Halloween Costume ideas 2015

अल्लाह वचनाच्या विरूद्ध जात नाही

दिलेले वचन पूर्ण करणे हे स्वतः अल्लाहचे वैशिष्ट्य आहे. पवित्र कुरआनात अल्लाह स्वतःविषयी असे म्हणतो की, निश्चितच अल्लाह कधीही वचनभंग करत नाही. अल्लाहने केलेले हे वचन आहे आणि तो कधीच आपल्या वचनाच्या विरोधात जात नाही. अल्लाह कधीही आपला शब्द टाळत नसतो. अल्लाहपेक्षा आपल्या वचनाशी बांधिल इतर कोण असू शकतो? (पवित्र कुरआन, विविध अध्यायांतील आयती) साधारणपणे दोन माणसांनी आपसात केलेल्या करारास वचन म्हटले जाते. पण जीवनातील प्रत्येक क्षेत्रात वचनपूर्ती करावी लागत असते. मग ते सामाजिक असो की आर्थिक, संस्कृती-सभ्यतेशी निगडीत असो की राज्यव्यवस्थेशी संबंधित असो; प्रत्येक क्षेत्रात माणसाने वचनबद्धता पाळली पाहिजे. मुस्लिमांच्या बाबतीत असे म्हटले गेले आहे की जर ते आपले वचन पाळत नसतील तर त्यांची श्रद्धा परिपूर्ण होऊ शकत नाही. जे वचन पाळतात अशा श्रद्धावंतांसाठी कुरआनात म्हटले आहे की, “असे लोक त्यांच्याकडील अमानती परत करतात. वचनभंग करत नसतात. आपल्या नमाजांविषयी (उपासना) ते दक्ष असतात. तेच लोक स्वर्गाचे वारस असतील. अशाच लोकांना उच्च दर्जाच्या स्वर्गांचा वारसा लाभेल, कारण ते लोक आपल्या विधात्याच्या आयतींवर श्रद्धा ठेवतात, त्यास भागीदार जोडत नाहीत. त्यांना जे काही जमेल ते इतरांना देतात. अशाच लोकांच्या हृदयांना आपल्या विधात्याकडे परतण्याची सतत भीती असते.” (पवित्र कुरआन-२३)

लोकांना पुरेपूर माप करून देणे हे अल्लाह आणि समाजाशी केलेले वचन आहे. “माप करताना पुरेपूर द्या. वजन करताना प्रमाणित तराजूने तोलून द्या.” (कुरआन-१७)

सगळ्यात महत्त्वाचे वचन म्हणजे माणसांनी अल्लाहशी केलेले वचन होय. हे वचन माणसाने अल्लाहशी केलेले असल्याने समस्त मानवांशी, समाजाशी, जनसमूहांशी त्याचा संबंध आहे. जे लोक अल्लाहशी केलेले वचन पूर्ण करतात, आपसातला करार मोडत नाहीत, असे लोक खऱ्या अर्थाने ज्या नातेसंबंधांना अल्लाहने जोडून ठेवण्याचे आदेश दिले आहेत ते जोडून ठेवतात. (कुरआन-१६)

क्षमा करणे

जसे वचनबद्धता अल्लाहचे वैशिष्ट्य आहे तसेच क्षमा करणेदेखील अल्लाहचे मानवतेला मोठे वरदान आहे. जर असे नसते तर अल्लाहने या जगाला आणि यातील मानवजातीला कधीच नष्ट केले असते. पवित्र कुरआननात म्हटले आहे की, “तोच आपल्या मानवांचा पश्चात्ताप स्वीकारतो आणि त्यांच्यातील अवगुणांना माफ करून टाकतो.” (कुरआन) जर अल्लाहची तशी इच्छा असती तर माणसांच्या वाईटपणासाठी त्यांचा नाश केला असता. अशाच प्रकारे मानवांना म्हटले आहे की, “जर तुम्ही कुणाच्या वाईट कृत्यांना क्षमा केले तर अल्लाह तुम्हालादेखील माफ करण्याचे सामर्थ्य राखतो.” (कुरआन-३) माणसांनी एकमेकांना क्षमा केली पाहिजे. असे केल्यास अल्लाह माणसांना क्षमा करतो, कारण तो परमदयाङू आहे. अल्लाह म्हणतो, “तुमच्या विधात्याने आपल्या दयेने आणि क्षमाशीलतेने तुमच्यासाठी जो स्वर्ग निर्माण केला आहे त्या स्वर्गाकडे धाव घ्या, ज्याचा विस्तार सबंध आकाश आणि साऱ्या धरतीसमान आहे. हा स्वर्ग अशा सदाचारी लोकांसाठी तयार केला गेला आहे जे टंचाईत असोत की भरभराटीत आपली साधने लोकांच्या सेवेत बहाल करतात. आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात, लोकांना क्षमा करून टाकतात. अशाच लोकांना अल्लाह पसंत करतो.” (कुरआन)

या आयतींनुसार सदाचारी लोक म्हणजे जे कुणावर रागवत नाहीत आणि लोकांकडून झालेल्या चुकांबद्दल त्यांना क्षमा करतात. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे एक अनुयायी अबू मसऊद आपल्या गुलामास मारहाण करत होते. त्यांच्या मागून आवाज आला. त्यांनी मागे वळून पाहिले तर स्वतः प्रेषित मुहम्मद (स.) होते आणि म्हणत होते की, “जितके नियंत्रण या गुलामावर तुमचे आहे त्यापेक्षा अधिक अल्लाहचे तुमच्यावर आहे.” अबू मसऊद म्हणतात या घटनेनंतर मी पुन्हा आयुष्यात कधी कुणावर रागवलो नाही. तसेच एका अन्य अनुयायींनी प्रेषितांना विचारले, “मी माझ्या सेवेत असणाऱ्यांच्या किती चुका माफ करू?” प्रेषित म्हणाले, “दररोज शंभर वेळा.” क्षमाशीलतेचे वर्णन पवित्र कुरआनात फार सुंदररित्या केले आहे.

“जो लोकांना अल्लाहकडे बोलावतो, नेक कर्म करतो आणि म्हणतो की मी श्रद्धावंत आहे त्यापेक्षा चांगले कुणाचे बोलणे. भले आणि वाईट समान नसतात. जे चांगले असेल त्याद्वारे वाईटावर उपाय करा. त्यामुळे ज्याच्याशी तुमचे शत्रुत्व होते तोच तुमचा जीवलग मित्र होईल. पण जे संयमी लोक असतात त्यांनाच हे लाभते आणि ज्यांचे नशीब मोठे त्यांच्याच भाग्यात हे येते.” (कुरआन-४१)

- सय्यद इफ्तिखार अहमद


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget