(२८५) पैगंबराने त्या मार्गदर्षनावर श्रद्धा ठेवली आहे जे त्याच्या पालनकर्त्याकडून त्याच्यावर अवतरले आहे, आणि जे या पैगंबराला मानणारे आहेत त्यांनीसुद्धा हे मार्गदर्शन मनापासून स्वीकारले आहे. हे सर्व अल्लाह आणि त्याच्या फरिश्त्यांना व त्याच्या ग्रंथांना आणि त्याच्या पैगंबरांना मानतात आणि त्यांचे विधान असे आहे की, ‘‘आम्ही अल्लाहच्या पैगंबरांना एक दुसऱ्यापासून वेगळे करीत नाही, आम्ही आज्ञा ऐकली आणि अनुसरण स्वीकारले. हे स्वामी! आम्ही तुझ्यापाशी गुन्हा माफीचे इच्छुक आहोत आणि आम्हाला तुझ्याकडेच परतावयाचे आहे.’’३३७ (२८६) अल्लाह कोणत्याही व्यक्तीवर त्याच्या शक्तीपेक्षा जास्त जबाबदारीचे ओझे टाकीत नसतो.३३८ प्रत्येक व्यक्तीने जे पुण्य कमविले आहे, त्याचे फळ त्याच्यासाठीच आहे आणि जे पाप गोळा केले आहे त्याचा दुष्परिणाम त्याच्यावरच होणार आहे.३३९ (ईमानधारकांनो! तुम्ही अशी प्रार्थना करीत जा) हे आमच्या पालनकत्र्या! आमच्याकडून भूलचुकीने जे अपराध घडतील, त्यांच्यासाठी आम्हाला पकडू नकोस. हे स्वामी, आमच्यावर तसा भार टाकू नकोस जसा तू आमच्या पूर्वीच्या लोकांवर टाकला होतास.३४० हे पालनकत्र्या! जो भार उचलण्याची शक्ती आमच्यात नाही तो आमच्यावर लादू नकोस.३४१
३३७) या आयत वर सखोल अध्ययन केल्याविना इस्लामी श्रद्धा आणि इस्लामी कार्यनीतीचा सारांश वर्णन केला आहे आणि ते हे की अल्लाहला, त्याच्या फरिश्त्यांना, (ईशदूत) व त्याच्या ग्रंथांना मान्य करणे. आणि अल्लाहच्या सर्व पैगंबरांना त्यांच्यात फरक न करता मान्य करणे तसेच या सत्याला मान्य करणे की अंतत: सर्वांना अल्लाहसमोर हजर व्हायचे आहे. ही इस्लामची पाच मूलतÎवे आहेत. यांना मान्य केल्यानंतर एका मुस्लिमाने अल्लाहकडून जे आदेश मिळतील त्यांना राजीखुशीने स्वीकारावे, त्यांचे पालन करावे आणि आपल्या सदाचारावर घमेंडी (गर्विष्ट) बनू नये तर अल्लाहजवळ सतत क्षमायाचना करीत राहावे.
३३८) अल्लाहजवळ मनुष्याची जबाबदारी त्याच्या सामर्थ्यानुसार आहे. असे होऊच शकत नाही की दास एखादे काम करण्याचे सामर्थ्य राखत नाही आणि त्याच कामाविषयी अल्लाह त्याला विचारणा करील. तसेच एखाद्या गोष्टीपासून वाचणे त्याच्या आवाक्याबाहेरचे होते म्हणून अल्लाह त्यावर त्याला मुळीच पकडणार नाही. परंतु हे अगदी स्पष्ट लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या सामर्थ्याविषयी निर्णय घेणारा मनुष्य स्वत: असू शकत नाही. याविषयीचा निर्णय अल्लाहच करणारा आहे. त्यालाच माहीत आहे की कोण किती सामर्थ्य राखून होता आणि कोणते सामर्थ्य राखून नव्हता.
३३९) मोबदला देण्यासंबंधीचा जो नियम अल्लाहने निर्धारित केला आहे, तो दुसरा मूलभूत नियम आहे. यानुसार प्रत्येकजण मोबदला त्यानेच केलेल्या सेवेचा प्राप्त करील. हे शक्य नाही की एकाने केलेल्या सेवेचा मोबदला दुसरा घेईल. याचप्रकारे प्रत्येकजण त्याने केलेल्या अपराधापोटीच शिक्षेस पात्र होईल. असे होणार नाही की एकाच्या अपराधाची शिक्षा दुसऱ्याने भोगावी. येथे हे अवश्य संभव आहे की एकाने एखाद्या चांगल्या कामाला सुरुवात केली असेल आणि त्या कामाचा प्रभाव आणि परिणाम हजारो वर्षापर्यत जगात शिल्लक राहीला तर हे सर्व त्या व्यक्तीच्या कर्मनोंद वहीत नोंदले जाते. तसेच एखाद्याने वाईटाची पायाभरणी केली असेल आणि हजारो वर्षापर्यंत त्या वाईटाचा प्रभाव जगात शिल्लक राहिला तर ते सर्व त्या अत्याचारीच्या खात्यात जमा होते. परंतु हे चांगले आणि वाईट जे काही फळ मिळेल ते त्याच्याच प्रयत्नांचे आणि धावपळीच्या परिणामस्वरुप असेल. हे शक्य नाही की ज्या चांगल्या किंवा वाईटात मनुष्याचा संकल्प, प्रयत्न आणि कामाचा काहीएक सहभाग नसेल तरी त्याचा मोबदला त्याला मिळणार. एखाद्याच्या कार्याचा मोबदला तर दुसऱ्यापर्यंत पोहचणारी ती वस्तू नाही.
३४०) म्हणजे आमच्या पूर्वजांना तुझ्या मार्गात जी संकटे झेलावी लागली आणि त्यांना ज्या कसोट्यांना सामोरे जावे लागले तसेच ज्या कठीण अडथळ्यांना त्यांना पार करावे लागले; त्या सर्वांपासून आम्हाला वाचव. अल्लाहचा शिरस्ता हाच आहे की ज्याने कोणी सत्याचे अनुकरण करण्याचे ठरविले त्यांना कठीण संकटांना आणि कसोट्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी एक इमानधारक पूर्ण हिमतीने आणि एकाग्र चित्ताने या स्थितीचा सामना करतो. परंतु मुस्लिमांनी अल्लाहशी हीच प्रार्थना केली पाहिजे की अल्लाहने त्यांच्यासाठी सत्यनिष्ठेचा मार्ग सरळ सोपा करावा.
३४१) म्हणजे संकटाचे तितकेच ओझे आमच्यावर टाक ज्याला आम्ही सहन करू शकू. असे होऊ नये की आमच्या सहनशक्तीपेक्षा जास्त ओझे आमच्यावर टाकले जावेत आणि सहनशीलतेपेक्षा जास्त कठीण परिस्थितींना आम्हास तोंड द्यावे लागावे आणि सत्याच्या मार्गावरचे आमचे पाय डगमगू लागावेत.
Post a Comment