Halloween Costume ideas 2015

साधनसंपत्ती अल्लाहची देणगी आहे


माणसाकडे अमाप संपत्ती एकवटली तर मग त्यापासून अपराधी वृत्ती जन्माला येते. एक तर लुबाडून सार्वजनिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवणे, गडगंज संपत्ती गोळा करणे याला कोणतीही मर्यादा नसते. पवित्र कुरआनात म्हटले आहे की, अशा प्रवृत्तीचे लोक एकमेकांच्या पुढे जाण्यात कोणत्याही नैतिक नियमांचे पालन करत नसतात आणि धनसंपत्ती बाळगण्यात ते एकमेकांशी वैरभाव करतात. असे लोक स्वतःला आणि इतरांनादेखील कबरीपर्यंत पोहोचविल्याशिवाय राहात नाहीत. मोजक्या लोकांकडे संपत्तीची सर्व साधने एकवटल्यास साहजिकच वंचितांचा त्यांच्याविरूद्ध द्वेषभाव निर्माण होतो. आधुनिक विचारवंतांच्या दृष्टीनेदेखील समाजामध्ये काही उणिवा असतात. वंशवाद, पिळवणूक, नैसर्गिक साधनांची असमान वाटणी यामुळे समाजात आंतरिक कलह निर्माण होतो. पण या विचारवंतांकडे या उणिवांवर मात करण्याची विचारधारा नसते. म्हणून अशा संपन्नवर्गाविरूद्ध समाजामध्ये वैरभाव निर्माण होतो. पुढे जाऊन सामाजिक बंड होतात. जगात जिकडेतिकडे अनाचार माजलेले आपण पाहात आहोत ते याच कारणामुळे, पण सत्ताधारीवर्ग यावर युद्धाचे, आतंकवादाचे आवरण चढवितात. पवित्र कुरआनच्या शिकवणी फक्त गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांच्या सुधारासाठीच नाहीत. अल्लाहने प्रेषित पाठवून साऱ्या मानवजातीला गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याची ताकीद दिली. पवित्र कुरआनात म्हटले आहे की अल्लाहने जर माणसाला विपुल साधने दिली असती तर त्यांनी धरतीवर बंड माजवले असते. ज्यांना अल्लाहने विपुल प्रमाणात दिले आहे त्यांनी त्या साधनसंपत्तीचा लोककल्याणासाठी वापर करावा. हे त्यांच्यावर बंधनकारक आहे. नुसते दानधर्म नाही. कारण त्यांनी हे स्वतः कमवलेले नसून तो अल्लाहचा वारसा आहे. म्हणून साऱ्या मानवांचा त्यावर हक्काधिकार आहे. (पवित्र कुरआन – ४२, ३०, ५०)

-०-०-०-

नैराश्याला थारा नको

प्रेषित मुहम्मद (स.) यांची शिकवण आहे की, जर तुमच्या समोर प्रलय येऊलागला आणि आता काही क्षणांतच हे जग संपून जाणार आहे, जगाची शेवटची घटिका समोर येताना दिसत आहे. आणि अशा वेळी जर तुमच्या हातात एखाद्या फळझाडाचे रोपटे असेल तर ते लावून टाका, ते फेकून देऊ नका. घाबरून जाऊ नका. तुम्ही जे कार्य हाती घेतलेले आहे ते पूर्ण करा.

प्रेषितांनी असे सांगितले नाही की आता या भीतीच्या वातावरणात तुम्ही काय करू शकता, शेवटची घटिका समोर दिसत आहे, आता एखाद्या झाडाचे रोपटे लावल्याने काय होणार आहे, कितीतरी वर्षे लागतील त्याला फळे यायला. आता काही क्षणांतच सर्व काही संपून जाणार आहे. तुम्ही फक्त ईश्वराच्या नावाचे स्मरण करा. सर्व काही सोडून द्या. प्रेषित म्हणाले, तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा. बाकी त्या झाडाचे काय होणार याची काळजी करणे तुमचे काम नाही.

मानवी जीवनात झाडाचे काय आणि किती महत्त्व आहे हे सर्वांना माहीत आहे. झाड लावणे म्हणजे माणसाने स्वतःचे जीवन दान देण्यासारखे आहे. जगाचा शेवट समोर दिसत असताना देखील प्रेषितांनी अशी शिकवण दिली की तुम्ही आपल्या जगण्याची इच्छा सोडता कामा नये. पुढे काय होणार हे तुमच्या सकारात्मक क्रियाशक्तीवर अवलंबून आहे. जी काही आपत्ती कोसळणार आहे ती कोसळणारच, पण तिच्या कोसळण्याआधीच तुम्ही निराश होता कामा नये. शेवटपर्यंत संघर्ष करा. जगातले सर्व अडथळे, कठीण प्रसंग आणि नैराश्य माणसाच्या इच्छाशक्तीसमोर काहीच नसतात. या शिकवणीत प्रेषितांना हेच सांगायचे आहे की आणखी इच्छाशक्ती ढळू देऊ नका. समोर डोंगरासारख्या समस्या असल्या, शत्रुंचे बलाढ्य सैन्य असले तरी घाबरण्याचे कारण नाही. आपण प्रयत्न केलेच पाहिजेत, कारण जे काही माणसाला लाभते ते प्रयत्नांती लाभते. समोर उभ्या असलेल्या आव्हानांना तोंड दिल्याशिवाय आपले ध्येय साधता येत नाही. पक्का विश्वास करून संघर्ष करत राहा. पुढे काय होणार याची काळजी करू नका. अशा विश्वासाने आपण आपल्या हातातील रोपटे जमिनीत लावून टाका, पुढे काय होईल हे पाहणे तुमचे काम नाही.

प्रेषित मुहम्मद (स.) यांना जीवे मारण्याची एक योजना मक्केच्या लोकांनी आखली होती, ती प्रेषितांना कळली. प्रेषित आपले एक अनुयायी अबूबकर (र.) यांना घेऊन मक्केबाहेर एका गुहेत जाऊन लपून बसले होते. इतक्यात मारेकरी त्या गुहेपर्यंत पोहोचले. अबूबकर काहीसे घाबरले. त्यावर प्रेषित त्यांना म्हणाले, “घाबरू नका. दुःखी होऊ नका. ईश्वर आपल्या बाजूने आहे.” त्या मारेकऱ्यांनी इकडेतिकडे पाहिले आणि निघून गेले.

- सय्यद इफ्तिखार अहमद

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget