Halloween Costume ideas 2015

इमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी कविता

भारतीय समाजाला चौकटीत बंदिस्त करण्याचे काम येथील जातीयता, धर्मांधता, दहशतवाद, भ्रष्टाचार, गरिबी, मूलतत्त्ववाद, चंगळवाद इत्यादी गोष्टींना केले आहे. त्या गोष्टींनी मानवी जीवनातील सौंदर्याचे अपहरणच केल्याचे दिसून येते. या गोष्टींनी समाजात हैदोस घातल्यामुळे समाजाचे अधःपतन होताना दिसत आहे. या गोष्टींनी समाजाला आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या कंगाल करण्याचा चंग बांधला आहे. या गोष्टींनी समाजाचे नैतिक दिवाळे काढले आहे. याचा अर्थ असा की, या गोष्टींनी मानवी जीवनाच्या मूळ सौंदर्याला कुरूप करण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. मूठभर लोकांनी सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील सौंदर्याचे अपहरण करणे म्हणजे सर्वसामान्यांचे शोषण करणे होय, सर्वसामान्यांवर शोषण लादणेच होय. या शोषणाने येथील जीवनाला वेठीस धरले आहे. मूठभर लोकांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सामान्य लोकांना गुलाम करण्यासाठी केलेले हे कृत्य आहे. मूठभर लोक सर्वसामान्य लोकांमध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी द्वेषाचे जहर पसरवित आहेत, दोन धर्मांमध्ये कायम भांडणाची धग पेटत राहावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे मूठभर लोक येथील श्रीमंतांची, भांवडलदारांची, राजकारण्यांची बाजू घेऊन येथील सांस्कृतिक सौहार्दाला कुरूप करण्याचे काम करीत आहेत. या मूठभर लोकांनी या देशात शोषणयंत्रणेचे तत्त्वज्ञान आणि शोषणाची संस्कृती लादली आहे. जेव्हा सामान्य माणसांना याची जाणीव होते तेव्हा गुलामीच्या चौकटी तुटतात. याचा प्रत्यय कवयित्री फरझाना महंमद इकबाल डांगे यांच्या ‘इमान मातीशी’या कवितासंग्रहामधून येतो. ‘इमान मातीशी’हा कवितासंग्रह फर्ज प्रकाशन, कराड, ने 2011 ला प्रकाशित केला आहे. यापूर्वी ‘हुंकार’हा त्यांचा पहिला कवितासंग्रह 2009 मध्ये प्रकाशित झाला आहे. कवयित्री फरझाना डांगे यांच्या दोन्ही कवितासंग्रहांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. कवयित्री फरझाना डांगे या ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’च्या सदस्या आहेत.
आपल्या मातृभूमीशी जोपर्यंत मनुष्य एकजीव होत नाही तोपर्यंत त्यांच्या अस्तित्वाला महत्त्व येत नाही. देशाभिमान असल्याशिवाय माणसांचे अस्तित्वच संभवत नाही. स्वतःचे अस्तित्व आणि देशाभिमान याचे सेंद्रियत्व असल्याशिवाय माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला बहर येत नाही. खरा देशभ्नत हा देशप्रेमाने स्पंदित झालेला असतो. कवयित्री फरझाना डांगे यांच्या ‘इमान मातीशी’या कवितासंग्रहाची दार उघडणारी कविता ‘मातृभूमी’ ही आहे. यावरून कवयित्रीचे मातृभूमीविषयीचे प्रेम दिसून येते.

‘हिचा मान राखणे
श्रेष्ठ कर्तव्य आपले’
(पृ.क्र. 16)

मातृभूमीवरील प्रेम हे असीमच असायला हवे. मातृभूमीवरील प्रेम हे प्रत्येक देशवासियांच्या जीवनाचे मर्म असते म्हणून प्रत्येकाने आपल्या मातृभूमीचा आदर करणे हेच त्याचे कर्तव्य समजायला हवे. प्रत्येक भारतीयाला आपल्या मातृभूमीविषयी असीम आदर असायला हवे. कवयित्री फरझाना डांगे यांच्या वरील ओळी मातृभूमीवरील प्रेमाचे क्षितिज विस्तारणाऱ्या आहेत.

‘काय पाव्हणं कुण्या गावाचं?
 अशी आपुलकीची चौकशी
मराठमोळा माणूसच करतो’
(पृ.क्र. 17)

वरील ओळी महाराष्ट्राच्या लोकप्रिय संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या आहेत. आपुलकीने विचारपूस करणारी मराठी माणसांची ही संस्कृती आहे. महाराष्ट्राच्या मराठी मातीत आदराची मर्मदृष्टी कशी आहे याचा निर्देश कवयित्रीने वरील ओळींमधून केला आहे. ही संस्कृती मानवी नात्यातील वीण घट्ट करणारी आहे. जेव्हा परका माणूस आपुलकीचे शब्द ऐकतो तेव्हा त्याच्या मनात अपार जिव्हाळ्याची शक्ती दाटून येते. नात्याला कवटाळण्याचे बळ अपरिचित माणसाच्या मनात उफाळून येतो. आपुलकीच्या चौकशीमुळे अनोखळी माणसाचे हृदय मोकळे होते आणि एकदा हृदय मोकळे झाले की तो आपल्या हृदयातील अंतरंगच चौकशी करणाऱ्यापुढे उघडे करतो. आपुलकीची जीवनशैली असलेली संस्कृती महाराष्ट्राची आहे याचा अपार गौरव कवयित्रीला आहे.

‘अकराशे वर्षांपूर्वी हिंदुस्थानात
सुफी संतांनी प्रवेश केला
 गावा गावातला माणूस
 मुस्लिमात कन्व्हर्ट झाला’
(पृ.क्र. 23)

सुफी संतांनी या देशात इस्लामचा समतावादी विचार सर्वसामान्य लोकांच्या मनात पेरला. त्यांनी साध्या सोप्या भाषेत इस्लामची शिकवण येथील समाजाला पटवून दिली. येथील कर्मठ धर्मसंकल्पनांना, जातीय श्रेष्ठत्वाचा अंहकाराला, श्रेष्ठ-कनिष्ठाच्या भावनेला समाजातून घालविण्याचे अवघड कार्य सुफींनी केले आहे. येथील समाजाला नीती, सदाचार, त्याग, निष्ठा आणि एकेश्वरवाद या इस्लामच्या तत्त्वाची दीक्षा दिली. समाजाला साधा भ्नतीमार्ग दाखविला. हे सुफी संतांचे मौलिक कार्य आहे. सुफी संतांनी या देशात हिंदू-मुस्लिमांत सांस्कृतिक ऐक्याची भावना निर्माण केली. त्यामुळेच येथील बहुजनवर्ग इस्लामशी जोडला गेला याचे मार्मिक विश्लेषण कवयित्रीने वरील ओळींमधून केले आहे.
 
‘मी मोठा, जात मोठी
तू दलित मी कुलीन
तू गरीब मी श्रीमंत
करत एकमेकांना
तुडवायचं’
(पृ.क्र. 34)

वरील ओळींमधील आशय येथील लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणारा आहे. श्रेष्ठ-कनिष्ठाच्या स्तोमाने समाजा-समाजामध्ये मनभेद आणि मतभेद निर्माण केले आहे. या मागे येथील प्रतिगामी शक्ती उभी आहे. या प्रतिगामी शक्तीने भांडवलशाहीला बळ दिले आहे. या प्रतिगामी शक्तीने सर्वसामान्यांचे शोषण करणारी अर्थव्यवस्था उभी केली आहे. या भेदामुळे मानवी समाज कोलमडून पडतो आहे. मानवी समाजापुढे निर्माण झालेल्या संकटांशी लढण्याचे बळ सर्वसामान्यांना मिळेल अशी ऊर्जा कवयित्री फरझाना डांगे यांच्या वरील ओळी देतात. समाजामध्ये आज जातिभेदाची, वर्णभेदाची जी उतरंड निर्माण करण्यात आली आहे. ही उतरंड समाजाच्या विकासात अवरोध निर्माण करणारी आहे. जर विकासाचा गाडा पुढे न्यायचा असेल तर ही उतरंडच नष्ट करावी लागेल ही स्पष्ट भूमिका कवयित्री फरझाना डांगे यांनी घेतली आहे.
 
‘पुढे काय होईल या विचाराने
बुद्धीच काम करेनाशी झाली
 सारे भारतीय बांधव जरी
 बेबंदशाहीला आवर घाला तरी’
(पृ.क्र. 74)

आज देशामध्ये विपरीत परिस्थिती पाहायला मिळते. कवयित्रीला सभोवतालच्या पर्यावरणातील चढउतार स्पष्ट दिसतात. आज तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाताना दिसते आहे. पोलीस यंत्रणा वसुलीत दंग आहे. सरकारी अधिकारी राजकारण्यांच्या हाताखालचे बाहुले बनले आहे. या बेबंदशाहीमध्ये शोषितांची आक्रंदने कवयित्रीला अस्वस्थ करणारी आहेत. या बेबंदशाहीच्या मानसशास्त्राला सर्व भारतीयांनी नष्ट करायला हवे.
कवयित्री फरझाना डांगे यांच्या ‘इमान मातीशी’या कवितासंग्रहात ‘बळीराजा’, ‘विळखा’ आणि ‘खंत’या तीन कविता शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे अत्यंत भेदक चित्रण करणाऱ्या आहेत. या कवितांमधून कवयित्रीने शेतकऱ्यांना मारक ठरणाऱ्या गोष्टींचा लेखाजोखा मांडला आहे. हा लेखाजोखा शेतकऱ्याच्या जीवनाशी केलेल्या बेइमानीचा आहे. याचा अर्थ असा की शेतकऱ्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडींवर कवयित्रीची सजग नजर आहे. देशाच्या पोशिंद्यालाच येथे राजरोषपणे फसविले जात आहे याविषयीची खंत कवयित्रीने व्यक्त केली आहे.
‘आत्महत्येने का सुटतो प्रश्न? सुटतो सारा पसारा
बायको पोरांना कोण देईल? हक्काचा निवारा
 मढ्यावरच्या लोण्यावर ‘भ्रष्ट’करतील रे मजा
शेतकरी दादा ही कसली रे सजा...’ (पृ.क्र. 25)
शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी कोणी आणली? शेतकऱ्यांच्या आत्महत्येने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील का? कवयित्रीचे हे प्रश्न अंतर्मुख करणारे आहेत. कवयित्री म्हणते शेतकरी दादा तुझ्या आत्महत्त्येने तुझा संसार उघड्यावर येईल. तुझ्या आत्महत्येमुळे तुझ्या लेकरांची आभाळ होईल. येथील भ्रष्ट यंत्रणा तुझ्या आत्महत्येचाही लाभ घेण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही. म्हणून तू आत्महत्या न करता तुला उद्ध्वस्त करणाऱ्यांच्याच विरोधात विद्रोह कर. शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्यांच्या विरोधात बंड करणे हीच क्रांती ठरेल.

कवी आणि कविताविषयक भूमिका
कवियित्री फरझाना डांगे यांच्या ‘इमान मातीशी’या कवितासंग्रहात ‘कवीची अमानत’, ‘फिनिक्स’, ‘स्वमत’ आणि ‘तळमळ’या चार कविता, कवी आणि कवितेची भूमिका विशद करणाऱ्या आहेत. आजच्या धकाधकीच्या काळात पर्यायी दुनियेची सफर कवी आणि त्याची कविता मानवी जीवनाला करायला लावते. कवी हा त्याच्यावर कितीही संकटे कोसळली तरी तो पराभूतपणे वागत नाही कारण त्याची कविता त्याला पराभूत होऊ देत नाही. कवीने पराभूत होणे त्याच्या कवितेला मान्य नसते. कवी हा स्वतःबरोबरच इतरांचेही दुःख वाचतो. इतरांना झालेल्या जखमांनी तो स्वतः रक्तबंबाळ होतो. तो विषमतावादी व्यवस्थेत थेट हस्तक्षेप करीत असतो. त्याचे हस्तक्षेप मानवी उत्थानासाठीच असते. तो दुनियेतील अंतर्बाह्य स्पंदने टिपत असतो. तो सृष्टीची नवनिर्मितीच करीत असतो याची जाणीव कवयित्री फरझाना डांगे यांच्या वरील चारही कवितांमधून होते.
 
‘आमच्यामुळे तर दुनिया ही
गाते आणि गुणगुणते’
(पृ.क्र. 43)

मानवी जीवन सुंदर आहे. याची जाणीव कवी माणसांना करून देतो. कवी आपल्या शब्दसामर्थ्याने इष्ट काय अनिष्ट काय हे आस्वादकांना सांगत असतो. तो मानवी जीवनाचे मर्म आस्वादकांना सांगतो. तो मानवी जीवनाला विद्रूप करणारा आशय जाळतो. तो मानवी जीवनातील उजेडाचे दिग्दर्शन करतो म्हणजे तो मानवी जीवनाचे सौंदर्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करतो. ही ठाम भूमिका कवयित्रीने मांडली आहे.
 
‘दुःखावर फुंकर घालणारी
वास्तवाचे भान देणारी
 उत्स्फूर्त-स्फूर्तिदायक ठरावी
 कविता अशी असावी’
(पृ.क्र. 81)

कविता कशी असावी याचे सुंदर विवेचन वरील ओळींमधून कवयित्रीने केले आहे. शोषित, वंचितासाठी बाणेदारपणे कवितेने आंदोलन करावे. शोषित, वंचिताचा दुःखाच्या विरोधात कवितेने युद्धात उतरून पर्यायी सृष्टी निर्माण करण्याची भूमिका घ्यावी. ही भूमिका कवितेची प्रकृती आणि कृती असावी. शोषित, पीडितांचे माणूसपण टिकविण्याची जिद्द कवितेत असावी. शोषित पीडित माणूस विस्कटून जाऊ नये म्हणून घेतलेली भूमिकाच कवितेचे सौंदर्य असते. शोषणविहीन समाजासाठी करुणेचे चांदणे निर्माण करणारी आणि सूर्यस्वभावाचा उजेड वाटणारी कविता असावी. कवितेची भूमिका शोषितांना गुलामीच्या तुरुंगातून सोडविणारी असावी. अशा कवितेच्या निर्मितीसाठी कवांनी आपला बौद्धिक कस लावावा ही अपेक्षा कवयित्रीने कवींकडून केली आहे.
‘इमान मातीशी’हा कवितासंग्रहात मला तीन महत्त्वाच्या गोष्टींचा प्रकर्षाने जाणवल्या. पहिली गोष्ट म्हणजे ज्या जन्मभूमीत कवयित्रीने जन्म घेतला त्या जन्मभूमीविषयीचे ओतप्रोत प्रेम कवयित्रीने आपल्या कवितेमधून व्य्नत केले आहे. कवयित्री आपल्या अस्तित्वाची नीजखूण आपल्या जन्मभूमीला मानते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जन्मभूमीच्या सांस्कृतिक पर्यावरणात जे बेबंदशाहीचे तण वाढले आहे. त्या तणाला उपटून फेकण्यासाठी सर्वच परिवर्तनवाद्यांना कवयित्री आपल्या कवितांमधून एकत्रित येण्याचे आव्हान करते. तिसरी गोष्ट म्हणजे कवयित्रीने येथील वास्तव जीवनातील अनुभवाचे निर्भयपणे केलेले प्रकटीकरण. या तिन्ही गोष्टींमुळे ‘इमान मातीशी’ या कवितासंग्रहातील आशय हा सश्नतपणे प्रकट झाला आहे. कवयित्री फरझाना डांगे यांच्या पुढील दमदार काव्यप्रवासाठी हार्दिक शुभेच्छा.

-डॉ. अक्रम. ह. पठाण
अंजूमन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,
सदर, नागपूर.
भ्रमणभाष : 8600699086
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget