उत्तर प्रदेशच्या एका गावातीलशासकीय शाळेतील एका शिक्षकाने एका दलित मुलाला यासाठी मारहाण केली आणि नंतर त्याला शाळेत कोंडून घातले की त्या ११ वर्षीय विद्यार्थ्याने त्या शिक्षकाच्या दुचाकीला नुसता हात लावला होता. आजवर उच्चवर्णीय दलितांना शिवून घेत नसत. पशुंनादेखील एक वेळ मान दिला जातो, पण दलितांना पशुंसारखाही सन्मान दिला जात नाही. आता हे ऐकिवात येते की एका निर्जीव वस्तुला जरी दलिताने स्पर्श केला तर त्याचा राग त्या वस्तुच्या मालकाला अनावर होतो.
दुसरी घटना राजस्थानमधील एका शाळेतीलच आहे. तिथल्या एका ९ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकासाठी पाणी पिण्याच्या माठातून स्वतः पाणी घेतले. याची शिक्षा त्या चिमुकल्या मुलाला इतकी गंभीर देण्यात आली की शेवटी त्या मुलाचा जीव गेला. हा अत्याचार कोणत्याही सहनशील माणसाने कसा सहन करावा, एवढे मोठे मन कोठून आणावे?
या दोन घटना तर उदाहरणादाखल दिल्या आहेत. अशा कितीतरी घटना वर्षातून नव्हे, महिन्यातून नव्हे, आठवड्यातून नव्हे तर दररोज घडत आहेत. दर तासाला घडत आहेत.
एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात २०२१ मध्ये एक लाख ६४ हजार लोकांनी आत्महत्या केली. यात २५ टक्के कामगारवर्गातील लोक आहेत. ९ टक्के बेरोजगार युवक आहेत तर व्यावसायिकांच्या आत्महत्येची सुद्धा यात नोंद आहे. महिला तर आहेतच. म्हणजे समाजाचा एकही वर्ग असा नाही ज्यामधून लोक आत्महत्या करत आहेत. आत्महत्या करणे म्हणजे नैराश्याचा अंतिम टप्पा. एकदा माणसाने तो टप्पा गाठला तर त्याचा स्वतःवर कसलाही ताबा नसतो. नकारात्मक विचारांनी त्याच्या मानसिकतेवर ताबा मिळवलेला असतो. अशा अवस्थेत आपला जीव संपवणे हा एकच मार्ग त्याला सुचतो.
सध्या मानवतेच्या भावी पिढीवर आणखीन एक संकट आलेले आहे. देशाच्या विशेषकरून महाराष्ट्रातील अहमदनगर, ठाणे, पालघर जिल्ह्यात ९-१० वर्षांच्या मुलांची खरेदी-विक्री चालू आहे आणि किंमत किती ५००-१००० रुपये. लोकांना आपले स्वतःचे पोट भरण्यासाठी आपण जन्मलेल्या मुलांना ५०० रुपयांत विकण्याची पाळी येणे हे किती मोठे दुर्दैव मानवजातीवर कोसळलेली कसली ही आपत्ती. या मुलांना विकत घेऊन मानवतेचे दलाल त्यांना वेठबिगार बनवण्यासाठी मेंढपाळांना विकत आहेत. आणि ते लोक त्यांचा छळ करू लागले आहेत.
ह्या काही समस्या आहेत, पण एवढ्याच समस्या आहेत असे नाही. समस्यांचा सागर आहे. व्याजपद्धतीवर कर्ज उचलून त्या कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्यांची वेगळी व्यथा आहे. पुन्यप्रसून वाजपेयी यांनी आपल्या यू-ट्यूब चॅनलद्वारे दिलेल्या माहितीनुसार हजारीबाग येथील एका शेतकऱ्याने महिंद्राकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर घेतला होता. त्यात कोरोनाचे ल़ॉकडाऊन झाले. कर्ज परतफेडीचे हफ्ते खोळंबले. शेवटी कंपनीचे अधिकारी वसुलीसाठी शेतात पोहोचले. एक लाख दहा हजार देणे होते. शेतकऱ्याने दोन दिरवसांची वेळ ममागितली. अधिकारी ऐकायला तयार नव्हते. शेतकऱ्याची पत्नी त्यांची गाडी धरून विनंती करत होती. त्यांनी आपली कार तशीच चालवली. शेतकऱ्याची पत्नी त्या गाडीखाली चिरडून मरण पावली. आणखी एका कारखानदारीची व्यथा १५ कोटींचे कर्ज थकित होते. कर्ज देणाऱ्यांनी व्याज देण्याचा आग्रह धरला. व्याज फेडण्यासाठी चार कोटींची संपत्ती दोन कोटींत विकली. बाकीचे कर्ज पेडण्यासाठी १२ कोटींची मालमत्ता आठ कोटींत विकली. तरीही कर्ज जसेच्या तसेच राहिले. त्याचा मालक आता विनंती करतो की त्याला स्वेच्छा मरणाची अनुमती मिळावी.
व्याजावर आधारित अर्थकारणाचे हे रौद्ररुप म्हणूनच अल्लाहने व्याजपद्धतीला वर्ज्य केले आहे. एक माणूस नव्हे तर श्रीलंकासारखा देश बुडाला. त्याच वाटेवर जगातले कितीतरी देश असतील, ज्यांना जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थांनी कर्ज पुरविलेले आहे. या सगळ्या देशांचे हाल श्रीलंकासारखे होतील का हा प्रश्न आहे.
ही सध्या देशाची स्थिती आहे. एका राजकीय पक्षाने भारत जोडो यात्रेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. राजकीय पक्षाचा कोणताही कार्यक्रम राजकीय उद्दिष्टाशिवाय इतर कशासाठीही नसतो. आज गरज आहे माणसाला माणसाशी जोडण्याची. माणुसकीला माणुसकीशी. म्हणजेच माणसाला स्वतःशी जोडावे लागेल. यासाठी राजकीय कार्यक्रम उपयोगी नसतात. नैतिक अधःपतनाला आळा घालण्याची गरज आले. माणसांनी नैतिकता सोडली, मग तो माणसांच्या जंगलात पशु-प्राण्यांसारखा सैरावैरा भरकटत जातो. म्हणून माणसाला नैतिक बंधनांमध्ये जोडण्याची गरज आहे. धार्मक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये माणुसकी नांदेल. यासाठी जर सर्वांनी प्रयत्न केले तरच मानवी जीवन सुरक्षित राहील. नसता भविष्यात जे काही होईल त्याचा अंदाज प्रत्येक जण लावू शकतो.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment