलेल्या ओमिक्राॅन  या विषाणूंमुळे सर्वत्र संभ्रमावस्था व भय निर्माण झाले आहे, कोरोनामुळे अनेक नातेवाईक, आप्त, मित्र, शेजारी यांच्यापैकी बळी पडलेले रुग्ण आणि त्यांच्या हलाखीच्या बातम्या किंवा अफवा ऐकून सर्वसामान्य माणूस घाबरून व हडबडून गेला होता,

त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून समाजात औदासिन्य आणि नैराश्यता यांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. त्यातून मनोरुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाण्याची भीतीही निर्माण झाली आहे.कितीही प्रयत्न केला तरी वृत्तपत्रांतील तसेच दूरदर्शन वरील व समाज माध्यमातून कोरोनाच्या बातम्या आणि दृश्ये पाहून सर्वसामान्य माणसाचे मन सैरभर होते. त्यामुळे समाजमनाची एकाग्रता भंग पावते. त्यातच हे मानवनिर्मित संकट असून जागतिक जैविक युद्घाची नांदी आहे की काय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात मोठ्या प्रमाणावर उभा राहिला आहे. चीन ने पुकारलेले हे जैविक युद्ध आहे, असे माध्यमातून ऐ्कल्यापासून तर सर्वसामान्य माणूस मोठ्या प्रमाणावर औदासिन्याच्या आणि नैराश्याच्या गर्तेत जावू लागला आहे. 

खरं तर शरीराचे आरोग्य म्हणजेच संपत्ती आहे. ही संपत्ती मिळण्याकरिता प्रत्येक माणसाला एकाग्रता जरूरीची असते. स्वास्थ्य म्हणजे तरी काय ? ज्याचे चित्त 'स्व' मध्येच राहते तो स्वस्थ. आपले चित्त स्वभावतः 'स्व' कडून इतरत्र जात असते. कोठूनही आवाज आला की आपण तिकडे लक्ष देऊ लागतो. समाजात काही अघटीत घडले की एकाग्रता भंग पावते. एखादे आकर्षक दृश्य समोर आले की आपली नजर तिथे खिळते. अर्थात या झाल्या शरीराच्या बाहेरच्या गोष्टी. शरीरात कुठे दुखले-खुपले की आपले लक्ष शरीराच्या त्या-त्या भागाकडे जाते. मनाविरूद्ध काही घडले की, आपला अपमान झाला असे वाटते. मग त्याच विचाराने पुन्हा पुन्हा आपले मन त्रस्त होते. आपले आर्थिक नुकसान झाले, किंवा प्रिय व्यक्तीचा वियोग झाला, तर भावनेचे उमाळे वारंवार येऊ लागतात. तसेच, काही सामाजिक घटनांची स्मृती आपल्याला छळत राहते. या सर्वांमुळे आपले शारीरिक, मानसिक अथवा सामाजिक स्वास्थ्य बिघडते व आपण अस्वस्थ होतो. आपल्या मनाला नैराश्य येऊ लागते. गेल्या दीड दोन वर्षात कोरोनाच्या संकटांमुळे अनेकांचे स्वास्थ्य पूर्णपणे बिघडले आहे.

जागतिक आरोग्य संस्थेने स्वास्थ्याची व्याख्या केली आहे. स्वास्थ्य म्हणजे केवळ आजार अथवा अपंगत्व यांचा अभाव एवढेच नसून शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती म्हणजेच स्वास्थ्य. अशी ही व्याख्या आहे. या पार्श्वभूमीवर स्थिर पद्धतीचे व्यायाम म्हणजे जीममध्ये जाऊन वेटलिफ्टींग, स्प्रिंग एक्झरसायझेसन,तर चल पद्धतीचे व्यायाम म्हणजे चालणे,धावणे, पोहणे, सायकल चालविणे, तसेच तोल सांभाळता येणे यासारखी विशिष्ट कवायती, लवचिकता येण्यासाठी योगासने व सूर्यनमस्कार यांची सवय करावी. यामुळे स्नायूंचा व सांध्यांचा कडकपणा कमी होऊ शकतो. अर्थातच प्रकृती स्वस्थ राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनाची प्रसन्नता!म्हंटलंच आहे,..." मन करारे प्रसन्न| सर्व सिद्धीचे कारण||"

जीवनात ज्याला कुठेही रस दिसत नाही; बाह्य जीवनातील रसांचा आस्वाद घेण्याएवढी रसनिष्पत्ती ज्यांत होत नाही तो नीरस म्हणजे निराश माणूस. जीभ कोरडी पडली की चव समजत नाही. जिभेवर जोपर्यंत ओलावा/किंवा रस असतो, तोपर्यंतच तोंडाला चव असते, आणि मनुष्याला खावेसे वाटते. तसेच, जीवनात सर्व अंगांचा रस चाखण्याच्या बाबतीत शरीरात शक्ती असावी लागते व ती रसरूपाने प्रकट व्हावी लागते अन् खाल्यानंतर त्याचा प्रथम रस होतो आणि अन्नाचे सेवन होत-होत अस्थी तयार झाल्या की पुढे अस्थींमधील मज्जा तयार होतात हे चक्र शरीरात सतत चालू असते.

"पळा पळा कोण पुढे पळे तो" अशी सध्याची अवस्था आहे,जीवनातील अति धावपळीमुळे किंवा अतिप्रमाणांत असलेल्या - इच्छा,हाव किंवा वासनांमागे पळण्यांत माणसाची शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च होते, अर्थात त्यामुळे मनुष्य स्वास्थ्य हरवून बसला आहे,  पण गेल्या दोन वर्षांपासून  कोरोनामुळे माणसाचे पळणेच बंद झाले आहे. त्यामुळे त्याला काही साध्य करता येत नाही. यामुळे माणसाला नैराश्य येते. काही करावेसे न वाटणे, म्हणजे चलनवलनांत आलेला अडथळा, बसल्या जागेवरून उठावेसे न वाटणे, डोळे मिटून पडावेसे वाटणे, कोणाशी बोलू नये असे वाटणे, माझी इच्छा नाही, मला काही नको- अशा तऱ्हेची प्रतिक्रिया येणे, हे सर्व प्रकार लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र पहायला मिळाले. कोरोनाविषयी सतत येणारे डोक्यातले विचार थांबतच नाहीत व डोके भणभणायला लागते व यांतून नैराश्य येते. अशी परिस्थिती सर्वत्र पहायला मिळाली,

आपण नुसताच  बसून वेळ वाया घालवतो आहे. या विचारांमुळे, बर्‍याच लोकांना नैराश्य व औदासिन्य आले. पण लक्षात घ्या की काहीही न करण्याची एक कला आहे. तीला समजून घेणे आवश्यक आहे.म्हणजे पहा मजा म्हणून, फन म्हणून काहीतरी मनाला आवडेल ते करायचे, कामात व्यग्र नाही म्हणून निराश होऊ नका. ‘क्या बडा तो दम बडा', ही म्हण लक्षात घ्या. नैराश्य किंवा औदासिन्य हे काही आज नवं नाही. तरीही त्या रोगाची लक्षणे जाणून घ्यावीत. जीवनातील चढउतार सर्वांच्या परिचयाचे असतात. परिस्थितीनुसार, कधी आनंदित होणे, कधी दु:खी होणे, कधी चिंतित होणे स्वाभाविक होय. पण जगण्यांत स्वास्थ्य उरले नाही. स्वतःहून काही करण्याची इच्छाच नाही. जीवनांत रस उरला नाही असे सतत वाटू लागले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, ही भावना दीर्घ काळपर्यंत तशीच राहिली किंवा पुन्हा पुन्हा जाणवू लागली तर ते अधिक हानीकारक आहे, कोरोनाचा संसर्ग व प्रत्येक वेळचे लॉकडाऊन यामुळे झोप कमी किंवा खूपच जास्त येणे, मन एकाग्र न होणे, जी गोष्ट सहज करता येत असे,ती आत्ता जमेनाशी होणे, छोट्या, छोट्या गोष्टींचा राग येणे, स्वत:वर नियंत्रण ठेवता न येणे, अन्नावरची वासना एकदम उडणे, जगण्याचा कंटाळा येणे, शारीरिक पातळीवर थकवा व मानसिक पातळीवर गोंधळ उडणे, निर्णय घेणे अवघड होणे, असुरक्षित वाटणे, धडाडीने काही करावे अशी इच्छाच न होणे आदी लक्षणे ही केवळ भीतीमुळे निर्माण झालेली समस्या आहे. एक प्रकारचा भयगंड समाजमनामध्ये मोठ्या प्रमाणात पसरू लागला. समाजाच्या संवर्धनाच्या दृष्टीने हे वाईट व घातकच आहे . हा भयगंड घालविण्यासाठी समुपदेशनाची मोठी गरज आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सरकारतर्फे अशा समुपदेशनासाठी काही योजना आखल्या पाहिजेत, शिवाय समाजातील जाणत्या नागरिकांनी एकमेकांना आधार दिला पाहिजे.मानसिक स्वास्थ्यासाठी जवळच्या माणसाचा आधार आणि समुपदेशन यांची मुख्यतः गरज असते.

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत)

९व्या रिफॉर्मेशन कप फुटबॉल टुर्नामेंट मुंब्रा मध्ये जमाअत ए इस्लामी हिंद मुंब्राचे अध्यक्ष यांच्याद्वारे दिलेला संदेश


खेळणे हा नैसर्गिकपणा आहे. खेळण्याचा जौहर स्वाभाविक आहे. मग तो पक्षी, प्राण्याविषयी असो किंवा मानवांच्या बाबतीत.  आपण पाहतो कि योग्य परिस्तिथीत पक्षी आणि प्राणी देखील संधी मिळताच उड्या मारतात,धावतात, खेळतात.         खेळ असो किंवा जीवनातील इतर कोणतेही कार्य, त्यात सहभागी होण्यासाठी उत्तम आरोग्य ही पूर्वअट आहे. खेळण्याच्या थेट संबंध चांगले स्वास्थ याच्याशी आहे. खेळ असो कि जीवनातील इतर एखादे कार्य व संघर्ष याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो.

इस्लामी दृष्टिकोनातून आरोग्य आणि तंदुरुस्ती देखील उपासनेसाठी आवश्यक आहे. सत्यधर्म इस्लामचा प्रचारासाठी,नमाज, रोजा, हज आणि सत्याचा विरोध करणाऱ्या अत्याचारींशी होणारा  जिहाद हा संघर्ष असो या सगळ्यांसाठी स्वास्थ आणि आरोग्य जरुरी आहे.म्हणूनच सृष्टी निर्मिकाचे प्रिय आणि आपले प्राण अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांना मुसलमान तंदरुस्त आणि निरोगी हवे होते.

त्यांचे कथन आहे

"दुबळ्या मुसलमान पेक्षा शक्तिशाली मोमीन बरा"ते स्वतः आणि त्यांचे सहकारी त्या काळातील वेगवेगळे खेळ खेळायचे. म्हणून इस्लामच्या थेट शिकवणीत गतीने चालणे,धावणे,कुस्ती,पाण्यात पोहणे,नेमबाजी,उंटाची रेस,घोडदौड, भाला फेकणे इत्यादी शिकवणी संबंधित प्रेषितांची शिकवण आढळते.      

आज, आपल्या सर्वांना आरोग्याची काळजी घेण्यासंबंधित इस्लामिक सूचनांसह, खेळांना प्रोत्साहन देणे आणि क्रीडा संबंधित क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्याचे महत्त्व अगदी वैद्यकीय आणि विज्ञानाच्या शिकवणी मार्फत पण कळले आहे. जमाते इस्लामिक हिंद मुंब्रा इस्लामी तत्वे आणि मर्यादा असलेल्या वेगवेगळ्या मैदानी खेळांना प्रोत्साहन देते, मुलांचा खेळात सहभाग झाल्याने आरोग्य व स्वाभाविकपणा जपण्यात मदत होते आणि वेगवेगळ्या वाईट सवई व्यसन यापासून सुरक्षित राहतात मग ती तंबाकू,ड्रग्स इत्यादी असो कि मोबाईल सुरफींग आणि प्रोनोग्राफी. 

आपण खेळातून काय शिकतो?

* आपले ध्येय साध्य करणे.

* स्वार्थ सोडून उद्देश साध्य करण्यासाठी सांघिक कार्य कसे केले जाते.

* इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून पुढे खेळा. तुमचा उद्देश साध्य करण्यासाठी, क्षमा करा.

* यश मिळविण्यापासून मागे हटू नका आणि पराभूत झालेल्यांच्या चांगल्या प्रयत्नांचे कौतुक करा. आत्मचिंतन करा आणि पुढे खेळ चालू ठेवा. 

हे सर्व गुण मुस्लिमांमध्ये जन्माला यावेत, जेणेकरून त्यांनी या जगात आपली जबाबदारी "सृष्टी निर्मिकाचे मार्गदर्शनवर आधारित सर्वोत्तम समाज,माध्यम मार्गीय समाज" ही भूमिका बजावू शकतील, अशी या शिकवणी मार्फत इस्लामची इच्छा आहे.

2012 ईसवी सनापासून पायात बूट नाहीय,गोलकोसवर धड नेट नाही, बांबू बांधून सुरु केलेले रिफॉर्मशन कप फुटबाल टूर्नामेंट आज देशपातळीवरचा चषक बनला आहे. आपण आज त्यासाठी जमा आहोत.घरी बसून, स्वतःच्या जगात आनंदी राहून, काहीही बदल होत नाही.

अंधाराला शिव्याशाप देऊन काहीही बदलणार नाही. मुंब्रा शहरात खुप काही चांगलं आहे आणि त्यासोबत काही वाईट गोष्टीही आहेत. त्यांना फटकारून काही होणार नाही. आपल्या सगळ्यांनी आपल्या समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढायचं आहे. समाज बदलण्यासाठी आपली भूमिका निभावण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे.आपले कौशल्य आणि विशेष गुण अल्लाहच्या मार्गात घाला, भौतिक नफा-तोटा याच्या वरती उठून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चांगल्या परिवर्तनासाठी कार्य करा. न्याय आणि संतुलित,प्रामाणिक,आनंदी भारतीय समाज घडवण्यासाठी.

जमाअत ए इस्लामी हिंदचे सहकार्य करा

मुंब्रा शहराचा कायापालट करण्यासाठी अतिशय पराकाष्ठा आणि प्रयत्न करत आहे.

अल्लाहने तुमच्यापैकी प्रत्येकाला काही ना काही कौशल्य दिले आहे, प्रत्येकामध्ये काही ना काही विशेष गुण ठेवला आहे.आपल्या त्या विशेष गुण आणि वेळेचा काही भाग इस्लामच्या फायद्यासाठी खर्च करू या.आपल्याला ज्या प्रकारचा न्याय,समता आणि बंधुत्वावर आधारित  चांगला समाज आणि जग निर्माण करायचे आहे ते केवळ विचार करून किंवा इतरांना शाप देऊन साध्य होणार नाही.त्यासाठी इस्लामच्या शिकवणीनुसार प्रथम स्वतःला घडवावे लागेल आणि त्यानुसार मग जग निर्माण करावे लागेल. 

जेव्हा प्रिय पैगंबर मक्केच्या खोऱ्यात एकटे उभे होते, तेव्हा तुमच्यासारख्या काही तरुणांनी  त्यांचे नेतृत्व स्वीकारले, आपले गुण आणि कौशल्य त्यांच्या स्वाधीन केले,आणि त्यांचा आदेशानुसार पराकाष्ठा करू लागले तेव्हा त्याचा परिणाम काय झाला हे आपल्या सर्वांना माहीत आहे.

दारू, जुगार, नाचगाणी,निर्मिक शिवाय काल्पनिक देवांची पूजा यांच्या व्यसनात गुरफटलेला, स्त्रियांचा आदर न करणारा समाज बघता बघता जगाचा तारणहार झाला. त्यांना जाग आली तर काही वर्षातच अरबस्तानची भूमीच नाही तर जगाचा कायापालट झाला.बघता बघता जगाला आपल्या डमरुवर नाचवणारे रोम आणि पर्शिया सारखे अत्याचारी साम्राज्यांचा सत्तेवरून हाकलून न्याय राबवणारे आणि बंधुत्व निर्माण करणारे शासक बनले.युवा शक्ती फार मोठी शक्ती आहे. समाजात तेच बदल घडवू शकतात. म्हणूनच प्रत्येक अत्याचारी शासन त्यांना दारू,जुगार,  नशा,नाचगाणे आणि सेक्स यामध्ये अडकवून ठेवण्याचे प्रयत्न करते.

या, जमात इस्लामी हिंदला या देशाची व्यवस्था बदलायची आहे, न्याय, बंधुत्व, प्रेम या तत्वावर आधारित समाज निर्माण करायचा आहे,आमच्या या कार्याला सगळ्यांनी साथ द्या.बदलत्या मुंब्राचे साक्षीदार बना. 

जे आमच्या संघटनेत सामील होऊन साथ देवू शकतात त्यांनी सोबत यावे, ज्यांना भाग न घेता एकत्र चालता येते ते भल्या कार्यासाठी आमच्या सोबत चालू शकतात. त्यांनी सोबत चाला. आपले ट्यालेंट परिवर्तन घडवण्यासाठी लावा. ते, आणि ज्यांना हे पण येत नाही त्यांना आपल्या जागी राहून आमच्यासाठी निदान प्रार्थना करता येते त्यांनी ती करावी.आम्ही अल्लाहवर विश्वास केला तोच आपल्यासाठी पुरेसा आहे. हे तर आपले सौभाग्य कि तो आपल्या कार्यासाठी ज्याला इच्छितो त्याला निवडतो. अल्लाहच आमचा पालनकर्ता, प्रेषित आमचे नेतृत्व आणि कुरानच आमचा मार्गदर्शक, जिहाद (पराकोटीची पराकाष्ठा) हाच आमचा मार्ग आहे. कुराणाच्या  शिकवणीला अंमलात आणणे हीच मानवता आहे. याशिवाय जे पण मानव विचारातून निर्माता तत्वांवर धर्म किंवा जीवनमार्ग उदंड लोकांनी बनवले आहेत ते फक्त मानवाला मार्गभ्रष्ट करू शकतात.शोषण आणि छळ करणारे आहेत.

- सैफ अस्रे

मुंब्रा (ठाणे)



हजरत अरबाज बिन सारिया (र.) म्हणतात, एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) हे आम्हाला प्रवचन देत होते. जे ऐकून आमचे मन घाबरून गेले आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आम्ही म्हणालो, ‘हे प्रेषिता! हे तर समारोपीय प्रबोधन वाटते. आम्हाला शिकवण द्या.’

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहशी भीत राहा. त्याचे आज्ञापालन करा. तुमच्यावर एखाद्या गुलामाला जरी उत्तराधिकारी नेमले असेल तरी देखील त्याची अवज्ञा करू नका. माझ्यानंतर तुमच्यापैकी जे हयात असतील त्यांच्यामध्ये बरेच विरोध-प्रतिविरोध असतील. अशा वेळी तुमच्यावर हे बंधनकारक असेल की तुम्ही माझ्या उपदेशांचे आणि माझ्यानंतर येणाऱ्या खलीफांचे पालन करावे. (धर्मात) नवनवीन पद्धती निर्माण करू नका. हे वाट चुकणारे कृत्य असेल.’’ (अबू दाऊद)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ‘‘मी तुम्हास अशा तेजस्वी मार्गावर सोडले आहे की ज्याची रात्रसुद्धा दिवसाप्रमाणे प्रकाशमान आहे. या मार्गावरून माझ्यानंतर भरकटरा स्वतःच उद्ध्वस्त होईल.’’

प्रेषित मुहम्मद (स.) ईद आणि शुक्रवारच्या नमाजप्रसंगी प्रवचन देत असत आणि कधी कधी आपल्या अनुयायांना संबोधितदेखील करीत असत. अल्लाहने त्यांना म्हटले होते की,

‘‘त्यांना समजावून सांगा आणि असा उपदेश देत जा जे त्यांच्या मनांमध्ये घर करेल.’’ (पवित्र कुरआन, ४:६३)

‘‘आपल्या विधात्याकडे बुद्धिमत्तेने आणि चांगल्या उपदेशाद्वारे बोलवा.’’ (पवित्र कुरआन, १६:१२५)

पण प्रेषित मुहम्मद (स.) नेहमी असे प्रवचन देत नसत, कारण लोकांनी कंटाळू नये.

प्रेषित मुहम्मद (स.) थोडक्या शब्दांत अशा पद्थतीने सांगत की ऐकणाऱ्याला ते समजता यावे.

अबू दाऊद (र.) यांचे म्हणणे आहे की प्रेषित मुहम्मद (स.) शुक्रवारचे प्रवचन लांबलचक देत नसत. मोजक्या शब्दांमध्ये मोजक्याच गोष्टी सांगत असत. ह. अरबाज म्हणतात की प्रेषितांचे प्रवचन ऐकताना मन हेलावून जाई आणि डोळ्यांतून अश्रू ढळत असत.

पवित्र कुरआनात याचे वर्णन अशा प्रकारे केले आहे,

‘‘सच्चे श्रद्धावंत ते आहेत ज्यांची मने अल्लाहचे उपदेश ऐकून हेलावून जात आणि जेव्हा त्यांच्या समक्ष अल्लाहच्या (कुरआनातील) आयती ऐकविल्या जाताना त्यांची श्रद्धा आणखीनच बळकट होते.’’ (पवित्र कुरआन, ८:२)



(१) अलिफ, लाऽऽम, रा. फर्मान आहे, ज्याची वचने परिपक्व व तपशीलवार सांगितली गेली आहेत, एक ज्ञानी व जाणत्या अस्तित्वाकडून

(२) की तुम्ही भक्ती करू नये परंतु केवळ अल्लाहची, मी त्याच्यातर्फे तुम्हाला खबरदार करणारादेखील आहे व शुभवार्ता देणारादेखील.

(३) आणि तुम्ही आपल्या पालनकत्र्यापाशी क्षमायाचना करा आणि त्याच्याकडे परतून या तर तो तुम्हाला एका विशिष्ट मुदतीपर्यंत चांगली जीवनसामुग्री देईल आणि प्रत्येक श्रेष्ठीला त्याचे श्रेष्ठत्व प्रदान करील. परंतु जर तुम्ही तोंड फिरविले तर मी तुमच्यासंबंधी एका मोठ्या भयंकर दिवसाच्या प्रकोपापासून घाबरतो. (४) तुम्हा सर्वांना अल्लाहकडे परतावयाचे आहे आणि तो सर्वकाही करू शकतो. 

(५) पाहा, हे लोक आपली छाती वळवितात की जेणेकरून त्याच्यापासून लपावे. खबरदार! जेव्हा हे वस्त्रांनी स्वत:ला झाकतात, अल्लाह त्यांच्या गुपितांना जाणतो व प्रकट गोष्टींनादेखील. त्याला तर रहस्यांचेदेखील ज्ञान आहे जे मनात आहेत.

(६) भूतलावर चालणारा कोणताही प्राणी असा नाही ज्याच्या उपजीविकेची जबाबदारी अल्लाहवर नाही आणि ज्याच्यासंबंधी तो जाणत नाही की त्याचे वास्तव्य कोठे आहे? आणि कोठे तो सोपविला जातो. सर्वकाही  एका स्पष्ट दप्तरात नोंदलेले आहे.


१) `किताब' याचा अनुवाद वर्णनशैलीला पाहून `आदेश' (फर्मान) केला आहे. अरबी भाषेत हा शब्द `ग्रंथ' आणि `लेख' या अर्थानेच फक्त येत नाही तर आदेश आणि `शाही फरमान' या अर्थानेसुद्धा येतो. कुरआनमध्ये अनेक ठिकाणी हा शब्द याच अर्थाने आला आहे.

२) म्हणजे या आदेशामध्ये जे सांगितले गेले आहे ते दृढ आणि अटळ आहे, खूप पारखून घेतलेले आहे. याचा एकही शब्द असा नाही जो वास्तविकतेपासून कमी-अधिक असेल. या आयती सविस्तर स्पष्ट रूपात आलेल्या आहेत. यात एक एक बाब तपशीलासह स्पष्ट रूपात आली आहे. (व्याख्यानात अस्पष्टता अजिबात नाही)

३) म्हणजे जगात तुमच्यासाठी ठराविक काळ निश्चित केला आहे. या काळात तो तुम्हाला वाईट नव्हे तर चांगल्या प्रकारे ठेवील. त्याच्या कृपाप्रसादाचा वर्षाव तुमच्यावर होत राहील, त्याच्या समृद्धीने तुम्ही लाभान्वित होत राहाल, तसेच जगात तुम्ही सुखी आणि सन्मानित राहाल. जीवनात तुम्हाला सुखचैनीत तो ठेवील, अपमान आणि तिरस्काराने नव्हे तर मान सन्मानाने तुम्ही जीवन व्यतीत कराल. हाच विषय (सूरह नहल, आयत ९७ मध्ये) आला आहे. यामुळे लोकांच्या त्या सर्वसामान्य गैरसमुजूतीला दूर करणे अभिप्रेत आहे, ज्यास शैतानाने बुद्धीहीन लोकांच्या मनात रूजविले आहे. शैतान अशा लोकांना पटवून सांगतो की ईशपरायणतेने, सत्यनिष्ठेने तसेच जबाबदारीपूर्ण आयुष्य घालविण्याने परलोक यश पदरात पडत असेल परंतु तुमचे जगातील जीवन मात्र बरबाद होते. अल्लाह याचे खंडन करताना स्पष्ट सांगत आहे, ``परलोकाबरोबर या जगातील जीवनाचा सन्मान आणि सफलतासुद्धा अशाच लोकांसाठी आहे जे ईशपरायणशीलतेत चांगुलपणाने आपले जीवन व्यतीत करतात.'' (`मताअ‍े अहसन' म्हणजे उत्कृष्ट जीवनसामुग्री) कुरआनच्या भाषेत जीवनाच्या त्या सामुग्रीला म्हटले जाते जे जगाच्या सुखवैभवावरच नष्ट होत नाही तर परिणामात परलोकाच्या सुखवैभवाचे साधन बनते. 

४) म्हणजे जी व्यक्ती नैतिकता आणि जीवनव्यवहारात जितकी पुढे जाईल अल्लाह तितकेच मोठे पद तिला बहाल करील. जी व्यक्ती आपल्या चारित्र्याने आणि आचरणाने स्वत:ला ज्या श्रेष्ठतेची पात्र सिद्ध करते, ती श्रेष्ठता तिला अवश्य दिली जाते.

५) मक्का येथे जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आवाहन (संदेश) चर्चेत येऊ लागले तेव्हा अनेकानेक लोकसुद्धा त्यांच्या संदेशाने अतिबेजार बनले. काही लोक विरोधात पुढे येत नसत. असे लोक पैगंबर मुहम्मद (स.) यांना टाळत असत आणि त्यांच्या कोणत्याच म्हणण्याकडे हे लोक लक्ष देत नसत. पैगंबर मुहम्मद (स.) एखाद्या ठिकाणी बसलेले दिसले की ते उलट्या पावलाने परत जात असत. लांबून आपणास येताना पाहिले तर दिशा बदलत िंकवा तोंड लपवित जेणेकरून आमना-सामना होऊ नये आणि त्यांनी संबोधित करून काही उपदेश करू नये.

अशाचप्रकारच्या लोकांकडे संकेत आहे की हे लोक सत्याचा सामना करण्यासाठी घाबरतात. आपले तोंड शहामृगासारखे लपवून त्यांना असे वाटते की सत्य आता गायब झाले आहे. परंतु सत्य आपल्या जागी विद्यमान आहे आणि तो तर पाहात आहे की हे मूर्ख लोक सत्यापासून वाचण्यासाठी तोंड लपवित फिरत आहेत. 

६) म्हणजे ज्या अल्लाहच्या ज्ञानाची स्थिती ही आहे की चिमणीच्या एक एक घरट्याची आणि कीडेमकोड्यांच्या एक एक बिळांची पूर्ण माहिती अल्लाहला आहे. अल्लाह त्यांना तिथेच उपजीविका पोहचवित आहे. त्याला कोणता जीव कोणत्या क्षणी कोठे राहातो व कोठे मरतो याची खबर असते. अशाप्रकारे तोंड लपवून आणि कानांत बोटे टावूâन िंकवा डोळयांवर पडदा टावूâन तुम्ही त्याच्यापासून वाचाल, अशी तुमची धारणा ही तुमची घोडचूक आहे. सत्याकडे बोलाविणाऱ्यापासून तुम्ही तोंड लपविले तरी शेवटी तुमच्या पदरात काय पडणार? काय अल्लाहपासूनसुद्धा तुम्ही वाचाल? काय अल्लाह पाहात नाही की एक मनुष्य तुम्हाला सत्याकडे बोलवित आहे आणि तुम्ही त्याचे म्हणणे कानावर पडू नये म्हणून जीवाचा आटापिटा करत आहात.

 


लहानग्या बबलूने आपल्या आजोबांचे बोट सोडून समोर खुणवत विचारू लागला, ‘‘हे काय आहे?’’
त्याने पत्र्याची पेटी कधी पाहिलेली नव्हती. समोरच दोघे जण एक पत्र्याची पेटी रिक्षात ठेवत होते आणि तिसरा कापडाची पिशवी हाता घेऊन उभा होता.
आजोबा म्हणाले, ‘‘ही लोखंडाने बनवलेली पेटी आहे.’’
बबलूने विचारले, ‘‘ही पेटी काय असते?’’
‘‘आपल्याकडे जशा बॅगा असतात तशीच ती पेटी.’’ आजोबांनी उत्तर दिले.
‘‘पण ही फार मोठी आहे.’’ बबलू म्हणाला.
‘‘ही तुझ्या बाबांकडे आहे तशीच, ते गावाला जाताना घेऊन जातात तशी.’’ आजोबा म्हणाले.
बबलू म्हणाला, ‘‘समजलं आता. पण बाबांच्या बॅगेला तर चाकंसुद्धा आहेत.’’
‘‘हो त्याचे बजन जास्त असते म्हणून.’’ आजोबा उत्तरले.
‘‘या पेटीत काय आहे?’’
आजोबा गंभीर विचारात पडले. म्हणाले, ‘‘यात काही वचनं आहेत, काही स्वप्नं आहेत आणि काही आकांक्षा आहेत जे हे मजूर आपल्याबरोबर घेऊन हिंडत असतात.’’
‘‘मला काही कळलं नाही. काय असतात, वचनं, स्वप्नं, आकांक्षा?’’
‘‘बाळ तुला कळणार नाही.’’
‘‘का बरं? मला समजायला काय करावं लागेल?’’
आजोबा म्हणाले, ‘‘आताच नाही तुला कळणार. मोठा झाल्यावर कळतील अशा गोष्टी.’’
पण बबलूने पुन्हा विचारले, ‘‘स्वप्न फार जड असतात, तर…’’
आजोबा म्हणाले, ‘‘होय. स्वप्न सजवायला एक आयुष्य लागते आणि वचनं पूर्ण करता करता माणूस थकून जातो. कधी कधी सर्व आकांक्षा पूर्ण होत नाहीत.’’
‘‘का नाही बरं?’’
‘‘कारण ते फार नाजूक असतात. थोडासा जरी धक्का लागला तरी मोडून जातात.’’
‘‘नाजूक म्हणजे माझ्या खेळण्यांसारखे?’’ बबलूने विचारले.
‘‘होय, हे तुझ्या खेळण्यांपेक्षाही नाजूक असतात.’’
‘‘कळलं मला. मी साबणाच्या पाण्याने बुडबुडे काढतो तसे. जे थोड्याच वेळात फुटून जातात, तसेच ना!’’
बबलूच्या या वक्तव्याने आजोबा हैरान झाले. त्यांना अंदाज नव्हता की लहान बालक इतके मोठी उपमा देईल. आजोबा म्हणाले, ‘‘होय, तू एकदम खरं बोललास.’’
बबलू म्हणाला, ‘‘मी तर नेहमीच खरं बोलत असतो. पण लोक माझं ऐकतच नाहीत.’’
‘‘तू अगदी लहान आहेस म्हणून.’’
‘‘मग काय झालं, लहान मुलं खरं बोलत नसतात का? आणि त्यासाठी वयाचा कुठे संबंध येतो?’’
आजोबा म्हणाले, ‘‘ते असं आहे की लोक लहानग्यांच्या खऱ्या गोष्टींना चुकीचे म्हणत असतात.’’
‘‘हे मला कळलं आणि मोठ्यांनी जरी चुकीचं सांगितलं तरी ते मान्य करतात.’’
ती पत्र्याची पेटी आता रिक्षात ठेवली गेली आणि ठेवणारा माणूस एका कोपऱ्यात बसला.
बबलूने विचारले, ‘‘ही काय गंमत आहे बाबा! त्या स्वप्नांच्या पेटीला भली मोठी जागा आणि ती स्वप्नं पाहणारा एका कोपऱ्यात.’’
आजोबा म्हणाले, ‘‘हो बाळा! तसंच असते. जो कुणी मोठमोठी स्वप्नं पाहतो तेव्हा असेच घडते. अशा माणसाला एखाद्या कोपऱ्यातच बसावे लागते.’’
‘‘बाबा तुम्ही त्या लोकांना ओळखता?’’ बबलूने आजोबांना विचारले.
आजोबांनी उत्तर दिले, ‘‘मी त्यांना ओळखत नाही. पण ते लोक समोरच्या इमारतीच्या बांधकामावर काम करणारे मजूर आहेत.’’
‘‘तुम्ही त्यांना ओळखत नाही, पण त्यांची बरीच माहिती तुम्हाला आहे.’’
‘‘होय बाळा, अशा गोष्टी सर्वांना माहीत असतात. सावकार आणि मजुरांमधील गोष्टी समान असतात.’’
बबलू म्हणाला, ‘‘म्हणजे या दोघांत काही फरक नसतो?’’
‘‘फरक असतो, तुमच्या बाबांची चाकवाली बॅग आणि ही पत्र्याची पेटी दिसायला समान, पण आतमधील वस्तू वेगळ्या असतात. स्वप्नं मात्र सारखीच असतात.’’
ऑटो रिक्षा चालू लागली. त्यांना निरोप देणारे इतर मजूर त्यांना पाहातच राहिले.
‘‘हे लोक जात का नाहीत, काय पाहतात ते?’’ बबलूने विचारले.
‘‘बाळ! हे लोक निघून जातील, पण या घडीला ते स्वप्नं पाहात आहेत. जशी स्वप्नं त्या पत्र्याच्या पेटीत आहेत तशी.’’
‘‘पण हे लोक आले कुठून?’’
‘‘मला माहीत नाही, पण जिथे जिथे बांधकाम आणि विकास होत असतो तिथे ते येऊन धडकतात.’’
बबलू म्हणाला, ‘‘मग जेव्हा हे काम बंद होईल, तेव्हा हे लोक कुठे जातील?’
‘‘ते कुठे जाणार हे कुणालाच ठाऊक नाही.’’
‘‘कुणालाच ठाऊक नाही?’’ बबलूने विचारले.
आजोबा म्हणाले, ‘‘हे कुणालाच माहीत नसते. ज्याने हे जग निर्माण केले त्यालाच तेवढे माहीत. मी त्या ठिकाणचा पत्ता सांगू शकतो जिथं कुठं बांधकाम आणि विकास होत असेल, तिथं ते जातील.’’
बबलू म्हणाला, ‘‘मग त्या पेटीत त्यांच्या मजुरीचे पैसे असतील!’’
आजोबा म्हणाले, ‘‘रोजगार नव्हे, पण त्या पेटीत नाजूक आणि मृदू अशी स्वप्ने असतात.’’
बबलू म्हणाला, ‘‘कळलं मला. पाण्याच्या बुडबुड्यांसारखी, जे काही वेळातच हवेत विरघळून जातात.’’
आजोबा म्हणाले, ‘‘बाळ तू वारंवार….’’
बबलू म्हणाला, ‘‘कारण की मला तो खेळ लई आवडतो.’’

- डॉ. सलीम खान



काही महिन्यांत ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापूर्वी दोन्ही सभागृहात वादग्रस्त निवडणूक सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. हे विधेयक २१ डिसेंबर रोजी राज्यसभेत कोणत्याही वादविवादाशिवाय आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. २० डिसेंबरलाच लोकसभेत कोणताही वाद विवाद न करता तो संमत करण्यात आला. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर हा कायदा केला जाईल. लोकांना मतदानाच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले, तर सरकारने म्हटले आहे की, या विधेयकामुळे देशातील बनावट मतदान रोखण्यास आणि मतदार यादीची शुद्धता सुनिश्चित करण्यास मदत होईल. प्रस्तावित निवडणूक सुधारणा दिसत असल्या, तरी केंद्र सरकार लाखो गरीब भारतीयांना वंचित करण्यासाठी आणि राष्ट्रीय भारतीय नागरिक नोंदणी (एनआरआयसी किंवा एनआरसी) सरावाचा वापर करून त्यांना मतदानाचा हक्क काढून टाकण्याच्या प्रयत्नात पुढे जात असल्याचे सूचित होते. मुख्य प्रस्तावित निवडणूक सुधारणांपैकी एक म्हणजे मतदार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र बायोमेट्रिक आधारित आधारशी जोडणे. प्रस्तावित निवडणूक सुधारणांनी मतदार ओळखपत्राशी आधार जोडण्यास होकार दिला, तर तो जनतेवर लादला जाईल आणि त्यांना अनधिकृतपणे ते दोन्ही जोडण्यास भाग पाडले जाईल. यापूर्वी, 2015 मध्ये, ईसीआयने राष्ट्रीय निवडणूक कायदा शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण कार्यक्रम सुरू केला, ज्याने मतदार ओळखपत्राशी आधार जोडण्याची योजना आखली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लक्षात घेता हा प्रयत्न थांबवण्यात आला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा, २००३ (सीएए २००३) संमत केला, ज्यात प्रमुख नागरिकत्व कायदा, १९५५ मध्ये सुधारणा करण्यात आली आणि त्यात "बेकायदेशीर स्थलांतरित"ची व्याख्या जोडली गेली. सीएए २००३ मध्ये एनआरसीचे संकलन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ज्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत, ज्यात भारतीय संविधानाच्या कलम ६ (बी) नुसार त्यांचे भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी १९ जुलै १९४८ नंतरची कागदपत्रे समाविष्ट असू शकतात. असे लोक "बेकायदेशीर स्थलांतरित" श्रेणीत मोडतील आणि त्यांना केवळ वंचित केले जाणार नाही आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्याची शिक्षा दिली जाईल, परंतु हे लोक आणि त्यांची संतती भारतीय नागरिकत्वासाठी कायमची अर्ज करण्याची संधी गमावतील. आधारच्या माध्यमातून केला जाणारा एनपीआर सराव, नागरिकत्व नियम, २००३ नुसार एनआरसीच्या संकलनाच्या दिशेने पहिले पाऊल आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एप्रिल २०२० मध्ये ती पुढे ढकलण्यात आल्यानंतर, एनपीआरला ही मान्यता देणारी जनगणना २०२१ डिजिटल पद्धतीने नियोजित करण्यात आली आहे. यामुळे १९५१ च्या मतदार यादीचा वापर करून एनआरसी तयार करण्याचा मार्ग मोकळा होईल, ज्यामुळे भारतातील नागरिकत्वाचे हक्क गमावण्याची शक्यता लाखो लोकांना भासणार आहे. सीएए २००३ ने नागरिकत्व कायदा, १९५५ मध्ये जोडलेल्या कायदेशीर तरतुदींचा वापर करून लाखो भारतीयांना जन्माने बिनशर्त नागरिकत्वाचा अधिकार नाकारल्यामुळे एनआरसी स्वत: समस्याग्रस्त आहे. एनआरसी ही सर्व भारतीय नागरिकांची खरी नोंदणी तयार करण्यापेक्षा लोकांना त्यांच्या नागरिकत्वाच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचा एक सराव आहे. दुसरे म्हणजे, १९५१ च्या मतदार यादीच्या तयारीदरम्यान जवळजवळ २.८ दशलक्ष नावे वगळण्यात आली. २०११ च्या एका अभ्यासानुसार, ५० वर्षांत जवळजवळ ५० दशलक्ष लोक – यापैकी ४०% लोक आदिवासी जनता आहेत- त्यांना भारतात बेदखल करण्यात आले आहे. जर त्यांचे तपशील एनपीआरमध्ये अद्ययावत केले गेले, तर त्यापैकी बहुतेक १९५१ च्या मतदार यादीमध्ये दाखल झालेल्या त्यांच्या पूर्वजांशी जोडले जाऊ शकत नाहीत. एनआरसी सरावाद्वारे हे लोक वंचिततेचा त्रास सहन करतील. प्रस्तावित निवडणूक सुधारणा आणि एनपीआर च्या सरावाविरूद्ध मोठ्या प्रमाणात संघर्ष होत नाही, तोपर्यंत गरीब आणि उपेक्षितांसाठी उद्धार होऊ शकत नाही. एनआरसीचा धोका त्यांना घेरून त्यांना राज्यविहीन करेल. तथापि, केवळ एनपीआर-एनआरसीवर टीका करण्यापुरते मर्यादित ठेवणारे विरोधी पक्ष, मोदी राजवटीला त्याच्या अंमलबजावणीत सहकार्य करताना या विषयावर अकार्यक्षम राहिले. मोदी राजवटीने वादग्रस्त नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा २०१९ (सीएए २०१९) संमत केला आहे, जो फक्त मुस्लिमविरोधीच कायदा नसून तो प्रत्यक्षात हिंदूंविरूद्ध, विशेषत: बहिष्कृत दलितांविरूद्ध कायदा आहे. प्रस्तावित निवडणूक सुधारणा थांबवण्यासाठी संसदेच्या आत आणि बाहेर समन्वयित लोकांची चळवळ नसेल, तर लाखो लोकांना एनआरसीच्या नेतृत्वाखालील वंचिततेपासून सुटका होऊ शकत नाही. विरोधी पक्ष या उपायांवर मौन बाळगून असल्याने स्वत: लोकांनाच अशा चळवळीची आघाडी घ्यावी लागेल. नागरिकत्व हक्क कार्यकर्त्यांनी आधीच्या चुकांकडे  मागे वळून पाहण्याची, मोदींच्या वादग्रस्त शेती कायद्यांच्या  विरोधात  शेतकरी चळवळीतून शिकण्याची आणि मोदी राजवटीला सीएए २००३ रद्द करण्यास भाग पाडण्यासाठी बिनशर्त नागरिकत्वाचा संघर्ष पुढे नेण्याची आणि भारतीय नागरिकत्व कायद्यातील इतर सर्व दुरुस्त्या पुढे नेण्याची वेळ आली आहे.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक, 

मो.:८९७६५३३४०४



दिवाळीच्या उंबरठ्यावर शेतकऱ्यांची होळी’ या शीर्षकाखाली, ऑक्टोबर 2020च्या ‘पुरोगामी जनगर्जना’ व  ’शोधन’  मध्ये लेख लिहून शेतीची तीन विधेयके, कोणत्याही चर्चेला वाव न देता, 17 सप्टेंबर 2020 रोजी लोकसभेत बहुमताच्या आधारे आणि 20 सप्टेंबर 2020 रोजी राज्यसभेत बहुमत नसल्याने आवाजी मतदानाच्या आधारे ज्या प्रकारे मंजूर करून घेण्यात आली आणि राष्ट्रपतींनी सही केल्याने त्या विधेयकांचे ज्या पद्धतीने कायद्यात रूपांतर करण्यात आले त्याचा तीव्र धिक्कार केला होता. देशाची अर्थव्यवस्था नेस्तनाबूद करून आता त्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले कृषिक्षेत्र कॉर्पोरेटक्षेत्राच्या घशात घालण्याचे हे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे असेही आम्ही मांडले होते.

आपल्या देशातील 50% रोजगार हा कृषिक्षेत्र निर्माण करते. भारतातील 58% जनतेचा उदरनिर्वाह हा कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे. आपल्या देशाचा 17% जी.डी.पी. हा एकट्या कृषिक्षेत्रातून येतो तर सुमारे 48% हिस्सा सेवाक्षेत्राकडून येतो.

देशाच्या जी.डी.पी.मधील उद्योग क्षेत्राचा 2019 मधील वाटा आहे 25% (जो मोदी येण्यापूर्वी 32% होता. स्मार्ट इंडिया, स्कील इंडिया, मेक इन इंडिया, एफ.डी.आय. अशा त्यांच्या अनेक प्रयत्नांनी तो घटला). जगण्याच्या सर्व सुखसोयी, सुविधा, सवलती भोगणाऱ्या, माणशी सर्वात अधिक उत्पन्न घेणाऱ्या आय.टी. क्षेत्राचा यातील वाटा आहे फक्त 8%. कोरोना महासाथीत उद्योग क्षेत्रातील रथीमहारथी नामोहरम झाले पण कृषिक्षेत्र भक्कमपणे टिकले. बेदरकार मोदी आणि बेताल कोरोना या दोघांच्या हल्लयाने कोलमडणाऱ्या अर्थव्यवस्थेला फार मोठा आधार दिला तो कृषिक्षेत्राने. असे असताना कोरोना महासाथीच्या आडून मोदी सरकारने हे कायदे आणण्याचे षड्यंत्र ज्या पद्धतीने रचले ते निषेधार्ह होते. हे सर्व कायदे किती फसवे आहेत याचीही चिरफाड  आम्ही त्या लेखात केली होती. अर्थात या कायद्यांविरुद्ध असे ऐतिहासिक आंदोलन उभे राहील हे मात्र अनपेक्षित होते. कारण गेले दीडदशक मोदी बेगुमानपणे देशात आणि देशाबाहेर थैमान घालत होते. हा अश्वमेघ कोणीच अडवू शकत नाही असे त्यांना आणि त्यांच्या बुद्धी गहाण टाकलेल्या अंधभक्तांना वाटू लागले होते. एका चहावाल्याचे रूपांतर लहरी आणि अहंकारी राजात झाले होते. 

आपण करू ती पूर्व दिशा, जे बोलू ते सत्य असे त्याला वाटू लागले. देश म्हणजे मी आणि मी म्हणजे विश्वाचा महागुरू. याच अहंकारातून हा राजा देशातील बळीराजाला टाचेखाली घ्यायला निघाला. पुराणातील जनतेचा वाली असणाऱ्या बळी राजाला लबाड वामन आता पुन्हा फसवून टाचेखाली घेणार की काय अशी चिंता वाटत असताना हा आधुनिक काळातील बळीराजा स्वाभिमानाने पेटून एकजुटीने असा काही झुंजला की त्याच्या नांगरापुढे राजाच्या अहंकाराला नांगी टाकावी लागली. या लढाईत बळी राजाने आपला नांगर शस्त्र म्हणून उगारला नाही, त्याने शस्त्र उगारले ते महात्मा गांधींच्या अहिंसक सत्याग्रहाचे. ज्यांनी गांधीला मारले त्यांचा गांधी नावाच्या अहिंसक शस्त्रानेच पराभव केला.

नांगर जिंकला, शेतकरी जिंकला, गांधी जिंकला.

अहंकार हरला, वामन हरला, नथुराम हरला!

या लढाईत मोदी, त्यांचे नाममात्र सरकार, भाजपा, आर.एस.एस. आणि त्यांच्या विषारी फौजा यांच्या लबाडीचे, दुटप्पीपणाचे खरे दर्शन घडले. या सर्वांनी आंदोलकांसाठी आंदोलनजीवी, देशद्रोही, तुकडेतुकडे गँग, खलिस्तानवादी, नक्षलवादी, डावे अतिरेकी, हुल्लडबाज अशी एक ना अनेक अपमानास्पद विशेषणे वापरली. या आंदोलनास परकीय आर्थिक पाठबळ आहे असा आरोप करण्यात आला. या आंदोलनातील आंदोलनकर्ते हे शेतकरी नसून भाडोत्री लोक असून ते बिर्याणी आणि पिझ्झा खाण्यासाठी आले आहेत असे म्हटले गेले. हे आंदोलन हिंदू धर्मविरोधी असल्याने ते चिरडले पाहिजे अशीही भाषा वापरली गेली. धर्म आणि ब्राम्हण्यवादाचाच शेवटी विजय होईल असेही म्हटले गेले. आंदोलकांवर पाण्याच्या तोफांचा मारा करण्यात आला, अभेद्य अडथळे उभारण्यात आले, जमिनींवर खिळे ठोकण्यात आले, लाठीमार, गोळीबार करण्यात आला. आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा डाव रचण्यात आला. लाल किल्लयावर शीख धर्माचा झेंडा, ‘निशाण साहेब’ फडकवला गेल्यावर ज्या आर.एस.एस.ने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला, ब्रिटिशांना मदत करण्यात धन्यता मानली, स्वातंत्र्य मिळाल्यावर तिरंगा नाकारला, भारताचे संविधान नाकारले आणि आज सात दशकांनंतर मनोरुग्ण कंगणा आणि दारुडा गोखले यांच्या मुखातून स्वातंत्र्यच नाकारले, त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांचा आणि तिरंग्याचा अवमान झाला म्हणून नक्राश्रू ढाळले. भाजपा केंद्रीय मंत्र्याच्या मानसिक तोल ढळलेल्या चिरंजीवांनी लखीमपुर खेरा येथे आपल्या भरधाव जीपखाली आंदोलक शेतकरी चिरडले. वास्तवात संघ परिवार हा हिंसेचा छुपा समर्थक आणि अहिंसेची उघड खिल्ली उडवणारा आहे. हे सगळे घडूनही शेतकऱ्यांनी आपले मानसिक संतुलन ढळू दिले नाही आणि हिंसेचा आधार घेतला नाही. शेवटी तब्बल 1 वर्ष 2 महिन्यानंतर ‘निवडणूकजीवी’ मोदींनी ‘आंदोलनजीवीं’ पुढे माघार घेतली.

दुराग्रही मोदींनी ही माघार का घेतली असावी याचा विचार केला पाहिजे. मोदी-शहा हे कोणतेही सोयरसुतक नसणारे एक ‘निवडणूक यंत्र’ आहेत. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. माध्यमांनी कितीही लपविण्याचा प्रयत्न केला असला तरी शेतकरी आंदोलनाला लक्षावधी शेतकऱ्यांचा आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील कोट्यावधी सुजाण लोकांचा पाठिंबा आहे, हे सत्य समांतर माध्यमांमधून जगापुढे आले होते. या आंदोलनात स्त्रिया, सुशिक्षित युवक-युवती आणि शाळकरी मुलेही प्रचंड प्रमाणावर सहभागी झाले होते.आंदोलनाचे व्यवस्थापन अभूतपूर्व असे होते. आंदोलकांसाठी तंबू, तंबूतील लंगर, शाळा, ग्रंथालये, रुग्णालये, शौचालये उभारण्यात आली. तंत्रज्ञ, इले्निट्रशियन्स, प्लंबर्स, गवंडी, शिक्षक, स्वयंपाकी, वैद्यकीय साहाय्यक यांच्या फौजा उभ्या राहिल्या. उबदार पांघरुणे, पंखे, जनरेटर्स, ट्रॅक्टर्स पुरवण्यात आले. थोडक्यात हे आंदोलन अमर्यादित काळ यशस्वीपणे पुढे जाईल हा निर्धार आंदोलकांनी प्रथम पासूनच ठेवला. आंदोलनातील आंदोलकांची संख्या सातत्याने राहील यासाठी आंदोलक शेतीची कामे आलटून पालटून करीत राहिले. आधुनिक समाजमाध्यमे आणि समांतर प्रसार यंत्रणा  कल्पकतेने वापरण्यात आली. साहित्यिक, विचारवंत, कवी, कलाकार, गायक, चित्रकार पाठींबा देण्यासाठी उतरले.

राकेश सिंग टिकैत सारखे नवे पोलादी नेतृत्व उभे राहिले. शेतकऱ्यांचे आंदोलन निर्घृणपणे चिरडणे शक्य नाही आणि तसे करीत या निवडणुका जिंकणे तर अजिबात शक्य नाही हे सरकारच्या लक्षात आले. उत्तर प्रदेश निवडणूक ही 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी महत्त्वाची आहे हे निर्विवाद. शेतकरी विरोधी तीन कायदे मागे घेण्याची घोषणा मोदींनी 19 नोव्हेंबर 2021 या गुरु नानक जयंतीच्या दिवशी पंजाबमधील डेरा नानक साहेब येथे केली. त्याच दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील गुरुद्वाराला भेट दिली. या दोघांना आपला परिवार ज्यांना ‘खालिस्तानवादी राष्ट्रद्रोही अतिरेकी’ आणि ‘शिखडे’ म्हणतो तो शीख समाज हा हिंदुत्वाचा एक महत्त्वाचा हिस्सा असल्याच्या सावरकरांच्या मांडणीचा अचानक साक्षात्कार झाला. पण सावरकरांनी ज्या मुस्लिमांना दानव आणि गोळवलकरांनी शत्रू क्रमांक एक मानले त्या मुस्लीम समाजातील अनेकांना अखिल भारतीय किसान सभेने नेतृत्वात सामावून घेऊन आपण खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहोत आणि हे आंदोलन फक्त शीख समाजाचे वा हिंदू जाटांचे नाही हे आधीच दाखवून दिले होते. हे कायदे शेतकऱ्यांच्या भल्याचेच होते आणि शेतकऱ्यांना हे पटवून देण्यात आम्ही कमी पडलो असा लबाडीचा सूर भाजपा लावत आहे. भाजपाने कोणताही सूर लावला तरी भारतीय शेतकऱ्यांनी एका मस्तवाल आणि मस्तवाल राजकीय शक्तीला अहिंसक मार्गाने ‘नमवले’ याची इतिहासात नोंद होईल. हे आंदोलन हा अहिंसक सत्याग्रह असल्याने कंगणा वा गोखले हा शेतकऱ्यांच्या शक्तीचा खरा विजय नसून मोदींनी शेतकऱ्यांना दिलेली ही ‘भीक’ आहे असे म्हणू शकतात, किंबहुना असे म्हणण्याचे त्यांनी धाडस दाखवावे. प्रत्यक्षात मोदी-शहा या जोडीने शेतकरी कायद्यांना मागे घेऊन शेतकऱ्यांकडे येणाऱ्या निवडणुकीतील विजयासाठी भीख मागितली आहे असे म्हणणे अधिक योग्य होईल. हे कायदे मागे घेतल्याने येणाऱ्या निवडणुकांमध्ये शेतकरी भाजपाला मतदान करतील का या प्रश्नावर टिकैत यांनी दिलेले ‘हा प्रश्न म्हणजे जसोदाबेन मोदींशी पुन्हा लग्न करतील का असे विचारण्यासारखे आहे’ हे उत्तर पुरेसे आहे.

निवडणुकांनंतर मोदी काय करतील हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. कदाचित 2024 लोकसभा जिंकण्याची ते वाट पाहतील आणि जिंकल्यास वेगळ्या पद्धतीने हे कायदे पुन्हा आणण्याचा प्रयत्न करतील. शेतमालाला किमान आधारभूत किंमत हा प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे. त्याचा ठोस निर्णय लागे पर्यंत शेतकऱ्यांनी मागे हटून चालणार नाही. हे संपादकीय लिहीत असताना लोकसभा आणि राज्यसभेने ही कृषिविधेयकेमागे घेण्याचा निर्णय घेतला. पण हे करतानाही सत्ताधारी पक्षाने कोणतीही चर्चा होऊन दिली नाही. विरोधकांना गोंधळ करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. 

12 विरोधी खासदारांना गोंधळ घातला म्हणून निलंबित करण्यात आले. खरे तर देशाच्या पंतप्रधानांनी या विधेयकांबद्दल देशाची आणि शेतकऱ्यांची माफी मागायला हवी होती. देशाच्या पंतप्रधानाची निष्ठा जनतेपेक्षा अदानी आणि अंबानी यांच्या प्रति अधिक आहे. अर्थात अदानी आणि अंबानी ही त्यांच्या निवडणूक यंत्राची दोन इंजिने आहेत हे विसरून चालणार नाही. 

या आंदोलनाच्या काळात सुमारे 700 शेतकऱ्यांनी प्राण गमावले. जनरल डायरची आठवण करून देणारे हे वर्तन आहे. या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने यासाठी नुकसान भरपाई दिली पाहिजे. मोदींच्या आणि त्यांच्या परिवाराच्या निर्णयांमुळे आणि कृतींमुळे आजवर देशातील हजारो निष्पाप लोकांनी प्राण गमावले आहेत. या घातक परिवाराला हद्दपार करण्याची वेळ आली आहे.



सब अपने बनाये हुए ज़िंदां में हैं महेबूस

खावर के सवाबत हों के अफरंग के सय्यार

पीरान-ए-कलिसा हों के शेखा-ने-हरम हों

ने जिद्दते गुफ्तार है ने जिद्दते किरदार

दुनिया को है उस महदि-ए-बरहक की ज़रूरत हो जिसकी निगाह जलजला-ए-आलमे अफकार

आम्ही राजकारणामध्ये रस घेत नाही म्हणून राजकारण तुमच्यात रस घेणार नाही असे नाही.’’ प्रसिद्ध युनानी सैनिक कमांडर परसेल्सचे हे वाक्य तब्लीगी जमाअतबद्दल तंतोतंत लागू पडते. कारण तब्लिगी जमाअत भारतात जन्म घेऊन जागतिक पातळीवर जवळ-जवळ 190 देशांमध्ये जरी काम करत असली आणि या देशांपैकी एकाही देशाच्या राजकारणात रस घेत नसली, म्हणून तिच्यात राजकारणी  घेणार नाहीत असे नाही. 2020 मधील कोरोना काळामध्ये तब्लिगी जमाअतच्या दिल्ली मर्कजमधून कोरोना पसरला म्हणून जे राजकारण सुरू झाले ते जरी संपले असले तरी 2021 मध्ये मागच्या आठवड्यात सऊदी अरब या देशातील राजकारणाने तिच्यात रस घेतला आहे.  एव्हाना ही बाब सर्व जगाला कळालेली आहे. मात्र 2019 मध्येही या जमाअतने आपल्यावरील आरोपांचे उत्तर दिले नव्हते आणि आताही तिने उत्तर दिलेले नाही. 

त्याचे झाले असे की मागच्या शुक्रवारी म्हणजे 11 डिसेंबरला सऊदी अरबच्या सर्व मस्जिदीमधून तब्लिगी जमाअतवर नव्याने प्रतिबंधाची घोषणा करण्यात आली. नव्याने यासाठी की 1980 पासूनच तब्लिगी जमाअतवर त्या देशामध्ये प्रतिबंध आहे. पण ते जरा सैल होते ते आता कडक झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर हा सारा काय प्रकार आहे? हे कसले राजकारण काय आहे? यासंबंधी सत्य समजून घेणे अनाठायी होणार नाही म्हणून हा लेखन प्रपंच. 

18 डिसेंबर रोजी देण्यात आलेला संदेश

’’हे भक्तानों अल्लाहकडे लोकांना बोलावणे मुस्लिमांचे आद्य कर्तव्य आहे. त्यात एका ईश्वराची उपासना करण्याबाबत आणि शिर्क (अल्लाहशिवाय इतरांना ईश्वर मानने) पासून रोखण्याबाबत तसेच प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे अनुसरण करण्याचे संदेश देणे. एवढेच आपले कर्तव्य आहे. यात नवीन प्रकार सुरू करणे चुकीचे आहे. अल्लाहची परमकृपा आहे की, आपल्या देशामध्ये शाह अब्दुल अजीज यांच्या काळापासूनच तौहिद (एकेश्वरत्व)चे समर्थन करणे आणि त्याचा फैलाव करणे आणि शहाणपणाने या संदेशाकडे बोलाविण्याचे काम आमचे लोक दृढपणे करत आहेत. परंतु अलिकडे बाहेरून आलेले काही लोक याच कामाच्या नावाखाली चुकीच्या शिकवणीकडे लोकांना बोलावत आहेत. त्या लोकांपैकी काही लोक ते आहेत ज्यांचे नाव तबलिगी जमाअत आहे. या लोकांच्या श्रद्धा शुद्ध नाहीत. हे लोक प्रेषितांच्या शिकवणीपासून अनभिज्ञ आहेत. यांच्याकडे फालतू गोष्टी, बकवास आणि खोट्या कथा सांगितल्या जातात. तरी त्यांना गर्व असतो की, ते इतरांपेक्षा जास्त इस्लामकडे लोकांना बोलाविणारे आहेत. या जमाअतची उत्पत्ती भारतात झाली. मग हे लोक आमच्या इलाख्यात आले. यांच्या कामाची पद्धत पाहून त्या काळातील ग्रँड मुफ्ती मुहम्मद बिन शेख इब्राहीम यांनी यांच्या विरूद्ध फतवा देऊन म्हटले होते की, ’’या लोकांमध्ये कुठलीही चांगली गोष्ट नाही. हे लोक पथभ्रष्ट, इस्लामच्या मूळ शिकवणीपासून   -(उर्वरित पान 7 वर)

लांब गेलेले आहेत. यांच्या पुस्तकातून मला असे आढळले आहे की, यांचा पायाच बिगर इस्लामी आहे. यांच्या पुस्तकांमध्ये शिर्क, कबरपरस्ती सामील आहे. म्हणून आम्ही गप्प बसू शकत नाही.’’ यानंतर पुन्हा दूसरे मुफ्ती शेख बिन बआज यांनी यांच्याबद्दल सांगितले की ही, ’’तब्लीगी जमाअत ही प्रसिद्ध भारतीय जमाअत आहे. त्यांच्यामध्ये अनेक गोष्टी इस्लामी श्रद्धेच्या विरूद्ध आहेत. म्हणून त्यांच्यासोबत जाणे, त्यांना वेळ देणे, त्यांची साथ देणे चुकीचे आहे. मी आवाहन करतो की, ज्यांना शरियतची माहिती आहे त्यांनी पुढे यावे आणि यांना विरोध करावा. यांच्या श्रद्धा दुरूस्त कराव्यात, यांना कल्याणकारी मार्गाकडे बोलवावे. इथपर्यंत की हे लोक आपल्या चुकीच्या धारणा सोडून खऱ्या इस्लामकडे परत येतील. ही एक अशी जमाअत आहे ज्यांच्या अनुयायांची श्रद्धा भ्रष्ट झालेली आहे. यांच्यात आणि इ्नवानुल मुस्लिमीन (इस्लामी ब्रदरहुड) अन्सारे सुन्ना मध्ये काही फरक नाही. यांचे सर्वांचे विचार एकसारखे आहेत. म्हणून यांची कोणी साथ देऊ नये’’

शेख मुहम्मद बिन उस्मैन यांनी तब्लिगी जमाअतबद्दल म्हटलेले आहे की, ’’मला कळाले आहे की, तब्लिगी जमाअतच्या श्रद्धेमध्ये अशुद्धता आहे. त्यामुळे या जमाअतपासून लांब राहणे गरजेचे आहे.’’ एक अन्य आलीम शेख हामूद तुवैजरी यांच्याबद्दल म्हणतात की, ’’लोकहो ! तब्लिग जमाअतसोबत फिरू नका. मग ते सऊदी अरबच्या भूमीवर असो का बाहेरच्या भूमीवर. कारण हे लोक पथभ्रष्ट झालेले आहेत. यांच्या श्रद्धा बिघडलेल्या आहेत.’’ शेख सालेह अफवजान यांनी यांच्याबद्दल म्हटलेले आहे की, ’’तबलिगी जमाअत एक अशी जमाअत आहे जिच्यामुळे अनेक लोक भ्रमित झालेले आहेत. या जमाअतचा दावा आहे की, या जमाअतने अनेक गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून रोखलेले आहे. हे जरी खरी असले तरी ही जमाअत त्यांना गुन्ह्यांपासून वाचवून त्यांना बिदआतमध्ये फसवून टाकते आहे. हे सुद्धा चुकीचे आहे. बिदअती व्यक्तीपेक्षा गुन्हेगार व्यक्ती बरी असते. म्हणून यांच्यापासून लांब रहायला हवे.’’ आपल्याच देशातील इस्लामी विद्वानांनी यांचा विरोध केलेला आहे असे नाही तर दुसऱ्या देशाच्या इस्लामी विद्वानांनीही या जमाअतचा विरोध केलेला आहे ज्यात प्रसिद्ध इस्लामी विद्वान शेख अलबानी प्रमुख आहेत. ते म्हणतात, ’’तबलिगी जमाअत ही कुरआन आणि प्रेषितांच्या शिकवणीवर दृढ नाही. ना ही ही जमाअत आमच्या नेक पूर्वजांच्या पद्धतीवर आहे. म्हणून यांना सहकार्य करणे निषिद्ध आहे.’’ (संदर्भ : अरबी भाषेमधून भाषांतर, मुफ्ती अबुल फजल कास्मी, यू ट्यूब) 

मुळात या संबोधनामध्ये जे फतवे सऊदी धार्मिक विद्वानांचे देण्यात आलेले आहेत ते समोर आल्यानंतर 1980 पासून तबलिगी जमाअतचे काम करणाऱ्यांवर सऊदी अरबमध्ये प्रतिबंध लावण्यात आला होता. तरी परंतु हे प्रतिबंध सैल असल्यामुळे तबलिगी जमाअतचे साथी हॉटेलमध्ये, मोठ्या लोकांच्या दिवानखाण्यामध्ये आणि हजला गेल्यानंतर हाजींच्या राहुट्यांमध्ये आपले काम करत होते. एवढेच नव्हे तर टुरिस्ट विजा घेऊन सऊदी अरबचे ते नागरिक जे या जमाअतशी संलग्न होते भारतात सुद्धा येत होते.

तबलिगी जमाअतवर सऊदी सरकारचे आक्षेप

सऊदी अरबचे धार्मिक कार्यमंत्री डॉ. शेख अब्दुल लतीफ बिन अब्दुल अजीज अल शेख यांनी सर्वप्रथम आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करून तबलिगी जमाअतविरूद्ध आपली भूमीका मांडली, जी की सऊदी सरकारची अधिकृत भूमीका मानली जाते. मंत्रालयाकडून ज्या गोष्टी प्रसिद्ध करण्यात आल्या त्याचा खुलासा खालीलप्रमाणे.

’’ही जमाअत मुळात भारतीय जमाअत आहे. ही इस्लामचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीविरूद्ध चालते. ही जमाअत इस्लामी ज्ञान नसतांना लोकांमध्ये उपदेश करण्यासाठी निघते. या जमाअतच्या प्रभावामुळे आतंकवादी समुहही उत्पन्न झालेले आहेत. ही जमाअत आतंकवादाचे प्रवेशद्वार आहे. सऊदी अरबच्या तुरूंगात बंद असलेल्या अनेक कैद्यांची जेव्हा चौकशी केली गेली तेव्हा लक्षात आले की त्यांच्यापैकी अनेकजण तबलिगी जमाअतमध्ये सामील होते. हे लोक त्यावेळेस सामील झालेले आहेत ज्यावेळेस सऊदी अरबच्या फतवा कमेटिने फतवा दिलेला आहे की या जमाअतमध्ये कोणीही सऊदी नागरिकाने सामील होवू नये. अशा परिस्थितीत आमच्यासाठी अनिवार्य आहे की, अशा जमाअतीचे निमंत्रण आमच्या नागरिकांनी स्वीकार करून ये. ही जमाअत आणि अशा अन्य जमाअतींमुळे आमच्या राष्ट्रीय एकतेचे तुकडे तुकडे करून टाकतील.’’

तबलिगी जमाअतचे समर्थन करावे का विरोध?

वरील प्रमाणे सऊदी अरबच्या मस्जिदीमध्ये वाचला गेलेला खुत्बा आणि सऊदी सरकारची भूमीका पुढे आल्यानंतर जागतिक पातळीवर या संदर्भात साहजिकच प्रतिक्रिया उमटल्या. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया खालीलप्रमाणे - 

जमियते उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महेमूद असद मदनी यांनी एक लिखित पत्रक जारी करून म्हटलेले आहे की, तबलिगी जमाअत ही जगातील सर्वात मोठी जमाअत असून शांतीपूर्वक काम करते. ते एक धार्मिक सुधार आणि चारित्र्यनिर्मितीचे अभियान आहे. या जमाअतने आपल्या शंभर वर्षाच्या इतिहासात अनेक मुस्लिम युवकांना दारूच्या गुत्त्यांमधून बाहेर काढून मस्जिदींमध्ये आणले. अनेकांना वाम मार्गापासून दूर करून सन्मार्गावर आणले. सर्व विश्व जाणून आहे ही एक अत्यंत कल्याणकारी जमाअत आहे. जे लोक आणि सरकारे हिचा विरोध करीत आहेत, वास्तविकपणे ते या जमाअतशी अपरिचित आहेत आणि दुष्प्रचाराने प्रभावित झालेले आहेत. या जमाअतीचे संरक्षण आणि समर्थन करणे प्रत्येक मुस्लिमांवर वाजीब (अनिवार्य) आहे. म्हणून जमियते उलेमा-ए- हिंद आपल्या सर्व सदस्य, पदाधिकारी आणि संबंधितांशी अपील करत आहे की, 1. प्रत्येक मस्जिदीमध्ये शुक्रवारच्या संबोधनामध्ये उलेमा आणि इमाम लोकांनी तबलिगी जमाअतच्या कार्यांचा जनतेला परिचय करून द्यावा.

2. दावते हक (सत्याकडे आमंत्रण देण्या) कडे बोलवण्यात मोठ्यात मोठी शक्ती न रोखू शकलेली आहे आणि न रोखू शकणार आहे. 3. मात्र आम्हाला हे विसरता येणार नाही की सत्यावर चालणाऱ्या लोकांना प्रत्येक काळामध्ये त्याग करावा लागतो. म्हणून तबलिगी जमाअतच्या समर्थन आणि संरक्षणासाठी जमियते उलेमा-ए-हिंद कोणताही त्याग करण्यासाठी तयार आहे. आम्ही मागे हटणार नाही. 4. जमियते उलेमाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तबलिगी जमाअतच्या कार्याला आपले कार्य समजावे आणि त्यांचे प्रबळ समर्थन करावे. वर्तमान स्थितीमध्ये याची अत्यंत गरज आहे. 

जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांनी या संबंधी म्हटले आहे की, ’’सऊदी अरबने तबलिगी जमाअतवर लादलेल्या प्रतिबंधाच्या निर्णयाला आम्ही चूक समजतो. सऊदी सरकारकडून असे पहिल्यांदाच घडलेले आहे असे नाही यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेक धार्मिक संघटना आणि जमाअतींवर प्रतिबंध लावलेले आहेत. त्यांच्या साहित्यावर प्रतिबंध लावलेला आहे. त्यांच्या गतिविधींवर प्रतिबंध लावलेला आहे. जेव्हा-जेव्हा त्यांनी अशी पावले उचलली आहेत तेव्हा-तेव्हा जमाअते इस्लामींनी त्यांचा विरोध केलेला आहे. सध्याचा त्यांचा तबलिगी जमाअत संबंधीचा निर्णय चुकीचाच नव्हे तर बिगर इस्लामी सुद्धा आहे. आज ज्या मुल्यांवर सऊदी सरकार चालण्याचा दावा करते हा निर्णय त्या मुल्यांच्याही विरूद्ध आहे. एवढेच नव्हे तर मानवाधिकाराच्याही विरूद्ध आहे.’’

सऊदी सरकारचा गैरसमज

सऊदी अरब सरकारने एकतर तबलिगी जमाअतच्या रचनेचा अभ्यासच केलेला दिसून येत नाही किंवा ते जाणून बुजून खोटे तरी बोलत आहेत. जमाअतमध्ये जे लोक चालतात त्यांची कुठलीच चारित्र्य पडताळणी करण्याची पद्धत जमाअतमध्ये पूर्वीपासूनच नाही. आपल्याबरोबर कोण चालत आहे, तो कोणत्या पंथाचा आहे, तो कोणत्या विचारधारेचा या संबंधी तब्लिगी जमाअत कोणालाच विचारपूस करत नाही. त्यामुळे सऊदी सरकारचा हा दावा की त्यांच्या तुरूंगामधील काही लोक असे आहेत ज्यांनी तबलिगी जमाअतमध्ये काही काळ व्यतीत केलेला आहे आणि ते देशविरोधी कारवायांमध्ये लिप्त आढळले तसेच ते आतंकवादी विचारसरणीचे होते, तर यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कारण त्या लोकांची ती व्यक्तीगत कृती आहे. जमाअतमध्ये फक्त त्यांच्या चारित्र्यसंवर्धनाचेच काम केले गेले असावे. त्यांच्या इतर व्यवहाराशी जमाअतचा काही एक संबंध येत नाही.

तबलिगी जमाअतवर प्रतिबंध लावण्यामागची कारणे

मुळात खादीमैन-ए-हरमैन-शरीफैन अर्थात मक्का आणि मदिनाचे सेवक म्हणून सऊदी सरकार सऊदी अरबकडे सगळेच आदराने पाहतात. परंतु सऊदी अरबमध्ये सत्तारूढ असलेले सऊदी घराने हे स्वतः इस्लामच्या मूळ शिकवणीपासून लांब गेलेले आहे.  

1. त्यांची पहिली सर्वात मोठी चूक ही की त्यांनी आपल्या देशाचे नाव अरबस्थान (जजीरतुल अरब ) बदलून सऊदी अरब केलेले आहे. सऊद हे नाव सऊदी अरबच्या सत्ताधाऱ्यांच्या कबिल्याचे नाव आहे. येणेप्रमाणे सऊदी अरब जगातील एकमेव असा देश आहे ज्याचे नाव त्याच्या भूमीमध्ये राहणाऱ्या एका कबिल्याच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे. जे की चूक आहे. 

2. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या देशात इस्लामला मान्य असलेली खिलाफत आधारित लोकशाही न स्थापन करता स्वतःची घराणेशाही लागू केलेली आहे. 

3. त्यांची तीसरी चूक अशी की, त्यांना सऊदी अरबमध्ये वहाबीजम (कट्टर इस्लामी विचारधारा) सुरू ठेवायची आहे. त्यामुळे त्यांना इस्लामच्या इतर विचारधारांची भीती वाटते. त्या भीतीतूनच त्यांनी तबलिगी जमाअतवर प्रतिबंध लादलेले आहेत.

3. तबलिगी जमाअत ही रूढीवादी जमाअत असून, इस्लामच्या प्राचीन मुल्यांवर तिचा विश्वास आहे. आणि अलिकडे राजपुत्र मुहम्मद बिन सलमान यांनी सऊदी अरबमध्ये आधुनिकतेच्या नावाखाली बिगर इस्लामी मुल्यांना स्थान देण्यास सुरूवात केलेली आहे. उदा. (अ) इस्लामला मान्य असलेली महिलांसंबंधीची महेरमची पद्धत त्यांनी बंद केली. (ब)  हॉटेलमध्ये अविवाहित बिगर अरब  जोडप्यांना प्रवेश देण्यास सुरूवात केली. (क) मदिनासारख्या पवित्र शहरामध्ये सिनेमा थिएटच्या बांधकामाला परवानगी दिली. (ड) नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री समारोह करण्याच्या बिगर इस्लामी पद्धतीला मान्यता दिली. (इ) मागच्या आठवड्यात त्यांनी पाकिस्तानला 3 कोटी डॉलर कर्ज म्हणून 6 टक्के व्याजाने दिले. म्हणजे इस्लामला मान्य नसलेल्या व्याजाधारित अर्थव्यवस्थेला त्यांनी मान्यता दिली. (ई) अरबांची ऐश जगप्रसिद्ध आहे. भारतातील प्रत्येक मोठ्या शहरात विशेषतः मुंबई, मिरज आणि हैद्राबादमध्ये येवून सऊदी नागरिक  काय करतात हे सर्वांना माहित आहे. (उ) काबागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नाव बाब-ए-शहा अब्दुल अजीज असे आपल्या पूर्वजाच्या नावावर ठेऊन त्यांनी काबागृहाचे महत्व कमी केले. (ऊ) अमेरिका आणि इजराईलच्या कच्छपी लागून त्यांनी कुरआनला मान्य असलेली संगसारी (गुन्हेगाराला दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा पद्धती) बंद केली. (ड) आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृतीचा जो धुडगुस सऊदीमध्ये घातला जातोय तबलिगचे लोग येवून हे सर्व हराम आहे, हे तेथील जनतेला समजावून सांगतील व असंतोष निर्माण होईल. या भीतीनेसुद्धा त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आला असावा.

एवढेच नव्हे तर 11 डिसेंबर शुक्रवारी ज्या दिवशी चारित्र्य संवर्धनास प्रसिद्ध असलेल्या तबलिगी जमाअतवर प्रतिबंध लावण्याची घोषणा मस्जिदीमधून करण्यात आली त्याच दिवशी रियाद या राजधानीच्या शहरात सलमान खानने 80 हजार सऊदी नागरिकांच्या समोर आपला डान्स, इतर कलाकार शिल्पा शेट्टी, प्रभू देवा, सई परांजपे आणि आयुष्य यांच्यासोबत सादर केला. ही किती मोठी विडंबना आहे. तबलिगी जमाअतमुळे जर सऊदी नागरिक पथभ्रष्ट होत असतील तर सलमान खानच्या परफॉर्मन्सने ते सन्मार्गावर येणार आहेत काय? याची उत्तर किंग सलमान यांनीच द्यावे. 

ज्या मुहम्मद बिन सलमानवर सऊदी नागरिक व पत्रकार जमाल खशोगी याच्या निघृण खुनाचा आरोप आहे, ज्या देशाच्या नागरिकांना 9/11 च्या हल्ल्यामध्ये शिक्षा झालेली आहे, जो सऊदी अरब गेल्या पाच वर्षापासून यमन या शेजारी देशावर कारपेट बॉम्बिंग करून लाखो नागरिकांच्या हत्येसाठी जबाबदार आहे त्याच्या तोंडातून इस्लामच्या संरक्षणाची भाषा शोभत नाही व तबलिगी जमाअतवर प्रतिबंध लावण्याचा त्या देशाच्या शासनकर्त्यांना कुठलाच नैतिक अधिकार नाही. कुरआनमध्ये म्हटले आहे की, ’’हे श्रद्धावंतांनो! न्यायावर दृढ राहा आणि अल्लाहसाठी साक्षीदार बना, यद्यपि तुमच्या न्यायाचा व तुमच्या साक्षीचा आघात तुम्हा स्वतःवर अथवा तुमच्या आईबापावर व नातेवाईकांवर जरी होत असेल तरी देखील! मामल्यातील पक्षकार मग तो श्रीमंत असो अथवा गरीब, अल्लाह तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितचितक आहे. म्हणून आपल्या मनोवासनेच्या अनुकरणात न्यायापासून दूर राहू नका आणि जर तुम्ही पक्षपाताची गोष्ट बोललाच अथवा सत्याला बगल दिली तर समजून असा की जे काही तुम्ही करता अल्लाहला त्याची माहिती आहे.  (सुरे अन्निसा : आयत नं.135)

तबलिगी जमाअत उपयोगात आणत असलेल्या पुस्तकांमधील काही मजुकराविषयी इस्लामी विद्वानांमध्ये मतभेद असले तरी वरील कुरआनच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक श्रद्धावान मुस्लिमांचे हे कर्तव्य आहे की, सऊदी सरकारच्या या चुकीच्या आदेशाचा निषेध करावा. समाधानाची बाब ही आहे की, स्वतः सऊदी अरबमधूनच एवढे प्रतिबंध असतांनासुद्धा या आदेशाविरूद्ध स्वर उमटत आहेत. 

- एम. आय. शेख


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget