Halloween Costume ideas 2015

लोकसभेचे निकाल आणि आपली जबाबदारी

हम फुल हैं औरों के लिए लाये हैं खुशबू
अपने लिए ले दे के बस एक दा़ग मिला है

23 मे रोजी 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आला आणि 30 मे रोजी नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधीसुद्धा झाला. अनेक पैलूंने या निकालांचे विश्‍लेषण आतापर्यंत आपल्यासमोर आलेलेच आहे. त्यात जवळ-जवळ सर्वच मुद्यांचा उहापोह झालेला आहे. अनेक दृष्टीने विचारमंथन झालेले आहे. फक्त एक मुद्दा ज्याचा संबंध भारतीय मुस्लिमांशी आहे, तो या ठिकाणी वाचकांच्या कोर्टात सादर करण्यासाठी हा लेखनप्रपंच मांडलेला आहे.
    आपल्या देशाच्या महान हिंदू संस्कृतीमधील सामाजिक न्यायाचा मुद्दा जेव्हा-जेव्हा चर्चिला जातो, तेव्हा -तेव्हा एक उदाहरण आवर्जुन दिले जाते. ते म्हणजे, जेव्हा एखाद्या परिवारामध्ये वडिलांचा मृत्यू होतो व त्या पश्‍चात वडिलांच्या संपत्तीचे सर्व भावंडांमध्ये वितरण केले जाते. तेव्हा जे पंच असतात ते संपत्तीचे समान भाग करतात. मात्र सर्वात लहान भावाला त्याच्या पसंतीचा हिस्सा निवडण्याची आधी संधी दिली जाते. याच क्रमाने सर्व भाऊ आपला हिस्सा उचलतात आणि शेवटचा हिस्सा हा मोठ्या भावाकडे राहतो. साहजिकच आहे लहान भाऊ चांगले हिस्से घेऊन टाकतात. तुलनेने कमी मुल्याचा हिस्सा मोठ्या भावाच्या वाट्याला येतो. तरीपण तो त्याचा आनंदाने स्वीकार करतो व कुठलीही तक्रार करत नाही.
    17 व्या लोकसभेच्या निवडणुकींमध्ये मात्र हा नियम डावलण्यात आलेला आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. भाजपच्या निवडून आलेल्या 303 खासदारांपैकी एकही खासदार मुस्लिम नसावा हे अल्पसंख्यांकांना (छोट्या भावाला) डावलण्यात आल्याचे ठळक उदाहरण आहे. तरीपण निवडून आल्यानंतर संविधानासमोर शिष नमवून केलेल्या भाषणामध्ये प्रधानमंत्र्यांनी ’सबका साथ सबका विकास’ या सोबत ’सबका विश्‍वास’ या तत्त्वाचा समावेश केलेला आहे, ही समाधानाची बाब आहे. त्यांचे हे म्हणणे केवळ सुभाषित राहणार नाही, याची दक्षता त्यांनी येत्या काळामध्ये घेतली तरी पुरे. निवडणूक निकाल स्पष्ट झाल्या-झाल्या मध्यप्रदेशच्या सीवनसह पश्‍चिम बंगालमध्ये काही ठिकाणी व हरियाणाच्या कर्नालमध्ये मुस्लिमांवर हल्ले झालेले आहेत. कर्नालमध्ये तर मस्जिदीची नासधूस सुद्धा करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्र्यांच्या वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर याकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते हे येत्या काळात स्पष्ट होईलच.
    गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिमांना राजकीयदृष्ट्या वेगळे पाडण्याची खेळी सर्वच पक्षांनी खेळलेली आहे. 17 व्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तर ही बाब अधिक ठळकपणे स्पष्ट झालेली आहे. देशभरातून निवडून आलेल्या मुस्लिम आमदारांची संख्या 27 असल्याच्या आनंदात मुस्लिम तरूण त्यांचे फोटो समाज माध्यमावरून इकडून तिकडे अभिमानाने फिरवत आहेत. यापूर्वी यापेक्षा जास्त मुस्लिम खासदार निवडून आले होते हे सुद्धा त्यांना माहित नाही. अशा परिस्थितीत मुस्लिमांनी राजकारणामध्ये अति सक्रीयता आणि प्रतिक्रियावादापासून अंतर ठेऊन आता स्वतःच्या विकासाकडे लक्ष द्यावे, असे माझे मत आहे. राजकारणाच्या क्षेत्रात जरी प्रभाव पाडता आला नसला तरी स्वतःच्या आणि देशाच्या विकासासाठी खुल्या असलेल्या अनेक क्षेत्रामध्ये प्रभाव पाडण्याच्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत, याची जाणीव असू द्यावी. अंगभूत गुणांच्या बळावर, इस्लामी चारित्र्याच्या पायावर, आपण सध्या असलेल्या क्षेत्रामध्ये अपार कष्ट करून स्वतःचा आणि स्वतःबरोबर देशाचा विकास साधता येईल, यात शंका नाही. कारण अलिकडे जरी हिंदूत्वाचे राजकीयकरण करण्यात आलेले असले तरी आजही सर्वसामान्य हिंदू हे सहिष्णू आहेत, हे सत्य नाकारण्यासारखे नाही. इंदिरा गांधींनी घटनेमध्ये ’धर्मनिरपेक्ष’ या शब्दाचा समावेश करण्यापूर्वीसुद्धा भारतातील हिंदू सहिष्णू होता. यावरून असे सिद्ध होते की, घटनेमुळे नाही तर स्वभावामुळेच बहुसंख्य हिंदू बांधव हे धर्मनिरपेक्ष प्रवृत्तीचे आहेत. सध्याचे हिंदूत्व ही भाजपची राजकीय धारणा आहे, वास्तव नाही, अशी माझी धारणा आहे.
थ्री टीज
    येत्या काळामध्ये मुस्लिमांनी राजकीय गदारोळापासून थोडेसे अंतर राखून स्वतःच्या व स्वतःच्या तरूण पीढिच्या विकासाकडे लक्ष द्यावे, असे मला स्वतःला वाटते. नाहीतरी सर्वपक्षांनी मिळून मुस्लिमांना राजकारणाचे लाभ मिळणार नाहीत, यासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. अशा परिस्थितीत आपण स्वतःच थोडासा अलिप्तपणा राखून इतर महत्त्वाच्या प्रश्‍नाकडे लक्ष दिल्यास फारसे काही नुकसान होणार नाही. उलट फायदाच होईल. अकोल्यामध्ये भाजपचा मुस्लिम कार्यकर्ता मतीन याचा खून झाला. खून करणारे काँग्रेसचे मुस्लिम कार्यकर्ते होते. यावरून सिद्ध होते की, राजकीय लाभ तर काही झाला नाही उलट खुनासारख्या गुन्ह्याचा बोजा डोक्यावर आला. आखिरतमध्ये या संंबंधी होणारी चौकशी वेगळीच. शांतपणे विचार करून येत्या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने जरूर मतदान करावे. मात्र बाकीची सक्रीयता टाळावी व त्यातून राहिलेली ऊर्जा खालील थ्री टीजवर खर्च करावी.
पहिला टी ः तालीम, अर्थात भौतिक शिक्षण. शिक्षण घेण्यापासून मुस्लिमांना कोणीही रोखलेले नाही. सर्वसमाजाला शिक्षण घेण्याच्या अनेक सुविधा गावपातळीपर्यंत शासनाने पोहोचलेल्या आहेत. त्या सुविधांचा उपयोग करून मुस्लिमांनी आपल्या नव्या पीढिसाठी भौतिक शिक्षण देण्यासाठी जमेल तेवढे प्रयत्न करावेत. शाखा कुठलीही असो प्रत्येक मुस्लिम तरूण किमान पोस्ट ग्रॅज्युएट होईल, असे लक्ष्य ठेऊन मुलांना शिक्षण देण्यासाठी पालकांनी स्वतःला झोकून द्यावे.
    दूसरा टी ः तरबीयत अर्थात इस्लामी तरबियत. तरबियत म्हणतात प्रशिक्षणाला, संस्काराला. आधुनिक भौतिक शिक्षणाबरोबर येणार्‍या वाईट गोष्टींपासून आपल्या तरूण पीढिचे रक्षण करावयाचे असल्यास त्यांचे इस्लामी प्रशिक्षण पूर्ण केल्याशिवाय गत्यंतर नाही. अन्यथा वाईट चारित्र्याची तरूण पीढि कितीही शिकलेली असली तरी ती ना समाजासाठी उपयोगी ठरू शकते ना देशासाठी. चारित्र्यवान मुस्लिम तरूणांची एक मोठी फळी येत्या पाच वर्षात उभी करण्यासाठी भौतिक शिक्षणाबरोबर आपल्या मुलांना नैतिक शिक्षण देण्याकडे मुस्लिम पालकांनी कटाक्षाने लक्ष द्यावे.
तीसरा टी ः तिजारत अर्थात व्यापार. व्यापाराच्या भरपूर संधी देशामध्ये उपलब्ध आहेत. त्या इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत की विदेशी कंपन्यासुद्धा भारतात येऊन व्यापार करीत आहेत. स्वतः प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ”उपजीविकेची 10 दारे आहेत. त्यापैकी 9 दारे व्यापारातून उघडतात.” आज व्यापारासाठी आदर्श म्हणून चीनी व्यापाराकडे पाहता येईल. त्यांनी व्यापाराच्या बळावर अमेरिकेसारख्या महाशक्तीसमोर आव्हान उभे केले आहे. 
    समाजामध्ये नेहमीच व्यापार्‍यांना मान दिला जातो. शासन आणि प्रशासनामध्ये त्यांच्याकडे चांगल्या नजरेने पाहिले जाते. व्यापारातून आर्थिक संपन्नता येते. हे जागतिक सत्य आहे. या सत्यामुळे प्रेषित सल्ल. यांच्या हदीसमध्ये सांगितलेल्या गोष्टींची पुष्टी होते. नाहीतरी आता सरकारी नोकर्‍या कमी कमी होत जाणार आहेत. म्हणून मुस्लिम तरूणांनी वेगवेगळ्या वापार्‍याच्या युक्त्या शिकाव्यात. विशेषतः आय.टी. क्षेत्रामध्ये, फार्मा क्षेत्रामध्ये, मोठ्या उद्योगांना लागणार्‍या छोट्या सुट्या भागांच्या पुरवठ्यामध्ये व यासारख्याच इतर अन्य शाखांमधील  उत्पादन आणि व्यापारामध्ये मुस्लिम तरूणांनी यायला हवे. हे क्षेत्र स्वतःच्या आणि देशाच्या विकासासाठी खुले आहे, याचा लाभ मुस्लिमांनी घ्यावा.
    भारतामध्येच नव्हे तर जागतिक स्तरावर मुस्लिमांच्या होत असलेल्या पतनाच्या कारणांची चर्चा करतांना एक महत्त्वाच्या कारणाकडे प्रसिद्ध इस्लामी विचारवंत सय्यद अबुल आला मौदूदी यांनी म्हटले होते की, ”
    राजकारण आणि सत्ताकारणामध्ये अतिसक्रीयता टाळून केवळ शिक्षण, प्रशिक्षण आणि व्यापारामध्ये लक्ष केंद्रीत केल्यामुळे महाराष्ट्रातील शिया मुस्लिमांच्या बोहरा शाखेतील लोक अतिशय उन्नत झालेले आहेत. इतके की ते सरकारला सुद्धा प्रसंगी आर्थिक मदत देतात. याचे उदाहरण सुन्नी मुस्लिमांनी डोळ्यासमोर ठेवल्यास नक्कीच प्रगती साध्य करता येईल. मुस्लिमांचे अधःपतन का होते याबाबत प्रसिद्ध इस्लामी विचारवंत सय्यद अबुल आला मौदूदी रहे. म्हणतात, ” ये कतई नामुम्कीन है के कोई कौम खुदा के कलाम की हामिल (समर्थक) हो और फिर दुनिया में ़जलील (अपमानित) व ख्वार (अधःपतीत), दूसरों की महेकूम (आश्रीत) हो, पाओं में रौंदी (तुडविली जाणे) और जूतों से ठुकराई जाए, इसके गले में गुलामी का फंदा हो, और दूसरों के हाथ में उसकी बागें (लगाम) हों और वो इस तरह हांके जाएं जैसे जानवर हांके जाते हैं, ये अंजाम उसका सिर्फ उस वक्त होता है जब वो अल्लाह के कलाम पर जुल्म करती है.” मौलांनाच्या या वैचारिक टिप्पणीवर विचार करून प्रत्येक भारतीय मुस्लिमाने आपले आत्मपरीक्षण केले तर राजकारणासह सर्वच क्षेत्रात मुस्लिमांची पीछेहाट का होत आहे, याचा त्यांना स्वतःला अंदाज येऊ शकेल.
    असो ! प्रधानमंत्री मोदी यांना व नवनिर्वाचित खासदारांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. आपण सर्वांनी मिळून नवीन भारत घडविण्यासाठी प्रधानमंत्री आणि संसदेची मदत करूया. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, या महान देशाच्या विकासासाठी बरकतीचा वर्षाव करावा. आमीन.

- एम.आय.शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget