Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१५२) याविरूद्ध जे लोक अल्लाह आणि त्याच्या सर्व पैगंबरांना मानतील आणि त्यांच्या दरम्यान फरक करणार नाहीत, त्यांना आम्ही अवश्य त्यांचा मोबदला प्रदान करू१७९ आणि  अल्लाह मोठा क्षमा करणारा व दया करणारा आहे.१८०
(१५३) हे पैगंबर (स.)! हे ग्रंथधारक जर आज तुमच्याकडे मागणी करीत आहेत की तुम्ही आकाशातून एखादे लिखित त्यांच्यावर उतरवा१८१ तर याहून वरचढ अपराधयुक्त मागण्या  यांनी पूर्वी मूसा (अ.) यांच्याजवळ केल्या आहेत. त्याला तर यांनी सांगितले होते की आम्हाला जाहीररीत्या ‘अल्लाह’ प्रत्येक दाखवा आणि त्यांच्या याच उदंडतेमुळे अकस्मात त्यांच्यावर  वीज कोसळली१८२ होती. मग त्यांनी वासराला आपला उपास्य बनविला. वस्तुत: यांनी उघड उघड संकेतचिन्हे पाहिली होती,१८३ याउपरदेखील आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही मूसा  (अ.) यांना स्पष्ट फर्मान प्रदान केले,
(१५४) आणि या लोकांवर तूर पर्वताला उचलून यांच्याकडून (या फर्मानाच्या पालनाची) प्रतिज्ञा घेतली.१८४ आम्ही यांना आदेश दिला की दरवाजातून नतमस्तक होऊन दाखल व्हा.१८५  आम्ही यांना सांगितले की ‘सब्त’च्या कायद्याचा भंग करू नका आणि यावर यांच्याकडून पक्के वचन घेतले.१८६
(१५५) सरतेशेवटी यांच्या प्रतिज्ञाभंग करण्यामुळे आणि या कारणास्तव   की यांनी अल्लाहच्या वचनांना खोटे ठरविले आणि अनेक पैगंबरांना नाहक ठार केले आणि इथपर्यंत सांगितले  की आमची हृदये आवरणांत सुरक्षित आहेत.१८७ वस्तुत:१८८ खरे पाहता यांच्या असत्यप्रियतेमुळे अल्लाहने यांची हृदये मोहरबंद केली आहेत. आणि यामुळेच हे फारच कमी श्रद्धा  ठेवतात.




१७९) म्हणजे जे अल्लाहला आपला एकमेव उपास्य आणि स्वामी मानतात आणि त्याच्या सर्व पैगंबरांचे अनुयायित्व स्वीकारतात, असेच लोक आपल्या कर्मांचा मोबदला प्राप्त् करण्यास  योग्य आहेत. हे जसे सत्कर्म करतील तसा त्यांना मोबदला मिळेल. राहिले ते लोक ज्यांनी अल्लाहच्या प्रभुत्वाचा आणि अधिपत्याचा स्वीकार करतांना दुसऱ्याला त्याचा भागीदार  बनविले आणि ज्यांनी त्याच्या पैगंबरांपैकी कोणाला मानले किंवा कोणाला मानले नाही; अशा विद्रोही लोकांचे केले सवरले सर्व वाया जाणार कारण अशा लोकांचे कोणतेच कर्म अल्लाहजवळ विधीसंगत कृत्य नाही.
१८०) म्हणजे जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान धारण करतील त्यांचा हिशेब अल्लाह कठोरपणे घेणार नाही. तर त्यांच्यासाठी अत्यंत नरमाईने आणि क्षमाशीलतेने काम घेतले जाईल.
१८१) मदीना येथील यहुदी लोक पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी विचित्र मागण्या करीत असत. त्यापैकी एक ही होती की आम्ही आपले पैगंबरत्व तोपर्यंत मान्य करणार नाही जोपर्यंत  आमच्या डोळयादेखत एक लिखित ग्रंथ आकाशातून उतरत नाही किंवा आकाशातून लेखी आमच्या प्रत्येकाच्या नावावर लेख यावे ज्यात पैगंबर मुहम्मद (स.) हे अल्लाहचे पैगंबर आहेत  आणि त्यांच्यावर ईमान धारण करा असे नमूद केलेले असावे.
१८२) येथे एखाद्या घटनेचे विस्तृत विवरण देणे अपेक्षित नाही तर यहुदी लोकांच्या अपराधांची संक्षिप्त् सूची देणे हा उद्देश आहे. म्हणून त्यांच्या समष्टी इतिहासातील काही ठळक  घटनांकडे धावते संकेत केले आहे या आयतीत ज्या घटनेचा उल्लेख आहे ते सूरह अल्बकरा आयत नं. ५५ मध्ये आलेली आहे. (पाहा सूरह २, (अल्बकरा, टीप ७१)
१८३) स्पष्ट निशाण्यांशी अभिप्रेत त्या निशाण्या आहेत ज्या आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांना पैगंबरत्व बहाल केल्यानंतर अवतरित झाल्या. फिरऔन समुद्रात बुडणे आणि  बनीइस्त्राईलचे इजिप्त्मधून बाहेर पडण्यापर्यंतच्या काळात निरंतर त्या काळातील लोकांच्या अवलोकनात त्या निशाण्या आल्या होत्या. स्पष्ट आहे की इजिप्त्च्या साम्राज्याच्या  महाशक्तीच्या पंज्यातून ज्याने बनीइस्राईलींना सोडविले होते ते काही गाईचे वासरू नव्हते, तो तर समस्त सृष्टीचा निर्माणकर्ता व पालनकर्ता अल्लाह होता. परंतु त्या काळातील लोकसमुदायाच्या असत्यतेचा तो उच्चंक होता की अल्लाहचे सामथ्र्य आणि अल्लाहची मेहरबानीच्या अनेक ज्वलंत निशाण्या त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्या तरी तो समुदाय आपल्या  उपकारकर्त्या अल्लाहपुढे झुकला नाही तर गाईच्या वासरूच्या कृत्रिम मूर्तीपुढे नतमस्तक झाला!
१८४) स्पष्ट आदेश म्हणजे आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांना शिलालेखावर लिहून दिलेले आदेश होते. पुढे कुरआन मध्ये ७ : ४३ याचा उल्लेख तपशीलासह येणार आहे. प्रतिज्ञेशी  अभिप्रेत ते वचन आहे जे तूर पर्वतावर बनीइस्राईलच्या प्रतिनिधीकडून घेण्यात आले होते. कुरआन २ : ६३ मध्ये याचा उल्लेख आलेला आहे आणि सूरह ७ आयत १७१ पुन्हा  याविषयीचा उल्लेख येणार आहे.
१८५) तपशीलासाठी पाहा सूरह २ (अल्बकर) आयत, ५८-५९ तसेच अल्बकराची टीप नं. ७५.
१८६) तपशीलासाठी पाहा, सूरह २ आयत ६५ तसेच अल्बकराची टीप नं. ८२-८३.
१८७) म्हणजे तुम्ही काहीही म्हणा आमच्या मनावर ह्याचा काहीच परिणाम होणार नाही. यहुदीच्या या कथनाकडे कुरआन २:८८ मध्ये संकेत आलेला आहे. खरेतर हे लोक सर्व  असत्यवादी अज्ञानी लोकांच्या प्रमाणे गर्व करतात की ज्या धारणा, रूढी-परंपरा आणि कर्मकांड आम्ही आमच्या पूर्वजांकडून प्राप्त् केलेल्या आहेत, त्यांच्यावर आमचा दृढविश्वास आहे.  तसेच कोणत्याही स्थितीत आम्ही त्यांच्यापासून अलग होऊ शकत नाही. (पाहा, सूरह २ (अल्बकरा) टीप नं. ९४)
१८८) हे ते वाक्य आहे ज्यात संदर्भापासून दूर जाऊन दुसरी गोष्ट सांगितली गेली आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget