Halloween Costume ideas 2015

पृथ्वीच्या रक्षणासाठी वनसंरक्षण व संवर्धन आवश्यकच!


पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा दक्षपणे व काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, शिवाय समस्त मानवजातीकडून मोठ्या प्रमाणात होणारे पृथ्वीवरील प्रदूषण व पर्यावरणाची हानी रोखणे किंवा त्याला आळा घालणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे;याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. असे आता जगभरातील पर्यावरण तज्ञ सांगत आहेत.मात्र त्यांच्या या धोक्याच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने कोणी लक्ष देत नाही असे दिसते, आज वनसंरक्षण आणि वनसंवर्धन तसेच पर्यावरण रक्षणासाठी आपण पाऊल उचलले नाही तर ही पृथ्वी नामशेष व्हायला वेळ लागणार नाही.यात संदेह नाही.

प्रचंड वेगाने वाढत जाणारी लोकसंख्या , वायू व जलप्रदूषण, अनिर्बंधीत जंगलतोड, प्लॅस्टिक तसेच दूषित पाणी व रासायनिक धूर व वस्तूंमुळे होणारी पर्यावरणाची हानी यामुळे पृथ्वीवरील भार कमालीचा वाढत चालला आहे.हे विचारात घेऊन सन १९९२ मध्ये ‘रिओ दि जानेरो’ येथे पहिली वसुंधरा शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या जागतिक परिषदेत पृथ्वी वाचविण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली व त्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण ठरावही संमत करण्यात आले. यावेळी ‘अजेंडा-२१’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या घोषणापत्राने पर्यावरणाचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रसंघ आणि देशोदेशीच्या सरकारांच्या कार्यक्रमपत्रिकेवर आला. ही शिखर परिषद पार पडून आता सुमारे तीस वर्षे झाली आहेत. दरम्यानच्या काळात परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी ती वेगाने अधिकच बिघडत चालली आहे.असे निदर्शनास आले आहे.

आज जागतिक लोकसंख्या १.६ अब्जांनी वाढली आहे. या प्रचंड लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी  पृथ्वी जेवढे देऊ शकते किंवा राखू शकते, त्याहूनही किती तरी जास्त प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर आपण करीत आहोत. त्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन ४८ टक्क्यांनी वाढले आहे. मानवी कृतीतून उत्सर्जित होणार्‍या हरितगृह वायूंपैकी ‘कार्बन डाय-ऑक्साइड’ हा सर्वाधिक घातक असा वायू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १५ वर्षांत पृथ्वीच्या तापमानात जेवढी वाढ झाली आहे. त्यापैकी ८५ टक्के तापमानवाढ एकट्या कार्बन डाय-ऑक्साइडमुळे झाली आहे. खनिज इंधने ही मानवनिर्मित कार्बन डाय-ऑक्साइडच्या उत्सर्जनाचे मोठे स्रोत आहेत. आपण ज्या ज्या वेळी वाहनांचा व उर्जेचा अतिरेकी वापर करत असतो. त्या त्या वेळी खनिज इंधने जाळून कार्बन डाय-ऑक्साइडची निर्मिती करत असतो, त्यामुळे आपण जागतिक तापमानवाढीला हातभार लावत असतो.

केवळ खनिज इंधनांद्वारेच जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणार्‍या वायूंची निर्मिती होते, असे नव्हे. तर आपल्या इतर छोट्या-मोठ्या कृतीतूनही पर्यावरणास घातक ठरणार्‍या वायूंची निर्मिती होत असते. जसे की- आपल्याला नको असलेले अन्न जेव्हा आपण फेकून देतो, तेव्हा जमिनीत फेकल्या गेलेल्या अन्नामुळेही जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणार्‍या वायूची निर्मिती होत असते. सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे आजमितीस उत्पादित अन्नाच्या साधारणपणे एक तृतीयांश अन्न फेकून दिले जाते. या कृतीतून आपण कोणाच्या तरी हक्काच्या अन्नाची नासाडी करतोच. शिवाय अन्नधान्य उत्पादनासाठी वापरली गेलेली जमीन, पाणी, ऊर्जा या संसाधनांचीही एका अर्थाने नासाडीच करत असतो आणि अंतिमतः तापमानवाढीला चालना देत असतो. त्यामुळेच जागतिक तापमानवाढीचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. हिमपर्वत व हिमनद्या वितळू लागल्या आहेत आणि त्यांच्या पाण्यामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.काही वर्षापूर्वी त्सुनामी सारख्या महाभयंकर संकटाने आपल्याला धोक्याचा इशारा दिला आहे.या पार्श्‍वभूमीवर जागतिक पर्यावरणतज्ज्ञांनी छोटी बेटे आणि समुद्रसपाटीजवळ असलेल्या जगभरातील सर्वच शहरांना धोका आहे असे भविष्य वर्तवले आहे,हा एक गंभीर  इशाराच दिला आहे.

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र हरित आच्छादनाखाली म्हणजेच वनांखाली असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात हे प्रमाण राखण्याऐवजी दिवसेंदिवस यात कमालीची घटच होत आहे. गेल्या २५ वर्षांत ३०० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील वने तोडण्यात आली आहेत. जंगले नष्ट करणाऱ्या प्रवृत्तींविरोधी जगभरातील पर्यावरण तज्ञ सातत्याने प्रबोधन करीत आहेत.भारताच्या बाबतीत विचार करता, भारतामध्ये १९८० ते २००५ या कालावधीत १ लाख, ६४ हजार ६१० हेक्टर जंगलांचे खाणींमध्ये रूपांतर झाले आहे. खाणीसाठी रूपांतरीत झालेल्या एकूण वन जमिनीपैकी निम्म्याहून अधिक जमिनीवर आज कोळशाच्या खाणी आहेत.

‘भारतीय वन सर्वेक्षण संस्थे’च्या नोंदीनुसार, २००९ ते २०११ या कालावधीत देशात एकंदर ३६७ चौरस किमी जंगलांचा नाश झाला आहे. भारतातील नैसर्गिक जंगले दरवर्षी १.५ ते २.७ टक्के या वेगाने घटत चालली आहेत. अशा प्रकारे एका बाजूला आपण प्रदूषण वाढवत आहोत, तर दुसर्‍या बाजूला प्रदूषण रोखणारी जंगलसंपती नष्ट करत आहोत. याचे गंभीर परिणामही आता दिसू लागले आहेत. सन २००० पासून जगभरात प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूमध्ये ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यापैकी ६५ टक्के मृत्यू आशियात होत आहेत. ‘जागतिक आरोग्य संघटने’नुसार प्रदुषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे जगभरात दरवर्षी ३.२ दशलक्ष मृत्यूमुखी पडतात.  शिवाय स्वाईन फ्ल्यू , चिकनगुणिया, कोविड सारखे नवनवीन आजार जगभरात मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. अर्थात या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता पृथ्वीचे आरोग्य राखणे म्हणजे आपले आरोग्य राखण्यासारखेच आहे.पृथ्वीचे आरोग्य राखण्यामध्ये वने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एक मोठे झाड छोट्या-छोट्या वनस्पती, कीटक, प्राणी-पक्षी यांना आसरा देते. विषारी कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेऊन जागतिक तापमानवाढ कमी करते आणि प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचे उत्सर्जन करते. वनांमुळे जमिनीची धूप रोखली जाते. जमिनीत पाणी मुरते व महापूर-दुष्काळ यांसारख्या आपत्ती रोखण्यास मदत होते. तसेच वनांपासून फळे-फुले, औषधे, मसाले, रंग, जनावरांसाठी चारा, जळणासाठी, निरनिराळ्या वस्तू बनविण्यासाठी आणि घरबांधणीसाठी लाकूड मिळते. अशा प्रकारची जवळपास ५० हजार कोटी रुपयांची साधनसंपत्ती भारतातील वने दरवर्षी आपल्याला दरवर्षी उपलब्ध करून देतात. म्हणूनच यंदाच्या वनसंवर्धन दिनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वनरक्षणासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे. भारतीय वनसर्वेक्षणाचा इतिहास व त्याचे महत्त्व, भारतीय वनसंपत्तीसमोरील संधी व आव्हाने, तसेच वनशेती किंवा वनीकरणाच्या दृष्टीने आवळा लागवडीचे महत्त्व, वड, पिंपळ, बाभळी, यांसारख्या वृक्षांचे महत्त्व अधोरेखित होणे गरजेचे आहे. वन संवर्धनाच्या दृष्टीने प्रत्येकाने वैयक्तिक किंवा सार्वजनिक पातळीवर किमान काही प्रयत्न केले पाहिजेत, तरच वनसंवर्धन दिनाचे  सार्थक झाले, असे म्हणता येईल.

अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या आपल्या मूलभूत गरजा असोत किंवा चंगळवादी संस्कृतीतील  चैनीच्या वस्तू असोत. आपली प्रत्येक गरज पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीद्वारेच भागविली जाते. त्यामुळे पृथ्वीविषयी कृतज्ञतेची भावना बाळगणे, आपली पृथ्वी स्वच्छ, सुंदर व हरित ठेवणे, ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. म्हणूनच वनसंवर्धन दिनाच्या निमित्ताने पृथ्वी वाचविण्याच्या कार्यात प्रत्येक नागरिकाचा हातभार असणे आवश्यक आहे.

आपली पृथ्वी,ही वसुंधरा हीच आपली जननी आहे, शिवाय ही समस्त मानवजातीची जीवनदायीनी आहे,ती टिकली तरच आपण टिकणार आहोत,याचा गांभीर्याने विचार करून प्रत्येक नागरिकाने कर्तव्य भावनेने वनसंपती वाढवली पाहिजे,ही वनसंपदा वाढली तर आणि तरच पर्यावरण टिकणार आहे, आणि पर्यायाने पृथ्वी नष्ट होण्यापासून वाचणार आहे, आज पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाची महत्त्वपूर्ण गरज निर्माण झाली आहे,या वनसंवर्धन दिनाचे निमित्त साधून जंगल आणि वनसंपदा वाढविण्यासाठी आणि जंगले आणि वनसंपदा नष्ट करणाऱ्या प्रवृत्तींविरोधी खंबीरपणे उभे राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने संकल्प व प्रतिज्ञा केली पाहिजे.

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२


(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget