Halloween Costume ideas 2015

कोरोनाचे संकट महाभयंकर

देशाची कसोटी : माणुसकी जीवंत ठेवावी

corona
तुम्ही एकाच आई-वडिलांपासून जन्म घेतलेली सगळी लेकंर. जगात कुठेही वावरा तुमचे प्रश्‍न एक, तुम्हाला जडलेल्या आजारांवरील सर्वांना लागू होणारा औषधीही एकच़़़ असचं कोरोना विषाणूने काहीशी परिस्थिती जगातील मानवजातीला दाखवून दिली़ जगातील जवळपास 199 पेक्षा अधिक देशाला कोरोना विषाणूजन्य आजारानं वेढलं आहे़ आत्तापर्यंत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येबाबत माहिती देणार्‍या वडोर्मीटर संकेतस्थळानुसार, जगातील 199 देशांमधील 7 लाख 23 हजार 124 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाचे एक लाख 48 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. रविवारी, स्पेनमध्ये एका दिवसात 821 जणांचा मृत्यू झाला. तर 6875 नवे रुग्ण आढळले आहेत. इटलीतही परिस्थिती चिंताजनक असून 756 जणांचा एका दिवसात मृत्यू झाला असून आतापर्यंत 10 हजार 779 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात बुधवारपर्यंत 8 लाख 41 हजार 285 जणांना कोरोना बाधा झाली पैकी 41403 जणांना मृत्यू झाला. उपचाराअंती 176097 बरे झाले. भारतात 1900 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 58 रूग्णांचा मृत्यू झाला तर उपचाराअंती 102 घरी परतले.
    चीन, अमेरिका, युरोपसह अन्य विकसित देशात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातलेले आहे़ उच्च कोटीच्या आरोग्य सुविधा असूनही कोरोनासमोर हे देश हतबल झाल्याचे दिसत आहे़ त्यामानाने भारतात उशीरा का होईना पण कडक अंमलबजावणी आणि योग्य जनजागृती होत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत झाली आहे़ त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचं याबाबत कौतूक झालं पाहिजे़ मात्र लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक घडी विस्कटून गेली असून, जनमाणस हतबल झाल्याचे दिसून येत आहे़     -
कामगार वर्ग तर पुरता हतबल झाला आहे़ राज्यभरात लाखोंची संख्या कामगारांची आहे़ त्यामध्ये ज्याचे हातावट पोट आहे त्यांची संख्याही लक्षणीय आहे़ राज्यात परराज्यातील आलेल्या कामगारांची तर दयनीय अवस्था आहे़ लॉकडाऊन वाढण्याच्या भीतीने त्यांनी आपल्या मूळ गावाकडे पलायन करणे सुरू केले आहे़ सर्व वाहने बंद असली तरी अत्यावश्यक सुविधा देणार्‍या वाहनांमधून दाटीवाटीने ते प्रवास करीत आहेत़ तसेच शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करीत ते गावाकडे जात आहेत़ ही अवस्था बघवत नाही़ खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना जिथे आहे तिथे राहण्याची विनंती केली असून, पंतप्रधानांनीही 3 महिने घर मालकांनी भाडेकरूंकडून भाडे घेऊ नये असे विनंती केली आहे़  मात्र तेवढी दयावृत्ती अजून आपल्याकडे आलेली नसल्याने काही ठिकाणी भाडेकरू व्यवसाय, नोकरी बंद असल्याने चिंतातूर झाले आहेत़ देशातील खाजगी नोकरवर्गाचाही जीवात जीव दिसून येत नाही़ एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखत आहोत, याचे समाधान होत आहे मात्र नोकरीवर याचे दीर्घकालीन परिणाम होऊन मोठी हानी होण्याची भीती निर्माण झाली आहे़ लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय बसले आहेत़ कंपन्या बंद झाल्या आहेत़ त्यामुळे पुढील महिन्यांत अनेकांना पगार मिळेल का नाही याची भीती आहे़ यावर सरसकट काही तरी उपाययोजना होणे अपेक्षित आहे़ मात्र ते होईल, असे सध्यातरी वाटत नाही़ गरीबाना तीन महिन्यांचे राशन देण्याचा आवाहन करण्यात आले असले तरी वितरणाची व्यवस्था अपुरी असल्याचे चित्र आहे़  काही जणांकडे राशन कार्ड आहे मात्र राशन दुकानात त्याची नोंद नाही, ऑनलाईन जोडणी झालेली नाही़ अनेकजण तर कधी राशन दुकानाकडे फिरकलेही नाही़ यामुळे सर्व गरजूंपर्यंत राशन पोहचेल का नाही, याची चिंता वाटते़
    पोलीस आणि डॉक्टर्सचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे़ मात्र त्यांना कित्येक असुविधांचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे खाजगी दवाखान्यांनी आपली ओपीडी बंद ठेवली आहे़ कोरोनाचा धसका स्वत: डॉक्टर्सनीही घेतला आहे़ जिथे असुविधा आहेत तेथील डॉक्टर्सनी हॉस्पिटल बंद करणे पसंद केले आहे़ जगभरातून कोरोनामुळे डॉक्टर्सच्या मृत्यूंच्या येणार्‍या बातम्यांनी खाजगी डॉक्टर्स हादरले आहेत़ एकंदर काय तर कोरोनाची ही भीषणता कुठे जाऊन थांबेल, ही बाब सध्यातरी अनिश्‍चित दिसत आहे़  अशात माणुसकीचं नातं जपणं फार गरजेचं आहे़
    भारतात एकत्रित कुटुंबात राहण्याची परंपरा जुनीच आहे़ त्यामुळे सर्व लोक कधीनाही तेवढे घरात जमले आहेत़ ते एकमेकांचे जमत नसले तरी जमवून घेत आहेत़ आपुलकीची भावना निर्माण झाली आहे़ मात्र सोशल डिस्टन्सचं अंतर पाळणं कठीण जात आहे़ एकत्रित कुटुंबातील एखादाही व्यक्ती शिंकला, खोकलला की संशयाच्या नजरेने त्याच्याकडे पाहिले जात आहे़ शासनानं एक बरं केलं की कोरोनाबाधिताची नावे जाहीर केली नाहीत़ अन्यथा त्या परिवाराशी लोकांनी संपर्कच ठेवणं बंद केलं असतं़ पुणे, मुंबई असो की परदेशातून आलेले नागरिक प्रत्येकाकडे संशयाची सुयी जात आहे़ त्यामुळे त्या लोकांनी स्वत:ची तपासणी करून होम कोरंटाईन करून घेतले पाहिजे़ कुठेही बाहर फिरले नाही पाहिजे़
    धार्मिक कार्यक्रम, स्थळे सर्वच तात्पुरते बंद करण्यात आले आहे़ काहींनी स्वत:हून बंद केले आहेत तर अजूनही काही आडमुठे लोक एकत्रित जमा होत आहेत़ अशा भीषण परिस्थितीत प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे़ कोरोना संसर्गजन्य आणि गुणाकार पद्धतीने पसरणारा आजार आहे़ त्यामुळे या भयंकर महामारीला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे़ त्यासाठी आयसोलेशन शिवाय दूसरा मार्ग नाही.
    कोरोनाने जगभरातील माणसांच्या चेहर्‍यावरचं हास्य ओरबडून घेतलं आहे़ प्रत्येक व्यक्ती चिंताग्रस्त आहे़ अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडताना कुटुंबियांचा जीव भांड्यात पडत आहे़ आनंदाचं हसणं घरातील व्यक्ती विसरल्या आहेत़ सर्व जग धावत असताना कोरोनाने जगाला अचानक ब्रेक लावल्यामुळे प्रत्येकाला इच्छा नसताना घरात रहावं लागत आहे़ जेव्हा इच्छा नसताना कुठलीही गोष्ट केली जाते तेव्हा तेथे विनाकारण वाद उद्भवतात़ तीच परिस्थिती आज मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहेत़  अशा भीषण परिस्थिती माणुसकीचं, प्रेमाचं, एकात्मतेचं आणि वात्सल्याच दर्शन घडणे गरजेचे आहे़ आज मोठ्या प्रमाणात देशात सामाजिक संस्था, संघटना गरीबांपर्यंत अन्नधान्य व जेवण पोहोचते करत आहेत.  ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. अशांची संख्या कमी आहे मात्र सरकारकडून कामगार, गरीबांपर्यंत अन्नधान्य आणि जेवण पोहोचविण्यासाठी मोठी पावले उचलणे गरजेचे आहे़ येणारा काळ महाभयंकर राहणार आहे़ कामगारांच पलायन वाढलं आहे़ जगण्या-मरण्याची भीतीने मानसिक आजार जडण्याची शक्यता आहे़ त्यामुळे कोरोनाचा सामना घरात राहून, सोशल डिस्टन्स पाळून करणं हेच उत्तम़

- बशीर शेख  

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget