Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१२८) जर१५७ एखाद्या स्त्रीला आपल्या पतीकडून वाईट वागणूक अथवा उपेक्षेचे भय असेल तर यामध्ये काहीही हरकत नाही की पतीपत्नी (काही हक्काच्या कमी अधिक प्रमाणावर)   परस्पर तडजोड करतील. तडजोड अधिकचांगली आहे.१५८ मने संकुचितपणाकडे शीघ्रतेने वळतात१५९ परंतु जर तुम्ही उपकारी वृत्तीने आणि अल्लाहचे भय बाळगून वागाल तर खात्री  बाळगा की अल्लाह तुमच्या या कार्यपद्धतीपासून अनभिज्ञ राहणार नाही.१६०
(१२९) पत्नींच्या दरम्यान पुरेपूर न्याय राखणे तुम्हाला शक्य नाही. तुम्ही इच्छिले तरी त्याला तुम्ही समर्थ ठरू शकत नाही. (म्हणून अल्लाहच्या आदेशाचा हेतू साध्य करण्यासाठी हे  पुरेसे आहे की) एका पत्नीकडे इतके झुकू नका की दुसरी अधांतरी राहील.
१६१ जर तुम्ही आपली वागणूक नीटनेटकी ठेवलीत आणि अल्लाहचे भय बाळगत राहिला तर अल्लाह  क्षमाशील आणि कृपा करणारा आहे.१६२
(१३०) परंतु पती-पत्नींनी एकदुसऱ्यापासून फारकत घेतलीच तर अल्लाह आपल्या विशाल सामथ्र्याने प्रत्येकाला दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापासून मुक्त करील. अल्लाहचे औदार्य  अतिविशाल आहे व तो बुद्धिमान व द्रष्टा आहे.
(१३१) आकाशांत आणि पृथ्वीत जे काही आहे सर्व अल्लाहचेच आहे. तुमच्यापूर्वी ज्यांना आम्ही ग्रंथ दिला होता त्यांनादेखील हाच आदेश  दिला होता आणि आता  तुम्हालादेखील हाच  आदेश देत आहोत की अल्लाहचे भय बाळगून काम करीत राहा परंतु जर तुम्ही मानत नसाल तर मानू नका. आकाश आणि पृथ्वीतील सर्व वस्तूंचा मालक अल्लाहच आहे व तो  निरपेक्ष आहे, सर्व स्तुतीला पात्र.
(१३२) होय अल्लाहच मालक आहे त्या सर्व वस्तूंचा ज्या आकाशांत आणि पृथ्वीत आहेत आणि कार्यसिद्धीकरिता केवळ तोच पुरेसा आहे.
(१३३) जर अल्लाहने इच्छिले तर तो तुम्हाला बाजूस सारून तुमच्या जागी इतरांना आणील, आणि यावर त्याचे सर्वस्वी प्रभुत्व आहे.



१५७) येथून मूळ प्रश्नाचे उत्तर आरंभ होत आहे. या उत्तराला समजण्यासाठी आवश्यक आहे की पहिल्या प्रश्नाला चांगल्या प्रकारे जाणून घेतले पाहिजे. अज्ञानताकाळात एक व्यक्ती  अनेक पत्नीं करण्यास मोकळा होता आणि त्या पत्नींसाठी काहीही हक्क निश्चित नव्हते. या सूरहची (सूरेनिसा) प्रारंभिक आयती जेव्हा अवतरित झाल्या तेव्हा या स्वातंत्र्यावर (अनेक  पत्नी करणे) दोन प्रकारचे प्रतिबंध लावण्यात आले. एक म्हणजे पत्नीं संख्या जास्तीतजास्त चारपर्यंत सीमित करण्यात आली, दुसरा प्रतिबंध म्हणजे एकापेक्षा जास्त पत्नी केल्यास  न्याय (समानतेचा व्यवहार) ही अट घातली गेली. आता प्रश्न निर्माण झाला की एखाद्याची पत्नी वांझ आहे किंवा एखाद्या मोठ्या आजाराने पीडित आहे, तसेच लैंगिक संबंध ठेवण्यास  ती योग्य नाही, अशा स्थितीत पतीने दुसरी पत्नी केली तर काय त्याने दोघींशी एकसमान लगाव ठेवावा? एकसमान प्रेम ठेवावे? शरीरसंबंधातसुद्धा समानता ठेवावी? त्याने असे केले  नाही तर तो अत्याचार ठरेल? काय दुसरा विवाह करण्यासाठी त्याने पहिल्या पत्नीला सोडून द्यावे? तसेच पहिली पत्नी विलग होऊ इच्छित नाही. परंतु पतीने तिला तलाक देऊ नये  म्हणून आपले काही हक्क तिने सोडून द्यावेत. काय असे करणे न्यायाविरुद्ध तर होणार नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे या आयतींत देण्यात आली आहेत.
१५८) म्हणजे तलाक आणि विलग होण्यापासून चांगले आहे की या प्रकारे आपापसात तडजोड करून एक स्त्री त्याच पतीजवळ राहावी ज्याच्या समवेत तिने आयुष्याचा एक भाग व्यतीत केला आहे.
१५९) स्त्रीकडून संकुचितपणा म्हणजे ती आपल्या मनात आपल्या पतीविषयीच्या उदासीनतेच्या कारणांना स्वत: अनुभवते आणि तिला वाटते की एका आवडत्या पत्नीबरोबर जसा वागतो  तसे त्याने आपल्याशी वागावे. पुरुषाची संकुचित वृत्ती म्हणजे जी पत्नी मनातून उतरल्यानंतरसुद्धा त्याच्याच जवळ राहू इच्छिते, तिला जास्त प्रमाणात त्याने दाबून ठेवावे आणि  तिच्या हक्कांना असह्य होईल इतके कमी कमी करीत जावे.
१६०) येथे अल्लाहने पुन्हा पुरुषाच्या उदारतेला उत्प्रेरित केले आहे. जसा अल्लाहचा सामान्यत: हा शिरस्ता आहे. त्याने पुरुषाला प्रेरणा दिली आहे की पत्नीशी लगाव जरी नसला तरी  उपकाराची नीती स्वीकारली जावी आणि त्या अल्लाहच्या कोपाची भीती बाळगावी जो मनुष्याच्या उणिवांना जाणूनसुद्धा तिकडे दुर्लक्ष करतो. अन्यथा अशा माणसांकडून अल्लाहने आपले  लक्ष काढून घेतले तर माणूस जगात असहाय होईल.
१६१) म्हणजे मनुष्य एकूण परिस्थितीत आणि योग्यतेत दोन किंवा दोनपेक्षा जास्त पत्नींमध्ये समानेतचा व्यवहार करू शकत नाही. एक रूपवती आहे तर दुसरी कुरुप, एक युवती  आहे तर दुसरी प्रौढ, एक नेहमीचीच आजारी तर दुसरी स्वस्थ आहे. तसेच एक भांडकुदळ तर दुसरी मनमिळावू आणि हसमुख आहे. अशाप्रकारे इतर भेदसुद्धा संभव आहेत ज्यामुळे  एकीच्याकडे स्वाभाविकपणे पतीचे कमी लक्ष आणि दुसरीच्याकडे जास्त झुकाव दिसतो. अशा स्थितीत कायदा ही मागणी करू शकत नाही की प्रेम, लगाव, शारीरिक संबंधांविषयीचे  संपूर्ण व्यवहार दोघांत एकसमानच व्हावेत. कायद्याची मागणी आहे की तुम्ही एखाद्या पत्नीशी लगाव ठेवत नाही आणि तलाकसुद्धा देत नाही आणि आपल्या इच्छेने किंवा तिच्या   इच्छेने पत्नी म्हणून ठेवत असाल तर तिच्याशी कमीतकमी एका सीमेपर्यंत संबंध अवश्य ठेवावेत, जेणेकरून पतीशिवाय स्त्रीचे जीणे तिने जगू नये. अशा स्थितीत एकीपेक्षा दुसऱ्या  पत्नीकडे पतीचा झुकाव जास्त असणे स्वाभाविक आहे, परंतु याचा अतिरेक होऊ नये की दुसऱ्या पत्नीने पतीशिवाय स्त्रीसारखे जीवन जगावे. या आयत द्वारा काहींनी हा अर्थ काढला  आहे की कुरआन एकीकडे न्यायोचित पद्धतीने बहुपत्नी विवाहाची अनुमती देतो आणि दुसरीकडे मात्र न्यायाला असंभव दाखवून या अनुमतीला व्यावहारिकतेनुसार व्यर्थ ठरवितो. परंतु  असा अर्थ या आयतचा निघू शकत नाही. जर असे फक्त म्हटले गेले असते, ``तुम्ही पत्नींमध्ये न्याय करू शकत नाही'' तर वरीलप्रमाणे अर्थ काढणे योग्य होते. परंतु त्वरित पुढे  म्हटले गेले आहे, ``म्हणून एकाच पत्नीकडे आपला झुकाव ठेवू नका.'' या वाक्याने वरील अर्थ काढण्यास काहीही वाव ठेवलेला नाही जो खिस्तीजन (युरोपियन) त्यांचे अनुकरण करणारे या आयतने काढण्याचा प्रयत्न करतात.
१६२) म्हणजे जोवर शक्य आहे तुम्ही हेतुत: अत्याचार करू नका आणि न्यायनिष्ठेने आपले कार्य करा. स्वाभाविक अशक्यतेमुळे तुमच्याकडून थोड्याफार उणिवा न्यायांबाबत राहिल्या तर अल्लाह माफ करणारा आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget