Halloween Costume ideas 2015

शरद पवारांच्या सक्रीयतेने राज्यात भाकरी फिरणार?

शरद पवार राजकारणातले चाणक्य मानले जातात, मात्र त्यांना मोठ्या प्रमाणात मोदी-शाह जोडगळीने शह देण्यात यश मिळविले. महाराष्ट्रात अनपेक्षितरित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांना आपल्या गोटात ओढण्याचे अशक्यप्राय आव्हान अमित शहा आणि फडणवीस यशस्वीपणे स्विकारले.  भाजपने या दोन्ही पक्षांना विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला अशा काही पद्धतीने हाताळले की या पक्षांची अनेक वर्षांपासून बसलेली घडी पवारांच्या डोळ्यादेखत विस्कटू लागली. राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात खिंडार पडले. दूरचे तर पळालेच पळाले जवळचेही साथ सोडून गेले. त्यामुळेच शरद पवार कधी नाही तेवढे व्यथित झाले आणि साध्या पण खोचक प्रश्‍नावरही संयमाने बोलणारे पवार अचानक रागात आल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. पवार हतबल होताना पाहणे  महाराष्ट्रासाठी आश्‍चर्यजनक होते. यातून अनेकांना वाटून गेले की, पवारांची पावर कमी होऊ लागली की काय? राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सोबत असलेल्या घराण्यांनी विकासाच्या नावावर पवारांची साथ सोडली. पवारांना हे इतके जिव्हारी लागले की, त्यांनी 80 च्या वयात असून देखील महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आणि त्याची सुरूवात सोलापूरहून केली. सोलापूर, उस्मानाबाद, बीड येथे झालेल्या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ कार्यकर्ते व नवतरूणांची उपस्थिती पाहून शरद पवार भाराहून गेले. यावेळी ते म्हणाले, मी घरच्यांना सांगितलंय तुम्ही तुमचं बघा, आता काही लोकांकडे बघायचंय. त्यांचे हे शब्द ऐकताच कार्यकर्त्यांत मोठा उत्साह संचारला. यावेळी त्यांनी पक्षांतर करणार्‍यावर आणि भाजप सरकारवर टिकास्त्र सोडले.
    दूसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये बिनसल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते बिथरलेत. ही स्थिती राजकीय दृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावरच पडेल, अशी एकंदरित परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचा लाभ पवार किती उचलून घेतात यावर त्याच्या पक्षाचेच नाही तर आघाडीचे भविष्य मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी एमआयएम आणि वंचित आघाडीमधील कार्यकर्ते व नेत्यांचा एकोपा पाहून महाराष्ट्रात होणार्‍या विधानसभा निवडणुकीकडे अनेक लोक आशेने बघत होते. दलित-मुस्लिम ऐक्य मजबूत होत होते. ओबीसींचाही मोठा वर्ग वंचित-एमआयएमच्या जवळ आला होता. मात्र या दोघांची युती जागावाटपावरून फिस्कटली अन् युती तुटल्याचे जाहीर झाले. यामुळे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षाच्या श्रेष्ठींवर खाजगीत नाराजी व्यक्त करू लागले. आता महाराष्ट्रात भाजपचा विजयी रथ रोकणे कोणालाच शक्य होणार नाही, असे वाटत असताना शरद पवारांच्या अचानक सक्रीयतेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरण बदलतात की काय आणि पवार आपल्या प्रदीर्घ अनुभवाने भाकरी फिरवतात की काय, अशी चर्चा लोकांमध्ये आहे.  एकंदरित त्यांची सक्रीयता पाहून भाजपविरोधक राज्यातील जनता राष्ट्रवादी-काँग्रेसकडे एकवटत असल्याचे चित्र तूर्ततरी निर्माण करण्यात पवारांना यश आले आहे. देशभरात राहूल गांधी व्यतिरिक्त मोदी-शाह व एकूणच भाजप संस्कृतीवर शरद पवारच कडाडून टिका करत आहेत. त्यामुळे राज्यातील धर्मनिरपेक्ष मुल्यांना मानणारा मोठा वर्ग शरद पवारांकडे आशेने पाहत आहे. कठीण परिस्थिती बदलण्यात तरबेज असलेले पवार सक्रीय झाल्याने महाराष्ट्रात भाकरी फिरेल अशी आशा महाराष्ट्रजनांना वाटत असल्याच्या प्रतिक्रिया लोकांतून येत आहेत. भाजप देशभरातील सर्व शासकीय संस्थांचा गैरवापर करत असल्याचे उघड-उघड राज्यातील नागरिकांना दिसत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीचे छापे पडत आहेत. या छाप्यांच्या धास्तीमुळेच अनेक नेते भाजपात गेल्याची चर्चा आहे. भाजपातील शिर्ष नेतृत्व आणि राज्यातील भाजप नेत्यांच्या डोळ्यात डोळा घालून बोलणारा महाराष्ट्रात सध्या फक्त दोन नेते आहेत. ते म्हणजे शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर. या सर्व घडामोडीत इव्हीएमकडे मात्र डोळ्यात तेल घालून आघाडीला लक्ष द्यावे लागेल. एवढे मात्र निश्‍चित.      

- बशीर शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget