Halloween Costume ideas 2015

जकात

इस्लाममध्ये सामुहिकतेला महत्त्व आहे. प्रत्येक बाबतीत सामुहिकतेला प्राधान्य देण्याकडे इस्लामचा कल असतो. नमाज घरामध्ये सुद्धा अदा करता येते परंतु ती मस्जिदमध्ये जाऊन  सामुहिकरित्या अदा करण्याची ताकीद करण्यात आलेली आहे. नमाजप्रमाणेच जकातसुद्धा वैयक्तिकरित्या दिली जाऊ शकते आणि बहुतेक करून आजही वैयक्तिकरित्याच दिली जाते.  मात्र जकातचा अगदी थोडा भाग आपल्या गरीब नातेवाईकांसाठी राखीव ठेवता येतो. बाकी सर्व जकात हा सामुहिकरित्या बैतुलमाल (सार्वजनिक निधी) मध्ये द्यावा लागतो. मग  एकत्रित झालेली जकातच्या राशीचा हिशोब करून त्या राशीचा कुरआनच्या सुरे तौबामधील आयत नं. 60 प्रमाणे 8 भागात विभागाणी केली जाते व गरजवंतापर्यंत पोहोचविली जाते.  ज्यावर्षी ज्या विभागामध्ये जास्त गरज असेल त्या विभागामध्ये समिती जास्त राशीची तरतूद करू शकते.

जकात कोणाला देते येते?
सुरे तौबाच्या आयत क्र. 60 मध्ये म्हटलेले आहे की, ’’ हे दान तर खऱ्या अर्थाने फकीर आणि गोरगरीबांसाठी आहे आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत  आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे, गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात  आणण्याकरिता आहे, एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्वकारी जाणणारा दृष्टा व बुद्धीमान आहे.’’
1. फकीर 2. मिस्कीन म्हणजे सफेद पोश म्हणजे असे लोक जे वरकरणी सुस्थितीत वाटतात मात्र प्रत्यक्षात गरीब असतात. ते स्वतःच्या इज्जतीला भिऊन कोणासमोर हात पसरत  नाहीत मात्र त्यांच्याकडे पाहून अंदाज येतो असे लोक. 3. जकात वसूल करण्यासाठी नियुक्त केलेले लोक 4. तालीफे कुलूब (दिलजमाई) म्हणजे असे लोक ज्यांच्या मनात इस्लाम  मध्ये येण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत. इस्लाममध्ये आल्यामुळे त्यांचे काही आर्थिक स्त्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. असे लोक. 5. प्रवासी -  यात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सुद्धा सामील आहेत. प्रवास करत असतांना अचानक कोणाला काही घातपात झाला, अपघात झाला, चोरी झाली किंवा आणखीन काही अभद्र घटना  घडली आणि ते सधन असून सुद्धा द्रव्यहीन झाले तर अशा लोकांची सुद्धा जकात मधून मदत करता येते. 6. मान सोडविण्यासाठी - साधारणतः याच्यात निर्दोष मुस्लिम ज्यांच्या  माना  काही कारणाने तुरूंगामध्ये अडकलेल्या आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्वरीय मार्ग सुलभ करण्यासाठी जकातचा उपयोग करता येतो. 8. कर्जदारांना  मदत करण्यासाठी. वरील प्रमाणे आठ विभागामध्ये जकातीतून खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, जकातीचा उपयोग अन्य कारणासाठी करता येऊ शकत नाही.
आज साधारणपणे आपल्या देशात जकात ही सामुहिकपणे काढली जात नाही. त्यामुळे त्याची बरकतसुद्धा जाणवत नाही. छोट्या छोट्या टुकड्यांमध्ये जकात दिली जात असल्यामुळे  त्याचा फारसा लाभ कोणाला होत नाही. जकात एक सामुहिक-आर्थिक, इबादत आहे. प्रत्येक शहरामध्ये जकात एकत्रित करण्याची व्यवस्था तयार करणे अपेक्षित आहे. आदर्श स्थिती ही  आहे की, प्रत्येक शहरामध्ये जबाबदार आणि अमानतदार लोकांची एक समिती गठित करण्यात यावी. त्या समितीकडे गावातल्या प्रत्येक साहेबे निसाब (जकात देण्यास पात्र) व्यक्तीने  जकात जमा करावी. गोळा झालेल्या जकातीच्या रकमेचा अंदाज घेऊन मग समितीने वर नमूद आयातीमध्ये आठ विभागामध्ये आवश्यकतेप्रमाणे त्याची विभागणी करावी व  गरजवंतांमध्ये त्याचे वितरण करावे.
भारतामध्ये कुठलेही वर्ष असे जात नाही ज्यावर्षी कुठे ना कुठे दंगली होत नाहीत. दंगलीमध्ये होरपळून गेलेल्या लोकांना शासकीय मदत मिळत नाही. अशा वेळेस जकातीचा काही  निधी राखीव ठेवला जावा व त्यातून या भरडल्या गेलेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे. शिवाय अनेकवेळेस अपघातामध्ये अनेक कुटुंबामधील कमावती लोकं दगावतात. अशा परिस्थितीत घरच्या परदानशीन महिला आणि मुलं उघड्यार पडतात. अशा लोकांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सुद्धा जकातच्या निधीचा उपयोग करता येईल. अनेक तरूण अनेक  वर्षांपासून आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली तुरूंगामध्ये खितपत पडलेले आहेत. त्यांच्या घरातील सदस्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आलेले आहे. समाजातील कोणीही त्यांची पुढे होवून मदत करण्यासाठी तयार नाही. अशा कुटुंबांच्या मुलभूत गरजा दूर करण्यासाठी व त्या तरूणांना तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा जकातीचा पैश्याचा सदुपयोग करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र असे घडत नाही. मुस्लिम समाजात अशिक्षितपणा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे संघटित होण्यासाठी ज्या दर्जाचा विचार समाजामध्ये रूजणे आवश्यक आहे तो  गेल्या 70 वर्षात रूजलेला नाही. त्यामुळे असंघटित समाजाला ज्या यातना सोसाव्या लागतात त्या यातनांमधून हा समाज जात आहे. समाजातील बुद्धीवंत, उलेमा, प्रेस यांना याबाबतीत  जनजागृती करता आलेली नाही. त्यामुळे घरासमोर जो जकात मागायला येईल, त्याला जकात देऊन जकात अदा केल्याचे समाधान मानण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. अनेक  गैरसरकारी संस्था सुद्धा जकात गोळा करतात. मात्र कुरआनमध्ये सांगितलेल्या आठ विभागात त्याची विभागणी करून त्याचे वितरण काटकोरपणे करत असतील याची शक्यता कमीच  आहे. जमाअते इस्लामी हिंद आणि काही मोजक्या संस्था अशा आहेत ज्या जकात जमा करण्याची आणि त्याचे काटकोरपणे वितरण करण्याची व्यवस्था बाळगून आहेत. या संस्थांच्या  द्वारे स्वतःच्या आर्थिक व्यवहाराची सी.ए.कडून तपासणीसुद्धा केली जाते. एकूणच असंघटित जकात व्यवस्थेमुळे त्याचे हवे तसे परिणाम दिसून येत नाहीत.
खरे तर आजकाल समाजमाध्यमांचा जमाना आहे. रमजानपूर्वी वर्षभर या संदर्भात लोकांचे प्रबोधन करून, रमजानपूर्वी प्रत्येक शहरात जकात गोळा करणारी समिती स्थापन करून  जकात एकत्रित करून त्याचे वितरण केल्यास अनेक गरीब कुटुंबांना त्याचा आधार मिळेल व मोठमोठी कामे लिलया होतील.
जकात एक ईश्वरीय कर आहे. त्यामुळे त्याचे वैशिष्ट्यही वेगळे आहे. जगातील जेवढ्या काही कर व्यवस्था आहेत, त्या एकतर कमाईवर (इन्कम) किंवा विक्रीवर (सेल) कर लावतात.  या दोन्ही प्रकारच्या कर व्यवस्थेमध्ये कराची चोरी करता येते. मात्र इस्लाममध्ये कमाईवरही टॅक्स लावला जात नाही आणि विक्रीवरही नाही. तुम्ही एका वर्षात एक कोटी कमाविले  आणि एक कोटी खर्च केले तुमच्यावर कर शुन्य. इस्लाममध्ये कर बचतीवर लावण्यात आलेला आहे आणि बचत लपविता येत नाही. साधारणपणे बचतीवर एक वर्षे पूर्ण झाल्यावर 2.5  टक्के एवढी जकात देणे प्रत्येक साहेबे निसाब (सधन) व्यक्तीवर बंधनकारक आहे. भारतात सर्व प्रकारचे उदा. आयकर, विक्रीकर, जीएसटी, सेस इत्यादी कर देऊन सुद्धा सधन मुस्लिम  स्वेच्छेने आपल्या बचतीवर 2.5 टक्के जकात अदा करतात आणि गरीबांची मदत करतात, ही संतोषजनक बाब आहे.

- बशीर शेख
bashirshaikh12@gmail.com

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget