Halloween Costume ideas 2015

स्वतंत्र भारताची अमृतमहोत्सवी वाटचाल


कौमी तिरंगे झण्डे उॅंचे रहो जहां मे

हो तेरी सर बुलन्दी ज्यों चांद आसमां में

तू मान है हमारा, तू शान है हमारी

तू जीत का निशां हैं तू जान है हमारी

आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. या अभूतपूर्व घटनेला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणारा हा आपला देश अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. यामध्ये मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आपल्या देशाने लोकशाही  समाजव्यवस्था स्विकारली आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांचे निर्माण झालेले हे राष्ट्र किती ही संकटे येऊ द्या पण आजही लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी झटत असताना दिसत आहे

गेल्या ७५ वर्षाच्या काळात भारताने विविध क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी केली आहे, गेल्या ७५ वर्षात केलेल्या सर्वांगीण विकासाचा आलेख पाहून प्रत्येक भारतीयाचे मन अभिमानाने भरून येते आहे. १९४७ पूर्वी या देशात टाचणी देखील तयार होत नव्हती. शिवाय बहुसंख्य जनता दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत होती, तरी ही इथल्या निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना अन्न, वस्त्र, निवारा, वीज, पाणी यांपासून वंचित रहावे लागत होते. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७५ वर्षांत भारताने कृषी क्षेत्रात संपूर्णपणे स्वावलंबी होण्यासाठी कटीबद्ध होऊन आज अन्नधान्य निर्यात करणाऱ्या देशातील अग्रभागी असणारा देश अशी ओळख निर्माण केली आहे. इथली साखर कारखानदारी,दुध व दुग्धजन्य व्यवसाय, सहकारी सोसायट्या पहाण्यासाठी परदेशी अभ्यासक मोठ्या संख्येने भारतात येतात.

भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात केलेली भरीव प्रगती देखील अभिमानास्पद आहे. भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांने १९७४ साली राजस्थानातील वाळवंटात ॲटमबाॅम्बचा स्फोट करून संपूर्ण जगाला आश्र्चर्यचकित केले होते. त्यावेळी ऑटमबॉम्ब तयार करणारे जगात भारत हे ६ वे राष्ट्र होते. माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गेली काही वर्षे भारतीय अभियंत्यांनी मोठा नावलौकिक मिळविला आहे आज अमेरिकेसारख्या जगाची महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या देशात सिलीकॉन व्हॅली मध्ये ‌संगणक तज्ज्ञ म्हणून भारतीय तरूण अभियंते अग्रेसर आहेत.

भारतीय जनतेच्या मनात स्वसामर्थ्य हा पिंड उपजतच आहे, त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगतीप्रमाणे भारताने काही उदात्त मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक अडचणींना तोंड देत कृषी, विज्ञान, संरक्षण, माहिती व तंत्रज्ञान या सारख्या अनेक क्षेत्रांत भारतीयांनी फार मोठी कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भारतीय लोकशाही कणखर आणि मजबूत करण्यासाठी दमदार पाऊले उचललेली दिसून येतात.. तसेच सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी नेहमीच पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांच्या आधारे वाटचाल केली आहे.जगातील सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून भारतीय राज्यघटनेकडे पाहीले जाते. आपली राज्यघटना ही जगातल्या इतर कोणत्याही चांगल्या राज्यघटनेशी तुलना करावी, इतकी उत्तम प्रकारची आहे, असे अनेक विचारवंतांनी मत मांडले आहे. आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्याच्या तत्वावर आधारित आहे. त्याचबरोबर या देशाला अनेक संतमंडळींनी दिलेल्या अध्यात्माचा विचार इतर देशांच्या नागरिकांना आकर्षित करत आहे. मन:शांतीसाठी भारत भूमीची धार्मिक, आणि अध्यात्मिक संस्कृती निश्चितच स्वीकारार्ह असून विविध धर्म, पंथ, जाती, जमाती गुण्यागोविंदाने नांदत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवतात. ही गोष्ट सुध्दा भारतीय लोकशाही समाजव्यवस्थेच्या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे.

आपल्या देशातील लोकशाही कणखर आणि खंबीर आहे. याचे एक कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वामध्ये सापडेल. पंडित नेहरू यांचा पिंड पूर्णपणे लोकशाहीवादी होता. त्यांनी आपल्या १७ वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या काळात येथील लोकशाहीचा पाया अनेक  दृष्टींनी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेमध्ये व देशामध्ये लोकशाहीला पोषक अशा परंपरा आणि प्रथा निर्माण केल्या. त्यांनी विरोधी पक्षांना सुध्दा प्रतिष्ठा मिळवून दिली. विरोधी पक्ष देखील राष्ट्र उभारणीच्या कार्यातील आपला भागीदार आहे, अशा दृष्टीने त्यांनी विरोधी पक्षांना वागविले. आपल्या हातातल्या सत्तेचा वापर त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचा सूडबुद्धीने बदला घेण्यासाठी किंवा विरोधी पक्षाला नामोहरम करण्यासाठी वापरली नाही,तर ती सत्ता राष्ट्राच्या विकासासाठी वापरली.त्यांची ही भूमिका आजच्या काळात ही अतिशय महत्त्वाची असून आदर्शवत ठरली आहे.

तसं पाहिलं तर जगातल्या इतर कोणत्याही देशासमोर नसतील अशी गुंतागुंतीची अनेक आव्हाने या देशातील लोकशाही समोर होती आणि आहेत, येथे जगातील अनेक धर्माचे लोक अनेक शतके राहत आहेत,जगात कोठेही नसलेली आणि केवळ याच देशात असलेली अस्पृश्यता, जातीपातीच्या भिंती,व त्यातून निर्माण होणाऱ्या संघर्ष या सारख्या प्रश्नांना आपल्या देशाला तोंड द्यावे लागते, अनेकदा धर्मांधता,प्रांतभेद  या शिवाय सामाजिक व आर्थिक विषमता हा ज्वलंत प्रश्न नेहमीच ऐरणीवर आहे,अशा या देशामध्ये सर्वांच्या मध्ये एकात्मकतेची भावना निर्माण करून राष्ट्राच्या विकासासाठीची धोरणे अंमलात आणणे हे खरे तर फार मोठे आव्हान होते, मात्र या देशाच्या सुदैवाने पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, इंद्रकुमार गुजराल, डॉ.मनमोहन सिंग यासारख्या लोकशाहीप्रवण उद्दात विचारांचे नेतृत्व या देशाला लाभले आणि म्हणूनच या देशातील लोकशाही हळूहळू पण निश्चितपणे बळकट होत गेलेली आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही.

देशातील अंतर्गत दळणवळण व वाहतूक व्यवस्था यांनाही त्यांनी उत्तेजन दिले. इंदिरा गांधी यांनी तर बॅंकांचे राष्ट्रीयीकरण केले आणि समाजवादी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले.आपल्या देशाने पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या काळात १९९२ नंतर मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली आणि लवचिकतेचा एक सुंदर आविष्कार आपण जगाला दाखवून दिला. वास्तविक त्यावेळी जागतिकीकरणाच्या प्रयोगाला अनेकांनी विरोध केला होता,मात्र नंतरच्या काळात सत्तेवर आलेल्या त्याच विरोधकांनी जागतिकीकरणाचा पुरस्कार केल्याचे आपण सर्वांनी पाहिले.खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण ही नवी तत्वे स्विकारल्यामुळे पंडित नेहरू यांच्या पूर्वीच्या समाजवादी विचारसरणीचे धोरण चुकीचे होते की काय अशी शंका ही अनेकांनी त्यावेळी व्यक्त केली,मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील वाढ आवश्यकच होती.पोलादासारखे अनेक कारखाने आपण सुरू केले. त्यामुळे खाजगी उद्योगधंद्यांना चालना मिळाली.१९६५ च्या पाकिस्तानच्या युध्दात याच पोलादाची शस्त्रे तयार करून ती आपण युध्दभूमीवर पाठवू शकलो.१९६५ चे युध्द आपण अवघ्या दहा दिवसांत जिंकू शकलो याचे कारण आधीच्या काळात आपण केलेल्या पोलादासारख्या पायाभूत उद्योगधंद्यांची वाढ हे होय.नंतरच्या काळात या राष्ट्रीयीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंद्यांमुळे कोट्यावधी रुपयांचा तोटा होऊ लागला.अशा उद्योगधंद्यांचा आपल्याला वाईट अनुभव आला, त्यामुळे खाजगी क्षेत्रातील उद्योगांनी आपले लक्ष वेधून घेतले.आणि ते देशाच्या विकासासाठी परवडणारे आहे, असे वाटू लागले. अर्थात असाच अनुभव जगातल्या कम्युनिस्ट राष्ट्रांनाही आला, चीनसारख्या कम्युनिस्ट देशानेही खाजगीकरण अवलंबिले.खाजगीकरण ही आज काळाची गरज आहे,तर राष्ट्रीयीकरण व सार्वजनिक क्षेत्रातील विस्तार ही सुरुवातीला आपली निकड होती, दोन्ही अर्थव्यवस्था पुरक ठरल्या आणि विकासाच्या गतीने वेध घेतला,हे वास्तव नाकारता येणार नाही.आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या देशाचा उत्पादित मालाची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे, शिवाय परदेशी तंत्रज्ञान आणि सुधारित पद्धतीने निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा यांचा उपयोग करणे आपल्याला ही सूलभ झाले आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बांधलेल्या भाक्रनांगल सारख्या मोठमोठ्या धरणांमुळेच आज देश प्रगतीच्या वारूवर स्वार झाला आहे,हे सुध्दा आपल्याला नाकारता येणार नाही. कारण शेतीला व मोठ्या उद्योगांना लागणारी वीजनिर्मिती अशा धरणांमुळेच शक्य झाली आहे. नद्या,कालवे,तलाव, शेततळे या सारख्या जलस्रोतांच्या उपलब्धतेमुळे इथला बहुसंख्येने असणारा शेतकरी समृद्धीच्या वाटेवर चालत आहे.

भारताने गेल्या ७५ वर्षात विविध क्षेत्रांत पुष्कळ उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरी केली आहे.मात्र दुर्देवाने गेल्या काही वर्षांपासून या देशात दहशतवादी कारवाया वाढत आहेत, त्याचबरोबर देशाला नैसर्गिक आपत्तींशीही सामना करावा लागतो आहे,त्यातच गेल्या दोन वर्षांपासून कोरोना च्या जागतिक संकटामुळे देशाला आर्थिक दृष्ट्या मोठा फटका बसला आहे,या महामारीमुळे देश महामंदीत जातो की काय,अशी परिस्थिती निर्माण झाली होती, देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात वाटचाल करत असतानाच एकीकडे विविध क्षेत्रांत केलेल्या विकासकामांचा आनंद आहे, तर दुसरीकडे, प्रचंड महागाई, वाढती बेकारी आणि बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, चीनसारख्या शेजारच्या देशांच्या कुरघोड्या, दहशतवादी कारवाया, यासारख्या अनेक नैसर्गिक व मानवी संकटांमुळे देशाला आर्थिक व सामाजिक दृष्ट्या पिछेहाट होते की काय अशी शंका निर्माण होत आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा कणखर बाणा दाखवून आपल्या देशात शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळवले आहे, तसेच त्यांनी संरक्षण क्षेत्रात देश कठीण परिस्थितीत ही सक्षमपणे सामना करण्यासाठी सज्ज आहे, हे समर्थपणे दाखवून दिले आहे, ही वस्तुस्थिती कुणालाही नाकारता येणार नाही.त्यामुळे आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असतांना काही संकटांशी सामना करीत असलातरी निश्चितच देशवासीयांना भविष्यात कणखर भुमिका निभावण्याची ग्वाही देत आहे, हे नक्कीच मान्य करावे लागेल.

- सुनिल कुमार सरनाईक

भ्रमणध्वनी:९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फ स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget