Halloween Costume ideas 2015

नवयुगाचे प्रणेते : महात्मा ज्योतिराव फुले


गुलामगिरी, जातिभेद, वर्णभेद या सारख्या समाजविघातक प्रवृत्तीचा मुळापासून बीमोड करण्यासाठी, तसेच हरिजन, भटके विमुक्त, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विधवा तसेच परित्यक्ता स्त्रीयांना न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले आयुष्याच्या अंतापर्यंत प्रखरपणे निकराने लढले. सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी त्यांनी केवळ विचार मांडून थांबले नाहीत तर त्यांनी कृतीशील बंड केले. बहुजनांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, शिक्षणाअभावी या देशातील फार मोठा वर्ग आडला, नाडला व शोषला जातो आहे, हे त्यांच्या चाणाक्षबुद्धीने हेरले होते, यावर जालीम उपाय म्हणजे बहुजन समाज शिकून शहाणा झाला पाहिजे, आपले हित अहित त्यालाच स्वतःला समजले पाहिजे, शेटजी आणि भटजी त्याची फसवणूक व पिळवणूक तसेच नाडवणूक करीत होते, त्यामुळे बहुजन समाज अज्ञान, अंधश्रद्धा तसेच अंधारात पुरता बुडला होता. अठरा विश्व दारिद्र्याच्या फेऱ्यात तो गुरफटलेला होता.हे सर्व वास्तव पाहून  शिक्षणाचे महत्त्व त्यांनी आपल्या अर्थपूर्ण अशा रचनेत मांडले. ती रचना बहुजनांच्या उध्दाराचा आता संपूर्ण जगभरात महामंत्र झाली आहे. ती म्हणजे...

विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेलीं !

नीती विना गती गेली, गतीविना वित्त गेले !

वित्ताविना शूद्र खचले,!!

इतके सारे अनर्थ... एका अविद्येने केले....

ज्योतिराव फुले यांनी पुण्यासारख्या अत्यंत कर्मठ आणि सनातन विचारांचे प्राबल्य असलेल्या शहरात पहीली मुलींची शाळा काढून स्त्री शिक्षणाचे एक नवे पर्व सुरु केले. पुण्याच्या भिडे वाड्यात सुरू केलेली ही शाळा भारतातली पहिली मुलींची शाळा म्हणून ती गणली जाते. बारा वर्षांखालील मुला-मुलींना मोफत शिक्षण द्यावें अशी आग्रही मागणी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे केली होती. त्यांनी स्वत:च्या पत्नीला, सावित्रीबाईना सर्वप्रथम शिक्षित केले. आपले मित्र उस्मान शेख यांची बहीण फातिमा शेख यांनीही सावित्रीबाई फुले यांच्यासोबत अहमदनगर येथील मिशनरी शाळेत शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले होते. फातिमा शेख आणि सावित्रीबाई यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांना आपल्या मुलींना शिकवण्याची प्रेरणा दिली. फातिमा शेख यांनी फुले दाम्पत्याकडून होत असलेल्या बहुतांश कामांना पाठिंबा दिला. "जिच्या हातात पाळण्याची दोरी, ती राष्ट्राला उध्दारी" या शब्दात स्त्रीवर्गाचा गौरव केला. समाजातील तळागाळातील लोकांच्यामध्ये आपल्या हक्काची जाणीव व्हावी, यासाठी त्यांनी 'गुलामगिरी' हे पुस्तक लिहिले. बहुजन समाजात शैक्षणिक व सामाजिक विकास घडविण्यासाठी जनजागृती केली, शिक्षणाच्या प्रसारासाठी संस्था काढल्या. कोणताही माणूस जन्माने अथवा जातीने श्रेष्ठ-कनिष्ठ नसून तो आपल्या कर्तृत्वाने लहान-मोठा ठरत असतो, हा विचार त्यांनी सर्वश्रृत केला. सामाजिक व आर्थिक विषमतेवर उभारलेली समाजव्यवस्था मोडून त्या जागी समतेवर आधारलेली नवसमाज निर्मिती व्हावी, या मुख्य उद्देशाने त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्योतिराव फुले हे लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते होते. लोकशाही ही जीवनप्रणाली व्हावी, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, मालक-मजूर ही मांडणी केवळ लोकशाही प्रणालीच बदलू शकते, यांवर त्यांचा विश्वास होता. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा, समाज परिवर्तन, न्यायाधिष्ठित समाजनिर्मिती या गोष्टी लोकशाहीतच घडू शकतात,यात कोणालाही अमर्याद स्वातंत्र्य नसते, सर्व स्त्री-पुरूष, नागरिक कायद्यापुढे समान असतात, असे ते म्हणत.

शेतकऱ्यांना दिलासा व त्यांचा सर्वांगीण विकास तसेच त्यांच्या मुला-मुलींना सक्तीचे शिक्षण यांवर त्यांनी लिहिलेले 'शेतकऱ्यांचा आसूड' हे पुस्तक आजही शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहे. शेतमालाला योग्य भाव न दिल्याने शेतकऱ्यांचे कसे आर्थिक शोषण होते, हे त्यांनी सरकारला दाखवून दिले. तसेच शेतकरी सावकाराच्या तावडीतून मुक्त व्हावा यासाठी त्यांनी सावकाराच्या विरोधात आवाज उठवला. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊ लागलेल्या होत्या, यासाठी त्यांनी सरकारला 'ॲग्रीकल्चरल रिलीफ ॲक्ट' संमत करण्यास भाग पाडले. शेतकऱ्यांचे ते खरे कैवारी होते.

कामगारांच्या अस्मितेला त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. मूठभर भांडवलदारांच्या विरोधात संघटीत लढा देण्यासाठी व मानसिकदृष्ट्या सक्षम आणि कणखर केले. जोतीराव फुले हे आद्य महात्मा होत. ते भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक, स्त्री स्वातंत्र्याचे आणि हक्काचे उद्गाते, शेतकरी व कामगारांच्या दु:खाचे व दारिद्र्याचे निर्मूलन करणारे पहिले पुढारी होत. चातुर्वर्ण्य व्यवस्था, जातीभेदाच्या भक्कम भिंती व स्पृश्य-अस्पृश्य हा भेद यावर कडाडून हल्ला करणारे पहिले क्रांतीपुरुष होत. तसेच मानवी समानतेची शिकवण देणारे पहिले लोकनेते होत. भारतीय समाज क्रांतीचे जनक आणि भारतातल्या सामान्य जनतेच्या नवयुगाचे प्रणेते असा त्यांचा उल्लेख विचारवंतांनी व समाज शास्त्रज्ञांनी केला आहे, तो सार्थच आहे. 

- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२


(लेखक भारत सरकारच्या वतीने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित असून ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget