Halloween Costume ideas 2015

हेतुपुरस्सर सनसनाटीचा माध्यमप्रवाह


आदर्श जगात पत्रकारिता हा अविश्वसनीय सचोटीचा व्यवसाय आहे आणि पत्रकार हे जगातील सर्वात निपुण आणि कुशल लोकांपैकी एक असतात. सत्याच्या शोधात जीवन, शरीर, कुटुंब आणि अगदी विवेकबुद्धीलाही पणाला लावणाऱ्या पत्रकारांच्या सततच्या कार्याचा आपल्या सर्वांना फायदा झाला आहे. सध्या जग मात्र बदललं आहे आणि अनेकदा पत्रकारितेच्या नावाखाली जे काही मिरवलं जातं, ते म्हणजे विशिष्ट समाजघटकांविरुद्ध कट्टरता आणि तिरस्काराचं उघड प्रदर्शन करणारा धंदा होय. बरीच शाई, असंख्य चित्रपटांची रिळं आणि कठोर स्वरांनी भरलेल्या बातम्यांच्या उन्मादी मंथनानं मुस्लिमांना एकपात्री म्हणून निश्चित केलंय. मुस्लिमांची तथाकथित विकृत भूमिका चमकत राहावी यासाठी लेखकांचा कुटीरोद्योग मध्यरात्री जळत राहतो. मुस्लिम म्हणजे काय, इस्लाम काय आहे, हे समजून घेण्याआधीच सदोष प्रतिमेत सतत फेरफार केला जातो आणि त्याद्वारे मुस्लिमांच्या अस्मितेवर हल्ला चढवला जातो, एका चौकटीत न बसण्याइतके ते वैविध्यपूर्ण असते. अनेक प्रामाणिक माध्यमांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जगभरातील बहुतेक हिंसाचाराचा संबंध कोणत्या ना कोणत्या प्रकारे इस्लामी विचारसरणीशी किंवा एखाद्या मुस्लिम गटाशी जोडण्यासाठी अर्थपूर्ण खेळांचे शस्त्रागार आणि ज्वालाग्राही वाक्प्रचार यांचा वापर करण्यात प्रसारमाध्यमे उल्लेखनीय सुसंगतता दाखवताना आढळून येतात. मुस्लिमांना भेडसावणाऱ्या मुद्द्यांवरील गुंतागुंतीच्या चर्चेला मूळ कारणे तपासण्याऐवजी घोषणाबाजी आणि द्वेषपूर्ण भाषणांच्या कथानकांव्दारे निर्माण होणाऱ्या अनेक मुद्द्यांना मर्यादित ठेवणे माध्यमांना अधिक सोपे जाते. मुख्य प्रवाहातील मुस्लिम विद्वान, शिक्षणतज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष करून मुस्लिमांच्या अत्यंत टोकाच्या आणि पूर्वग्रहदूषित टीकाकारांना पाठिंबा देणे अजूनही सोपे होते. विशिष्ट समाजाविरूद्ध गरळ ओकणाऱ्याना हुशारीनं आणि अजाणतेपणी बळ देऊन प्रसारमाध्यमे त्यांचा प्रभाव अधिक प्रगल्भ करतात. सांप्रदायिकदृष्ट्या ज्वलनशील काहीतरी बोलणाऱ्यांनाच मीडियाद्वारे ऑक्सिजन पुरवला जातो आणि अशा वातावरणात शांततावाद्यांच्या आणि अगदी नियंत्रित घटकांच्या प्रयत्नांचेही मोठं नुकसान होते. दुर्दैवानं, मुस्लिमांबद्दलच्या जुन्या बुरसटलेल्या मुद्द्यांचं केवळ पुनरुज्जीवन करून पत्रकारिता आपली मूलभूत भूमिका पार पाडण्यात अपयशी ठरते. सत्य त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं अधिक गुंतागुंतीचं आहे आणि प्रत्येक दिवशी इतक्या मुसलमानांना सोबत घेऊन जगावे लागते, हे धोकादायक वास्तव निर्माण करण्यात संपूर्ण जगाची थेट भूमिका आहे. पुष्कळदा मथळे सनसनाटी किंवा विकृत असतात आणि वृत्तांकन हे अनेकदा खोलवर वर्णद्वेषी असते. याचा परिणाम थेट मुस्लिमांच्या जीवनावर होतो. प्रसारमाध्यमांमध्ये मुस्लिमांविषयीच्या नकारात्मक बातम्यांचे सादरीकरण हेदेखील निःसंशयपणे या वस्तुस्थितीमुळे होते की, पत्रकारांना सामान्यत: संबंधित गटांना कव्हर करण्यासाठी आवश्यक असलेले विशिष्ट ज्ञान नसते. या माहितीच्या अभावाचा मोठा परिणाम जेव्हा बातमी किंवा लेख तयार केला जातो तेव्हा लक्षात येतो. या कमतरतेमुळे रिपोर्टरने बऱ्याचदा या विषयावरील सर्वात योग्य तज्ज्ञांचा न घेतलेला सल्ला आणि गोळा केलेल्या हानिकारक व चुकीच्या माहितीमुळे त्याचे गंभीर विश्लेषण वाचकाला गोंधळात टाकते. यावर तोडगा काढणे कठीण नाही आणि त्यासाठी प्रसारमाध्यमे आणि मुस्लिम समुदाय यांच्यात अधिक अर्थपूर्ण संबंध असणे आवश्यक आहे. माध्यमांना असे सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय ऐक्य जपणारे सर्वसमावेशक गट शोधावे लागतील. इस्लामच्या विकृत प्रतिमा काही अंशी बिगर-मुस्लिमांमध्ये इस्लामचे आकलन न झाल्यामुळे आणि काही अंशी मुस्लिम स्वत: समजावून सांगण्यात अपयशी ठरल्यामुळे निर्माण झाल्या आहेत. द्वेष द्वेषाला खतपाणी घालतो, त्याप्रमाणे बिगर-मुस्लिम आपल्या अज्ञानामुळे इस्लामबाबत गैरसमज करून घेतात आणि त्याबदल्यात त्यांना त्याची भीती वाटते. अशा प्रकारे, कल्पनारम्यता, अनुमान आणि रूढीवादी गोष्टी प्रसारमाध्यमांद्वारे सत्य आणि वास्तवाची जागा घेतात. त्याचप्रमाणे मुसलमानांचेही गैरसमज आहेत. ते आपल्या समाजात बचावात्मक पवित्रा निर्माण करून मुस्लिमेतरांच्या द्वेषाला आणि भीतीला प्रतिसाद देतात आणि कधीकधी आक्रमक वक्तृत्वावर आधारित प्रतिकूल वातावरण निर्माण करतात. या धगधगीत आणि गैरसमजात सहिष्णुतेचे आवाज विरून जातात. हिजाब, हलाल, बुलडोझर आणि भोंग्यांचे विकृत राजकारण करणाऱ्यांच्या मागे धावून मुस्लिमांबद्दलच्या बातम्या चुकीच्या ठरतात आणि अनेकदा त्याच रूढींचा पुन्हा वापर होताना दिसतो. मुस्लिमांबद्दल ढिसाळ वृत्तांकन, पक्षपातीपणा किंवा हेतुपुरस्सर सनसनाटीचा प्रवाह सातत्याने दिसून येतो. मुस्लिमांबद्दलच्या एका विशिष्ट सूत्रात बसण्यासाठी ज्या प्रकारे कथा विकृत केल्या जातात - आणि एकदा या कल्पित गोष्टी मांडल्या गेल्यानंतर त्या उखडून टाकण्यात येणाऱ्या अडचणी - माध्यमांमध्ये दिसू शकतात. माध्यमांद्वारे दुरुस्त्या आणि दिलगिरी व्यक्त करणे सध्या अत्यंत दुर्मिळ बनले आहे. द गार्डियनचे संस्थापक-संपादक सी. पी. स्कॉट यांनी म्हटल्याप्रमाणे, "टिप्पणी मुक्त असते, पण वस्तुस्थिती पवित्र असते." अशा अराजकतेच्या वातावरणात शांततेचे आणि सहिष्णुतेचे आवाज लोप पावतात. सत्याचा विजय होऊ देण्यासाठी आपल्याला सर्व क्षेत्रांत विवेकबुद्धीची गरज आहे. जॉन पिल्जर यांनी 'हिडन अजेंडाज' या आपल्या पुस्तकात असा सल्ला दिला आहे : “पत्रकारांनी संदेशाच्या छुप्या कार्यक्रमपत्रिका आणि त्याभोवती असलेल्या मिथकांना समजून न घेता स्वत:कडे केवळ संदेशवाहक म्हणून पाहणे पुरेसे नाही.”

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक, 

मो.:८९७६५३३४०४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget