Halloween Costume ideas 2015

अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(५२) आणि जे लोक आपल्या पालनकर्त्याचा अहोरात्र धावा करीत असतात व त्याची प्रसन्नता प्राप्त करण्यात गुंतलेले असतात त्यांना आपल्यापासून दूर लोटू नका.३४ त्यांच्या हिशेबातील  कोणत्याही गोष्टीचा भार तुमच्यावर नाही व तुमच्या हिशेबातील कोणत्याही गोष्टीचा भार त्यांच्यावर नाही. याउपरदेखील जर तुम्ही त्यांना दूर लोटले तर अत्याचारी लोकांत गणले जाल!३५
(५३)  खरे पाहता आम्ही अशा तऱ्हेने या लोकांपैकी काहींना काहींच्याद्वारे परीक्षेत टाकले आहे३६ जेणेकरून त्यांनी त्यांना पाहून म्हणावे, ‘‘हेच ते आमच्यातील लोक आहेत ज्यांच्यावर अल्लाहची  दया व कृपा झाली आहे?’’ होय! काय अल्लाह आपल्या  कृतज्ञ दासांना यांच्यापेक्षा अधिक जाणत नाही?
(५४) जेव्हा तुमच्याजवळ ते लोक येतील जे आमच्या वचनांवर श्रद्धा ठेवतात तेव्हा त्यांना सांगा, ‘‘तुमच्यावर शांती असो. तुमच्या पालनकर्त्याने दया आणि कृपेचा परिपाठ स्वत:साठी अनिवार्य केला  आहे. (ही त्याची दया व कृपाच आहे की) जर तुमच्यापैकी एखाद्याने अज्ञानाने एखादे दुष्कर्म केले असेल व नंतर पश्चात्ताप व्यक्त केला व सुधारणा केली तर तो त्याला माफ करतो, नरमाई  दाखवितो.३७
(५५) आणि आम्ही अशा तऱ्हेने आमची संकेतचिन्हे उघड करून प्रस्तुत करतो जेणेकरून अपराध्यांचा मार्ग अगदी स्पष्ट व्हावा.३८
(५६) हे पैगंबर (स.)! यांना सांगा, ‘‘तुम्ही लोक अल्लाहशिवाय इतर ज्यांचा धावा करीत आहात त्यांची भक्ती करण्यास मला मनाई करण्यात आली आहे.’’ सांगा, ‘‘मी तुमच्या इच्छांचे अनुकरण  करणार नाही. जर मी असे केले तर मी पथभ्रष्ट होईन, सरळमार्ग प्राप्त करणाऱ्यांपैकी राहू शकणार नाही.’’
(५७) सांगा, ‘‘मी आपल्या पालनकर्त्यातर्फे एका उज्ज्वल प्रमाणावर कायम आहे आणि  तुम्ही त्याला खोटे लेखले आहे. आता माझ्या अखत्यारीत ती गोष्ट मुळीच नाही जिच्याबद्दल तुम्ही घाई करीत आहात.३९ निर्णयाचा सर्वस्वी अधिकार अल्लाहला आहे.  तोच सत्य बाबी सांगतो आणि तोच सर्वोत्कृष्ट निवाडा करणारा आहे.’’
(५८) सांगा, ‘‘जर एखादे वेळी ती गोष्ट माझ्या अखत्यारीत असती जिच्यासाठी तुम्ही घाई करीत आहात तर माझ्यात आणि तुमच्यात केव्हाच निर्णय लागला असता. परंतु अल्लाह अधिक चांगले  जाणतो की अत्याचाऱ्यांशी कोणता व्यवहार केला गेला पाहिजे.


३४) कुरैशचे मोठमोठे सरदार आणि सधन लोकांचा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर इतर अनेक आक्षेपांपैकी एक आक्षेप हा होता की त्यांच्या चहुबाजूला गुलाम, दलित, पद्दलित, गरीब आणि  निम्नवर्गाचे लोक जमा झालेले होते. ते टोमणे मारत की या माणसाला साथीदार पाहा कसे कसे इज्जतदार लोक मिळालेत! बिलाल (निग्रो गुलाम), अम्मार, सुहैब आणि खब्बाब (रजि.) आमच्यातून बस हेच लोक अल्लाहला सापडले ज्यांना सन्मानित केले जावे! ते सरदार व श्रीमंत लोक ईमानधारकांच्या गरीब स्थितीची टिंगल उडविण्यावरच शांत होत नसत तर एखाद्याच्या इस्लामपूर्व जीवनातील नैतिक उणिवांचा बोभाटा व भांडवल करीत असत आणि चेष्टेने म्हणत की कालपर्यंत तो तर असा असा होता पण आज या सन्मानित समुदायात सामील झाला. याच  चेष्टेचे उत्तर येथे दिले आहे.
३५) म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या भल्या-बुऱ्यासाठी स्वत:च जबाबदार आहे. या मुस्लिम होणाऱ्यांपैकी कोणाबद्दलही तुम्हाला जाब विचारला जाणार नाही आणि न तुमच्याबद्दल त्यांना जाब  विचारला जाईल. तुमच्या हिश्श्याची नेकी (सदाचार) हे हिसकावून घेऊ शकत नाही आणि आपल्या हिश्श्याचा दुराचार (दुष्टता) तुमच्यावर टाकू शकत नाही. हे केवळ सत्याचे अभिलाषी बनून तुमच्याजवळ येतात तर तुम्ही त्यांना दूर का लोटता?
३६) म्हणजे गरीब, दलित आणि समाजातील उपेक्षित लोकांना सर्वप्रथम ईमान धारण करण्याचे सौभाग्य देऊन आम्ही (अल्लाहने) श्रीमंत, गर्विष्ट लोकांना परीक्षेत टाकले आहे.
३७) ज्या लोकांनी त्या वेळी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ईमान धारण केले त्यात बहुतांश लोक असे पण होते, ज्यांच्याकडून इस्लाम स्वीकारण्यापूर्वी मोठमोठे गुन्हे व पाप घडले होते. आता  इस्लाम स्वीकारल्यानंतर त्यांचे जीवन पूर्ण बदलून गेले होते. तरी इस्लामविरोधक त्यांना मागील जीवनाच्या (अज्ञानकाळाच्या) उणिवा, दोष आणि कामाविषयी खजील करीत असत. यावर सांगितले जात आहे, की ईमानधारकांना धीर द्या व त्यांना सांगा की जो मनुष्य पश्चात्ताप करून स्वत:ची सुधारणा करून घेतो त्याच्या मागील अपराधांसाठी त्याची पकड करण्याची रीत अल्लाहजवळ नाही.
३८) आणि अशाप्रकारे संकेत व्याख्यानाच्या पूर्णक्रमाकडे आहे जो चौथ्या प्रभागाच्या (रूकुअ) या आयतीपासून सुरू झाला आहे. हे लोक म्हणतात की त्यांच्यावर एखादी निशाणी का उतरली नाही?  म्हणजे इतके स्पष्ट आणि बोलके पुरावे असूनसुद्धा लोक आपल्या नकार आणि अवज्ञेच्या आग्रहाखातर अडून बसलेले असतात. असे लोक अपराधी वृत्तीचे असणे असंदिग्धरित्या सिद्ध होते आणि  ही वास्तविकता आरशासारखी स्पष्ट समोर येते की हे लोक खरेतर मार्गभ्रष्टतेच्या आहारी गेल्यामुळे चुकीच्या मार्गावर आहेत. यामुळे नव्हे की सत्य मार्गाचे पुरावे स्पष्ट नाही किंवा काहीं पुरावे त्यांच्या मार्गभ्रष्टतेच्या बाजूचे आहेत.
३९) संकेत आहे अल्लाहच्या कोपाकडे. विरोधक म्हणत होते की जर तुम्ही अल्लाहकडून पाठविलेले पैगंबर आहात आणि आम्ही उघडपणे तुम्हाला नाकारात आहोत, तर का अल्लाहचा कोप  आमच्यावर होत नाही? तुम्ही अल्लाहतर्फे नियुक्त असल्याची निकड तर ही होती की ज्याक्षणी तुम्हाला कोणी खोटे ठरविल व अपमानित करील त्याक्षणी जमीन खचावी आणि तो त्यात गाडला  जावा अथवा वीज पडावी आणि तो भस्म व्हावा. हा कसा अल्लाहने नियुक्त केलेला पैगंबर की त्याच्यावर श्रद्धा ठेवणारे तर संकटांवर संकटे आणि अपमानावर अपमान सोसत आहेत. मात्र त्यांना  शिवीगाळ करणारे आणि दगड धोंडे मारणारे चैन करत आहेत!

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget