Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(६१) आणि जेव्हा त्यांना सांगितले जाते की या, त्या गोष्टीकडे जी अल्लाहने अवतरली आहे आणि या, पैगंबराकडे तेव्हा तुम्ही या दांभिकांना पाहाता की हे तुमच्याकडे येण्याचे टाळतात.९२
(६२) मग तेव्हा काय होते जेव्हा यांनी स्वहस्ते ओढवून घेतलेले संकट यांच्यावर कोसळते? त्या वेळेस हे तुमच्याजवळ शपथा घेत येतात९३ आणि सांगतात की ईश्वराची शपथ, आम्ही  तर केवळ भले इच्छित होतो आणि आमची मनिषा तर अशी होती की उभयपक्षात कोणत्या न कोणत्या प्रकारे समेट व्हावा.
(६३) अल्लाह जाणतो जे काही यांच्या मनांत आहे, यांच्याकडे लक्ष देऊ नका. यांची समजूत घाला व असा उपदेश द्या जो यांच्या अंत:करणात उतरावा.
(६४) (यांना सांगा की) आम्ही जो कोणी पैगंबर पाठविला आहे. याकरिताच पाठविला की अल्लाहच्या आदेशांच्या आधारावर त्याची आज्ञा पाळली जावी.९४ जर यांनी ही पद्धत  अंगीकारिली असती की जेव्हा हे स्वत:वर अत्याचार करून बसले होते तेव्हा तुमच्यापाशी आले असते आणि अल्लाहजवळ क्षमायाचना केली असती आणि पैगंबरांनीदेखील माफीची  दरखास्त केली असती, तर नि:संशय अल्लाह यांना क्षमा करणारा व कृपा करणारा आढळला असता.
(६५) नाही, हे मुहम्मद (स.)! तुमच्या पालनकर्त्याची शपथ, हे कधीही श्रद्धावंत होऊ शकत नाहीत, जोपर्यंत आपल्या वादग्रस्त प्रश्नात हे तुम्हाला निर्णय देणारा मान्य करीत नाहीत.  मग जो काही निर्णय तुम्ही द्याल त्यावर आपल्या मनांतदेखील काही संकोच वाटू नये तर पूर्णत: मान्य करावे.९५
(६६) जर आम्ही यांना आज्ञा दिली असती की आत्मघात करा अथवा आपल्या घरातून निघून जा तर यांच्यापैकी थोड्याच लोकांनी त्याची अंमलबजावणी केली असती.९६ वास्तविक  पाहाता जो उपदेश यांना दिला जात आहे जर यांनी ते अमलात आणले असते तर हे यांच्यासाठी अधिक हितकारक व अधिक दृढतेचे कारण बनले असते.९७
(६७) आणि जेव्हा यांनी असे केले असते तर आम्ही यांना आपल्याकडून फार मोठा मोबदला दिला असता.
(६८) आणि यांना सरळमार्ग दाखविला असता.९८

९२) यावरून माहीत होते की पाखंडी आणि दांभिक लोकांचे हे नित्याचे आचरण होते. ज्या दाव्यामध्ये त्यांना होण्याची आशा असते. आशा होती, की निर्णय त्यांच्याच बाजूने होणार;  त्यांना पैगंबर मुहम्मद (स.) यांचेकड घेऊन येत. परंतु ज्या दाव्याचा निर्णय त्यांच्या बाजूने न लागण्याचा त्यांना संशय असायचा असे दावे ते पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे नेत नसत. हीच दशा आजसुद्धा दांभिक लोकांची आहे. असे लोक ईमान असण्याचा डिंडोरा तर पिटतात. शरीयतचा निर्णय त्यांच्या बाजूने झाल्यास उतम. नाहीतर त्या प्रत्येक कायद्याच्या  नियमांच्या आणि परंपरेच्या आणि न्यायालयाच्या आश्रयाला जावून पडतात ज्यापासून त्यांना आपल्या इच्छेनुसार निर्णय.
९३) तात्पर्य हे आहे की त्यांची पाखंडी वागणूक मुस्लिम लोक जाणून घेतात आणि त्या पाखंडीना जाब विचारण्याची व शिक्षेची भीती वाटू लागते म्हणून ते शपथावर शपथी खाऊन  आम्ही खरे ईमानवाले (श्रद्धावंत) आहोत असे पटविण्याचे प्रयत्न करतात.
९४) म्हणजे अल्लाहकडून पैगंबर येतो फक्त यासाठी नव्हे की त्याच्या पैगंबरत्वावर ईमान धारण करावे आणि यानंतर आज्ञापालन कुणाचेही करीत फिरावे (परंतु असे नाहीये) परंतु  पैगंबर आगमनाचा उद्देश हाच असतो की त्याने जी जीवनप्रणाली आणि तिची कायदेसंहिता आणली आहे; त्यासाठी इतर सर्व जीवनप्रणालींना आणि कायद्यांना झुगारून देऊन फक्त  त्याचेच आचरण व्हावे. पैगंबराने अल्लाहकडून जो आदेश आणला, त्यासाठी इतर सर्व आदेशांना पायाखाली तुडवून त्याच आदेशाचे पालन व्हावे. जर असे कोणी केले नाही तर त्याचे पैगंबरांना पैगंबर मानने निरर्थक आहे.
९५) या आयतीचा आदेश फक्त पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनापुरताच लागू होत नाही तर सर्व जगवासीयांसाठी अंतिम दिनापर्यंत (कयामत) आहे जे काही अल्लाहकडून पैगंबर  मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित झाले आहे आणि अल्लाहच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी त्यानुसार स्वत: जीवनव्यवहार पार पाडले, (पैगंबरप्रणाली) ते सदासर्वदा मुस्लिमांसाठी निर्णायक  प्रमाण आहे. याच प्रमाणास मानणे अथवा न मानणे यावर ईमानधारक होणे न होणे अवलंबून आहे. हदीसकथन आहे, ``तुमच्यापैकी तोपर्यंत कोणी मोमीन होऊ शकत नाही जोपर्यंत त्याची मनोकामना त्या पद्धतीनुसार होत नाही ज्याला मी घेऊन आलो आहे.''
९६) म्हणजे त्यांची ही स्थिती आहे की शरीयतवर आचरण करण्याने ते थोडेसे नुकसान किंवा थोडेसे कष्टसुद्धा सहन करू शकत नाही तर त्यांच्याशी मोठ्या त्यागाची अपेक्षा करणे व्यर्थ  आहे. घरदार सोडणे व प्राणपर्ण करण्याची मागणी त्यांच्याशी केली तर त्वरित दूर पळतील आणि ईमान आणि आज्ञापालन करण्याऐवजी अवज्ञा आणि द्रोह करू लागतील.
९७) म्हणजे हे लोक संशय, संकोच सोडून एकाग्रतेने पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आज्ञापालन आणि अनुकरणावर कायम राहतील व धरसोड केली नाही तर त्यांचे जीवन  अनिश्चिततेपासून सुरक्षित असते. यांचे विचार, आचार आणि चरित्र सर्व एक स्थायी, शाश्वत व मजबूत आधारावर स्थापित झालेले असते. त्याना ती समृद्धी प्राप्त् झाली असती जी  एका सरळमार्गावर दृढतेने चालल्यास प्राप्त् होते. ज्याची वृत्ती धरसोडीची आणि संकोचपूर्ण आहे तो तर कधी या मार्गावर तर कधी दुसऱ्यामार्गावर चालतो आणि त्याला आत्मिक  समाधान मिळतच नाही. त्याचे संपूर्ण जीवन पाण्यावर बनविलेल्या चित्राप्रमाणे असते आणि त्याच्या संपूर्ण जीवनाची धडपड व्यर्थ ठरते.
९८) म्हणजे जेव्हा ते संशय सोडून ईमान आणि दृढतेसह पैगंबर आज्ञापालनाचा निर्णय घेतात तेव्हा अल्लाहच्या मेहरबानीने त्यांच्या समोर प्रयत्न आणि व्यवहाराचा तो सरळमार्ग  अगदी स्पष्ट होतो. त्यांना स्पष्ट कळून येते की आपले श्रम, शक्ती आणि वेळ कोणत्या मार्गावर लावावेत. ज्यामुळे त्यांचे प्रत्येक पाऊल आपल्या वास्तविक ध्येयाकडे उठते.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget