(११९) आणि पथभ्रष्टतेपासून केवळ तेच लोक वाचतील ज्यांच्यावर तुझ्या पालनकर्त्याची कृपा आहे. याच (आवडी व निवडीचे स्वातंत्र्य आणि परीक्षे) साठी तर त्याने त्यांना निर्माण केले होते११६ आणि तुझ्या पालनकर्त्याचे ते वचन पूर्ण झाले जे त्याने प्रतिपादिले होते की मी नरकाला जिन्न आणि माणसे या सर्वांनी भरून टाकीन.
(१२०) आणि हे पैगंबर (स.)! या पैगंबरांच्या गोष्टी ज्या आम्ही तुम्हाला ऐकवीत आहोत, या त्या गोष्टी आहेत ज्यांच्याद्वारे आम्ही तुमचे हृदय बळकट करतो. यांच्याद्वारे तुम्हाला सत्याचे ज्ञान मिळाले आणि श्रद्धावंतांना उपदेश आणि जागृती लाभली.
(१२१) उरले ते लोक जे श्रद्धा ठेवीत नाहीत तर त्यांना सांगून टाका की तुम्ही आपल्या पद्धतीने कार्य करीत राहा आणि आम्ही आपल्या पद्धतीने करीत राहू,
(१२२) परिणामाची तुम्हीदेखील प्रतीक्षा करा आणि आम्हीदेखील प्रतीक्षेत आहोत.
(१२३) आकाशांत आणि पृथ्वीत जे काही लपलेले आहे ते सर्व अल्लाहच्या अधिकारक्षेत्रात आहे. आणि संपूर्ण मामला त्याच्याकडेच रुजू केला जातो. तर हे पैगंबर (स.), तू त्याचीच भक्ती कर आणि त्याच्यावरच विश्वास ठेव, जे काही तुम्ही लोक करीत आहात त्यापासून तुझा पालनकर्ता अनभिज्ञ नाही. ११७
११६) हे त्या शंकेचे उत्तर आहे जे सामान्यता अशा वेळी भाग्याच्या नावाने प्रस्तुत केले जाते. वर पूर्वींच्या राष्ट्राच्या विनाशाचे जे कारण दाखविले आहे त्यावर असा आक्षेप घेतला जाऊ शकतो की सदाचारींची तिथे संख्या अपुरी असणे अथवा नसणे हे अल्लाहच्या इच्छेवरच अवलंबून आहे. मग अशा स्थितीत त्या राष्ट्रांवर आरोप ठेवणे कसे योग्य आहे? अल्लाहने त्या राष्ट्रांत सदाचारी लोक विपुल प्रमाणात जन्माला का घातले नाहीत? उत्तरात सांगितले गेले की अल्लाहची इच्छा मानवाविषयी ही नाही की त्याला नैसगिर्कताच साचेबंद करावे की त्यापासून तो हटलाच जाऊ नये. अल्लाहची ही इच्छा असती तर ईमान धारण करण्याचे आवाहन, पैगंबरांना पाठविले जाणे आणि ग्रंथांचे अवतरण इ. सर्वांची आवश्यकताच काय होती? सर्व माणसं त्याचे आज्ञाधारक आणि ईमानधारकच अल्लाहने जन्माला घातले असते आणि अवज्ञाकारी आणि ईशद्रोहींची संभावनाच निर्माण झाली नसती, परंतु अल्लाहची माणसाविषयी जी इच्छा आहे ती म्हणजे त्याला स्वीकारण्याची आणि निवडण्याची स्वतंत्रता दिली जावी. मनुष्याला आपल्या इच्छेनुसार वेगवेगळ्या मार्गावर चालण्याची शक्ती द्यावी. त्याच्यासमोर स्वर्ग आणि नरक दोन्ही मार्ग स्पष्ट केले जावेत. प्रत्येक माणसाला आणि समाजाला संधी दिली जावी की ज्याला जे हवे त्यावर त्याने चालावे. याचाच अर्थ होतो ज्याने त्याने आपल्या प्रयत्नांचे फळ चाखावे, म्हणून ही योजना ज्याच्यामुळे माणसाला जन्माला घातले गेले आहे त्याला निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि ईशद्रोह आणि ईमानधारक बनणे स्वातंत्र्याच्या नियमांवर आधारित आहे. मग एखादे राष्ट्र स्वत: दुष्टतेच्या मार्गावर प्रगती करू इच्छिते आणि अल्लाहने त्याला जबरदस्तीने भलाईच्या मार्गावर चालवावे, हे कसे शक्य आहे?
११७) म्हणजे कुफ्र (ईशद्रोह) आणि शांती (इस्लाम) या संघर्षातील दोन्ही बाजूने जे प्रयत्न होत आहेत, ते अल्लाहला संपूर्ण माहीत आहे. येथे तत्त्वदशिर्ता, सहनशीलता आणि नम्रतेच्या आधारावर विलंब होतो परंतु अंधार (अन्याय) मुळीच नाही. जे लोक सुधारणा करण्याचा हेतू बाळगून आहेत आणि त्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांनी विश्वास ठेवावा की त्यांचे प्रयत्न वाया जाणार नाहीत. तसेच जे लोक बिघाड करण्यात लागलेले आहेत आणि सुधार कार्य करणाऱ्यांवर ते अत्याचार व अन्याय करतात, त्यांनी आपले सर्व कष्ट यात लावले आहेत की सुधारकार्य कशाप्रकारेही चालू नये. अशा लोकांनासुद्धा खबरदार राहिले पाहिजे की त्यांचे सर्व प्रयत्न अल्लाहला ज्ञात आहे आणि त्यांची शिक्षा त्यांना जरूर भोगावी लागेल.
Post a Comment