Halloween Costume ideas 2015

महासत्तांच्या वर्चस्वाची लढाई आणि इस्लामची भीती


ऑक्टोबर 2023 रोजी भल्या पहाटे हमासने इजराइलमध्ये प्रवेश करून जो हल्ला केला तो आतंकवादी हल्ला होता, यावर अपवादखेरीज करून अवघ्या जगाचे एकमत आहे. गरीब बिचारा इजराईल त्यानंतर जे काही करत आहे तो मात्र प्रतिकारात्मक कारवाई आहे. याबद्दल सुद्धा अपवादखेरीज करून जगाचे एकमत आहे. अमेरिकेने इजराईलची याप्रकरणात जी मदत केली व ज्या स्तरावर केली व अमेरिकेचा हस्तक्षेप पाहून 58 मुस्लिम राष्ट्रांनी जी सावध भूमिका घेतली यावरून एक गोष्ट सिद्ध झालेली आहे ती म्हणजे हे युद्ध इजराईल आणि हमास यांच्यातील नसून अमेरिका आणि मुस्लिम जगताशी आहे. जॉर्ज बुश, बिल्निलंटन आणि बराक ओबामा या तीन राष्ट्राध्यक्षांच्या कालावधीचा एकत्रित विचार केला तर या तीन राष्ट्राध्यक्षांनी अफगानिस्तानसह मध्यपुर्वेतील 9 देशांवर आक्रमण केल्याचे लक्षात येते. यापूर्वी इराण-इराक युद्ध 10 वर्षे सुरू ठेवण्यामध्ये सुद्धा अमेरिकेचीच महत्त्वाची भूमिका होती. मध्यपुर्वेत सतत मुस्लिम राष्ट्रांमध्ये युद्ध सुरू राहील याची डोळ्यात तेल घालून अमेरिका दक्षता घेत असतो. लिबियाचा गद्दाफी असो, इराकचा सद्दाम हुसैन असो की हमासचा इस्माईल हनिया असो अमेरिकेला कोणत्याही मुस्लिम शासकाने आव्हान दिल्याचे अमेरिकेला आवडत नाही. आधीच तेलसंपन्न असलेल्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये जर शांतता राहिली तर ते अधिक शक्तीशाली होतील आणि त्यानंतर ते अमेरिकेला आव्हान देण्याच्या स्थितीमध्ये येतील अशी भीती अमेरिकेला वाटते. म्हणूनच गाझा सारख्या अमेरिकेला आव्हान देणाऱ्या पॅलेस्टिन लोकांची चोहोबाजूंनी कोंडी करून त्यांच्यावर पावसासारखा अग्नीवर्षाव करतांना अमेरिकेला जरासुद्धा वाईट वाटत नाही. 1991 साली गोरबाचेव्ह यांना हाताशी धरून युएसएसआर (युनायटेड सोव्हियत सोशिलिस्ट रिपब्लिक)ची शकले उडविल्यानंतर अमेरिकेने आता जग दोन ध्रुवीय राहिलेले नसून एक ध्रुवीय झालेले आहे आणि तो ध्रुव अमेरिकेची धारणा झालेली आहे. अमेरिकेला जी गोष्ट महासत्ता बनवते ती त्याची व्याजाधारित अर्थव्यवस्था आहे. अमेरिकेतील बँका आणि आयएमएफ व वर्ल्ड बँक यांच्यामार्फतीने अमेरिका तिसऱ्या जगातील गरीब आणि विकसनशील देशांचे प्रचंड आर्थिक शोषण करतो व त्यातून आपले सामर्थ्य वाढवितो. चीन म्हणायला जरी साम्यवादी देश असला तरी त्यांची अर्थव्यवस्था व्याजावर आधारित शुद्ध भांडवलशाही आहे. जे देश अमेरिकेच्या भांडवलशाही एकाधिकारशाहीला आव्हान देऊ शकतील त्यांचीच अमेरिकेला भीती आहे. हे आव्हान व्याजविरहित अर्थव्यवस्था मान्य असलेल्या इस्लामी देशांकडून मिळेल, याची अमेरिकेला सार्थ भीती वाटते. म्हणून अमेरिका व्याजविरहित अर्थव्यवस्था जगात कुठेही डोके वर काढणार नाही याची काळजी घेत असतो. 57 मुस्लिम राष्ट्रांपैकी फक्त इराण आणि अफगानिस्तान अशी दोनच मुस्लिम राष्ट्रे आहेत जे व्याजविरहित अर्थव्यवस्थेचे ध्वजवाहक आहेत. म्हणूनच अमेरिका या दोन देशांचा कट्टर विरोधक आहे. बाकी सर्व मुस्लिम राष्ट्रांमध्ये अर्थव्यवस्थेचे अमेरिकन मॉडेलच प्रचलित आहे. म्हणून अमेरिकेचा त्या देशांना विरोध नाही. 

मध्ययुगीन काळात सर्वच ख्रिश्चन बहुल देशात सत्तासुत्रे ही चर्चच्या हाती होती. मात्र जशी-जशी वैज्ञानिक प्रगती होत गेली तशी-तशी ख्रिश्चन जनता चर्चपासून दूर होत गेली. भौतिक प्रगतीचा वेग वाढला आणि या प्रगतीच्या आड येणाऱ्या बायबलमधील धर्म आज्ञांना नाकारण्यास सुरूवात झाली. इतके की हळूहळू व्याज, नशा, अश्लिलता, खोटेपणा, भ्रष्टाचार या ख्रिश्चन धर्मात निषिद्ध असलेल्या गोष्टींना त्या समाजामध्ये स्विकारले गेले इतके की पुढे चालून त्यांना मानाचे स्थान मिळाले. चर्च हे फक्त रविवारच्या प्रार्थनेपुरते शिल्लक राहिले. आजतर अशी परिस्थिती आहे की, ’विक-एंड’च्या सुट्ट्यांच्या नियोजनामध्ये, ’’संडे-प्रेअर’’ला सुद्धा स्थान राहिलेले नाही. काही वृद्ध मंडळी चर्चमध्ये जातात. बाकी लोक आपल्या चंगळवादी जीवनशैलीत मस्त आहेत. परिणामी, पाश्चात्य समाज धार्मिक बंधनातून जवळ-जवळ मोकळा झाला. धर्माची मर्यादा सोडली की तिचा शेवट नास्तिकतेत होतो. म्हणून आजमितीला पाश्चिमात्य देशांमध्ये नास्तिक नागरिकांची संख्या 70 ते 75 टक्के एवढी प्रचंड आहे. म्हणूनच अनेक चर्चकडून ख्रिश्चन युवा पिढीला, ’’लॉस्ट- जनरेशन’’ (वाया गेलेली पिढी) असे संबोधले जाते. या उलट अमेरिकेच्या प्रसिद्ध ,’’ प्यु रिसर्च सेंटर’’चे अनेक सर्व्हेक्षण अहवाल असे आहेत की, ज्यात इस्लामला   जगात सगळ्यात वेगाने वाढणारा धर्म असल्याचे मान्य केले गेले आहे. विपरित परिस्थिती व प्रचंड दुष्प्रचारानंतरसुद्धा इस्लामने पाश्चिमात्य देशात ज्या गतीने आपली घौडदौड सुरू ठेवली आहे ती आश्चर्यजनक म्हणता येईल अशीच आहे.  

ख्रिश्चन आणि इस्लाम या दोन्ही धर्मांवर नजर टाकली असता एक फरक चटकन लक्षात येतो, तो हा की, ख्रिश्चन धर्म हा सर्व भौतिक सोयीसुविधांनी सुसज्ज असतांनासुद्धा रक्षात्मक मुद्रेत आहे तर कुठल्याही भौतिक सोयी सुविधा नसतांनासुद्धा इस्लाम हा आक्रमक मुद्रेत आहे. याची कारणमिमांसा करतांना पोप बेनेड्निट सहावे यांनी एकदा म्हटले होते की, ’’ मुस्लिम धार्मिकदृष्ट्या आक्रमक असण्यामागचे कारण हे आहे की, कुरआनच्या रूपात त्यांच्याकडे, ’’ वर्ड-ऑफ-गॉड’ आहे.  ते ही शुद्ध स्वरूपात आहे. याशिवाय विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध इतिहासकार आरनॉल्ड ट्विन बी. म्हणतो की, ’’ पाश्चिमात्य सभ्यतेचा अंत होत आहे. तिचे पुनरूज्जीवन करावयाचे असल्यास त्यांना दोन गोष्टी कराव्या लागतील. एक-स्वतःमध्ये अध्यात्मिकता वाढवावी लागेल, दोन-  तंत्रज्ञानाचे वेड कमी करावे लागेल. विसाव्या शतकाच्या मध्यामध्ये पाश्चिमात्य देशांचा एक विचार असा होता की, इस्लाममध्ये आधुनिक काळासोबत आपल्या अनुयायांना नेण्याची क्षमता नाही. प्रगतीची चाके मागच्या बाजूने फिरविण्यात इस्लामला रस असतो. थोडक्यात इस्लाममध्ये राहून प्रगती शक्य नाही. याच कारणामुळे मुस्लिम हे वेगाने प्रगती करू शकत नाहीत. वरकरणी हा विचार खरा वाटतो मात्र खोलपणे विचार केला असता हा विचार पोकळ आहे, हे लक्षात आल्यावाचून राहत नाही. माणसाच्या आतून निर्माण होणाऱ्या नैतिक शक्तीशिवाय बाहेरील भौतिक शक्ती कितीही मोठी असली तरी ती माणसाच्या कामी येत नाही, हे इतिहासात अनेकदा सिद्ध झालेले आहे. यासाठी एक उदाहरण स्पेनचे घेता येईल. स्पेनवर मुस्लिमांनी म्हणजे अरबांच्या बनी उमय्या या खिलाफतीचे प्रतिनिधी तारीक बिन जियाद यांनी स्पेनच्या जनतेच्या आग्रहास्तव इ.स. 711 मध्ये प्रवेश केला व सत्ता ताब्यात घेतली. मुस्लिमांनी तेथे 1492 पर्यंत म्हणजे 781 वर्षे शासन केले. त्या काळात स्पेनने जगात सगळ्यात जास्त भौतिक प्रगती केलेली होती. मात्र ती प्रगती त्यांच्या कामी येवू शकली नाही. जेव्हा त्यांची नैतिक शक्ती खचली तेव्हा शासन करण्याचा त्यांचा प्रयत्न स्थानिक जनतेने उधळून लावला. इतका की ज्या स्पेनवर त्यांनी 781 वर्षे राज्य केले त्या स्पेनला त्यांना रडत-रडत सोडून मायदेशी परतावे लागले. याचाच अर्थ असा की, माणसाला सुखी बनविणाऱ्या वस्तू मुबलक व धन अमाप प्रमाणात उपलब्ध असेल आणि हाती सत्तासुद्धा असेल मात्र समाज आतून नैतिकदृष्ट्या खचलेला असेल तर तो समाज फार काळ सुखी राहू शकत नाही. प्रगत समाज सार्थक जीवन जगू शकतो, हे गृहितकच मुळात चुकीचे आहे. पैशानी महागडे पलंग व गादीतर विकत घेता येते पण झोप विकत घेता येत नाही. 

माणसाला श्रीमंत बनविणाऱ्या गोष्टी त्याच्या आत असतात. ज्या प्रमाणे सदृढ शरिरासाठी पेशींची वाढ आवश्यक असते पण पेशी जेव्हा अनियंत्रित वाढू लागतात तेव्हा त्यांचे रूपांतर कर्करोगात होते. त्याचप्रमाणे गतीशील भौतिक प्रगती समाजासाठी आवश्यक असते पण अनियंत्रित भौतिक प्रगती ही सुद्धा समाजासाठी कर्करोगाएवढी धोकादायक असते. म्हणूनच इस्लाममध्ये माणसाच्या जीवनाशी निगडीत कोणत्याही गोष्टींची वाढ अनियंत्रित होणार नाही, यासाठी शरियतने चेक आणि बॅलेन्सची एक परिपूर्ण संहिताच दिलेली आहे. 

पाश्चिमात्य देशांना इस्लाम न आवडण्यामागचं पहिलं कारण व्याज आहे. सामान्य लोकांमध्ये असा एक समज दृढ झालेला आहे की, पाश्चिमात्य देशांमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन जनतेमध्ये जो वाद आहे तो धार्मिक आहे. हा समज चुकीचा आहे. इस्लाम हा बायबलला ईश्वरीय ग्रंथ म्हणून मान्यता देतो. मदर मेरीला पवित्र माता म्हणून मान्यता देतो. येशू ख्रिश्तांना प्रेषित म्हणून मान्यता देतो. याच कारणाने आजही अनेक मुस्लिम मुलींची नावे मरियम (मेरी) आणि अनेक मुलांची नावे इसा (येशू) मोठ्या श्रद्धेने ठेवली जातात. ख्रिश्चन लोकांना कुरआनने, ’’अहले किताब’’ म्हणजेच एका धर्मग्रंथाला माणणारेे म्हणून संबोधले आहे व त्यांच्याशी रोटी-बेटी व्यवहार करण्याची परवानगी दिलेली आहे. मुस्लिमांच्या मनात ख्रिश्चन धर्माविषयी कुठलीही विरोधाची भावना नाही. त्यांचा ख्रिश्चन नागरिकांना जो विरोध आहे तो यासाठी आहे की, त्यांनी बायबलच्या मूळ शिकवणीचा त्याग करून स्वतःच्याच मनाने एक नवीन जीवन पद्धती सुरू केेलेली आहे, ज्याला भांडवलशाही असे म्हणतात. विरोध आहे तो या जीवन पद्धतीला आहे.  भांडवलशाही व्यवस्थेचा शोध ख्रिश्चनांनीं लावला व या पद्धतीला जगातील सर्वच देशांनी स्विकारले. या भांडवलशाही व्यवस्थेला इस्लामचा विरोध आहे. कारण ही व्यवस्था त्रुटीपूर्ण व शोषणावर आधारित व्यवस्था आहे. व्याज या व्यवस्थेचा पाठीचा कणा आहे. इस्लामची अशी शिकवण आहे की, व्याज हराम आहे. कारण व्याजामुळे गरीबांचा सर्वनाश होतो. 

या व्यवस्थेत श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होत जातात. हे सर्व होतांना बहुसंख्य लोक उघड्या डोळ्यांनी ठीक त्या पद्धतीने पाहतात ज्या पद्धतीने शक्तीशाली सिंह हरणाच्या पाडसाला त्यांच्या कळपातून ओढून घेवून जातांना हरिणांचा कळप असहाय्यपणे पाहत राहतो, त्यांना काहीच करता येत नाही. या विवशतेमधून त्यांच्यातील काही लोक नाईलाजाने हत्यार उचलतात व नक्षलवादी बनतात तर ज्यांच्यात हत्यार उचलण्याची हिम्मत नसते ते आत्महत्या करून या आर्थिक पिळवणुुकीतून आपली सुटका करून घेतात. इस्लामला हे दोन्ही पर्याय मान्य नाहीत. तो हत्यार उचलण्याचेही समर्थन करत नाही व आत्महत्या करण्याचेही समर्थन करत नाही. तो माणसाच्या सद्प्रवृत्तींना साद घालतो व व्याजरहित अशा एका शुद्ध अर्थव्यवस्थेकडे बोलावितो. ज्यामध्ये माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळेल. ज्यात व्याजाचा नाश होईल व अर्थव्यवस्था नैसर्गिकरित्या वाढेल. संपत्ती सर्वांच्या हाती येईल. व्याजामुळे अर्थव्यवस्थेची गती कृत्रिमरित्या वाढते. म्हणून त्या गतीने गरीबांना पळता येत नाही व ते मागे पडत जातात. याउलट व्याजमुक्त अर्थव्यवस्थेची गती नैसर्गिक असते म्हणून गरीबांना सुद्धा त्या गतीबरोबर चालता येते, ते मागे पडत नाहीत व समाजातील सर्व घटकांचा संतुलित विकास होतो. हाच विकास खरा विकास असतो. कारण यातूनच सामाजिक संतुलन साधले जाते. यात श्रीमंतांना आपली श्रीमंती वाढविण्याचीही संधी असते मात्र त्यांना अवाजवी गती गाठता येत नाही, कारण व्याजरूपी इंधन त्यांना मिळत नाही. आपल्या नैसर्गिक क्षमतेनेच त्यांना श्रीमंती वाढवावी लागते. गरीबांना केवळ ते संसाधनविहीन आहेत म्हणून प्रगतीपासून रोखता येत नाही. त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे प्रगती करता येते. कारण व्याजाचा अडसर नसल्यामुळे त्यांच्या प्रगतीला अनावश्यक बाधा पोहोचत नाही.

मात्र प्रत्येक देशातील व प्रत्येक समाजातील (त्यात काही मुस्लिमही आले) लोकांना हा संतुलित विकास आवडत नाही म्हणून त्यांना इस्लाम आवडत नाही. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये श्रीमंतांना आपले श्रेष्ठत्व सिद्ध करावयाचे असते. येथेच इस्लाम आणि श्रीमंतांचा संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष मुळात सुरूच होवू नये, यासाठी श्रीमंत लोक इस्लामचा द्वेष करतात. इस्लाम न आवडण्याचे एक कारण हे सुद्धा आहे की, इस्लाम दारू, ड्रग्स, संगीत, सिनेमा, सिरियल्स, वेश्याव्यवसाय, फॅशन इत्यादी अनुत्पादक मात्र प्रचंड उत्पन्न देणाऱ्या मात्र त्याचवेळेस समाजाचे तेवढेच नुकसान करणाऱ्या उद्योगधंद्यांचा विरोध करतो. बुद्धिमान वाचक हे जाणूनच आहेत की, हे ’धंदे’ समाजातील सत्तेची सुत्रे ज्यांच्या हाती आहेत त्यांची किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचीच असतात. इस्लामी व्यवस्था समाजात प्रस्थापित झाली तर ह्यांचे हे ’धंदे’ बंद पडतात. म्हणून या लोकांना इस्लाम आवडत नाही. 

अशा या जागतिक भांडवलशाही संरेचनमध्ये गांधींचा अहिंसेचा वारसा लाभलेल्या देशात राहणाऱ्या मुस्लिमांना ही संधी नैसर्गिकरित्याच उपलब्ध आहे की, आपल्या वाणी आणी आचरणाने त्यांनी कल्याणकारी इस्लामी जीवन व्यवस्थेचा परिचय जगाला करून द्यावा. आव्हान मोठे आहे म्हणूनच ते पेलण्यासारखे आहे. जय हिंद!


- एम. आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget