Halloween Costume ideas 2015

सूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(३४) परंतु आता त्याने त्यांच्यावर कोप का पाठवू नये जेव्हा ते मस्जिदेहराम (काबा मस्जिद) चा मार्ग रोखत आहेत व खरे पाहता ते त्या मस्जिदचे अधिकृत व्यवस्थापक नाहीत. तिचे अधिकृत व्यवस्थापक तर ईशपरायण लोकच असू शकतात परंतु बहुसंख्य लोकांना ही गोष्ट माहीत नाही. 

(३५) अल्लाहच्या घराजवळ या लोकांची नमाज काय असते? केवळ ते शिट्या वाजवतात व टाळ्या पिटतात.२८ तर घ्या आता या प्रकोपाचा आस्वाद, आपल्या त्या सत्याच्या इन्कारापायी जो तुम्ही करीत राहिला आहात,२९ 

(३६) ज्या लोकांनी सत्य स्वीकारण्यास नकार दिला ते आपली मालमत्ता अल्लाहच्या मार्गापासून लोकांना रोखण्यासाठी खर्च करीत आहेत व आता आणखीही खर्च करीत राहतील. परंतु सरतेशेवटी हेच प्रयत्न त्यांच्यासाठी पश्चात्तापाचे कारण बनतील. मग पराभूत होतील, मग हे ईमानविरोधक (काफिर) नरकाकडे घेरून आणले जातील. 

(३७) ते यासाठी की अल्लाहने दुष्टांना सज्जनांपासून वेगळे करून समस्त दुष्टांना एकत्रितपणे नरकाग्नित झोकून द्यावे. हेच लोक खरे नुकसान प्राप्त करणारे आहेत.३० 

(३८) हे पैगंबर (स.), या इन्कार करणाऱ्यांना सांगा की जर आतादेखील परावृत्त झाले तर पूर्वी जे काही घडलेले आहे ते माफ केले जाईल, परंतु जर हे त्याच पूर्वीच्या चालीची पुनरावृत्ती करतील तर पूर्वीच्या लोकांशी जे काही घडले आहे ते सर्वांना माहीत आहे. 

(३९,४०) हे श्रद्धावंतांनो! या अधर्मियांशी युद्ध करा इथपर्यंत की उपद्रव शिल्लक राहू नये आणि दीन (आज्ञापालन) सर्वस्वी अल्लाहसाठी व्हावा.३१ मग जर ते उपद्रवापासून परावृत्त झाले तर त्यांची कृत्ये पाहणारा अल्लाह आहे, पण जर का त्यांनी मानले नाही तर समजून असा की अल्लाह तुमचा वाली आहे, आणि तो सर्वोत्तम सहाय्यक व मदतगार आहे. 

(४१) आणि तुम्हाला माहीत असावे की जो काही (युद्धात प्राप्त संपत्ती) तुम्ही हस्तगत केला आहे, त्याचा पाचवा वाटा अल्लाह व त्याचे पैगंबर (स.) व नातेवाईक व अनाथ, व गोर-गरीब व वाटसरू यांच्याकरिता आहे.३२ जर तुम्ही श्रद्धा ठेवली आहे अल्लाहवर आणि त्या गोष्टीवर जी निर्णयाच्या दिवशी अर्थात दोन्ही सैन्याची गाठ पडण्याच्या दिवशी, आम्ही आमच्या दासावर अवतरली होती,३३ (तर हा वाटा स्वखुशीने अदा करा) अल्लाह सर्व गोष्टींना समर्थ आहे. 

(४२) आठवा तो प्रसंग जेव्हा तुम्ही खिंडीच्या अलीकडे होता आणि ते पलीकडे पडाव टाकून होते आणि काफिला तुमच्या खालच्या बाजूला होता. जर एखादेवेळी पूर्वीच तुमच्या आणि त्यांच्यामध्ये मुकाबल्याचा करार होता तर निश्चितच तुम्ही या प्रसंगाला बगल दिली असती, परंतु जे काही घडले त्याचे कारण असे की ज्या गोष्टीचा निर्णय अल्लाहने घेतलेला होता त्याला अल्लाहने प्रत्यक्षात आणावे म्हणजे जे नष्ट होणार आहे त्याने उघडपणे प्रमाणासह नष्ट व्हावे व ज्याला जिवंत राहावयाचे आहे त्याने उघडपणे प्रमाणासह जिवंत राहावे;३४ खचितच अल्लाह ऐकणारा व जाणणारा आहे.३५ 

(४३) आठवा तो प्रसंग जेव्हा हे पैगंबर (स.)! अल्लाह तुमच्या स्वप्नांत त्यांना थोडे करून दाखवीत होता.३६ जर एखाद्या वेळेस तुम्हाला त्याने त्यांची संख्या जास्त दाखविली असती तर निश्चितच तुम्ही लोकांनी धीर सोडला असता आणि युद्धाच्या बाबतीत तुम्ही तंटा सुरू केला असता; परंतु अल्लाहनेच त्यापासून वाचविले. नि:संशय तो मनातील स्थितीदेखील जाणणारा आहे.



२८) हा संकेत त्या भ्रमास दूर करतो ज्याद्वारे अरब लोक धोका खात होते. ते समजत होते की कुरैश अल्लाहच्या गृहाचे पुजारी आहेत आणि प्रबंधक आहेत. ते तेथे पूजापाठ करतात म्हणून अल्लाहची त्यांच्यावर मेहरबानी आहे. या भ्रमाचे खंडन करण्यासाठी सांगितले गेले आहे की परंपरागत पुजारी किंवा प्रबंधक बनून कोणी व्यक्ती अथवा समाज एखाद्या उपासनागृहाचा वैध पुजारी बनू शकत नाही. वैध आणि योग्य पुजारी आणि प्रबंधक तर तेव्हाच बनू शकतो जेव्हा ईशपरायणतेने मनुष्य आपले जीवनव्यवहार पार पाडीत असेल. हे लोक तर ईशपरायण लोकांना काबागृहात येण्याची मनाई करतात. हे काबागृह तर फक्त अल्लाहचीच उपासना करण्यासाठी आहे. हे तर या काबागृहाचे पुजारी, प्रबंधक व सेवक बनण्याऐवजी मालक होऊन बसलेले आहेत. म्हणूनच ते ज्यांच्याशी नाराज आहेत अशांना काबागृहात ते येण्याची मनाई करतात. त्यांचे हे कृत्य स्पष्ट पुरावा आहे की ते अल्लाहचे भय बाळगत   नाहीत आणि ईशपरायण नाहीत. त्यांची उपासना जे ते काबागृहात करतात तर त्यात एकाग्रता व विनम्रता नाही. त्यांची उपासना अल्लाहसाठी नाही की त्यांचे स्मरणसुद्धा अल्लाहसाठी नाही. त्यांची ती उपासना निरर्थक आहे, एक खेळतमाशा आणि हंगामा आहे ज्याचे नाव त्यांनी उपासना ठेवले आहे. अल्लाहच्या गृहाची अशी तथाकथित सेवा आणि खोटी उपासना करून ते अल्लाहच्या कृपेचे अधिकारी कसे बनणार? आणि हे कृत्य त्यांना अल्लाहच्या कोपापासून कसे वाचविणार?

२९) ते समजत होते की अल्लाहचा कोप आकाशातून दगडांचा वर्षावाने होतो किंवा निसर्गाच्या प्रकोपाने येतो. परंतु येथे त्यांना दाखवून दिले आहे की बदरच्या युद्धात त्यांचा निर्णायक पराजय ज्यामुळे इस्लामसाठी जीवनाचा आणि प्राचीन अज्ञानी व्यवस्थेसाठी मृत्यूचा निर्णय झाला होता, हा तर त्यांच्यासाठी अल्लाहचाच कोप होता.

३०) यापेक्षा आणखीन दिवाळखोरी काय असू शकते की मनुष्य ज्या मार्गात आपला पूर्ण वेळ, सर्व कष्ट, सर्व योग्यता आणि संपूर्ण शक्ती, जीवनपुंजी खर्च करतो आणि तेव्हा त्याला माहीत होते की तो तर विनाशाकडे  पोहचला  आहे.  त्याने  या  मार्गात  जे  काही  खर्च केले ते सर्व वाया गेले आणि त्यावर व्याज आणि नफा मिळण्याऐवजी उलटा त्याला दंड भोगावा लागत आहे.

३१) येथे मुस्लिमांच्या त्याच युद्धाच्या उद्देशाला स्मरण करून दिले आहे. यापूर्वी सूरह २, आयत १९३ मध्ये वर्णन आले आहे. या उद्देशाचे नकारात्मक अंश म्हणजे बिघाड व उपद्रव बाकी राहू नये आणि सकारात्मक अंश म्हणजे आज्ञापालन (दीन) फक्त अल्लाहसाठीच व्हावे. फक्त हाच एक नैतिक उद्देश आहे ज्याच्यासाठी लढणे ईमानधारकांसाठी अनिवार्य (फर्ज) आहे. याव्यतिरिक्त दुसऱ्या हेतुसाठी युद्ध करणे वैध नाही आणि अशा अवैध युद्धात भाग घेणे ईमानधारकांसाठी उचित नाही. (तपशीलासाठी पहा सूरह २, टीप २०४-२०५) 

३२) येथे युद्धात प्राप्त् झालेल्या संपत्तीच्या वाट्यासंबंधीचे आदेश आले आहेत. याविषयी व्याख्यानाच्या प्रारंभी सांगितले गेले होते की हा अल्लाहचा ईनाम (बक्षीस) आहे. याचा निर्णय घेण्याचा अधिकार अल्लाह आणि पैगंबर यांचाच आहे. आता हा निर्णय झाला आहे. तो म्हणजे युद्ध संपल्यानंतर सर्व सैनिकांनी युद्धसंपत्ती सेनापतीच्या पुढे आणून द्यावी आणि काहीही लपवून ठेवू नये. नंतर या संपत्तीतून पाचवा भाग त्या उद्देशासाठी काढून ठेवावा ज्यांचा आयतमध्ये उल्लेख आला आहे. राहिलेले चार भाग त्या सर्व लोकांत वाटप व्हावे ज्यांनी युद्धात भाग घेतला असेल. म्हणून या आयतीनुसार पैगंबर मुहम्मद (स.) नेहमी युद्धानंतर घोषणा करीत की ``ही युद्धसंपत्ती तुमच्यासाठी आहे. माझ्यासाठी यात काहीही नाही, शिवाय पाचव्या (खम्स) भागाशिवाय आणि हा पाचवा हिस्सासुद्धा तुमच्या सामुदायिक हितासाठीच आहे. म्हणून एकएक सुई आणि एक एक धागा आणून समोर ठेवा. एखादी लहान  आणि  मोठी  वस्तू  लपवून  ठेवू  नका. असे  करणे लज्जास्पद आहे आणि याचे परिणाम नरक आहे. या वाट्यात अल्लाह आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांचा एकच भाग आहे आणि याचा अर्थ म्हणजे पाचव्या भागाचा एक भाग अल्लाहचा बोलबाला करणे आणि `सत्य धर्माच्या कामात' लावला जावा. (खर्च केला जावा)

नातेसंबंधी म्हणजे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनात त्यांचे नातेसंबंधी होते. जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) आपला पूर्ण वेळ इस्लाम धर्मासाठी लावत असे आणि उपजीविका स्वत:साठी कमविण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नसायचा, म्हणून यासाठी निश्चितच प्रबंध होणे आवश्यक होते ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांचा (नातेसंबंधी) आणि दुसरे आप्तेष्ट ज्यांचे संगोपण त्यांच्यावर होते, खर्च भागला जावा आणि त्यांच्या जीवनावश्यक गरजापूर्ण होणे आवश्यक होते. `खम्स' मध्ये आपल्या नातेसंबंधीचासुद्धा हिस्सा निश्चित केला होता. परंतु याविषयी मतभेद आहे की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या देहावसनानंतर हा हिस्सा कोणाला मिळावा. काहींच्या मते पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यानंतर हा हिस्सा निरस्त झाला होता. काहींचे मत आहे की हा हिस्सा पैगंबर मुहम्मद (स.) नंतर जे शासनाध्यक्ष बनले त्यांच्या नातेसंबंधींना मिळणे आवश्यक आहे. तिसऱ्या गटाचे मत आहे की हा हिस्सा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या कुटुंबातील निर्धन लोकांत वाटला जावा. माझ्या शोध कार्यानुरूप चार आदर्श खलीफांच्या काळात याच तिसऱ्या मतानुसार कार्यवाही होत होती.

३३) म्हणजे ते समर्थन व मदत ज्यामुळे तुम्ही विजयी झाला आहात आणि ज्यामुळे तुम्हाला ही युद्धसंपत्ती मिळाली आहे.

३४) म्हणजे सिद्ध व्हावे की जो जिवंत होता त्याला जिवंतच राहिले पाहिजे होते आणि जो मृत झाला त्याला मृत होणे होते. येथे जिवंत राहणारा आणि मृत होणाऱ्याशी तात्पर्य मनुष्य नाही तर इस्लाम आणि अज्ञानता आहे.

३५) म्हणजे अल्लाह आंधळा, बहिरा आणि बेखबर नाही तर तो जाणणारा आणि पाहणारा आहे. त्याच्या साम्राज्यात अंदाधुंद काम होत नाही. 

३६) ही त्याकाळची गोष्ट आहे जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) मुस्लिमांना घेऊन मदीनाहून निघाले होते किंवा रस्त्यात होते आणि हे पाहिले गेले नव्हते की शत्रूचे सैन्य किती प्रमाणात आहे. त्या वेळी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्वप्नात त्या सैन्याला पाहिले आणि जे दृष्य त्यांच्यासमोर ठेवले गेले त्यावरून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अनुमान लावला की शत्रूची संख्या काही अधिक नाही. तेच स्वप्न पैगंबर  मुहम्मद (स.) यांनी मुस्लिमांना सांगितले. त्यावरून मुस्लिमांना धीर आला आणि ते पुढे सरसावले.

३७) म्हणजे आपल्या भावना आणि इच्छांना वशीभूत करा. उताविळपणा, भय, भीती, लोभ, घबराट आणि अनुचित उत्तेजनापासून स्वत:ला दूर ठेवा. शांत मनाने आणि संतुलित निर्णय शक्तीद्वारा काम करीत राहा. संकट आणि अडथळे समोर असले तर तुमचे पाऊल डगमगले जाऊ नये. उत्तेजनापूर्ण समयी क्रोध व उन्मादाने तुम्ही एखादे अनुचित कार्य करू नये. संकटे समोर असतील आणि स्थिती बिघडली असे वाटत असेल तर घाबरून तुम्ही विचलीत होऊ नये. उद्देशप्राप्तीच्या उन्मादात किंवा कच्चे पक्के उपायांनाच वरवर प्रभावकारी समजून तुमचे ध्येय गडबडीचे शिकार बनू नये. जग, जगाचे फायदे आणि मनाच्या इच्छांचे प्रलोभने तुम्हाला खुणवित असतील तर तुमचे मन त्यांच्याकडे आकर्षित होण्याइतपत कमजोर बनू नये. हा सर्व तपशील एक लहानसा शब्द `सब्र' (धैर्य) मध्ये समाविष्ट आहे. अल्लाह सांगतो की जे लोक या सर्व दृष्टीने सब्र करणारे (धैर्यवान) आहेत, माझे समर्थन त्यांनाच आहे.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget