जुन्या काळात एकमेकांच्या राज्यातील धर्मस्थळं उद्ध्वस्त केली जायची, मग ती आपली असोत की परकी असोत, ते बघितली जात नसत. पेशव्यांनी सप्तश्रृंगीचे मठ उद्ध्वस्त केले होते. औरंगजेबाने गोवळकोंड्यावरील मस्जिद जाळून टाकली होती. अरबस्तानात अब्बासी व उमवी या दोन एकाच धर्माच्या दोन गटात झालेल्या युद्धात चक्क काबागृहाची नासधूस झाली होती. काश्मीरचा एक हिंदू राजा मंदिरातील सोन्या चांदिच्या मुर्त्या तोडून त्यांना वितळवून त्या सरकारी खजिन्यात जमा करायचा. कोषागाराच्या त्या विभागाला त्याने ’देवोत्पादन’ असं नाव दिलं होतं. (संदर्भ: इस्लाम, मुस्लिम आणि देशबांधव, लेखक : अल्लामा युसुफ करज़ावी अबू मसऊद अज़हरी)
कारण युद्धज्वर ही चीजच तशी असते की, त्यामुळे फक्त शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान कसं करू शकतो तेवढंच बघितलं जातं. त्यावेळी त्यांना ती धर्मस्थळं दिसत नसतात तर फक्त शत्रूच्या क्षेत्रातल्या इमारतीच दिसतात, बस्स.
एकमात्र खरं की, एकमेकांच्या क्षेत्रातील धर्मस्थळं उद्ध्वस्त केल्यानंतर त्याजागी दुसऱ्या धर्माच्या धर्मस्थळांची उभारणी केल्याचं एकही अधिकृत उदाहरण सापडत नाही. पण ’फोडा आणि राज्य करा’ म्हणून तेढ निर्माण करण्यासाठी इंग्रजांनी मुद्दामहून त्यांच्या गजेटियरमध्ये तशा काही खोट्या नोंदी केल्या, ती गोष्ट वेगळी. पण अगदी अयोध्येच्या निकालातही मंदिर पाडून मस्जिद बांधल्याचं स्वीकारलेलं नाहिये, हे विशेष.
मंदिरं पाडल्यानंतर दुसरीकडे मस्जिद बनवतांना मात्र मस्जिदनिर्मितीची काही पथ्ये पाळली गेली नाही, हे मात्र खरंय. मुस्लिम हे त्यावेळी देखील अल्पसंख्यांकच होते. म्हणून मस्जीदी उभारण्यासाठी त्यांना इथल्याच मुस्लिमेतर बहुजन मजुरांची मदत घेणे क्रमप्राप्त होते. पण इथल्या मुस्लिमांनाच त्यावेळी इस्लामचं पूर्ण ज्ञान नव्हते तर मुस्लिमेतरांना कुठून होईल. अगदी आमच्या लहानपणी खेडेगावातल्या मस्जिदींच्या अंगणात शेणाचा सडा टाकला जायचा, शेणानं मस्जीदी सावरल्या जायच्या, कारण त्या लोकांना माहिती नव्हती की, मस्जीदीत शेण वगैरे गोष्टी चालत नाहीत. कारण इस्लामी साहित्य प्रादेशिक भाषेत तेवढ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हते, जनजागरण करणाऱ्या चळवळी तळागाळापर्यंत पोहोचल्या नव्हत्या. म्हणून मस्जीदी बांधतांना जनावरे, इतर धर्माची चिन्हे असलेले दगड वापरायचे नसतात, हे शरियतचे इस्लामी नियम त्यांना ठाऊक नव्हते. देखरेख करणाऱ्या सुभेदार, सैनिकांचीही तीच गत होती. शासकांनीही इतकं बारीक लक्ष दिलं नाही. म्हणून मजुरांनी शहरात इतर ठिकाणी पडझड झालेल्या किंवा केलेल्या दुसऱ्या धर्मस्थळांचे काही अवशेष मस्जीदींच्या बांधकामासाठी वापरले असण्याचा संभव आहे.
असो, आता पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. जुनी मढी उकरण्यात वेळ दवडण्यात काही अर्थ नाही. या अशा मुद्यांमुळे फक्त भावनिक खेळ मांडून राजकीय बेगमी केली जाऊ शकते. पण या खेळात अनेक तरूणांचे करिअर बरबाद झाले आहे, अनेकांना आतापर्यंत कोर्टाचे खेटे घ्यावे लागत आहेत. याला कुठेतरी पूर्णविराम मिळावा, जुनी मढी किती दिवस उकरायची अन् तोच तो कोळसा किती दिवस उगळायचा? म्हणून ’धर्मस्थळ कायदा 1991’ हा कायदा पारित करण्यात आला होता की, मागं जे काही झालं, नाही झालं, आता पुढे बघायचं आहे, शतकानुशतके मंदिर मस्जिदींसाठी भांडत न बसता मानवी समाजाला प्रगती पथावर न्यायचंय, इन्शाअल्लाह!
- नौशाद उस्मान
Post a Comment