Halloween Costume ideas 2015

देश आर्थिक आणीबाणीच्या उंबरठ्यावर...

सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी अवघा देश कंबर कसून सज्ज झाला आहे. हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे महाभयानक कट असले तरी ते भारतासमोर एक मोठे आर्थिक अरिष्ट आहे.या विषाणूंचा संसर्ग थोपवणे हे देशासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे, त्यासाठी  संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, सर्व देश स्थानबद्ध झाला आहे. एकूणच देश आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला आहे, हे  वास्तव आहे. या जीवघेण्या संकटांमुळे कधी नव्हे ते भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच मोडून पडणार आहे अशी भीती सर्व थरांतून मोठ्या प्रमाणात  व्यक्त होऊ लागली आहे. या अरिष्टाशी कसा मुकाबला करावा, हा प्रश्न देशातील सरकार बरोबरच अर्थतज्ज्ञ व विचारवंतांना पडला आहे. यापूर्वी  भारतात महामारी, प्लेग, देवी, स्वाईन फ्ल्यू, चिकन गुणिया, एड्स यासारख्या रोगांनी थैमान घातले होते, काही अंशी त्या त्या परिस्थितीत  आर्थिक संकटेही आ वासून उभी राहिली, मात्र त्यातून आपण सहिसलामत बाहेर पडलो. तथापि सध्या कोरोनाने जे आर्थिक अराजक निर्माण  झाले आहे, ते न भूतो असे आहे. अर्थात हे जागतिक पातळीवरच महाभयानक संकट उभे ठाकले असले तरी भारताच्या दृष्टीने हे महाभीषण व महाभयप्रद आहे, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. अर्थतज्ञांच्या मते नोटा बंदीच्या निर्णयानंतर गेल्या तीन वर्षांपासून देशाला आर्थिक संकटाशी सामना करावा लागला आहे. त्यातून कसे बसे उठून देश आर्थिक विकासाच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवत असतांनाच हा कोरोनाच्या जीवघेण्या हल्ल्याला तोंड द्यावे लागते आहे. तसेच नेमका आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात हा हल्ला झाल्यामुळे त्यांने अधिक उग्र स्वरूप धारण केले  आहे, याचे कारण आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने वर्ष अखेर ही अत्यंत प्रतिकूल वेळ असते. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांच्या काळ  महत्त्वाचा असतो. अनेक प्रकारची फायदेशीर गुंतवणूक याच काळात केली जाते, शिवाय देशातील सर्वांत मोठ्या देयकांची परतफेड याच काळात  केली जाते, आपण गेल्या ७-८ वर्षांपासून सर्वांत निचांकी आर्थिक कामगिरी बजावली आहे, हे कुणालाच नाकारता येणार नाही. मागणीमध्ये सर्व   पातळ्यांवर घसरण झाली आहे, निर्यातीसाठी आपण पूर्वीपेक्षा खूप मागे आलो आहोत, निर्यातीचे प्रमाण कमालीचे घटले आहे. पतपुरवठ्याचे संकट  गेल्या १०-१२ वर्षे टांगत्या तलवारीप्रमाणे आपल्या मानगुटीवर बसलेले आहे. गुंतवणुकीचा अभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे, अनेक  मोठ्या उद्योगांना दिलेल्या वित्तपुरवठ्याची परतफेड झालेली नाही, बड्या भांडवलदारांनी मोठ्या प्रमाणावर दिवाळे काढले आहेत, त्यामुळे अनेक राष्ट्रीयकृत बँकांनी माना टाकल्या आहेत. याच काळात रोजगाराची स्थिती बिघडली होती.
देशात बेकारांच्या संख्येत कधी नव्हे तेवढी प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. देश या अभूतपूर्व संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत   असतानाच कोरोनाने हल्ला केला आहे. या संकटातून सामना करण्यासाठी सुनियोजन व कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. देशात ४० कोटींपेक्षा  अधिक संख्येने कामगारवर्ग आहेत. या कामगार वर्गांपैकी ९३ टक्के असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत. रोजंदारीवरील कामगारांची संख्या सुमारे  ९ कोटी इतकी आहे. १०० कामगारांमध्ये ७५ कामगार हे हातावर पोट असणारे असे आहेत. हातगाडीवाले, सुतार लोहार आदी स्वयंरोजगाराची   कामे करणाऱ्यांसह जे मिळेल ते काम करणाऱ्यांची संख्या २५टक्के आहे. सध्याच्या संकटाचा सर्वांत जास्त परिणाम या वर्गावर होत आहे.  कारण बरेच लोक रोजच्या रोज कमावून खाणारे आहेत.ते कायमपणे आर्थिकदृष्ट्या असुरक्षित जीवन जगत आहेत. रोज काम करून रोज मिळणाऱ्या श्रमाच्या मोबदल्यातून यांची व त्यांच्या कुटुंबीयांची रोजीरोटी चालत असते. रोज काम केले तरच रोजची भाकर असा हिशेब असलेला  हा बहुतांश कामगारवर्ग देशात आहे. या संख्येने मोठ्या असलेल्या वर्गाच्या दृष्टीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार  शहरात रोजंदारीवर जगणाऱ्या कुटुंबाची संख्या २५ ते ३० टक्के आहे. ही सर्व स्थलांतरित कुटुंबे असतात. दुसरा वर्ग सूक्ष्म व लघुउद्योग क्षेत्रात  काम करणारे लोक आहेत. देशातील यांची संख्या ७.५ कोटींच्या आसपास आहे, देशातील उद्योगांना चालू ठेवण्यासाठी यांच्या योगदानाचा वाटा  मोठा आहे.
कोरोनाचे संकट वैश्विक असले तरी भारताच्या औद्योगिक व सामाजिक परिस्थिती हलाखीची बनवणारी ही महामारी ठरणार आहे. अगोदरच पांगळी  बनलेली भारतीय अर्थव्यवस्था कोरोनामुळे जायबंदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे सगळेच ठप्प झाले  आहे. ही स्थिती किती दिवस राहणार याचा अंदाज आजच्या घडीला तरी कोणी ही देऊ शकत नाही. देश चालविण्याचे काम करणाऱ्यांची बौद्धिक  क्षमता काय आहे, याची चुणूक गेल्या काही वर्षांत सर्वांना आलेलीच आहे. मोठ्या प्रमाणात खूषमस्करे आणि अंधभक्त आजुबाजुला असलेले  राज्यकर्तेच नोटाबंदीच्या निर्णयानंतर फसलो असल्याची भावना खाजगीत मान्य करीत आहेत. त्यावर कढी म्हणून की काय जे देशात हुशार   अर्थतज्ज्ञ आहेत, त्यांना पध्दतशीरपणे डावलून आपणास सोईचे होईल तशांची नेमणूक करण्यात या सरकारने आघाडी घेतली आहे. जे अर्थतज्ज्ञ  सध्या खुर्चीवर बसलेले आहेत, ते या आर्थिक अराजकतेत कोणते उपाययोजना करतात, तसेच कोरोनामुळे आर्थिक आणीबाणीच्या उंबरठ्यावर  उभ्या असलेल्या देशाला कसे सावरतात, हाच खरा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. देशवासियांना मानसिक आणि आर्थिक आणीबाणीच्या  संकटांतून बाहेर काढण्यासाठी धाडसी निर्णय घेतले जाण्याची नितांत गरज आहे, देशातील सर्वसामान्य माणसाला त्याचा पालक म्हणून मानसिक  आधार आणि संरक्षण देण्याची जबाबदारी प्रत्येक देशाच्या राज्यकत्र्यांची आहे, त्यांनी ती सजगपणे व कोणत्याही सवंग लोकप्रियतेच्या आहारी न  जाता पार पाडणे आवश्यक आहे, भारतीय अर्थव्यवस्था कोरोनामुळे निश्चितच आणीबाणीच्या उंबरठ्यावर उभी आहे. भारतीय जागरूक नागरिक  म्हणून प्रत्येकांनी सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या निर्णयाला मनापासून साथ दिली पाहिजे, प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे. आज  ना उद्या जगभरातील कोरोनाचे काळे ढग निश्चितच दूर होतील, ढगाळ वातावरणामुळे अंधारलेल्या सृष्टीला आशेचा किरण दिसेल, आकाश स्वच्छ  व निरभ्र होईल, मात्र त्या आकाशाखाली तितक्याच निर्भयपणे आणि स्वच्छंदपणे जगण्यासाठी दाटून आलेले प्रत्येकाच्या मनामनातील भीतीचे  काळेकुट्ट ढग दूर होण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची खरी गरज आहे.

– सुनीलकुमार सरनाईक
(लेखक भारत सरकारच्या वतीने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ पत्रकार आहेत. मो.: ७०२८१५१३५२)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget