Halloween Costume ideas 2015

आलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१०१) तुमच्यासाठी अधर्माकडे परतण्याला आता कुठे वाव उरला आहे जेव्हा तुम्हाला अल्लाहची वचने ऐकविली जात आहेत आणि तुमच्या दरम्यान त्याचा पैगंबर उपस्थित आहे?  ज्याची बांधिलकी अल्लाहशी भक्कम असेल त्याला निश्चितच सरळमार्ग मिळेल. (१०२) हे ईमानधारकांनो! अल्लाहचे भय बाळगा जसे भय बाळगले पाहिजे आणि तुम्हाला अशा  अवस्थेत मरण यावे की तुम्ही अल्लाहचे मुस्लिम (आज्ञाधारक) आहात.८२ (१०३) सर्वजण मिळून अल्लाहच्या दोरीस८३ घट्ट धरून असा आणि आपसांत फाटाफूट होऊ देऊ नका.  अलाहच्या त्या उपकाराची आठवण ठेवा, जो त्याने तुम्हावर केला आहे. तुम्ही एक दुसऱ्याचे शत्रू होता, त्याने तुमची मने जोडली आणि त्याच्या मेहेरबानी व कृपेने तुम्ही बंधुजन झालात. तुम्ही अग्नीने भरलेल्या एका खड्ड्याच्या तोंडावर उभे होता, अल्लाहने तुम्हाला त्यापासून वाचविले.८४ अशाप्रकारे अल्लाह आपली संकेतचिन्हे तुमच्यासमोर प्रकाशित करतो.  कदाचित यामुळे तुम्हाला आपल्या कल्याणाचा सरळमार्ग दिसावा.८५ (१०४) सद्वर्तनाचे आवाहन करणारा व चांगुलपणाचा आदेश देणारा, तसेच दुराचाराचा प्रतिबंध करणारा एक गट  तुमच्यात अवश्य असला पाहिजे,जे हे करतील अशा लोकांना साफल्य लाभेल. (१०५) एखाद्या वेळी तुम्ही त्या लोकांसारखे होऊ नये जे गटागटांत विभागले गेले आणि उघड उघड स्पष्ट सूचना मिळाल्यानंतर पुन्हा मतभेदांत गुरफटले.८६ ज्यांनी हे वर्तन अवलंबिले ते त्या दिवशी कठोर शिक्षा भोगतील. (१०६) जेव्हा काहींचे चेहरे तेज:पुंज असतील तर काहींचे चेहरे काळवंडलेले असतील. ज्यांचे चेहरे काळवंडतील (त्यांना सांगण्यात येईल की) ईमानची देणगी मिळाल्यानंतर तुम्ही नाकारणाऱ्यांचे (कुफ्र) वर्तन करता? बरे तर आता या कृतघ्नतेच्या मोबदल्यात प्रकोपाचा आस्वाद घ्या. (१०७) उरले ते  लोक ज्यांचे चेहरे तेज:पुंज असतील तर त्यांना अल्लाहच्या कृपाछत्राखाली जागा मिळेल आणि ते सदैव त्याच अवस्थेत राहतील.  (१०८) हे अल्लाहचे आदेश आहेत जे आम्ही तुम्हाला ठीकठीक ऐकवीत आहोत कारण अल्लाह जगवासियांवर अत्याचार करण्याचा कोणताही हेतू बाळगत नाही.८७ (१०९) पृथ्वी आणि  आकाशातील साऱ्या वस्तूंचा मालक अल्लाह आहे आणि सर्व व्यवहार अल्लाहच्याचपुढे सादर होतात. (११०) आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल  मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी व सुधार करण्यासाठी (कल्याणासाठी) अस्तित्वात आणले गेले आहे.



८२) म्हणजे मरेपर्यंत अल्लाहच्या आज्ञापालनात आणि कृतज्ञतेवर कायम राहावे.
८३) अल्लाहच्या दोरीने अभिप्रेत अल्लाहचा दीन धर्म आहे. अल्लाहने अवतरित परिपूर्ण जीवनप्रणालीस (दीन-धर्म) दोरीची उपमा यासाठी देण्यात आली आहे की हाच तो अतुट संबंध  आहे, जो एकीकडे मुस्लिमांचा संबंध अल्लाहशी निश्चित करतो आणि दुसरीकडे सर्वमुस्लिमांना एकत्रित करून त्यांची मजबूत संघटना (जमात) स्थापन करतो. या ``दोरीला मजबूत  (घट्ट) पकडण्याचा'' अर्थ होतो, मुस्लिमांच्या नजरेत वास्तविक महत्त्व जीवन धर्मप्रणालीचे (दीन) असावे. त्याला प्रस्थापित करण्यासाठीच (वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात) त्यांनी  प्रयत्नरत असावे आणि त्यांनी एकमेकांना मदत करावी. जेव्हा कधी अल्लाहने अवतरित या स्वाभाविक परिपूर्ण जीवन धर्मप्रणाली (दीन) ला प्रस्थापित करण्याच्या ध्येयापासून व  त्याच्या मूलभूत शिकवणींपासून मुस्लिम जर दूर गेले आणि त्यांचे लक्ष गौण व लहानसहान गोष्टींतच अडकून गेले तर त्यांच्यामध्ये निश्चिततीच फूट पडेल आणि आपापसात मतभेद  निर्माण होतील. जसे या पूर्वींच्या पैगंबरांच्या अनुयायांना त्यांच्या जीवनध्येयाचा (ईशप्रणित जीवनधर्म प्रणाली स्थापित करणे) विसर पडून. परिणामत: या जगात आणि परलोकात विनाशाला सामोरे जावे लागले.
८४) हा संकेत आहे त्या स्थितीकडे ज्यात इस्लामपूर्वी अरब पीडाग्रस्त होते. टोळया-टोळयांतील परस्पर शत्रुत्व, क्षुल्लक कारणांमुळे होणाऱ्या लढाया आणि रात्रंदिवसाचे खूनखराबे यामुळे  अरबांचा सर्वनाश समीप आला होता. या आगीत भस्म होण्यापासून त्यांना कोणी वाचविले असेल तर तो इस्लाम आहे. या आयतीं ज्या काळी अवतरित झाल्या त्यापूर्वी तीन-चार  वर्षांअगोदर मदीनावासी मुस्लिम बनले होते आणि इस्लामी जीवनप्रणालीची समृद्धता आपल्या डोळयांनी पाहात होते व स्वत: अनुभवत होते. औस आणि खज़रज नामक टोळया ज्या एक-दुसऱ्यांच्या वर्षानुवर्षे हाडवैरी होत्या, इस्लाम स्वीकारल्यानंतर एक-दुसऱ्यात मिसळून एक झाल्या होत्या. या दोन्ही टोळयांतील लोक मक्काहून येणाऱ्या निर्वासित (मुहाजीरांना)  लोकांशी अभूतपूर्व त्याग आणि प्रेमाचे वर्तन करीत होते, जे एका परिवाराचे लोकसुद्धा आपसात करू शकत नाहीत.
८५) तुम्ही दृष्टी राखता तर या निशाण्या पाहून स्वयं अनुमान लावू शकता की काय तुमची सफलता या जीवनप्रणालीला (इस्लाम) घट्ट धरण्यात आहे की त्याचा त्याग करून त्याच  पूर्वीच्या स्थितीत पलटून जाण्यात आहे? काय तुमचे भले करणारा अल्लाह आणि त्याचा पैगंबर आहे की हे यहुदी अनेकेश्वरवादी आणि कपटाचारी लोक जे तुम्हाला पुरातन काळातील दु:खी स्थितीत नेण्याचा प्रयत्न करत आहेत?
८६) हा संकेत त्या समुदायांकडे आहे ज्यांनी अल्लाहच्या पैगंबरांपासून सत्य धर्माची स्पष्ट आणि सरळ शिकवण घेतली. परंतु काही काळानंतर त्यांनी धर्माच्या मूलभूत तत्त्वांना सोडून  दिले आणि असंबंधित, गौण आणि तांत्रिक प्रश्नांवरून वेगवेगळे गट बनविले. नंतर निरर्थक व क्षुल्लक गोष्टींवर भांडू लागले. परिणामत: त्यांना अल्लाहने सोपविलेल्या कामाचा विसर  पडला आणि त्यांचा धारणा, सद्व्यवहाराच्या मूळ सिद्धान्तावर विश्वास राहिला नाही. ज्यावर वास्तविकपणे मनुष्याचे सौभाग्य आणि सफलता अवलंबून आहे.
८७) म्हणजेच अल्लाह जगवासीयांवर अत्याचार करू इच्छित नाही म्हणून तो लोकांना सरळमार्गही दाखवितो आणि वेळेपूर्वीच त्यांना सचेत करतो की शेवटी कोणत्या गोष्टींची विचारणा  तो त्यांच्याशी करणार आहे. यानंतरसुद्धा ज्यांनी वाम मार्ग अवलंबिला आणि आपल्या चुकीच्या पद्धतीवरून हटले नाही तर ते स्वत:च स्वत:वर अत्याचार ओढवून घेतील.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget