Halloween Costume ideas 2015

रहेमतुल्लील आलमीन (सल्ल.)


अंधारातून प्रकाशाची वाट दाखविणारा, स्वत:पेक्षा इतरांची जीवापाड काळजी घेणारा, ऐहिक आणि पारलौकिक जीवनाचा यशस्वी सारथी बनणारा, ईश्वराच्या भेटीची साक्ष देणारा, कल्याणकारी व्यवस्था स्थापन करणारा, दीन दु:खितांचा नाथ, अनाथांचा कैवारी, महिलांचा रक्षक, ईश्वराचा मित्र आदरणीय प्रेषित हजरत मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम. ज्यांनी समस्त मानवकल्याणाकरिता इस 610 पासून ते प्रलयाच्या दिवसापर्यंत  जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या भल्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली. शिवाय ईश्वराच्या आदेशावर कसे चालायचे? हे त्यांनी स्वत: आचरणातून दाखवून दिले. अपार संयमाचे महामेरू प्रेषित सल्ल. यांनी जगात प्रलयापर्यंतच्या येणाऱ्या मानवांसाठी यशस्वीतेचा मार्ग दाखवून दिला. ईश्वरानेही त्यांना रहेमतुल्लील आलमीन या उपाधीने नावाजले. म्हणजेच आम्ही तुम्हाला समस्त मानवकल्याणाच्या भल्यासाठी पाठविले.

प्रेषित हजरत मुहम्मद मुस्तफा (सल्ल.) यांचं जीवन चालतं बोलतं कुरआन होतं. त्यांच्या शिकवणीनुसार वागणारी कुठलीही व्यक्ती यशोशिखरावर निश्चतच पोहचेल यात दुमत नाही. प्रेषित हजरत मुहम्मद सल्ल. यांचे अनुकरण ज्याने-ज्याने स्विकारले तो-तो यशस्वी झाला. आणि भविष्यात यशस्वी होणार. व्यक्तीच नव्हे तर कुठलाही समुह  कधीही चुकीच्या मार्गावर मार्गक्रमण करणार नाही. 

अशी काय होती प्रेषित सल्ल. यांची शिकवण की वैरीही सखा झाला? तलवार घेऊन मारायला आलेला शत्रू ही मित्र झाला? प्रेषित सल्ल. यांची वचने ज्यावेळी आम ते खास लोक ऐकू लागले आणि त्यानुसार वागू लागले त्यावेळी त्यांच्या जीवनात आनंदाचे वारे वाहू लागले. त्यामुळे ते जीवापाड प्रेषित सल्ल. यांच्यावर प्रेम करत. इतके की त्यांच्यावर आपला जीव ओवाळून टाकत. लिहिण्यासारखे तर भरपूर काही आहे पण जागेअभावी त्यांनी सांगितलेली काही वचने थोडक्यात आपणांसाठी सादर करत आहे. जी दैनंदिन जीवनाला प्रफुल्लित करण्यास पदोपदी कामी पडतात. 

’’जगातील श्रेष्ठ ग्रंथापैकी सर्वश्रेष्ठ ग्रंथ ईश्वरीय आदेशाच्या रूपाने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर अवतरला. तो ग्रंथ म्हणजे पवित्र कुरआन होय. पवित्र कुरआन व अल्लाहचे शेवटचे प्रेषित हजरत मुहम्मद सल्ल. ही अल्लाहने मानवास दिलेली सर्वोच्च देणगी आहे.’’(हदीस) जर आपण कुरआनचे अध्ययन कराल तर निश्चितच ते आपल्या मनाला सुखद अनुभव देईल व जीवनाला नवा आयाम मिळेल.

प्रेषित सल्ल. यांनी सांगितले, ’’इस्लामचे पाच स्तंभ आहेत. ईमान, नमाज, रोजा, जकात, हज. ज्याला आदर्श मुस्लिम बनावयाचे असेल, धार्मिक म्हणून घ्यावयाचे असेल, त्याने या पाच स्तंभावर श्रद्धा ठेवून, त्यांचा अंतःकरणपूर्वक आचार व प्रचार करणे आवश्यक आहे.   

1.अल्लाहचे प्रेषित सल्ल. यांनी सांगितले, अल्लाहच्या भक्तीमध्ये अन्य कोणासही सामावून घेणे, आईवडिलांची आज्ञा न पाळणे, कुठल्याही व्यक्तीची विनाकारण हत्या करणे व खोटी साक्ष देणे हे इस्लामने फार मोठे गुन्हे मानले आहेत. (बुखारी, मुस्लिम). 

2. आपल्या स्वतःच्या भोजनातून वाटा द्यावा लागेल म्हणून स्वतःच्या पोटी जन्मलेल्या मुलां-मुलींची कत्तल करणे, त्यांना ठार माणे वा पुरणे’’ हे महापाप आहे. 

3. प्रेषित सल्ल. म्हणाले, जे मानवास घातक आहेत अशा सात गुन्ह्यांपासून दूर रहा. साहबींनी प्रेषित सल्ल. यांना विचारले की ते सात गुन्हे कोणते? प्रेषित सल्ल. म्हणाले, 1. एकमेव अल्लाहशिवाय अन्य कोणांची भक्ती करणे. 2.जादूटोणा करणे. 3 . अकारण रक्तपात व कत्तल करणे 4. व्याजाचा धंदा करणे. 5. अनाथांची संपत्ती गिळंकृत करणे, 6. धर्मयुद्धाच्या वेळी  मैदान सोडून पलायन करणे. 7. स्वतःचे पतिवृत्त जपणाऱ्या, ईश्वरावर श्रद्धा ठेवणाऱ्या व भोळ्याभाबड्या स्त्रियांवर स्वतःच्या स्वार्थासाठी खोटे दोषारोप लावणे. (बुखारी, मुस्लिम)

दांभिक बनू नका - अल्लाहचे प्रेषित सल्ल. यांनी सांगितले, ’’दांभिक म्हणजे त्या भटकणाऱ्या शेळीसारखे आहेत, जी शेळी कधी या चाऱ्यावर तर कधी त्या चाऱ्यावर ताव मारत फिरत असते.’’ 

कपटी माणसाची ओळख अल्लाहचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले, खालील चार त्याज्य गोष्टींपैकी एकही बाब ज्याच्या अंगी असेल, अशा माणसास दांभिक, माणूस घोषित करावयास हरकत नाही. 1. ज्याच्याजवळ विश्वासाने अनामत ठेव दिली असता तिचा अपहार करणे, 2. बोलतांना जाणूनबुजून खोटे बोलणे. 3. वचन देऊन ते पूर्ण न करणे. 4. भांडण करतांना शिवीगाळ करणे. (बुखारी, मुस्लिम). 

खऱ्या मुस्लिमांबद्दल प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले, ज्याच्याकडून हाताने व वाचेने श्रद्धावानाचे कसलेही नुकसान होत नाही तोच खरा मुस्लिम होय. तसेच अल्लाहने मनाई केलेले काम जो सोडून देतो, त्यास (धर्मासाठी केलेला त्याग म्हणावे).’’ (बुखारी मुस्लिम)

सच्चा श्रद्धावान कोणास म्हणावे हे या ’हदीस (प्रेषित वचन) ने स्पष्ट केले आहे. सच्चा श्रद्धावान कोणा श्रद्धावानास दुखवीत नाही. त्यास शारीरिक व मानसिक दुःख देत नाही. श्रद्धावानाच्या पाठीमागे चहाडी अथवा निंदा करीत नाही. त्याची चेष्टामस्करी करीत नाही. एकाही श्रद्धावानावर खोटा आरोप करीत नाही. शिवीगाळ करीत नाही. त्याला शब्दांनेही दुखवित नाही. सच्चा मुस्लिम आपल्या  शक्तीचा दुरुपयोग करून त्रास देत नाही. एखादा मुस्लिम त्याचा वैरी असला तरी त्याचे वाईट चिंतित नाही. श्रध्दावंतांची मने आपसात जुळलेली असतात. त्यांचे आपसात प्रेमाचे व आपुलकीचे संबंध असतात. धर्मनिष्ठ मुस्लिम संघटित व एका दिलाने वागतात. ज्याप्रमाणे भिंतीच्या विटा एकसंघ झालेल्या असतात. 

आई-वडिलांची सेवेबद्दल अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, त्यांच्या तोंडात माती पडो! त्यांच्या तोंडात माती पडो! त्यांच्या तोंडात माती पडो!  त्यावर प्रेषितांना विचारले गेले, कोणाच्या तोंडात माती पडेल? त्यावर प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ’’ज्यांनी आई-वडील दोघांची अथवा एकाची म्हातारपणी सेवा केली नाही, तो स्वर्गात कधीही प्रवेश करू शकणार नाही.’’ - मुस्लिम

ज्याने अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी आई-वडिलांची सेवा केली आहे, तो स्वर्गाचा अधिकारी राहील. असे या हदीसने स्पष्ट केले आहे. या हदीसमध्ये म्हातारपणाचा उल्लेख मुद्दाम केला आहे. कारण म्हातारपणीच आई-वडिलांना सेवेची अत्यंत आवश्यकता असते. म्हातारपणामुळे ते हतबल व चिडखोर झालेले असतात. या वृध्दावस्थेत त्यांना काही काम नसते. मुलांना आईवडील ओझे वाटू लागतात. आणखी एका ’हदीस’ मध्ये सांगितले आहे, एका माणसाने विचारले, हे ईश्वराच्या प्रेषिता! संततीवर आई-वडिलांचा काय अधिकार आहे? प्रेषितांनी उत्तर दिले, ’आई-वडील हे मुलांसाठी स्वर्ग आणि नरक आहे.’ (इब्ने माजा) म्हणजे त्यांची सेवा केल्याने स्वर्ग तर अवज्ञा केल्याने नरक मिळेल. एका अन्य हदीसमध्ये प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, सर्वांत मोठे पुण्य म्हणजे, मानवाने आपल्या वडिलानंतर वडिलांच्या मित्रांना तेवढाच मान द्यावा. आई-वडिलांच्या सेवेबरोबरच त्यांच्या नातेवाईकांवर व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांशी चांगला व्यवहार करावा.

अल्लाहच्या प्रिय प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ’’ हे संपूर्ण जग काही दिवसांचे आहे. या जगातील सर्वांत चांगली सोबती सत्चरित्र पत्नी आहे.’’ (मुस्लिम). अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, जो मनुष्य आपल्या किंवा परक्या अनाथांच्या खाण्यापिण्याची, इत्यादी व्यवस्था करेल, तो माझ्याबरोबर स्वर्गात याप्रमाणे राहील. ’प्रेषितांनी एवढे बोलून, अंगठा व त्याजवळची तर्जनी जवळ आणून मात्र त्यात थोडे अंतर ठेवून इशारा केला व त्यामध्ये थोडेसेच अंतर ठेवले.’ (बुखारी). जगात सर्वांत वाईट वर्तन अनाथाबरोबर केले जाते. दुसरे काहीजण अनाथाकडे तिरस्काराने पाहतात त्यांना धक्के मारतात. अनाथांचे रक्षणकर्ते म्हणविणारेही त्यांच्याशी चांगले वर्तन करीत नाहीत. उलट त्यांची मालमत्ता हडप करतात. अनाथाश्रमातही त्यांच्याकडे तिरस्काराने पाहिले जाते. त्यांना भीक मागण्यास भाग पाडले जाते. अनाथालयात अनाथांनी आणलेल्या भिक्षेच अपहरण केले जाते. कुरआन मध्ये ईश्वराने सांगितले, ’जे अनाथांची मालमत्ता कसलाही अधिकार नसताना खातात ते स्वतः अग्नी भक्षण करतात. ते निश्चितपणे नरकाचेच (जहन्नुम) धनी होतील.’ ( कुरआन सुरह अन्निसा आयत नं. 10)

अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ईश्वरा शपथ तो सच्चा मुस्लिम नाही.! त्यावर एका माणसाने विचारले, कोण सच्चा मुस्लिम नाही? त्यावर प्रेषित मुहम्मद (स.) यांनी उत्तर दिले, ’तो, ज्याचा शेजारी त्याच्या त्रासाने व वर्तनाने त्रासला असेल. (बुखारी, मुस्लिम). पवित्र कुरआनने जसा अल्लाहच्या भक्तीवर जोर दिला आहे, त्याप्रमाणे त्याने सभोवतालच्या लोकांना मदत व सहकार्य केले पाहिजे. या गोष्टीवरही जोर दिला आहे. यावरून हे सिध्द होते की धर्माचे पायाभूत दोन मुद्दे आहेत. एक (भक्ती) सरळ अल्लाहशी संबंधित विषय आहे व दुसरा अल्लाहच्या भक्तांशी संबंधित आहे.

अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, जुलूम करू नका. कारण जुलूम करणाऱ्याला शेवटच्या दिवशी (न्यायदानाच्या दिवशी) अंधारालाच सामोरे जावे लागेल. तुम्हास अंधाराच्या (नरकाच्या) रूपात जुलुमाचे फळ मिळेल. जुलुमाबरोबरच स्वार्थापासून लालचेपासून दूर राहा. कारण लालचेमुळे व जुलुमामुळे तुमच्यापूर्वी अनेकांची वाताहत झाली आहे. स्वार्थासाठी या माणसांनी भूतलावर रक्तपात केला. ज्या गोष्टी आम्ही नाकारल्या होत्या, निषिध्द ठरविल्या होत्या त्या गोष्टी त्यांनी ’वैध’ स्वीकारणीय ठरविल्या.’ (मुस्लिम)

या हदीसमध्ये जुलूम व अन्याय यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. मानवाने केलेला जुलूम न्यायदानाच्या दिवशी त्यांच्यासमोर अंधार होऊन उभा ठाकणार आहे. आणि जुलूम करणारी व्यक्ती अंधारात भटकेल. म्हणजे त्या व्यक्तीस नरकवास भोगावा लागेल. अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ’लाज बाळगण्यातच मानवाचे कल्याण आहे’ बुखारी, मुस्लिम शर्म (शरम) म्हणजे वाईट गोष्टींचा तिरस्कार करणे. जो शर्म बाळगून वाईटाकडे वळत नाही, त्याचे कल्याणच होते. यात काही शंका नाही. जो माणूस जास्तीतजास्त शर्म बाळगून वागेल, तितका तो वाईट कामापासून दूर राहील. जो बेशरमपणे वागेल तो वाईट कामाच्या आहारी जाईल.

सत्य संकल्प - अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,’ चांगल्या वर्तनाचा पाया हेतूवर आधारित असतो. ज्याने सत्य संकल्प करून त्याप्रमाणे वर्तन केले, मानवाचे वर्तन अल्लाह व प्रेषितांना प्रसन्न करून घेण्यासाठीच असेल तर त्याचे कल्याणच होईल. त्याला ईश्वरप्राप्ती होईल.’ मात्र त्याची सर्व धडपड एखाद्या लौकिक फायद्यासाठी वा एखादी स्त्री प्राप्त करून घेण्यासाठी असेल तर फक्त तीच त्याला प्राप्त होईल. परंतु तो स्वर्ग सुखास मुकेल. (बुखारी, मुस्लिम) ’जो माणूस अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करून घेण्याच्या भावनेने काम करील, सत्कर्मे करील, त्याच्याच कर्मांना ईश्वर मान्यता देऊन त्याच्यावर खूश होईल. मात्र ती सर्व कर्मे अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या निर्देशाप्रमाणे असली पाहिजेत.’’एखादे कितीही मोठे सत्कर्म तुम्ही केले असेल आणि ते कीर्ती व देखाव्यासाठी असेल तर ते सत्कर्म अल्लाह कधीही कबूल करणार नाही. उलट ते कर्म कीर्तीलोलुप माणसाच्या तोंडावर फेकून मारले जाईल.’ 

माणसाचे जीवन अल्प काळाचे आहे. माहित नाही कोण किती दिवस जगेल. त्यामुळे आपल्या आयुष्याचा प्रत्येक दिवस सुखी, समृद्ध आणि आनंददायी जाण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी सांगितलेला सत्याचा, शांतीचा मार्ग अवलंबून ऐहिक आणि पारलौकिक जीवन यशस्वी करावे.  अल्लाहकडे प्रार्थना आहे की सर्वांना प्रेषित सल्ल. यांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यावर अमल करण्याची सद्बुद्धी द्यावी. (आमीन.)

- बशीर शेख 

उपसंपादक

मो . 9923715373


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget