(५७) म्हणून जर हे लोक तुम्हाला युद्धात सापडले तर त्यांचा असा समाचार घ्या की त्यांच्यानंतर जे लोक असले वर्तन अंगीकारणारे असतील त्यांचे भान हरपले जाईल.४२ अपेक्षा आहे की करार-भंग करणाऱ्यांच्या या अशा शेवटाने ते धडा घेतील.
(५८) आणि जर तुम्हाला एखाद्या लोकसमुदायाकडून दगलबाजीची भीती असेल तर त्यांचे करार जाहीरपणे त्यांच्या तोंडावर फेकून द्या.४३ निश्चितच अल्लाह विश्वासघातकी लोकांना पसंत करीत नाही.
(५९) सत्याचा इन्कार करणाऱ्यांनी या भ्रमात पडू नये की त्यांनी विजय मिळविला. खचितच ते आम्हाला हरवू शकत नाहीत.
(६०) आणि तुम्ही लोक, यथाशक्ती जास्तीतजास्त सामर्थ्य आणि तयार बांधून ठेवले जाणारे घोडे त्यांच्या मुकाबल्यासाठी सज्ज ठेवा.४४ जेणेकरून त्यायोगे अल्लाहच्या व आपल्या शत्रूंना आणि त्या इतर वैऱ्यांना भयभीत करावे ज्यांना तुम्ही जाणत नाही परंतु अल्लाह जाणतो. अल्लाहच्या मार्गात जे काही तुम्ही खर्च कराल त्याची पुरेपूर तुम्हाला परतफेड केली जाईल व तुमच्यावर कदापि अन्याय होणार नाही.
(६१) आणि हे पैगंबर (स.)! जर शत्रूंचा कल, तह व शांततेकडे असेल तर तुम्हीदेखील त्यासाठी तयार व्हा आणि अल्लाहवर भरोसा ठेवा. नि:संशय तोच सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.
(६२,६३) आणि जर ते दगाफटका करण्याची नियत बाळगून असतील तर तुमच्यासाठी अल्लाह पुरेसा आहे.४५ तोच तर आहे ज्याने आपल्या मदतीने व श्रद्धावंतांच्याद्वारे तुमचे समर्थन केले. आणि श्रद्धावंतांची हृदये एकमेकांशी जोडली. तुम्ही पृथ्वीतलावरील सारी संपत्ती जरी खर्च केली असती तरीसुद्धा या लोकांची हृदये जोडू शकला नसता; परंतु तो अल्लाह आहे ज्याने यांची हृदये जोडली.४६ खचितच तो मोठा सामर्थ्यशाली व बुद्धिमान आहे.
(६४) हे नबी (स.)! तुमच्यासाठी आणि तुमच्या श्रद्धावंत अनुयायांकरिता तर बस अल्लाह पुरेसा आहे.
(६५) हे नबी (स.)! श्रद्धावंतांना युद्धाचे प्रोत्साहन द्या. जर तुमच्यापैकी वीस जण संयमी असतील तर ते दोनशे जणांवर मात करतील. आणि जर शंभर माणसे अशी असतील तर ते सत्य नाकारणाऱ्यांपैकी हजार माणसांवर विजयी ठरतील; कारण ते असले लोक आहेत ज्यांना जाण नाही.४७
(६६) बरे, आता अल्लाहने तुमचे भार हलके केले आणि त्याला कळून आले की अजून तुमच्यात दुर्बलता आहे, म्हणून जर तुमच्यापैकी शंभर जण संयमी असतील तर ते दोनशेवर आणि तुमच्यात असे एक हजार असतील तर ते अल्लाहच्या हुकुमाने दोन हजारांना भारी ठरतील.४८ आणि अल्लाह त्या लोकांसमवेत आहे जे संयमी आहेत.
४३) या आयतीनुसार आमच्यासाठी हे उचित नाही की जर एखाद्या व्यक्तीशी, समाजाशी किंवा देशाशी आपला करार झाला आणि त्याच्या व्यवहाराने कळते की तो करारपालन करीत नाही किंवा आशंका निर्माण होते की तो वेळ पडल्यास धोका देईल, अशा स्थितीत आपण स्वत: करारभंगाचा निर्णय घ्यावा आणि त्याच्याशी अचानक पूर्वीप्रमाणे व्यवहार सुरु करावा. याव्यतिरिक्त आम्हास याचे पालन करण्यास बाध्य केले आहे की जर अशी स्थिती समोर आली तर आम्ही विरोध करण्यापूर्वी त्याला सावध करावे की आपल्यामध्ये आता करार राहिलेला नाही. कारण तुम्ही वचनभंग करत आहात जेव्हा दुसरा पक्ष उघडउघड करारभंग करीत असेल आणि उघडपणे त्याने आपल्याविरुद्ध द्वेषपूर्ण कार्यवाही केली असेल तर या स्थितीत वरील आयतीनुसार समोरच्या पक्षाला करारभंगाची सूचना देणे आवश्यक नाही, तर त्याच्याविरुद्ध सूचना न देता सैनिक कार्यवाही करण्याचा अधिकार प्राप्त् होतो. इस्लामी धर्मशास्त्रींनी हा अपवाद पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या कार्यापासून घेतला आहे. कुरैशनी बनीखुजाआविषयी हुदैबियाचा करार उघडपणे भंग केला होता, तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्यांना करारभंगाची सूचना दिली नाही आणि मक्का शहरावर चालून गेले.
४४) म्हणजे तुमच्याजवळ युद्धसामुग्री आणि स्थायी सैन्य प्रत्येक वेळी तयार असले पाहिजे म्हणजे गरज पडल्यास त्वरित सैनिक कार्यवाही केली जावी. धोका समोर आल्यावर घाबरून लवकर सैन्याची जुळवाजुळवी करीत बसावे आणि तोपर्यंत शत्रूने आपला कार्यभाग उरकून घ्यावा असे होऊ नये.
४५) म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहारात तुमचे वर्तन डरपोक नसावे. अल्लाहच्या भरोशावर वीरतापूर्ण आणि साहसपूर्ण असले पाहिजे. शत्रूने संधीवार्तेसाठी इच्छा व्यक्त केली तर नि:संकोच त्याच्यासाठी तयार व्हावे. संधीसाठी हात पुढे करण्यास मागे राहू नका जरी त्याच्या नियतीविषयी तुम्हाला शंका असेल की तो विद्रोह करील. कोणाची नियत निश्चितपणे समजणे अवघड आहे. तो जर खरोखरी संधी (समेट) इच्छित असेल तर अशा स्थितीत तुम्ही विरोध करून का म्हणून खूनखराबा वाढवावा आणि तो विद्रोहाची इच्छा ठेवून असेल तर तुम्हाला अल्लाहवर भरोसा करून वीरतापूर्ण व्यवहार करायला पाहिजे. करारासाठी पुढे येणाऱ्या हातांना तुम्ही साथ द्या जेणेकरून तुमची नैतिक श्रेष्ठता प्रमाणित व्हावी. लढाईसाठी उठणाऱ्या हातांना आपल्या बाहुबलाने छाटावे जेणेकरून कोणीही तुम्हाला नरम (मऊ) घास समजू नये.
४६) संकेत त्या बंधुभाव आणि प्रेम आणि लगावाकडे आहे ज्यास अल्लाहने ईमानधारक अरबांमध्ये निर्माण करून त्यांना एक मजबूत जत्था बनविले होते. ते लोक त्या विभिन्न कबिल्यांचे होते ज्यांच्यात शतकानुशतके शत्रुत्व होते. मुख्यत: अल्लाहची ही मेहरबानी औस आणि खजरज यांच्याविषयी प्रखरतेने जाणवत होती. हे दोन्ही कबिले दोन वर्षांपूर्वीच एक-दुसऱ्याच्या रक्ताचे तहानलेले होते. बुआसच्या प्रसिद्ध लढाईलासुद्धा जास्त काळ लोटला नव्हता ज्यात एकमेकांनी एक-दुसऱ्याचे अस्तित्व संपविण्याचा चंग बांधला होता. अशाप्रकारच्या तीव्र शत्रुत्वाला दोन-तीन वर्षाच्या आत जिगरी दोस्तीत आणि बंधुत्वात बदलून दिले. या विरोधी तत्त्वांना समरस करून शिशे पाजळलेल्या भिंतीप्रमाणे एकजीव केले जसे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात इस्लामी संघटन होते. हे सर्व मनुष्यशक्तीबाहेरील कार्य होते. भौतिक संसाधनांनी असे महानतम कार्य पार पाडले जाऊ शकत नव्हते. म्हणून अल्लाह सांगतो की जेव्हा आमच्या समर्थनाने आणि मदतीने हे सर्वकाही करून दाखविले तेव्हा पुढे तुमची नजर भौतिक संसाधनावर नव्हे तर अल्लाहच्या समर्थनावर आणि मदतीवर असणे आवश्यक आहे. जे काही होईल ते अल्लाहच्याच मदतीने होईल.
४७) आजकालच्या परिभाषेत ज्याला `मनोबल' अथवा `नैतिक शक्ती' म्हटले जाते त्यालाच अल्लाहने प्रज्ञा, विवेक आणि समज म्हटले आहे. हा शब्द या अर्थासाठी नवीन पारिभाषिक शब्दावलीपेक्षा अधिक वैज्ञानिक आहे. जो मनुष्य आपल्या उद्देशाप्रती सचेत असेल आणि शांत मनाने विचार करून यासाठी लढत आहे की, स्वत:च्या जीवापेक्षा मौल्यवान वस्तू प्राप्त् व्हावी आणि त्या शिवाय जीवन मूल्यहीन आहे. तो अचेतावस्थेशी लढणाऱ्या व्यक्तीपेक्षा अनेक पटीने शक्तीवान आहे जरी दोघांची शारीरिक शक्ती एकसमान असेल. ज्याला वास्तविकतेचे बोध होते, तो आपले अस्तित्व व अल्लाहचे अस्तित्व तसेच अल्लाहशी आपले संबंध, जगाचे अस्तित्व आणि मृत्यूची वास्तविकता तसेच मृत्यूपश्चात जीवनाची वास्तविकता यांना चांगल्या प्रकारे जाणून असतो. त्याला सत्य आणि असत्यातील भेद तसेच असत्य प्रभावित होण्याच्या परिणामांचा खरा बोध होतो. अशा व्यक्तीच्या पासंगाला ते लोक पोहचू शकत नाहीत जे राष्ट्रवाद, क्षेत्रवादात किंवा वर्गीय वादात गुरफटून मैदानात उतरतात. म्हणूनच सांगितले गेले आहे की समजुतदार ईमानधारक आणि एक अल्लाहस नकार देणारा द्रोही त्यांच्यात विवेक आणि अविवेकीमुळे स्वभावत: एक आणि दहा असा अनुपात आहे. परंतु हा अनुपात केवळ समजुतदारपणाने होत नाही तर याबरोबर धैर्य (सब्र) चा गुणसुद्धा अनिवार्य अट आहे.
४८) याचा हा अर्थ नाही की पूर्वी एक आणि दहाचा अनुपात (प्रमाण) होता आणि आता तुमच्यात कमजोरी आली आहे म्हणून एक आणि दोनचे प्रमाण निश्चित केले आहे. किंबहुना याचा खरा अर्थ होतो की सैध्दान्तिक दृष्टीने आणि आदर्श रुपातसुद्धा ईमानधारक आणि कुफ्र करणाऱ्यांमध्ये एक आणि दहाचाच अनुपात आहे. परंतु अद्याप तुमचे नैतिक प्रशिक्षण पूर्ण झालेले नाही आणि अद्याप तुमची चेतना आणि समजदारी प्रौढतेच्या सीमेपर्यंत पोहचलेली नाही म्हणून सध्या हा अनुपात घटवून तुमच्याशी मागणी केली जाते की आपल्यापेक्षा दुप्पट जास्त शक्तीशी मुकाबला करण्यास तुम्हाला संकोच वाटू नये. लक्षात ठेवा की हे कथन हि. सन ०२ मधील आहे जेव्हा मुस्लिमांमध्ये नुकतेच इस्लाम स्वीकारलेले अनेक नवमुस्लिम होते. आणि त्यांचे प्रशिक्षण प्रारंभिक स्थितीत होते. नंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मार्गदर्शनात हे लोक प्रौढतेला पोहचले तेव्हा त्यांच्या आणि शत्रूंच्यामध्ये एक आणि दहाचे प्रमाण होते. म्हणून पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या अंतिम समयी आणि आदर्श चार खलीफांच्या समयीच्या युद्धाप्रसंगी याची प्रचिती येत होती.
Post a Comment